Thursday 29 February 2024

DIO BULDANA NEWS 29.02.2024

वयस्कर, दिव्यांग मतदारांना मतदानासाठी पोस्टल बॅलेट व्यवस्था

*अर्ज करून घरूनच मतदानाची सुविधा

बुलडाणा, दि. 29 : आगामी लोकसभा निवडणुकीत 80 वर्षाहून अधिक वयोवद्ध आणि दिव्यांग मतदारांना मतदानासाठी पोस्टल बॅलेटची व्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी त्यांना 12 डी हा फॉर्म भरून द्यावा लागणार आहे. यामुळे या मतदारांना घरूनच मतदान करण्याची सुविधा मिळणार आहे.

मतदार यादीमध्ये नाव नोंदविलेले असणाऱ्या 80 वर्षाहून अधिक वय असणारे नागरीक आणि दिव्यांग जे मतदान केंद्रावर येऊ शकत नाही, अशा मतदारांना 12 डी हा फॉर्म भरून देण्याची सुविधा देण्यात आली आहे. मतदान केंद्रावर येऊ शकत नाही, अशा मतदारांनी स्थानिक स्तरावरील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा लागणार आहे. याप्रकारे मतदान करण्यासाठी फॉर्म 12 डी आणि दिव्यांग असल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे. जेणेकरून निवडणुकीच्या दिनांकापूर्वी संबंधित निवडणूकीचे अधिकारी घरी येऊन मतदानाची संधी संबंधी दिव्यांग आणि वयस्क मतदारांना पूर्व सूचना देऊन येतील.

या सुविधेचा लाभ जे मतदार मतदान केंद्रावर येऊ शकणार नाही, अशा मतदारांनी घ्यावा. तसेच 12 डी फॉर्म भरून देण्याची काळजी घ्यावी. यात अडचणी असल्यास संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचा संपर्क क्रमांक देऊन मदत करण्यात येणार आहे, तसेच अडचण असल्यास 1950, वोटर हेल्पलाईनवर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.

00000

कौशल्य विकासाचा दिव्यांगांनी लाभ घेण्याचे आवाहन

बुलडाणा, दि. 29 : प्रमोद महाजन कौशल्य विकास प्रशिक्षणाचा सक्षम दिव्यांगांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांना नोकरीच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र कार्यालयातर्फे जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजना सन 2023-24 अंतर्गत किमान कौशल्य विकास कार्यक्रम, ग्रामीण कौशल्य विकास केंद्र, प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य विकास केंद्र योजना राबविण्यात येत आहेत. सदर योजनेंतर्गत देण्यात येणारे प्रशिक्षण हे पूर्णपणे मोफत असून हे प्रशिक्षण संपूर्ण जिल्ह्यामध्ये देण्यात येणार आहे. या योजनेचा सक्षम दिव्यांग लाभार्थ्यांनी प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.

याबाबत अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, बुलडाणा कार्यालयाच्या 07262-242342 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त प्र. वा. खंडारे यांनी केले आहे.

00000

भारत सरकार शिष्यवृत्तीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

बुलडाणा, दि. 29 : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या अधिनस्त अकोला, बुलडाणा व वाशिम या तीन जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय, अनुदानित, कायम विना अनुदानित महाविद्यालयांनी सन 2023-24 या शैक्षणिक सत्रातील भारत सरकार शिष्यवृत्ती व इतर शिष्यवृत्ती योजनेचे लाभ मिळण्याकरिता नवीन अर्ज, तसेच नुतनीकरण अर्ज भरावे, असे आवाहन करण्यात आले आहे. यासाठी संकेतस्थळ ऑक्टोबर महिन्यापासून कार्यान्वित झाले आहे.

सन 2023-24 या शैक्षणिक सत्रामध्ये अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना विविध शिष्यवृत्ती योजनेचा लाभ मिळण्यासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज भरणे आवश्यक आहे. अकोला, बुलडाणा व वाशिम जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयामध्ये सन 2023-24 या शैक्षणिक सत्रामध्ये शिक्षण घेत असलेल्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना भारत सरकार शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क, परिक्षा शुल्क व इतर शिष्यवृत्ती योजनेचे नवीन अर्ज तथा नुतनीकरण अर्ज तात्काळ mahadbt.maharashtra.gov.in या प्रणालीवर ऑनलाईन भरावे लागणार आहे. अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना विहित मुदतीत शिष्यवृत्तीचे अर्ज भरुन महाविद्यालयास सर्व दस्ताएैवज जोडून सादर करावे लागणार आहे.

महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी महाविद्यालय स्तरावरील फलकावर सूचना, तसेच नोटीस देऊन अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजनेचा लाभ मिळण्यासाठी अवगत करावे. तसेच सन 2021-22 व 2022-23 या वर्षात महाविद्यालयस्तरावरील विविध कारणास्तव प्रलंबित असलेले अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांचे नवीन अर्ज, तसेच नुतनीकरण अर्ज तात्काळ त्रृटी पुर्तता करुन प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अकोला कार्यालयाच्या लॉगीनला मंजूरीसाठी पाठवावे लागणार आहे. विद्यार्थ्यांच्या अर्जाची हार्ड कॉपी महाविद्यालयस्तरावर जतन करुन ठेवण्यात यावी. सन 2023-24 या शैक्षणिक वर्षामध्ये शिक्षण घेत असलेल्या सर्व अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी mahadbt.maharashtra.gov.in या प्रणालीवर भारत सरकार पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती आणि इतर शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेण्याकरिता ऑनलाईन अर्ज भरावे, असे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प प्रकल्प अधिकारी मोहनकुमार व्यवहारे यांनी केले आहे.

