Saturday 23 November 2019

केंद्रीय पथकाने केली जिल्ह्यातील खरीप पिक नुकसानीची पाहणी




  • खामगांव तालुक्यातील कलोरी, टेंभूर्णा व सुटाळा शिवारातील पिक पाहणी
  • शेतकऱ्यांशी साधला संवाद, जाणून घेतली परिस्थिती
  • भादोला येथील शेतात नुकसानग्रस्त सोयाबीनच्या सुडीची केली पाहणी

 बुलडाणा, दि. 23 :  अरबी समुद्रात गत काही दिवसांमध्ये निर्माण झालेल्या ‘क्यार’ व महा’ या चक्रीवादळामुळे राज्यात अवकाळी पाऊस झाला. या पावसामुळे जिल्ह्यातील खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. केंद्रीय कृषी मंत्रालयातंर्गत असणाऱ्या कापूस विकास संचालनालयाच्या कृषि व शेतकरी कल्याण विभागाचे संचालक डॉ आर. पी सिंग यांचे पथकाने आज जिल्ह्यात नुकसान झालेल्या खरीप पिकांची पाहणी केली. पथकाने खामगांव तालुक्यातील कलोरी, टेंभूर्णा व सुटाळा तर बुलडाणा तालुक्यातील भादोला शिवारातील शेतांमध्ये जाऊन नुकसानीची पाहणी करीत शेतकऱ्यांशी संवाद साधला.                                                                                                                  

यावेळी या पथकासमवेत खामगांव विधानसभा मतदारसंघाचे आमदार ॲड आकाश फुंडकर, अमरावती विभागाचे विभागीय आयुक्त पियुष सिंग, जिल्हाधिकारी डॉ. निरूपमा डांगे, प्र. मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश लोखंडे, अमरावती विभागाचे कृषि सहसंचालक सुभाष नागरे,  जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी  नरेंद्र नाईक, निवासी उपजिल्हाधिकारी भिकाजी घुगे,  खामगांवचे उपविभागीय कृषी अधिकारी श्री. पटेल, तहसीलदार शितल रसाळ, तालुका कृषि अधिकारी श्री. गिरी तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. तसेच भादोला येथील शेतात उपविभागीय अधिकारी राजेश्वर हांडे, तहसिलदार श्री. शिंदे, उपविभागीय कृषि अधिकारी संतोष डाबरे आदी उपस्थित होते.

          सर्वप्रथम पथकाने कलोरी येथील शेतकरी विशाल वामनराव घुले यांच्या शेतात जाऊन अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या सोयाबीन पीकाची पाहणी केली. तसेच टेंभूर्णा येथील शेतकरी नरेश जगन्नाथ चौकसे यांच्या सोयाबीन व ज्वारी पीकाची, तर सुटाळा येथील शेतकरी शंकर संपत वानखेडे यांच्या  शेतातील कापून ठेवलेल्या ज्वारी पीकाची पाहणी केली.

  पीक परिस्थितीची पाहणी करून केंद्र शासनाला अहवाल सादर करण्यात येणार असल्याचे यावेळी डॉ. सिंग यांनी यावेळी सांगितले.  त्यांनी पाहणी केलेल्या शेतकऱ्यांशी संवाद साधत पिकांच्या झालेल्या नुकसानीची सविस्तर माहिती करून घेत परिस्थिती जाणून घेतली. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पथकातील अधिकाऱ्यांना माहिती देतांना शेतकऱ्यांनी सांगितले की, ऐन पीक काढणीच्यावेळी आलेल्या अवकाळी पावसामुळे हातातोंडाशी आलेले पीक वाया गेले आहे. त्याचबरोबर अद्यापही काही ठिकाणी जमीन ओलसर असल्यामुळे रब्बी हंगाम घेण्यातही अडचण येत आहे. तसेच ज्वारी, सोयाबीन पिकाचे नुकसान झाल्यामुळे जनावरांना या पिकापासून बनलेला चारा मिळणार नाही.

   भादोला येथील शंकरअप्पा दगडअप्पा चित्ते यांच्या शेतात सोंगूण सुडी मारलेल्या नुकसानग्रस्त सोयाबीन पिकाची पाहणी करण्यात आली. यावेळी डॉ. सिंग यांनी शेतकऱ्याशी संवाद साधत नुकसानीची माहिती घेतली. भेटीप्रसंगी महसूल, कृषी विभागाचे वरीष्ठ अधिकारी व कर्मचारी तसेच भेट दिलेल्या ठिकाणी ग्रामस्थ व शेतकरी उपस्थित होते.  सुरूवातीला जिल्हाधिकारी डॉ. निरूपमा डांगे यांनी जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची सविस्तर माहिती पथकाला दिली. तसेच जिल्ह्यातील पीकाचे खरीप व रब्बी हंगामाचे क्षेत्र, पीक परिस्थिती, लागवड केलेले क्षेत्र, बाधित क्षेत्र, पाऊसाची सरासरी तसेच पीक काढणीच्यावेळीच पाऊस झाल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती दिली. त्याचबरोबर अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात बाजरी, ज्वारी, मका, सोयाबीन, कापूस, फळपिके आदींचे  जिल्ह्यातील  शेतकऱ्यांचे लाखो हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असल्याची माहिती दिली.



               खामगांव कृषी उत्पन्न बाजार समितीमधील शेतमालाची पथकाने केली पाहणी
  • सोयाबीन व मुंगाच्या प्रतवारीची घेतली माहिती
 बुलडाणादि. 23 :  जिल्ह्यात परतीचा व अवकाळी पाऊस मोठ्या प्रमाणावर झाल्यामुळे खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झाले. त्यामुळे शेतमालाची प्रतवारीही घसरली आहे. अशा शेतमालाची पाहणी आज केंद्रींय पथकातील केंद्रीय कृषी मंत्रालयातंर्गत असणाऱ्या कापूस विकास संचालनालयाच्या कृषि व शेतकरी कल्याण विभागाचे संचालक डॉ आर. पी सिंग खामगांव येथील  कृषि उत्पन्न बाजास समितीमध्ये जावून केली. याप्रसंगी मुंग, सोयाबीन शेतमालाची प्रतवारी बघत संबंधित शेतकरी व अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली.
   यावेळी या पथकासमवेत आमदार ॲड आकाश फुंडकर, अमरावती विभागाचे विभागीय आयुक्त पियुष सिंग, जिल्हाधिकारी डॉ. निरूपमा डांगे, प्र. मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश लोखंडे, अमरावती विभागाचे कृषि सहसंचालक सुभाष नागरे,  जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी  नरेंद्र नाईक, निवासी उपजिल्हाधिकारी भिकाजी घुगे,  उपविभागीय अधिकारी मुकेश चव्हाण, खामगांवचे उपविभागीय कृषी अधिकारी श्री. पटेल, तहसीलदार शितल रसाळ, तालुका कृषि अधिकारी श्री. गिरी तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
*******


