विजेपासून सुरक्षित राहण्यासाठी उपाययोजनेचा अवलंब करा; जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांचे आवाहन

 

विजेपासून सुरक्षित राहण्यासाठी उपाययोजनेचा अवलंब करा; जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांचे आवाहन

 

बुलडाणा, (जिमाका) दि. 3 : राज्यात सध्या अवकाळी पावसाचे आणि वादळी वाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे आणि यामुळे वीज पडण्याच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. मान्सूनपूर्व काळात, विशेषत: शेतीच्या कामांच्या वेळी, वीज पडण्याचा धोका अधिक असतो आणि यामुळे पशुधनाची हानी होण्याची शक्यता वाढते. त्याकरिता जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी जिवीतहानी, प्राणहानी व वित्तहानी टाळण्याच्या दृष्टीने सजग राहून उपाययोजनाचा अवलंब करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.

 

वीज पडण्याची कारणे : ढगांमधील पाण्याच्या थेंबांचे आणि बर्फाच्या कणांचे घर्षण होऊन सकारात्मक आणि नकारात्मक विद्युत भार निर्माण होतो.  ढग आणि जमीन यांच्यातील विद्युत भाराचे अंतर वाढल्याने एक शक्तिशाली विद्युत क्षेत्र तयार होते. जेव्हा हे क्षेत्र हवेच्या प्रतिकारापेक्षा अधिक होते, तेव्हा वीज जमिनीवर कोसळते. उष्ण आणि दमट हवामान ढगांची जलद निर्मिती करते, ज्यामुळे विद्युत भार लवकर वाढतो. उंच झाडे, पर्वत किंवा धातूच्या वस्तू वीज आकर्षित करू शकतात.

 

विजा चमकत असताना किंवा वादळी परिस्थिती निर्माण झाल्यास अशावेळी काय करावे व काय करु नये यासंदर्भांतील सूचनाचे नागरिकांनी पालन करावे.

 

पूर्वतयारी : आपल्या भागातील स्थानिक हवामान विषयी अंदाजाची व सतर्कतेच्या माहितीचे निरीक्षण करावे.  स्वतःसाठी व कुटुंबासाठी वज्राघाताच्या आपत्कालीन परिस्थितीत वैद्यकीय सेवेसंदर्भात तसेच स्थानिक यंत्रणांशी संपर्कात राहावे. वैद्यकीय व स्थानिक आपत्कालीन सेवांचे संपर्क तपशील तयार करावे.जर गडगडाटी वादळाचा, अतिवेगाने वाहणाऱ्या वादळी वाऱ्याचा अंदाज असेल तर घराबाहेरील क्रिया पुढे ढकलणे. विजेवर चालणाऱ्या वस्तू, इलेक्ट्रिक व इलेक्ट्रिकल वस्तू आणि वातानुकूलित यंत्रे बंद ठेवण्यात यावीत. आपल्या घराच्या आजूबाजूची वाळलेली झाडे किंवा फांद्या काढून टाकावे.

 

घरात असल्यास उपाययोजना: वायरद्वारे जोडले गेलेले फोन, मोबाईल व इतर इलेक्ट्रिक, इलेक्ट्रिकल उपकरणे विद्युत जोडणीस लावू नये. गडगडीच्या वादळ दरम्यान व विजा चमकतांना कोणत्याही विद्युत उपकरणाचा वापर करू नका.   या दरम्यान अंघोळ करणे, हात धुणे, भांडी धुणे, कपडे धुणे, ही कार्य करू नये, प्रवाहकीय पृष्ठभागाशी संपर्क टाळावा.

 

घराबाहेर असल्यास : त्वरित सुरक्षित निवाऱ्याच्या ठिकाणाकडे (मजबूत इमारतीकडे) प्रस्थान करावे, शेतीची अवजारे, मोटार सायकल व इतर वाहने यांच्या पासून दूर रहा, गाडी चालवत असल्यास, सुरक्षित स्थळी जाण्याचा प्रयत्न करा व गाडी सुरक्षित ठिकाणी लावताना मोठ्या झाडापासून तसेच पुराचे पाणी येत असल्यास अशी ठिकाणे वगळून लावावीत. उघड्यावर असल्यास, शेवटचा पर्याय म्हणून लगेच गुडघ्यावर बसून हाताने आपले कान झाकावे व आपले डोके दोन्ही गुडघ्यांच्या मध्ये झाकावे, जमिनीशी कमीत कमी संपर्क असावा, मोकळ्या तसेच लटकत्या विद्युत तारांपासून दूर रहावे, जंगलामध्ये दाट लहान झाडाखाली, उताराच्या जागेवर निवारा घ्यावा, इतर खुल्या जागेवर दरीसारख्या खोल जागेवर जाण्याचा प्रयत्न करावे.

 

वज्राघात झाल्यास उपाययोजना : त्वरित रुग्णवाहिका व वैद्यकीय मदत बोलवा, वज्राघात बाधित व्यक्तीस त्वरित वैद्यकीय मदत मिळवून द्या. श्वसन बंद असल्यास तोंडावाटे पुनरुत्थान (Mouth-to-Mouth) प्रक्रिया राबवावी. हृदयाचे ठोके बंद असल्यास कुठलीही वैद्यकीय मदत मिळेपर्यंत रुग्णाची हृदय गती CPR चा वापर करून सुरू ठेवावा.

मोबाईल अॅप्सचा वापर करा : पावसादरम्यान आणि वीज चमकत असताना घराबाहेर जाणे टाळा. स्वतःच्या आणि आपल्या मालमत्तेच्या सुरक्षेसाठी खालील मोबाईल अॅप्सचा वापर करावा. 

दामिनी अॅप- वीज पडण्याच्या घटनांपासून संरक्षण करण्यासाठी उपयोगी.

मेघदूत अॅप - हवामान आधारित शेती व्यवस्थापनासाठी शेतकऱ्यांसाठी उपयुक्त.

सचेत अॅप - आपल्या स्थानानुसार आपत्तीपूर्व सूचना मिळवण्यासाठी मदत करते.

भुकंप अॅप: भूकंप होण्यापूर्वी सूचना देणारे अॅप.

आपत्तीजन्य परिस्थिती टाळण्यासाठी व सुरक्षित राहण्यासाठी वरील अॅप्स आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून त्यांचा वापर करावा. सर्व नागरिक व शेतकऱ्यांनी सजग राहून आवश्यक खबरदारी घ्यावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी सुहासिनी गोणेवार यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

स्वयं अर्थसहाय्यिता नवीन शाळांना मान्यता व दर्जावाढीची शिफारस; हरकती मागविल्या