0000000

यवतमाळ येथे आज विभागीय रोजगार मेळावा

बुलडाणा, दि. 29 : अमरावती विभागातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांना नोकरीच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, यासाठी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागीय आयुक्तालय, अमरावती तसेच लोकनायक बापूजी अणे महिला महाविद्यालय, यवतमाळ यांच्या वतीने पंडीत दिनदयाल उपाध्याय विभागीय रोजगार मेळाव्याचे आयोजन शुक्रवार, दि. 1 मार्च रोजी करण्यात आले आहे.

या रोजगार मेळाव्यात 20 पेक्षा अधिक उद्योजकांनी त्यांच्याकडील 1300 पेक्षा अधिक रिक्त पदे अधिसुचित केली आहेत. सदर कार्यालयाकडे नोंदणीकृत उमेदवारांना रोजगार उपलब्ध होण्याच्या दृष्टीने या रोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे. या मेळाव्याद्वारे नामांकित कंपनी प्रतिनिधीद्वारे गरजु व रोजगार इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेऊन प्राथमिक निवड करतील. यासोबतच उमेदवारांना नि:शुल्क कौशल्य विकास प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नाव नोंदणी केलेल्या दहावी, बारावी, आयटीआय, पदवीधर उमेदवारांनी दि. 1 मार्च रोजी लोकनायक बापूजी अणे महिला महाविदयालय, यवतमाळ येथे प्रत्यक्ष उपस्थित राहुन सहभागी व्हावे. पात्र, गरजू व नोकरी इच्छुक स्त्री-पुरुष उमेदवार आपल्या शैक्षणिक पात्रतेच्या आधारे एकापेक्षा जास्त पदाकरिता अर्ज करु शकतील. मेळाव्यासाठी आवश्यक शैक्षणिक कागदपत्रांसह सकाळी १० वाजता स्वखर्चाने उपस्थित राहून आपली नाव नोंदणी करावी आणि उपस्थित कंपन्यांच्या प्रतिनिधी समवेत मुलाखत द्यावी.

याबाबत समस्या आल्यास जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, बुलडाणा या कार्यालयाच्या (07262-242342) या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त प्र. वा. खंडारे यांनी केले आहे.

000000

Wednesday 28 February 2024

DIO BULDANA NEWS 28.02.2024

 



मतदारांमध्ये विश्वास निर्माण होण्यासाठी कठोर निर्णय घ्यावेत

-जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील

बुलडाणा, दि. 28 : आगामी काळात लोकसभा निवडणूक भयमुक्त वातावरणात पार पडणे आवश्यक आहे. यात पोलिस विभागाची भूमिका महत्वाची राहणार आहे. मतदारांमध्ये विश्वास निर्माण होण्यासाठी पावले उचलावीत, तसेच कठोर निर्णय घ्यावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले.

लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने संबंधित पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण आज नियोजन सभागृहात पार पडले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार, उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुहासिनी गोणेवार, उपजिल्हाधिकारी शरद पाटील, उपविभागीय अधिकारी डॉ. रामेश्वर पुरी, समाधान गायकवाड, अतिरिक्त पोलिस अधीक्षक बी. महामुनी, जिल्हा सूचना अधिकारी सुनील खुळे उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ. पाटील म्हणाले, येत्या काळात निवडणूक विषयक कार्यवाही प्राधान्याचा विषय असणार आहे. निवडणूक कामकाजात विविध ॲपचा उपयोग होणार आहे. त्या अनुषंगाने याबाबतची माहिती यासंबंधित प्रत्येकाला असणे आवश्यक आहे. या ॲपच्या माध्यमातून एकत्रित करण्यात आलेली माहिती ही निवडणूक आयोगाला दिसणार आहे. त्यामुळे यात गांभीर्याने कामकाज करणे आवश्यक आहे. तसेच पथकाकडून केलेल्या कारवाईची माहिती अचूकपणे समाविष्ट करणे गरजेचे आहे. यात कोणत्याही प्रकारे निष्काळजीपणा करण्यात येऊ नये. फिरत्या पथकाच्या प्रमुखाला दंडाधिकाऱ्याचा दर्जा देण्यात आला आहे. त्यामुळे विविध कारवाई करताना सोयीचे होणार आहे.

सी-व्हीजीलच्या माध्यमातून नागरिक आचारसंहिता भंगबाबत तक्रारी करू शकणार आहे. यावर आलेल्या तक्रारीवर फिरत्या पथकाने तात्काळ कार्यवाही करावी. तसेच तपासणी पथकाने गांजा, अवैध दारू किंवा इतर बाबतीत जप्तीची कार्यवाही करावी. बँकांनी रोख रक्कम वाहतूक करण्यासाठी योग्य ती काळजी घ्यावी. संपूर्ण निवडणूक कालावधीत कायदा व सुव्यवस्थेची कोणतीही परिस्थिती उद्भवू नये यासाठी दक्ष राहावे. निवडणूक प्रक्रियेत ईव्हीएम ही अत्यंत संवेदनशील आहे. याबाबत कोणतीही तडजोड करू नये. ईव्हीएमबाबत आलेल्या प्रत्येक सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

यावेळी श्री. शेलार यांनी निवडणूक कर्तव्यावर असलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना मतदानासाठी देण्यात येणाऱ्या सुविधेबाबत माहिती दिली. श्री. महामुनी यांनी निवडणूक प्रक्रिया गांभीर्यपूर्वक घेऊन दररोज अहवाल सादर करावा, तसेच निर्भय वातावरणात निवडणूक होण्यासाठी कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. प्रशिक्षणात श्री. गायकवाड यांनी आदर्श आचारसंहिता, श्री. खुळे यांनी सी-व्हीजील ॲप, शरद पाटील यांनी ईएसएमएस, श्री. पुरी यांनी निवडणूक खर्चाबाबत माहिती दिली. श्रीमती गोणेवार यांनी निवडणूक विषयक कामकाजाच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या सूचना सांगितल्या.