‘आरटीओ’ विशेष वाहन तपासणी मोहिम; 273 वाहनधारकांना दंड
  • स्वत: विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांनी दंड ठोठावला
  • वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन
 बुलडाणादि. 23 : उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाच्यावतीने आज 23 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात विशेष वाहन तपासणी मोहिम राबविण्यात आली. केंद्रीय पथकाच्या दौऱ्यानिमित्ताने जिल्ह्यात आलेल्या विभागीय आयुक्त पियुष सिंग, तसेच दौऱ्यावर असलेल्या जिल्हाधिकारी डॉ. निरूपमा डांगे यांनी स्वत: या तपासणी मोहिमेत सहभाग घेत वाहतुक नियमांची पायमल्ली करणाऱ्या वाहनधारकांना दंड ठोठावला. यावेळी स्वत: विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांनी चलान दिल्या. तसेच वाहनधारकांना वाहतुक नियमांचे पालन करीत वाहन चालविण्याचे आवाहनही त्यांनी केले. याप्रसंगी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयश्री दुतोंडे उपस्थित होत्या.
   जिल्ह्यात आज करण्यात आलेल्या विशेष तपासणी मोहिमेत हेल्मेट न वापरणे, फॅन्सी नंबरप्लेट, अवैध प्रवाशी वाहतूक, विना नोंदणी वाहने, विहीत मर्यादेपेक्षा जास्त वेगाने वाहन चालविणे, सिट बेल्ट न लावणे, अनुज्ञप्ती सादर न करणे, विमा सादर न करणे, वाहन चालविताना मोबाईलचा वापर करणे या गुन्ह्यांअंतर्गत सदर कार्यालयाने चार पथकांच्या माध्यमातून जिल्ह्यात खामगांव ते मलकापूर या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 व ईतर मार्गांवर एकुन 273 वाहन धारकांवर कार्यवाही केली. तपासणी मोहिमेत बुलडाणा-  चिखली -दे.राजा रस्त्यावर मोटार वाहन निरीक्षक निशिकांत वैद्य, संदीप मोरे, वरिष्ठ लिपिक गजानन तनपुरे, कनिष्ठ लिपिक प्रविण मुंगळे, अनंता सोर यांचा समोवश होता. तर  नांदुरा – खामगांव- कलोरी फाटापर्यंत मोटार वाहन निरीक्षक संदीप तायडे, संदीप पवार, वरिष्ठ लिपीक संतोष घ्यार, कनिष्ठ लिपीक विजय माहुलकर, अमोल खिरोडकर, यांनी तपासणी मोहिम राबविली. तसेच नांदुरा ते मलकापूर रस्त्यावर मोटार वाहन निरीक्षक संताजी बर्गे, अविनाश भोपळे, वरिष्ठ लिपीक सुनील सोळंकी, कनिष्ठ लिपीक राजेश काळे, मिलींद उईके यांनी, तर चिखली – खामगांव महामार्गावर मोटार वाहन निरीक्षक फारूक शेख, वरिष्ठ लिपीक सुनील सुर्यवंशी, कनिष्ठ लिपीक रोहीत काळे यांनी तपासणी मोहिमेत सहभाग घेतला, असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयश्री दुतोंडे यांनी कळविले आहे.

--

Wednesday 20 November 2019

DIO BULDANA NEWS 20.11.2019

आरोग्य विषयक योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी
- जिल्हाधिकारी