00000

अधिकृत कंपनीमार्फत आरोग्य मित्राची नियुक्ती

बुलडाणा, दि. 28 : महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेंतर्गत अंगीकृत रुग्णालयांमध्ये रुग्णांच्या मार्गदर्शनासाठी आरोग्य मित्रांची नियुक्त करण्यात आली आहेत. काही संस्थाद्वारे आरोग्यमित्र नियुक्तीसंदर्भात जाहिराती व्हायरल होत आहे. अशा मेसेज, अफवा व भाम्रक जाहिरातीवर कुणीही विश्वास ठेऊ नये, असे आवाहन प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे विभागीय व्यवस्थापक सुनील वाठोरे यांनी केले आहे.

जिल्हा समन्वयक डॉ. विवेक सावके यांनी आरोग्य मित्रांची नियुक्ती अधिकृत विमा कंपनीकडून केली जाते. सद्यास्थितीत अधिकृत विमा कंपनीकडून नियुक्तीसंदर्भात कोणतेही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली नाही. राज्य शासनाची महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना, तसेच केंद्र शासनाची प्रधानमंत्री जनआरोग्य योजना २०१८ पासून राज्यात राबविली जाते. रुग्णांना मार्गदर्शन करणे, तसेच प्रणालीवर रुग्णांच्या कागदपत्रांची नोंदणी करण्यासाठी आरोग्यमित्रांची नियुक्ती केली जाते. आरोग्य मित्रांची नियुक्ती विमा कंपनीच्या तृतीय पक्ष प्रशासकाव्दारे कार्यरत एम. डी. इंडिया, मेडी असिस्ट, पॅरामाऊंट व हेल्थ इंडिया इन्शुरन्स या चार कंपन्यांद्वारे केली जाते.

सदर दोन्ही योजना २०२० पासून एकत्रित करण्यात आल्या आहे. मागील काही दिवसांपासून विविध यंत्रणा व संस्थांद्वारे आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजने करीता आरोग्यमित्र नियुक्ती देण्यासंदर्भात जाहिराती व संदेश व्हायरल होत आहे. या अफवांवर विश्वास ठेवू नये. अशा कोणत्याही प्रकारची जाहिरात कंपनीकडून प्रसिद्ध झाली नाही. अशा अफवा, भ्रामक जाहिरातीला बळी पडू नये, याबाबत सजग रहावे, तसेच गरजू रुग्णांना मोफत मार्गदर्शनाकरीता 18002332200 वर संपर्क साधावा आणि आयुष्मान भारत beneficiary.nha.gov.in मोबाईल ॲप डाउनलोड करून स्वतः केवायसी करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

00000






भाषेला महत्त्व आहेच, पण मातृभाषेचे  महत्त्व अतूट

-जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील

बुलडाणा, दि. 28 : भाषा हेच एकमेव माध्यम आहे, ज्यामुळे एकमेकांसोबत जुळल्या जाते. त्यामुळे जगातील प्रत्येक भाषा ही महत्वाची आहे. मात्र मातृभाषेचे महत्व आतूट असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार, तहसिलदार संजिवनी मुपळे, माया माने, जिल्हा पुरवठा अधिकारी आर. एम. बस्सीये, साहित्यिक विक्रांतसिंह राजपूत, विदर्भ साहित्य संघाच्या सचिव वैशाली तायडे, नायब तहसीलदार प्रमोद करे, श्री. हिवाळे आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ. पाटील म्हणाले, विद्यार्थी दशेपासूनच भाषा हा विषय कायम मागे असतो. भाषेची नीट तयारी केली नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे व्याकरण व्यवस्थित नसते. मात्र प्रत्येक भाषा ही महत्वाची आहे. त्यातही जन्मल्यापासून मातृभाषा कायम कानावर पडत असते आणि हिच भाषा कायम कामाला येते. मातृभाषा शिकण्यासाठी कोणतेही कष्ट लागत नाही, मात्र परकीय भाषा शिकण्यासाठी प्रचंड मेहनत लागते. त्यामुळे मातृभाषेसह इतरही भाषा शिकाव्यात. इंग्रजीवर प्रभुत्व मिळवावे. आज मराठी भाषा सर्व ठिकाणी उपयोगी आणता येऊ शकते. भाषा शिकताना विद्यार्थ्यांनी पाया मजबूत ठेवावा. शासनाने 2013पासून मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्याचे ठरविले आहे. यामुळे राज्याच्या विकासाची मुहूर्तमेढ रोवली गेली आहे. आपली कला, संस्कृती आदर्श असून हा वसा पुढे नेणे गरजेचे आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी प्रत्येक मार्ग शोधावा, कोणत्यातरी मार्गावर यश जरूर मिळेल.

वैशाली तायडे यांनी मराठी भाषेचा ऱ्हास होत असताना तिचे संवर्धन करण्यात येत आहे. इंग्रजी ही ज्ञानभाषा म्हणून शिकावी. मात्र अस्सल जीवन जगताना मातृभाषा हिच कामी येते. मातृभाषेने समृद्ध भाषा जगली पाहिजे. मराठीच्या संवर्धनासाठी न्यायालयापासून शुभेच्छा देण्यासाठी मराठीचा उपयोग व्हावा. बडबड गीते आणि जात्यावरच्या ओवीनी मराठी भाषा विकसित झाली असल्याचे सांगितले. त्यामुळे प्रत्येकाने मराठीला विसरू नये, असे आवाहन केले.

विक्रांतसिंह राजपूत यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील विविध प्रसंगावर प्रकाश टाकला.  शिवचरित्रातून मराठी संस्कृतीचे महत्त्व सांगितले. त्यांच्या जीवनातील प्रत्येक प्रसंग स्फुर्तीदायक आहे. त्यांचा प्रत्येक पराक्रम हा आठवावा लागेल. छत्रपती शिवाजी महाराज यांचे संपूर्ण जीवन प्रामुख्याने मराठीतून समोर आले. त्यामुळे शिवाजी महाराज हा विषय डोक्यात घेण्याचा विषय आहे. मराठी ही अतिशय सुंदर भाषा आहे. मराठीचा सन्मान व्हायला हवा. शिवाजी महाराजांचा प्रताप मराठी भाषेसह ब्रज भाषेत कविराज भूषण यांनी रुपात मांडला आहे. त्यांनी त्यांच्या काव्यातून स्फुर्ती निर्माण केली आहे. शिवाजी महाराज हे व्यक्ती नसून तो आता एक शक्ती आणि विचार झाला असल्याचे सांगितले.

निवासी उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार यांनी प्रास्ताविकातून सर्वांनी मातृभाषा मराठीचे संवर्धन जाणिवपूर्वक करण्याचे आवाहन केले. दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. मिनाक्षी पटेल, पूनम बसू यांनी मनोगत व्यक्त केले. श्री. कंकाळ यांनी सूत्रसंचालन केले. तहसिलदार माया माने यांनी आभार मानले.

000000

सोमवारी लोकशाही दिनाचे आयोजन

बुलडाणा, दि. 28 : दर महिन्यात पहिल्या सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. मार्च महिन्याचा लोकशाही दिन सोमवार, दि. 4 मार्च 2024 रोजी दुपारी 1 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आला आहे.

तक्रारदारांनी लोकशाही दिनी उपस्थित राहावे, उपस्थित राहणे शक्य नसल्यास तक्रारी रजिस्टर पोस्टाने लोकशाही दिनाआधी जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचतील, असे पाठवावे, असे निवासी उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार यांनी कळविले आहे.

00000

कौशल्य विकास अंतर्गत बांधकाम कामगारांना संधी

बुलडाणा, दि. 28 : महाराष्ट्र इंटरनॅशनल आणि एनएसडीसी इंटरनॅशनल मार्फत इस्त्राईलमधील कुशल बांधकाम कामगारांसाठी नोकरीची संधी उपलबध करून देण्यात आली आहे. यासाठी इच्छुकांनी ऑनलाईन नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास संस्थेंतर्गत इस्त्राईलमध्ये कुशल बांधकाम कामगारांसाठी नोकरीची संधी उपलब्ध करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील बांधकाम क्षेत्रातील किमान तीन वर्षांचा अनुभव असलेल्या व्यक्तींकरीता सुमारे 1.40 लाख ते 2 लाखापर्यत मासिक वेतन देण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने इच्छुक व्यक्तींना इस्त्राईलमध्ये नोकरीची संधी महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास विभागामार्फत उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासाठी इच्छुक व्यक्तींनी rojgar.mahaswayam.gov.in/#/mic या वेबसाईटवर नोंदणी करावी, असे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त डॉ. अनिता राठोड यांनी केले आहे.

00000

बाल विकास कार्यालयाकडून भाडेतत्वावरील वाहनासाठी निविदा आमंत्रित

बुलडाणा, दि. 28 : बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी प्रकल्प कार्यालयाकडून भाडेतत्वावरील वाहनासाठी निविदा मागविण्यात आल्या आहेत.

एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत बाल विकास प्रकल्प अधिकारी, नागरी प्रकल्प, बुलढाणा (दक्षिण) या कार्यालयासाठी भाडेतत्वावर वाहन घेण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे. अटीशर्तीनुसार या कार्यालयासाठी भाडेतत्वावर वाहन घेणेकरीता बाल विकास प्रकल्प अधिकारी, नागरी प्रकल्प, बुलढाणा (दक्षिण), एकता नगर, नगर परिषद शाळेसमोर, बुलढाणा येथे दि. ६ मार्च २०२४ पर्यंत परिपूर्ण प्रस्ताव सादर करावा, असे आवाहन बाल विकास प्रकल्प अधिकारी श्रीमती मं. मा. पांचाळ यांनी केले आहे.