तंबाखू खाण्याच्या दुष्परीणामांविषयी जनजागृती करावी
बुलडाणा, दि. 20 : शासन विविध आरोग्यविषयीच्या कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून आरोग्यवर्धनासाठी काम करते. आरोग्याच्या योजनांतून लाभार्थ्यांना उपचार, प्रतिबंधात्मक माहिती मिळते. अनेक योजनांमुळे संबंधित आजाराविषयी जनजागृती होवून नागरिकांकडून आजार न होण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय करण्यात येतात. शासनाच्या आरोग्यविषयक योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. निरूपमा डांगे यांनी आज दिल्या.
  जिल्हाधिकारी यांच्या दालनामध्ये आज विविध आरोग्य विषयक योजनांच्या अंमलबजावणीबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीला माता व बाल संगोपण अधिकारी डॉ. गोफणे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालकल्याण) श्री. रामरामे, संबंधित विभागाचे विभागप्रमुख आदी उपस्थित होते.
    जास्तीत जास्त लोकसंख्येची एचआयव्ही तपासणी करण्याचे निर्देश देत जिल्हाधिकारी म्हणाल्या, एचआयव्ही तपासणी करताना अधिकाधिक लोकांचा सहभाग घ्यायला पाहिजे. जिल्ह्यातील संपूर्ण गावे त्यामध्ये आली पाहिजेत. 'हाय रिस्क' लोकसंख्येची तपासणी करून आजुबाजूच्या गावातील, परिसरातील लोकांची तपासणीही करून घ्यावी. एड्स नियंत्रण कार्यक्रमात जिल्हा अव्वल असावा. एआरटीवर असणाऱ्या रूग्णांना विनात्रास औषधे उपलब्ध करून द्यावीत. क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम राबविताना जिल्ह्याचे काम अव्वल दर्जाचे असावे. लसीकरण मोहिम राबविताना शासनाकडून देण्यात येणाऱ्या लसींचा पुरवठा पर्याप्त संख्येत ठेवावा. लसीकरणातंर्गत सर्व पात्र बालके घ्यावीत.
      पीसीपीएनडीटी कायद्यातंर्गत सोनोग्राफी केंद्रांची नियमित तपासणी करण्याच्या सूचना देत जिल्हाधिकारी म्हणाल्या, स्त्री भ्रुण हत्या जास्त होत असलेल्या भागांमध्ये जनजागृती करण्यात यावी. प्रत्येक महिन्यात मुलांच्या जन्मांची संख्या, मुलींच्या जन्मांची संख्या व आढळणारी तफावत याचा सखोल विश्लेषणात्मक अहवाल सादर करावा. ज्या गावांत, तालुक्यात हे प्रमाण व्यस्त्‍ असेल तिथे लक्ष केंद्रीत करून तपासण्या बारकाईने कराव्या. अशा ठिकाणी केसेस दाखल कराव्यात. मुलींचा जन्मदर कमी राहत असलेल्या गावाचा, भागाचा बारकाईने तपास करून कारणांसह अहवाल सादर करावा. राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमातंर्गत तंबाखू नियंत्रण प्रभावीपणे करण्यासाठी कार्यवाही करावी. तंबाखू नियंत्रण कायद्याचा प्रभावीरित्या उपयोग करावा.
  त्या पुढे म्हणाल्या, तंबाखू नियंत्रणासाठी महाविद्यालयीन व शालेय विद्यार्थ्यांचा गट, तंबाखूमुळे कर्करोग झालेल्या नागरिकांचा एक गट अशा पद्धतीने  कार्यवाही करावी.  विद्यार्थी गटात तंबाखूचे दुष्परिणाम समजवून जनजागृती करावी, तर कर्करोग झालेल्या गटात उपचारासाठी कार्यवाही करावी. तंबाखू नियंत्रण करताना जिल्ह्यात तंबाखूमुळे कर्करोग झालेल्या नागरिकांचा अहवाल सादर करावा. यामध्ये तालुकानिहाय आकडेवारी असावी. बैठकीप्रसंगी संबंधित शाखेचे जिल्हा समन्वयक, गजानन देशमुख, डॉ लता बाहेकर आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
                                                                        *******
आयटीआय मलकापूर येथे तासिका तत्त्वावर पदांसाठी अर्ज आमंत्रित
  • 30 नोव्हेंबर 2019 पर्यंत मुदत
बुलडाणा, दि. 20 : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मलकापूर येथे अत्यंत तात्पुरत्या स्वरूपात तासिका तत्वावर शासकीय नियमानुसार मानधनावर निदेशक पदांसाठी भरती करावयाची आहे. निदेशक पद 'एम्प्लॉयबीलीटी स्कील' या व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी असून त्याची शैक्षणिक पात्रता दोन वर्षांसह एमबीए किंवा बीबीए, अथवा सामाजिक शास्त्र, अर्थशास्त्र या विषयात स्नातक दोन वर्षाच्या अनुभवासह आहे. पदसंख्या एक आहे. या पदाकरीता शैक्षणिक अर्हताधारकांनी संपूर्ण अर्ज, बायोडाटासह संस्थेच्या iti_malkapur@yahoo.com व iti_malakapur@dvet.edu.in या इमेलवर 30 नोव्हेंबर 2019 पर्यंत पाठवावे, असे आवाहन प्राचार्य, आयटीआय मलकापूर यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
                                                                                    *******
        जिल्ह्यात 2 डिसेंबरपासून लसीकरणाची विशेष इंद्रधनुष्य मोहिम
बुलडाणा, दि. 20 : जिल्ह्यात लसीकरण सक्षमीकरणासाठी ‘विशेष इंद्रधनुष्य मोहिम 2.0’ येत्या 2 डिसेंबर 2019 पासून सुरू करण्यात येणार आहे. सदर मोहिमेंतर्गत जिह्यातील लसीकरणापासून वंचित 0 ते 2 वर्षे वयोगटातील बालके व गरोदर माता यांचा सर्व्हे करून त्यांच्यासाठी अतिरिक्त लसीकरण सत्रांचे आयोजन करण्यात येणार आहे.
   या मोहिमेच्या अंमलबजावणीबाबत आज 20 नोव्हेंबर 2019 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हाधिकारी डॉ.निरुपमा डांगे, यांचे अध्यक्षतेखाली नियमित लसीकरण सक्षमीकरण जिल्हा कृती समितीची सभा घेण्यात आली.  जिल्हाधिकारी यांनी जिह्यातील लसीकरण कार्यक्रमाचा यावेळी आढावा घेतला.
   जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. रवींद्र गोफणे यांनी विशेष इंद्रधनुष्य लसीकरण मोहिमेविषयी माहिती दिली. सदर मोहिमेचे प्रभावी नियोजन करून सर्व विभागांच्या समन्वयातून मोहीम यशस्वी करण्याबाबत निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले. यावेळी आरोग्य विभागाचे विविध अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बाल कल्याण) अरविंद रामरामे याचेसह विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी हजर होते.