00000

Tuesday 27 February 2024

DIO BULDANA NEWS 27.02.2024






भाषेला महत्त्व आहेच, पण मातृभाषेचे  महत्त्व अतूट

-जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील

बुलडाणा, दि. 27 : भाषा हेच एकमेव माध्यम आहे, ज्यामुळे एकमेकांसोबत जुळल्या जाते. त्यामुळे जगातील प्रत्येक भाषा ही महत्वाची आहे. मात्र मातृभाषेचे महत्व आतूट असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार, तहसिलदार संजिवनी मुपळे, माया माने, जिल्हा पुरवठा अधिकारी आर. एम. बस्सीये, साहित्यिक विक्रांतसिंह राजपूत, विदर्भ साहित्य संघाच्या सचिव वैशाली तायडे, नायब तहसीलदार प्रमोद करे, श्री. हिवाळे आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ. पाटील म्हणाले, विद्यार्थी दशेपासूनच भाषा हा विषय कायम मागे असतो. भाषेची नीट तयारी केली नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे व्याकरण व्यवस्थित नसते. मात्र प्रत्येक भाषा ही महत्वाची आहे. त्यातही जन्मल्यापासून मातृभाषा कायम कानावर पडत असते आणि हिच भाषा कायम कामाला येते. मातृभाषा शिकण्यासाठी कोणतेही कष्ट लागत नाही, मात्र परकीय भाषा शिकण्यासाठी प्रचंड मेहनत लागते. त्यामुळे मातृभाषेसह इतरही भाषा शिकाव्यात. इंग्रजीवर प्रभुत्व मिळवावे. आज मराठी भाषा सर्व ठिकाणी उपयोगी आणता येऊ शकते. भाषा शिकताना विद्यार्थ्यांनी पाया मजबूत ठेवावा. शासनाने 2013पासून मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्याचे ठरविले आहे. यामुळे राज्याच्या विकासाची मुहूर्तमेढ रोवली गेली आहे. आपली कला, संस्कृती आदर्श असून हा वसा पुढे नेणे गरजेचे आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी प्रत्येक मार्ग शोधावा, कोणत्यातरी मार्गावर यश जरूर मिळेल.

वैशाली तायडे यांनी मराठी भाषेचा ऱ्हास होत असताना तिचे संवर्धन करण्यात येत आहे. इंग्रजी ही ज्ञानभाषा म्हणून शिकावी. मात्र अस्सल जीवन जगताना मातृभाषा हिच कामी येते. मातृभाषेने समृद्ध भाषा जगली पाहिजे. मराठीच्या संवर्धनासाठी न्यायालयापासून शुभेच्छा देण्यासाठी मराठीचा उपयोग व्हावा. बडबड गीते आणि जात्यावरच्या ओवीनी मराठी भाषा विकसित झाली असल्याचे सांगितले. त्यामुळे प्रत्येकाने मराठीला विसरू नये, असे आवाहन केले.

विक्रांतसिंह राजपूत यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील विविध प्रसंगावर प्रकाश टाकला.  शिवचरित्रातून मराठी संस्कृतीचे महत्त्व सांगितले. त्यांच्या जीवनातील प्रत्येक प्रसंग स्फुर्तीदायक आहे. त्यांचा प्रत्येक पराक्रम हा आठवावा लागेल. छत्रपती शिवाजी महाराज यांचे संपूर्ण जीवन प्रामुख्याने मराठीतून समोर आले. त्यामुळे शिवाजी महाराज हा विषय डोक्यात घेण्याचा विषय आहे. मराठी ही अतिशय सुंदर भाषा आहे. मराठीचा सन्मान व्हायला हवा. शिवाजी महाराजांचा प्रताप मराठी भाषेसह ब्रज भाषेत कविराज भूषण यांनी रुपात मांडला आहे. त्यांनी त्यांच्या काव्यातून स्फुर्ती निर्माण केली आहे. शिवाजी महाराज हे व्यक्ती नसून तो आता एक शक्ती आणि विचार झाला असल्याचे सांगितले.

निवासी उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार यांनी प्रास्ताविकातून सर्वांनी मातृभाषा मराठीचे संवर्धन जाणिवपूर्वक करण्याचे आवाहन केले. दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. मिनाक्षी पटेल, पूनम बसू यांनी मनोगत व्यक्त केले. श्री. कंकाळ यांनी सूत्रसंचालन केले. तहसिलदार माया माने यांनी आभार मानले.

000000







 बचतगटांच्या नवतेजस्विनी महोत्सवाचे उद्घाटन

बुलडाणा, दि. 27 : नवतेजस्व‍िनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्प व मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान महिला आर्थिक विकास महामंडळ जिल्हा कार्यालयातर्फे महिला बचतगटद्वारे उत्पादित वस्तूचे भव्य प्रदर्शन व विक्री अर्थात नव तेजस्विनी महोत्सव २०२४ या महोत्सवाचे उद्घाटन शनिवारी, दि. २४ फेब्रुवारी रोजी गांधी भवनात पार पडला.

नव तेजस्विनी महोत्सव दि. २४ ते २७ फेब्रुवारी दरम्यान बुलडाणा येथे पार पडला. आमदार संजय गायकवाड यांच्या हस्ते उद्घाटन पार पडले. महिला आर्थिक विकास महामंडळाचे सहजिल्हा समन्वय अधिकारी समीर देशमुख, शकुंतला रत्नपारखे, वर्षा गवई, रेखा शिंदे, राहुल तायडे यावेळी उपस्थित होते.