                                                                                    ******
 एक दिवसीय उद्योजकता परिचय मेळाव्याचे 21 नोव्हेंबर रोजी आयोजन
बुलडाणा, दि. 20 : शासनाच्या उद्योग संचालनालयामार्फत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विशेष सामुहिक प्रोत्साहन योजनेतंर्गत जिल्ह्याकरीता 18 दिवसीय मोफत निवासी उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन 28 नोव्हेंबर पासून करण्यात येणार आहे. सदर प्रशिक्षण कार्यक्रम अनुसूचित जाती प्रवर्गासाठी असून प्रशिक्षणाकरीता मुलाखतीअंती 40 प्रशिक्षणार्थिंची निवड कार्यबल समितीमार्फत केली जाणार आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमाची सविस्तर माहिती देण्याकरीता 21 नोव्हेंबर 2019 रोजी मोफत एक दिवसीय उद्योजकता परिचय मेळाव्याचे आयोजन पवार सायन्स/ चव्हाण कॉमर्स क्लासेसच्या सभागृह, गजानन महाराज मंदीराजवळ, विष्णुवाडी, बुलडाणा येथे आयोजित करण्यात येत आहे. अनुसूचित जाती प्रवर्गातील बेरोजगार इच्छूक तथा गरजवंत युवक युवतींनी मोफत एक दिवसीय उद्योजकता परिचय मेळाव्यास उपस्थित रहावे. अधिक माहितीकरीता मिटकॉन किंवा जिल्हा उद्योग केंद्र, बुलडाणा येथे संपर्क करावा, असे आवाहन मिटकॉनच्यावतीने प्रसिद्धी पत्रकान्वये करण्यात आले आहे.
                                                                        ********
कापूस पिकावरील गुलाबी बोंड अळीचे नियंत्रण करावे
·        कृषि विभागाचे आवाहन
बुलडाणा, दि. 20 :  यावर्षी सुरूवातीच्या काळात चांगला पाऊस असल्यामुळे पिक चांगले होते. मात्र परतीच्या जास्तीच्या पावसामुळे कापसाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे निदर्शनास येते. मात्र काही भागामध्ये निचरा होणाऱ्या हलक्या जमिनीमध्ये कापसाला फुले, पाते व बोंडे लागलेली आढळतात. अशा पिकावर गुलाबी बोंडअळी येण्याची दाट शक्यता आहे.
   पेरणी झालेल्या कपाशीवर गुलाबी बोंड अळीचा 5 ते 10 टक्के पर्यंत प्रादुर्भाव फुलामध्ये ऑगस्टच्या पहिल्या पंधरवडयात दिसुन आला. सद्यस्थितीत हा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी फेरोमोन सापळे, डोमकळया वेचुन नष्ट करणे, निंबोळी अर्काची फवारणी व लक्षणीय प्रादुर्भावाच्या ठिकाणी रासायनिक किटकनाशकांचा वापर इत्यादीचा पिकाचे अवस्थेनुसार वेळीच वापर करून या किडीच्या प्रादुर्भावावर आवर घालण्यात आला. यासाठी सर्व कृषि विभागाची विस्तार यंत्रणा अशासकीय यंत्रणा, तसेच कृषि विद्यापीठाचे वेळोवेळी तांत्रिक मार्गदर्शन व बोंड अळीच्या नियंत्रणाची व्युहरचना आखून अंमलबजावणी सुरु आहे.
    गुलाबी बोंड अळीचे प्रादुर्भाव सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात अथवा ऑक्टोंबरच्या पहिल्या व दुसऱ्या आठवडयात सरासरी 29 ते 33 अंश से. तापमान असताना आढळून येतो. मात्र यावर्षी पावसाळा वाढल्यामुळे व पोषक हवामान असल्यामुळे गुलाबी बोंड अळीचे पतंग जमिनीत असलेल्या कोषावस्थेमधून बाहेर निघाले. हीच परिस्थिती सर्वदूर शेतकऱ्यांच्या कापूस पिकामध्ये आढळून येण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र सध्या कोषातून बाहेर निघालेले पतंग मिलन होवून अंडी टाकल्यानंतर 8 ते 10 दिवसांनी त्यांचा प्रादुर्भाव ज्या कपाशीला हिरवे बोंडे व पात्या आहेत अशा ठिकाणी दिसून येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
    शेतकरी बांधवांनी त्वरित कापूस पिकात त्वरीत किमान एकरी दोन फेरोमन सापळे लावून त्यामध्ये सतत तीन दिवस सात ते आठ पतंग आढळल्यास 5 टक्के निंबोळी अर्काची किंवा ॲझाडिरेक्टीन 1500 पीपीएम 25 मिली/10लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. बोंडे/पात्या/फुले यामध्ये प्रादुर्भाव 5 ते 10 टक्क्यापर्यंत आढळून आल्यास इंडोक्झाकार्ब 15.8 टक्के प्रवाही 10 मिली किंवा थायोडिकार्ब 75 टक्के भुकटी ग्रॅम किंवा सायहॅलोथ्रीन 4.9 सीएम, 10 मिली किंवा क्विनॉलफॉस 25 टक्के एएफ 25 मिली किंवा क्लोरोपायरीफॉस 20 टक्के प्रवाही 25 मिली प्रती 10 लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.
   गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव 10 टक्केपेक्षा जास्त आढळून आल्यास इमामेक्टीन बेंझोएट 5 टक्के दाणेदार 4 ग्रॅम किंवा बाजारात उपलब्ध असलेली मिश्र किटकनाशके जसे, प्रोफेनोफॉस 40 टक्के अ सायपरमेथ्रीन 4 टक्के 20 मिली किंवा डेल्टामेथ्रीन 1 अ ट्रायझोफॉस 35 टक्के प्रवाही 1250 मिली किंवा क्लोरोपायरीफॉस 50  सायपरमेथ्रीन 5 टक्के 20 मिली प्रती 10 लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी.
   शेतकरी बंधुंनी पिकाचे नियमित निरिक्षण करुन कामगंध सापळ्यामधील पतंगाची संख्या/प्रादुर्भाव तसेच सध्याच्या कापूस पिकाच्या वाढलेल्या हंगामामध्ये कापूस पिकाची संपूर्ण वेचणी झाल्यानंतर एक ते दिड महिन्यामध्ये कापसावर असलेली बोंडाची संख्या व अपेक्षीत उत्पन्न यांचा अंदाज घेऊनच कीड व्यवस्थापनाची वरील प्रमाणे उपाय योजना करावी. सरसकट सर्व शेतकरी बंधुंनी कीड व्यवस्थापनाची उपरोक्त प्रमाणे उपाययोजना करावी. डिसेंबर 2019 नंतर कापूस पीक पूर्णत काढून टाकावे. कापूस फरदड घेण्याचा मोह टाळावा जेणेकरुन, किडीचे जीवनचक्र खंडीत होऊन येणाऱ्या पुढील खरीप हंगामामध्ये या किडीचा प्रतिबंध करण्यास मदत होईल, असे आवाहन कृषि विभागाच्यावतीने प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे. 

                                                                                    *******


  

Wednesday 6 November 2019

सेवानिवृत्तांनी निवृत्तीवेतनाबाबत अडचण असल्यास कोषागार कार्यालयाशी संपर्क करावा - जिल्हा कोषागार अधिकारी


  • जिल्हा कोषागार कार्यालयात सेवानिवृत्तांचा मेळावा
बुलडाणा, दि. 6 -  राज्य शासकीय अधिकारी, कर्मचारी यांना आपल्या निवृत्ती वेतनाबाबत अडचण येत असल्यास त्यांनी तात्काळा आमच्या जिल्हा कोषागार कार्यालयाशी, उपकोषागार कार्यालयांशी संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी दिनकर बावस्कर यांनी केले आहे.
  जिल्हा कोषागार कार्यालयात राज्य शासकीय निवृत्ती वेतन धारक अथवा कुटूंब निवृत्ती वेतन धारकांचा मेळावा 5 नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. याप्रसंगी अप्पर कोषागार अधिकारी संजय अंभोरे, निवृत्ती वेतन धारकांच्या कल्याणकारी संघटनेचे अध्यक्ष श्री. पऱ्हाड, सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापक श्री. सिन्हा, बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापक श्री. शेळके, अन्य अप्पर कोषागार अधिकारी उपस्थित होते.
   मेळाव्यात निवृत्ती वेतन धारकांच्या विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली. तसेच काही समस्या तात्काळा सोडविण्यात आल्या. यावेळी निवृत्ती वेतन धारकांच्या नियमित तक्रारी सोडविण्यासाठी कोषागार कार्यालयामध्ये स्वतंत्र तक्रार निवारण कक्षाचे उद्घाटन ज्येष्ठ निवृत्ती वेतन धारक श्री. इंगळे यांच्याहस्ते करण्यात आले. आभार प्रदर्शन श्री. भोलाने यांनी केले. मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी पंकज गवई, राहुल भोलाने, मयुरी लेकुरवाळे, शिवनारायण बारगजे, सविता आढाव, दिपाली वानखडे, दुर्गा चव्हाण व तृप्ती सरोदे आदी कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले. मेळाव्याला 150 निवृत्ती वेतन धारक उपस्थित होते.
                                                            *******
अल्पसंख्यांक खासगी व अपंग शाळांमध्ये पायाभूत
सुविधा पुरविण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित
बुलडाणा, दि. 6 : धार्मिक अल्पसंख्यांक विद्यार्थीबहुल शासनमान्य खाजगी अनुदानीत, विनाअनुदानीत, कायम विनाअनुदानित शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नगर परिषद शाळा व अपंग शाळांमध्ये पायाभूत सोयी-सुविधा पुरविण्यासाठी अनुदान योजनेअंतर्गत इच्छुक शाळांकडून अर्ज मागविण्याबाबत प्रस्ताव मागविण्यात येत आहे. शाळांनी 7 ऑक्टोंबर 2015 च्या शासन निर्णयामधील विहीत नमुन्यातील परिपूर्ण अर्ज आवश्यक कागदपत्रे जोडून प्रस्ताव  सादर करण्याची अंतिम मुदत 31 ऑगस्ट 2019 होती. ती मुदत वाढविण्यात आली असून इच्छुक शाळांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे 30 नोव्हेंबरपर्यंत प्रस्ताव सादर करावे.
इच्छुक शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्था व अपंग शाळांनी संपूर्ण भरलेला अर्ज अल्पसंख्यांक विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, बुलडाणा येथे दि. 30 नोव्हेंबर, 2019 पर्यंत सादर करावे.  विहित मुदतीनंतर प्राप्त झालेले प्रस्ताव स्वीकारले जाणार नाही. अर्ज सादर करून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने प्रसिद्धी पत्रकान्वये करण्यात आले आहे.  
                                                                        ******
डॉ झाकीर हुसैन मदरसा आधुनिकीकरण योजनेच्या प्रस्ताव सादर करण्यास मुदतवाढ
·          30 नोव्हेंबर 2019 अंतिम मुदत
बुलडाणा, दि. 6 :  डॉ झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना सन 2019-20 अंतर्गत प्रस्ताव सादर करण्यास यापूर्वी 31 ऑगस्ट 2019 मुदत होती. सदर मुदत वाढविण्यात आली असून 11.10.2013 च्या शासन निर्णयातील विहीत नमुन्यातील परिपूर्ण अर्ज आवश्यक कागदपत्रे जोडून प्रस्ताव 30 नोव्हेंबर 2019 पर्यंत मागविण्यात येत आहे. तरी जिल्ह्यातील सदर योजनेतंर्गत अनुदान मिळवू इच्छिणाऱ्या निवासी मदरसांनी दिनांक 11.10.2013 च्या शासन निर्णयामधील निकषांनुसार विहीत नमुन्यातील परिपूर्ण भरलेले प्रस्ताव कागदपत्रांच्या पुर्ततेसह अल्पसंख्यांक विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, बुलडाणा येथे 30 नोव्हेंबर 2019 पर्यंत सादर करावे व या योजनेचा लाभ घ्यावा. विहीत मुदतीनंतर प्राप्त झालेले प्रस्ताव स्वीकारले जाणार नाहीत, असे जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने प्रसिद्धी पत्रकान्वये कळविण्यात आले आहे.  
                                                                        ******
              पाळणाघर चालविणाऱ्या इच्छूक संस्थांनी 20 नोव्हेंबरपर्यंत प्रस्ताव सादर करावे
बुलडाणा, दि. 6: जिल्हा परिषद अंतर्गत असलेले एकात्मिक बाल विकास सेवा योजना कक्षातर्फे  जिल्ह्यातील ज्या स्वयंसेवी संस्थांना खाजगीरित्या पाळणाघर चालवायची आहेत. अशा सर्व पाळणाघर चालविणाऱ्या संस्था चालकांनी शासन निर्णय 7 जानेवारी 2019 च्या अटी व शर्ती नुसार 20 नोव्हेंबर 2019 पर्यत एकात्मिक बाल विकास सेवा योजना कक्ष, जिल्हा परिषद, बुलडाणा येथे प्रस्ताव सादर करावे, असे आवाहन जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