आमदार गायकवाड यांनी तालुक्यातील बचतगटासाठी बचतभवन आणि १०० बचतगटांना उत्पादित वस्तूंच्या विक्रीसाठी गाळे, तसेच महिला बचतगट संस्था लोक संचलित साधन केंद्र कार्यालय  बांधून देण्याचे आश्वासन दिले. महिलांना मार्गदर्शन करताना छोट्या उद्योगासह शाश्वत उपजिविकेसाठी पावले उचलावीत, महिलांची कंपनी स्थापन करून महिलांना शाश्वत रोजगार मिळावे याबद्दल बचत गटातील महिलांना मार्गदर्शन केले. समीर देशमुख यांनी प्रास्ताविक केले. वर्षा गवई यांनी सूत्रसंचालन केले. प्रदर्शनीमध्ये महिलांनी विविध प्रकारच्या उत्पादित वस्तूंचे स्टॉल उभारले होते.

00000

अण्णाभाऊ साठे महामंडळामार्फत नाविन्यपूर्ण योजना

बुलडाणा, दि. 27 : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळातर्फे मातंग व तत्सम पोटजातीतील नागरिकांसाठी नाविन्यपूर्ण योजना राबविण्यात येत आहे. या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ मर्यादित बुलडाणा मार्फत मातंग समाज व तत्सम १२ पोटजातीतील कुटुंबांची सामाजिक, आर्थिक उन्नती व्हावी, त्यांना रोजगार व स्वयंरोजगाराची साधने उपलब्ध व्हावीत, म्हणून समाजातील गरजूंना व्यवसाय प्रशिक्षण देऊन त्यांना उपजिविकेचे साधन उपलब्ध व्हावे, ज्या व्यवसायाचे प्रशिक्षण हवे, त्या व्यवसायाच्या प्रशिक्षणासाठी सन २०२४-२५ या आर्थिक वर्षाकरीता जिल्ह्याकरीता २०० प्रशिक्षण योजनेचे उद्द‍िष्ट प्राप्त झाले आहे. यासाठी इच्छुक अर्जदारांनी महामंडळाच्या विहीत नमुन्यातील अर्ज जिल्हा व्यवस्थापक, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ मर्यादित, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, चिखली रोड, बुलडाणा जिल्हा कार्यालयास सादर करावे, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक जे. एम. गाभणे यांनी केले आहे.

अर्जासोबत अर्जदाराने जातीचा दाखला सक्षम अधिकारी यांच्याकडून घेतलेला असावा, अर्जदाराचा कुटुंबाचा उत्पन्नाचा दाखला उत्पन्न मर्यादा ३ लाखापर्यंत तहसीलदार यांच्याकडुन घेतलेला असावा, नुकताच काढलेल्या पासपोर्ट साईज फोटो, रेशनकार्डच्या झेरॉक्स प्रत, आधार कार्ड झेरॉक्स प्रत, मतदान कार्ड, अर्जदाराचा शैक्षणिक दाखला, प्रशिक्षणार्थी मातंग समाज व तत्सम १२ पोटजातीतील असावा, प्रशिक्षणार्थी महाराष्ट्रातील रहिवासी असावा, प्रशिक्षणार्थीचे वय १८ ते ५० वर्षे असावे, प्रशिक्षणार्थिंनी यापूर्वी शासन, महामंडळाच्या कोणत्याही प्रशिक्षण योजनेचा लाभ घेतलेला नसावा, एका कुटुंबातील एकाच व्यक्तीस सदर योजनेचा लाभ घेता येईल, प्रशिक्षणार्थींना आधारकार्ड जोडलेल्या बँक खात्याचा तपशील सादर करावा लागणार आहे.

00000

Thursday 22 February 2024

DIO BULDANA NEWS 22.02.2024








 महासंस्कृती महोत्सवात लोक कलेचा जागर

*दंडार, गोंधळाला नागरिकांची पसंती

* हास्य कवी संमेलनात विडंबनाला दाद

* लावणीवर धरला ठेका

बुलडाणा, दि. 22 : महासंस्कृती महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी गुरूवारी, दि. 22 फेब्रुवारी रोजी ‘जागर लोक कलेचा’ कार्यक्रमात पारंपरिक दंडार, भारुड, गोंधळ, पोवाडा, वासुदेव या लोककला सादर करण्यात आल्या. तसेच महाराष्ट्रातील नामांकीत कवींचे हास्यकवी संमेलन पार पडले. दीप्ती आहेर आणि समूहानी पारंपरिक लावणी सादर केली. उपस्थितांनी पारंपरिक गोंधळ, दंडारला पसंती दिली. हास्य कवी संमेलनात विडंबनाला दाद दिली. तसेच लावणीवर ठेका धरला.

यावेळी आमदार श्वेता महाले, जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार, उपजिल्हाधिकारी शरद पाटील आदी उपस्थित होते. सांस्कृतिक परंपरांचे आदान-प्रदान व्हावे यासाठी पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग आणि जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे चिखली येथे आयोजित महासंस्कृती महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी ‘जागर लोक कलेचा’ कार्यक्रम सादर करण्यात आला.

यात बुलडाणा येथील अंध निवासी शाळेच्या विद्यार्थ्यांनी गीत सादर केले. नंदकिशोर यांच्या समुहाने गोंधळ सादर केला. गणेश कदम यांनी वासुदेव, शाहिर हरिदास खाडेभराड यांनी शेतकरी आत्महत्या, प्रमोद दांडगे यांनी भारूड, पांडुरंग ढिलावी यांच्या समूहाने दंडार, मेहकर येथील आई लोककला समूहाने गोंधळ सादर केला.