DIO BULDANA NEWS 6.11.2019

नोंदणी व मुद्रांक विभागाची कार्यशाळा उत्साहात
बुलडाणा, दि. 6 -  नोंदणी व मुद्रांक विभागाच्या नागरी सेवांमधील सुधारणांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र येथे नुकतीच कार्यशाळा पार पडली. ही कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली.  कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी नोंदणी उपमहानिरीक्षक व मुद्रांक उपनियंत्रक अमरावतीचे मेहन जोशी होते, तर अकोल्याचे सह जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी दिलीप भोसले, वाशिमचे किशोर मगर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
   यावेळी धनजंय देशपांडे यांनी नोंदणी व मुद्रांक विभागाद्वारे पुरविण्यात येणाऱ्या नागरी सेवांमधील ऑनलाईन सेवांची व सुधारणांची माहिती अतिशय साध्या, सोप्या पद्धतीने पॉवर पॉईंट सादरीकरणाच्या माध्यमातून उपस्थितांना दिली. सदर कार्यशाळेस सर्व मुद्रांक विक्रेते, विधीज्ज्ञ, बांधकाम व्यावसायिक, अधिकृत सेवा पुरवठादार, बँक प्रतिनिधी आदी उपस्थित होते. कार्यशाळा बुलडाणा सह जिल्हा निबंधक वर्ग 1 व मुद्रांक जिल्हाधिकारी उमेश शिंदे यांचे नेतृत्वात यशस्वीरित्या पार पडली, असे मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने प्रसिद्धी पत्रकान्वये करण्यात आले आहे.
                                                                        *******
        तांदुळवाडी बंधारा मासेमारीसाठी पाच वर्षासाठी ठेका पद्धतीने देणार
बुलडाणा, दि. 6 -  खामगांव तालुक्यातील पाटबंधारे विभागाचा 10 हेक्टरचा तांदुळवाडी बंधारा  सन 2019-20 ते सन 2023-24 या पाच वर्षासाठी ठेका पद्धतीने देण्यासाठी लिलाव करण्यात येणार आहे. मत्स्यव्यवसायाकरिता तलाव / जलाशय मासेमारी ठेक्याने देण्यासाठी शासनाने सुधारीत धोरण अटी – शर्तींचे अधिन राहून पाच वर्षांसाठी ठेक्याने देणेकरीता जिल्ह्यातील नोंदणीकृत मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांकडून प्रस्ताव मागविण्यात येत आहेत.
   मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थेने संस्थेच्या ठरावासोबत मागणी प्रस्ताव प्रसिद्धी झाल्याच्या सात दिवसाचे आत सहाय्यक आयुक्त  मत्स्यव्यवसाय (तांत्रिक), प्रशासकीय इमारत, पहिला माळा, बुलडाणा या कार्यालयास सादर करावा. सदर संस्था अवसायनात तथा संस्थेबाबत न्यायप्रविष्ठ प्रकरण सुरू नसल्याचे सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था (दुग्ध), बुलडाणा यांचे प्रमाणपत्र प्रस्तावासोबत जोडावे. संस्थेचा सन 2018-19 या आर्थिक वर्षाचा लेखा परिक्षण अहवाल प्रत, संस्थेची 97 वी घटना दुरूस्ती संपूर्ण प्रत, मत्स्यव्यवसाय सहकारी संस्था नोंदणीसाठी देण्यात आलेले मत्स्यव्यवसाय विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र अथवा संस्था नोंदणी प्रमाणपत्र तसेच उपविधी दुरूस्ती प्रत, संस्था ही शासन अथवा जिल्हा परिषद, सिंचन विभागाची थकबाकीदार नसल्याचे प्रमाणपत्र, सद्य: स्थितीत संस्थेकडे मासेमारी ठेक्याने असलेल्या पाटबंधारे विभागाचे अथवा जिल्हा परिषद  सिंचन विभागाचे असलेले तलाव / यादी सोबत सादर करावी.  तांदुळवाडी बंधारा कालावधी न्युनतम ठेका रक्कम 4500 रूपये राहणार आहे. जाहीर लिलाव बोली प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या मत्स्यव्यवसाय सहकारी संस्था न्यूनतम ठेका रक्कम 4500 रूपये रक्कमेपासून बोलीची सुरूवात करतील.
  मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांनी जाहीर लिलाव बोली प्रक्रियेत सहभागी होण्यास अथवा कार्यालयास प्रस्ताव दाखल करण्याचा कालावधी 14 नोव्हेंबर 2019 पर्यंत आहे. जाहीर बोली लिलाव प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी अटी – शर्ती आणि जाहीर बोली लिलावाची तारिख व वेळ 16 नोव्हेंबर 2019 नंतर पात्र मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांना कळविण्यात येणार आहे. तरी जिल्ह्यातील सर्व नोंदणीकृत मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांनी पाटबंधारे विभागाच्या तांदुळवाडी बंधारा जाहीर लिलावा बोली प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन स.इ नायकवडी, सहाय्यक आयुक्त, मत्स्यव्यवसाय (तांत्रिक), बुलडाणा यांनी प्रसिद्धिी पत्रकान्वये केले आहे.
********
   पिक विमा योजनेतंर्गत शेतकऱ्यांचे पिक नुकसानीचे अर्ज ग्रामस्तरावर स्वीकारणार
बुलडाणा, दि. 6 -  प्रधानमंत्री पिक विमा योजनेतंर्गत सन 2019-20 खरीप हंगामातील पिक विमा काढलेल्या शेतकऱ्यांचे पिक नुकसान अर्ज ग्रामस्तरावरच स्वीकारण्यात येणार आहे. पिक नुकसान सुचना अर्ज व पंचनामा अर्ज, 7/12, नमुना 8 अ, पिक विमा भरल्याची पावती, आधार कार्ड, बँक पासबुक झेरॉक्स आदींसह संबंधीत गावातील कृषि सहाय्यक, ग्रामसेवक, तलाठी, कृषि मित्र यांच्याकडे ग्रामपंचायत कार्यालयामध्ये शेतकरी बांधवांनी जमा करावे, असे आवाहन तालुका कृषि अधिकारी, बुलडाणा यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

पुर्नरचित हवामान आधारीत फळपिक विमा योजनेचे फळपिकांना मिळणार ‘कवच’


  • मोसंबी, केळी व द्राक्ष फळपिकाकरिता 7 नोव्हेंबर, तर संत्रा फळासाठी 30 नोव्हेंबर अंतिम मुदत
  • आंबा फळपिकासाठी 31 डिसेंबर व डाळींब फळासाठी 14 जानेवारी 2020 अंतिम मुदत
  • गारपीट नुकसानीला मिळणार स्वतंत्र संरक्षित विमा रक्कम
बुलडाणा, दि. 6 -  सन 2019-20 साठी आंबिया बहारासाठी पुर्नरचित हवामान आधारीत फळपिक विमा योजना जाहीर करण्यात आली आहे.  जिल्ह्यामध्ये ही योजना संत्रा,  मोसंबी, केळी, द्राक्ष, आंबा व डाळींब या फळपिकांकरिता राबविण्यात येणार आहे. योजनेतंर्गत फळपिकनिहाय विमा संरक्षण रक्कम शासनाने मंजूर केलेली आहे. ही योजना जिल्ह्यात 13 तालुक्यांमध्ये 90 महसूल मंडळात राबविण्यात येणार आहे.  त्यामुळे निश्चितच फळपिकांना विम्याचे कवच प्रदान होणार आहे.
    ही योजना कर्जदार शेतकऱ्यांना सक्तीची असून बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छीक आहे. अवेळी पाऊस, कमी तापमान, वेगाचा वारा, जास्त तापमान  व गारपीट या हवामान धोक्यापासून निर्धारित केलेल्या कालावधीत शेतकऱ्यांना विमा संरक्षण देण्यात येणार आहे. तसेच आर्थिक सहाय्य देणे व फळपीक नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थितीत शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधीत राखणे ही मुख्य उद्देश या योजनेचा आहे. अधिसुचित क्षेत्रात अधिसुचित फळ पिके घेणारे (कुळाने, भाडेपट्टीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसह) सर्व शेतकरी या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत. फळपिक निहाय निर्धारित केलेले हवामान धोके (ट्रिगरलागू झाल्यावर नुकसान भरपाई देय होते. विमा क्षेत्र घटक हा महसुल मंडळ असणार आहे.   
        आंबिया बहारातील मोसंबी, केळी व द्राक्ष या तीन फळपिकांसाठी बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी विमा प्रस्ताव बँकांकडे 7 नोव्हेंबर 2019 पर्यंत सादर करावयाचे आहे. तसेच संत्रा फळपिकाकरीता 30 नोव्हेंबर, आंबा फळिपिकासाठी 31 डिसेंबर, डाळींब फळपिकासाठी 14 जानेवारीपर्यंत प्रस्ताव बँकांना सादर करावयाचे आहेत. तर बिगर कर्जदार शेतकऱ्यांची घोषणापत्रे संबंधित बँक शाखेने संबंधित विमा कंपनीस द्राक्ष, मोसंबी व केळी फळपिकासाठी 15 नोव्हेंबर आहे. संत्रा फळपिकासाठी 7 डिसेंबर, आंबासाठी 7 जानेवारी 2020 व डाळींब फळपिकाकरीता 21 जानेवारी 2020 असणार आहे. ज्या कर्जदार शेतकऱ्यांची अधिसुचीत पिकाकरीता सदर हंगामासाठी अंतिम तारखेपर्यंत कर्जमर्यादा मंजूर असेल त्या सर्व शेतकऱ्यांच्या क्षेत्राचा विमा विहीत मुदतीत करूण घेणे बँकांना अनिवार्य  आहे.
 कर्जदार शेतकरी, कर्ज घेतलेले व बँकेकडून अधिसुचीत फळपिकांसाठी पिक कर्ज मर्यादा मंजुर असलेले शेतकरी यांच्या फळपिकांचा विमा प्रस्ताव बँकांना सादर करण्याची अंतिम मुदत द्राक्ष, मोसंबी व केळी फळपिकांसाठी 7 नोव्हेंबर 2019 आहे. संत्र्यासाठी 30 नोव्हेंबर, आंबासाठी 31 डिसेंबर 2019, डाळींब 14 जानेवारी 2020 आहे. तसेच बँकांनी कर्जदार शेतकऱ्यांची घोषणापत्रे संबंधित विमा कंपनीस सादर करण्याची अंतिम मुदत द्राक्ष, मोसंबी व केळी फळपिकांकरीता 21 नोव्हेंबर, संत्र्यासाठी 16 डिसेंबर, आंबा फळपिकाकरीता 15 जानेवारी 2020 व डाळींबकरीता 29 जानेवारी 2020 आहे.
     द्राक्ष फळपिकासाठी एकूण विमा संरक्षित रक्कम 3 लक्ष 8 हजार आहे व शेतकऱ्याने भरावयाचा एकूण विमा हप्ता 15 हजार 400 प्रति हेक्टर आहे. तर गारपीटसाठी एकूण विमा हप्ता संरक्षीत रक्कम 5133 रूपये आहे. तसेच मोसंबीकरीता 77000 प्रती हेक्टर विमा संरक्षित रक्कम, 3850 प्रती हेक्टर विमा दर व गारपीट झाल्यास 1283 रूपये प्रति हेक्टरी विमा संरक्षीत रक्कम मिळणार आहे.  डाळींबसाठी प्रती हेक्टर 1 लक्ष 21 हजार प्रती हेक्टरी विमा संरक्षित रक्कम, 6050 प्रती हेक्टर विमा दर व गारपीटच्या नुकसानीपोटी 2017 रूपये विमा संरक्षीत रक्कम मिळेल.  केळी फळपिकाकरीता प्रती हेक्टर  1 लक्ष 32 हजार विमा संरक्षित रक्कम व 6600 विमा हप्ता प्रति हेक्टर दर आहे. तसेच गारपीट नुकसानीसाठी 2200 रूपये विमा संरक्षीत रक्कम असणार आहे. त्याचप्रमाणे संत्र्याकरीता प्रती हेक्टर 77000 विमा संरक्षीत रक्कम,  3850 विमा हप्ताप्रति हेक्टर दर असणार आहे. तर गारपीट नुकसानीकरीता 1283 रूपये प्रति हेक्टर विमा संरक्षीत रक्कम असणार आहे. आंबा फळपिकरीता प्रती हेक्टरी विमा संरक्षीत रक्कम प्रती हेक्टर 1 लक्ष 32 हजार व प्रती हेक्टर विमा हप्ता दर 6600 आहे. गारपीटने नुकसान झाल्यास आंबा फळपिकासाठी 2200 रूपये विमा संरक्षीत रक्कम प्रति हेक्टर असणार आहे. 
  योजनेत सहभागी होण्याच्या अंतिम दिनांकास शासकीय सुट्टी आल्यास सहभागाचा दिनांक पुढील कार्यालयीन कामकाजाच्या दिवसापर्यंत लागू राहणार आहे. शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त संख्येने या योजनेत सहभागी व्हावे. याबाबत अधिक माहितीसाठी तालुका कृषि अधिकारी कार्यालय, कृषि सहायक, कृषि पर्यवेक्षक, मंडळ कृषि अधिकारी, नजीकच्या बँक शाखेशी व संबंधीत विमा कंपनीशी संपर्क साधावा. शेतकऱ्यांनी अंतिम मुदतीची वाट न बघता जास्तीत जास्त प्रमाणात या योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी नरेंद्र नाईक यांनी केले  आहे.
                                                            फळपिक निहाय समाविष्ट महसूल मंडळ
द्राक्ष : बुलडाणा, बोराखेडी ता. मोताळा, जळगांव, सोनाळा व बावनबीर ता. संग्रामपूर, दे.राजा. मोसंबी : सिं.राजा, सोनोशी, किनगांव राजा, दुसरबीड, मलकापूर पांगरा, शेंदुर्जन व साखरखेर्डा ता. सिं.राजा. डाळींब : पेठ, चिखली, चांधई, धोडप, कोलारा, एकलारा, अमडापूर, उंद्री, शेळगांव आटोळ, हातणी, मेरा खु ता. चिखली, बुलडाणा, धाड ता. बुलडाणा, शेलापूर, बोराखेडी, मोताळा व धा. बढे ता. मोताळा, हिवरखेड, पिंपळगांव राजा व काळेगांव ता. खामगांव, सि.राजा, दुसरबीड, शेंदुर्जन, साखरखेर्डा ता. सिं.राजा, दे.राजा, दे.मही, तुळजापूर, मेहुणा राजा, अंढेरा ता. दे.राजा, जामोद व पिंपळगांव काळे ता. जळगांव जा, जांबुळधाबा व नरवेल ता. मलकापूर, लोणार ता. लोणार, डोणगांव, हिवरा आश्रम, शेलगांव देशमुख, नायगांव दत्तापूर ता. मेहकर, केळी : बुलडाणा ता. बुलडाणा, मेरा खुर्द ता. चिखली, डोणगांव, हिवरा आश्रम, वरवंड, जानेफळ, नायगांव दत्तापूर ता. मेहकर,  बोराखेडी, मोताळा, धा. बढे, पिंप्री गवळी, पिं. देवी, रोहीनखेड ता. मोताळा, जळगांव व जामोद ता. जळगांव जामोद, संग्रामपूर, बावनबीर, सोनाळा, पातुर्डा ता. संग्रामपूर,  हिवरखेड, काळेगांव, वझर, लाखनवाडा, पि.राजा ता. खामगांव. संत्रा : डोणगांव, हिवरा आश्रम, मेहकर, शेलगांव दे, जानेफळ, नायगांव दत्तापूर ता. मेहकर, बिबी, अंजनी खुर्द, सुलतानपूर, लोणार, हिरडव ता. लोणार, हिवरखेड, काळेगांव, वझर, लाखनवाडा, आडगांव ता. खामगांव, दे. मही व  अंढेरा ता. दे.राजा, बावनबीर, सोनाळा, संग्रामपूर ता. संग्रामपूर, साखरखेर्डा, शेंदुर्जन, मलकापूर पांग्रा ता. सिं.राजा, जामोद ता. जळगांव जामोद, आंबा : सि.राजा ता. सिं.राजा.