हास्य कवी संमेलनात स्वाती सुरंगळीकर, अनिल दीक्षित, भालचंद्र कोळपकर, वृशाली देशपांडे, बंडा जोशी यांनी सहभागी होत हास्य कविता सादर केल्या. बंडा जोशी यांनी याड लागलं हे विडंबन सादर केले. भालचंद्र कोळपकर यांनी बायकोवर कविता सादर केली. स्वाती सुरंगळीकर यांनी मुलाच्या लग्नातील किस्सा सांगितला. अनिल दीक्षित यांनी नोटबंदीवर कविता सादर केली.

दीप्ती आहेर आणि समूहानी सुरवातीला गौळण आणि पाटलाचा वाडा लावणी सादर केली. त्यानंतर माधवी यांनी 'या रावजी बसा भावजी', बुगडी शोधायला आणि दीप्ती आहेर यांनी हा साजन माझा, चंद्रा लावणी सादर केली. कामिनी पुणेकर यांनी कुणी तरी न्या हो मला फिरवायला, जरा सरकून बसाया गाण्यावर लावणी सादर केली. महोत्सवातील लावणीच्या कार्यक्रमात शेवटी कामिनी पुणेकर, माधव आणि दिप्ती आहेर यांनी पाटलाचा वाडा या गाण्यावर लावणी सादर केली. दिप्ती आहेर यांनी स्टेजखाली उतरून उपस्थितांच्या मध्ये जाऊन नृत्य सादर केले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व कलाकारांचा आमदार श्वेता महाले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमस्थळी बचतगटांच्या स्टॉल्सच्या माध्यमातून खाद्य संस्कृतीचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच हस्तकला आणि पारंपरिक वस्त्रांचे दालन आणि पुस्तके विक्रीस ठेवण्यात आली आहे. महासंस्कृती महोत्सवात शेवटच्या दिवशी गुरुवार, दि. 22 फेब्रुवारी रोजी ‘महाराष्ट्राची लोकधारा’ या महाराष्ट्राची संस्कृती दर्शविणारा कला आविष्कार अनिरुद्ध जोशी आणि सहकलाकार सादर करतील. तसेच गौरी थोरात ह्या ‘राजमाता जिजाऊसाहेब’ यांच्या जीवनावर आधारित एकांकिका सादर करतील. महासंस्कृती महोत्सवात नागरिकांनी विनामूल्य प्रवेश आहे. नागरिकांनी सांस्कृतिक आणि लोककलांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.

00000

जिल्ह्यात 3 मार्चला पल्स पोलिओ मोहिम

बुलडाणा, दि. 22 : जिल्ह्यात पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत दि. ३ मार्च २०२४ रोजी जिल्ह्यात पल्स पोलिओ लसीकरण अभियान राबविण्यात येईल. यामध्ये ५ वर्षापर्यंतच्या सर्व बालकांना या दिवशी पोलिओ डोस देऊन लसीकरण मोहिम यशस्वी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात पल्स पोलिओ लसीकरण मोहिम जिल्हा समन्वय समितीची सभा बुधवार, दि. २१ फेब्रुवारी २०२४ रोजी जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

यावेळी जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी पोलिओ लसीकरण मोहिमेत जिल्ह्यात सर्व गावे, वाड्या, वस्ती, तांडे, विटभट्टी, मेंढपाळ, आदिवासी, कुठल्याही स्तरावरील बालक वंचित राहणार नाही, याची काळजी घ्यावी. लसीकरण झालेल्या सर्व बालकांच्या डाव्या करंगळीवर मार्कर पेनने खुण करण्यात यावी, यासाठी मोबाईल पथक, ट्रान्झीट टिम, आदी सज्ज ठेवाव्यात, अशा सूचना दिल्या.

अभियानात आरोग्य विभागासोबत विविध विभागातून एकुण ५ हजार ५२१ कर्मचारी सहकार्य करणार आहेत. तसेच ४३९ पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे ११७ मोबाईल टिम, १४२ ट्रान्झीट टिम नियुक्त करण्यात आल्या आहेत.

जिल्ह्यातील ग्रामीण भागात १ लाख ८२ हजार ३०८ बालके, तर शहरी भागात ६१ हजार ९८ बालके अशाप्रकारे एकुण २ लाख ४३ हजार ४०६ बालकांना पोलिओ डोज देण्यात येणार आहे. सर्व बालकांना लसीकरणाकरीता २ हजार ५२ बुथची व्यवस्था करण्यात आली आहे.

00000

जिल्हा क्रीडा पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

बुलडाणा, दि. 22 : क्रीडा विभागातर्फे जिल्हा क्रीडा पुरस्कार देण्यात येतो. यासाठी दि. 1 मार्च 2024 पर्यंत अर्ज सादर करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. सन 2021-22 व 2022-23 च्या पुरस्कारासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.

क्रीडा धोरण 2001 अंतर्गत क्रीडा व युवक सेवा संचालनालयामार्फत जिल्ह्यातील उत्कृष्ठ क्रीडापटू, गुणवंत क्रीडा मार्गदर्शक व गुणवंत क्रीडा कार्यकर्ता यांच्या कार्य, योगदानाचे मुल्यमापन होवून त्यांचा गौरव व्हावा व प्रोत्साहन मिळावे, यासाठी गुणवंत क्रीडा मार्गदर्शक, गुणवंत खेळाडू, दिव्यांग गुणवंत खेळाडू यांना जिल्हा क्रीडा पुरस्काराने गौरविण्यात येते. या पुरस्काराचे स्वरुप प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह आणि रोख 10 हजार रूपये असे आहे.