शिष्यवृत्तीसाठी अर्ज महाडीबीटी पोर्टलवर सादर करण्यास मुदतवाढ

 झाकीर हुसैन मदरसा आधुनिकीकरण योजनेच्या प्रस्ताव सादर करण्यास मुदतवाढ
·          30 नोव्हेंबर 2019 अंतिम मुदत
बुलडाणा, दि. 6 :  डॉ झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना सन 2019-20 अंतर्गत प्रस्ताव सादर करण्यास यापूर्वी 31 ऑगस्ट 2019 मुदत होती. सदर मुदत वाढविण्यात आली असून 11.10.2013 च्या शासन निर्णयातील विहीत नमुन्यातील परिपूर्ण अर्ज आवश्यक कागदपत्रे जोडून प्रस्ताव 30 नोव्हेंबर 2019 पर्यंत मागविण्यात येत आहे. तरी जिल्ह्यातील सदर योजनेतंर्गत अनुदान मिळवू इच्छिणाऱ्या निवासी मदरसांनी दिनांक 11.10.2013 च्या शासन निर्णयामधील निकषांनुसार विहीत नमुन्यातील परिपूर्ण भरलेले प्रस्ताव कागदपत्रांच्या पुर्ततेसह अल्पसंख्यांक विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, बुलडाणा येथे 30 नोव्हेंबर 2019 पर्यंत सादर करावे व या योजनेचा लाभ घ्यावा. विहीत मुदतीनंतर प्राप्त झालेले प्रस्ताव स्वीकारले जाणार नाहीत, असे जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने प्रसिद्धी पत्रकान्वये कळविण्यात आले आहे.  
                                                                        ******
              पाळणाघर चालविणाऱ्या इच्छूक संस्थांनी 20 नोव्हेंबरपर्यंत प्रस्ताव सादर करावे
बुलडाणा, दि. 6: जिल्हा परिषद अंतर्गत असलेले एकात्मिक बाल विकास सेवा योजना कक्षातर्फे  जिल्ह्यातील ज्या स्वयंसेवी संस्थांना खाजगीरित्या पाळणाघर चालवायची आहेत. अशा सर्व पाळणाघर चालविणाऱ्या संस्था चालकांनी शासन निर्णय 7 जानेवारी 2019 च्या अटी व शर्ती नुसार 20 नोव्हेंबर 2019 पर्यत एकात्मिक बाल विकास सेवा योजना कक्ष, जिल्हा परिषद, बुलडाणा येथे प्रस्ताव सादर करावे, असे आवाहन जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.
                                                                        *****
शिष्यवृत्तीसाठी अर्ज महाडीबीटी पोर्टलवर सादर करण्यास मुदतवाढ 
  • 15 नोव्हेंबर 2019 अंतिम मुदत
बुलडाणा, दि. 6: जिल्ह्यातील सर्व  कनिष्ठ, वरिष्ठ, व्यवसायिक, बिगर व्यवसायिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र शासनाच्या सर्व प्रकारच्या शिष्यवृत्तीसाठी महाडीबीटी पोर्टल शैक्षणिक सत्र 2019-20 शैक्षणिक वर्षाकरीता 31 ऑक्टोंबर 2019 पर्यंत कार्यान्वीत करण्यात आले होते. अनुसूचित जाती, इमाव, विमाप्र व विजाभज प्रवर्गातील मागासवर्गीय विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहू नये म्हणून महाडीबीटी पोर्टलवरील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीसाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत 15 नोव्हेंबर 2019 पर्यत शासनातर्फे वाढवून देण्यात आली आहे. तेव्हा महाविद्यालय प्राचार्यांनी भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण व परिक्षा शुल्क अर्ज भरण्याच्या अंतिम दिनांकाची सुचना विद्यार्थ्यांना लेखी कळवून सुचना महाविद्यालयाच्या सुचना फलकावर लावावी.
    महाडीबीटी संगणकीय प्रणालीवरील डॅशबोर्डचा दि. 4 नोव्हेंबर 2019 रोजी आढावा घेतला असता महाविद्यालय स्तरावर भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण, परिक्षा शुल्क व इतर योजनेचे अनु. जाती, इमाव, विजाभज, विमाप्र प्रवर्गाचे एकूण 27 हजार 592 विद्यार्थ्यांचे अर्ज महाडीबीटी पोर्टलवर प्रलंबित आहेत.  महाविद्यालय प्राचार्य यांनी महाडीबीटी संगणकीय प्रणालीवरील विद्यार्थी शिष्यवृत्ती अर्ज प्रचलित नियमानुसार तपासणी करुन पात्र अर्ज  तात्काळ सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, बुलडाणा  यांचेकडे मंजुरीसाठी ऑनलाईन सादर करावेत.
    तसेच भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण, परिक्षा शुल्क योजनेचा कोणताही अनुसूचित जाती, इमाव, विमाप्र, विजाभज प्रवर्गातील पात्र विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहील्यास त्यास सर्वस्वी संबंधित महाविद्यालयाचे प्राचार्य जबाबदार राहतील, असे सहाय्यक आयुक्त डॉ. अनिता राठोड यांनी असे प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.
000000
मैत्रेय ग्रृप ऑफ कंपनीज विरोधात राज्यात 31 ठिकाणी गुन्हे
  • 4 अधिसुचनेअन्वये 353 मालमत्ता जप्त
  •  ठेवीदारांनी आर्थिक गुन्हे शाखा, बुलडाणा येथे अर्ज करावे
बुलडाणा, दि. 6 : मैत्रेय ग्रुप ऑफ कंपनीविरुध्द महाराष्ट्रात 31 ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहे. तसेच शासन स्तरावर 4 अधिसुचनांच्या माध्यमातून 353 मालमत्ता जप्त करण्यात आलेल्या आहेत. इतर नवीन मालमत्तांचा शोध लागला असून शासन स्तरावर अधिुसचना काढून त्या मालमत्ता लिलावाद्वारे विक्री झाल्यानंतर ठेवीदारांना ठेवी परत करण्यात येणार आहे.
  गुन्ह्याचे तपासात सुसुत्रता रहावी. तसेच ठेवीदारांना त्यांच्या ठेवी परत करता याव्यात या उद्देशाने संनियंत्रण समिती अपर पोलीस महासंचालक, आर्थिक गुन्हे शाखा, मुंबई यांचे अध्यक्षेतखाली गठीत करण्यात आली आहे. या समितीमध्ये सक्षम प्राधिकारी तथा उपजिल्हाधिकारी तरुणकुमार खत्री यांची नियुक्ती केली आहे. बुलडाणा जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयात ए.एम बोडखे, पोलीस निरीक्षक,  आर्थिक गुन्हे शाखा, बुलडाणा यासंदर्भातील गुन्ह्यांचा तपास करीत आहेत.  ठेवी परत मिळण्यासाठी ठेवीदारांचे अर्ज आर्थिक गुन्हे शाखा, बुलडाणा येथे स्विकारणे सुरु आहे. जिल्ह्यातील सर्व ठेवीदारांनी ठेवी परत मिळण्यासाठी अर्ज आर्थिक गुन्हे शाखे कडे मुदतीत दाखल करावे, असे डी. बी तडवी, पोलीस उप-अधिक्षक, आर्थिक गुन्हे शाखा, बुलडाणा यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.
                                                                                    *******
 लोणार येथे 8 व 9 नोव्हेंबर रोजी चित्रप्रदर्शनी व  सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन
  • महात्मा गांधी यांच्या शतकोत्तर सुवर्ण जयंती महोत्सवाचे निमित्त
बुलडाणा, दि. 6 : केंद्र शासनाच्या माहिती व  प्रसारण मंत्रालयाच्या क्षेत्रीय लोकसंपर्क ब्युरो, औरंगाबाद यांच्यावतीने गांधी : जीवन कार्य व स्वच्छता या विषयावर चित्रप्रदर्शनी व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन श्री मंगल कार्यालय, लोणार येथे 8 व 9 नोव्हेंबर 2019 रोजी करण्यात आले आहे. महात्मा गांधींच्या शतकोत्तर सुवर्ण जयंती महरोत्सवाच्या निमित्ताने सदर आयोजन करण्यात येणार आहे. ही चित्रप्रदर्शनी 8 व 9 नोव्हेंबर 2019 रोजी सकाळी 10 ते रात्री 8 या कालावधीत सर्वांसाठी विनामूल्य सुरू राहणार आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन 8 नोव्हेंबर रोजी दु. 12.30 वाजता होणार आहे. या कार्यक्रमास उपस्थित राहून संपूर्ण कार्यक्रमाला लाभ घेण्याचे आवाहन केंद्र शासनाच्या क्षेत्रीय लोकसंपर्क ब्युरो, औरंगाबाद यांच्यावतीने प्रसिद्धी पत्रकान्वये करण्यात आले आहे.

--