पुरस्काराचे निकष हे पुरस्कारासाठी अर्ज करणाऱ्या अर्जदाराचे महाराष्ट्रात सलग 15 वर्षे वास्तव्य असले पाहिजे, क्रीडा मार्गदर्शक म्हणून सतत दहा वर्षे महाराष्ट्रात क्रीडा मार्गदर्शनाचे कार्य केले असावे व त्याने वयाची 30 वर्षे पूर्ण केली असणे आवश्यक आहे. गुणांकनाकरीता त्या जिल्ह्यातील खेळाडूंचीच कामगिरी ग्राह्य धरली जाईल. दिव्यांग खेळाडू व गुणवंत खेळाडूने पुरस्कार वर्षासह लगतपुर्व 5 वर्षांपैकी 2 वर्षे त्या जिल्ह्याचे मान्यताप्राप्त खेळांच्या अधिकृत स्पर्धांमध्ये प्रतिनिधीत्व केले असले पाहिजे. एका जिल्ह्यामध्ये जिल्हा क्रीडा पुरस्कार प्राप्त करणारी व्यक्ती राज्यातील अन्य जिल्ह्यात जिल्हा क्रीडा पुरस्कारासाठी अर्ज करण्यास पात्र राहणार नाही. एकदा एका खेळामध्ये किंवा एका प्रवर्गामध्ये जिल्हा क्रीडा पुरस्कार प्राप्त केलेली व्यक्ती पुन्हा त्याच खेळात किंवा प्रवर्गात जिल्हा क्रीडा पुरस्कार मिळण्यास पात्र असणार नाही.

पुरस्कार वर्षाची गणना दि. 1 जुलै ते दि. 30 जुन असा आहे. या तिनही पुरस्काराकरीता अर्जासोबत सादर करण्यात आलेले प्रमाणपत्र व इतर कागदपत्रे अनेकवेळा सादर करु नयेत. अर्जदाराने सादर केलेली कागदपत्रे व प्रमाणपत्र सत्य असल्याबाबतचे संबंधित तहसिलदार यांचेकडून ॲफीडीवेट करुन घ्यावे लागणार आहे. विहीत नमुन्यातील अर्ज आणि पुरस्काराच्या अटी व शर्ती आणि अधिक माहितीसाठी इच्छुकांनी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात अर्ज प्राप्त करावे, तसेच परिपूर्ण बंद अर्ज कार्यालयास सादर करावेत.  असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी बाळकृष्ण महानकर यांनी केले आहे.

0000000

कोलवड येथे ‘कॅच द रेन’मध्ये श्रमदान

बुलडाणा, दि. 22 : नेहरु युवा केंद्र, राष्ट्रीय जिजामाता महाविद्यालयाचे सेवा योजना यांच्या वतीने ‘कॅच द रेन’ पाणी आडवा पाणी जिरवा उपक्रमांतर्गत कोलवड, ता. बुलडाणा येथे बुधवार, दि. 21 फेब्रुवारी 2023 रोजी श्रमदान करण्यात आले.

श्रमदानात पैनगंगेत गावातून वाहून जाणाऱ्या 3 ठिकाणी खडे खोदण्यात आले. यात विटांचे तुकडे, मोठे दगड टाकून पाणी जिरवण्याचा उपक्रम राबविण्यात आला. त्याचप्रमाणे गावातील रस्ते व नाल्याची साफसफाई  करण्यात आली. राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. ज्ञानोबा कांदे, नेहरु युवा केंद्राचे कार्यक्रम पर्यवेक्षक अजयसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला. यावेळी महिला कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. राजश्री येवले, साहेबराव पाटील उपस्थित होते.

000000

जिल्हा उद्योग केंद्रातर्फे सूक्ष्म उद्योग उपक्रमांना बीजभांडवल

बुलडाणा, दि. 22 : जिल्हा उद्योग केंद्रातर्फे निमशहरी व ग्रामीण क्षेत्रातील लहान व सूक्ष्म उद्योग उपक्रमांना बीजभांडवल म्हणून कर्ज देण्यात येणार आहे. या योजनेचा युवकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

या योजनेतून निमशहरी व ग्रामीण क्षेत्रातील अतिलहान व मुल्य उद्योग, उपक्रमांना बीजभांडवल उभारण्यासाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्यात येते. उद्योगांमधील यंत्रसामग्रीमध्ये स्थिर भांडवली गुंतवणूक 2 लाख रुपयापर्यंत आहे, अशा नव्याने स्थापन होणाऱ्या अतिलहान व सूक्ष्म उद्योग, उपक्रमांना या योजनेखाली मृदू कर्ज स्वरुपात अर्थसहाय्य देण्यात येते. ही योजना एक लाखापर्यंत लोकसंख्या असलेल्या व दहा लाख लोकवस्तीच्या शहराच्या बाहेर 15 किलोमीटरपेक्षा अधिक अंतरावरील गावासाठी लागू आहे. या योजनेच्या लाभासाठी शिक्षण आणि वयाची अट नाही. परंतू लाभार्थ्यांकडे उद्योग करण्यासाठी लागणारे कौशल्य किंवा अनुभव असणे अपेक्षित आहे.

योजनेंतर्गत बीजभांडवल सहाय्य मिळण्यासाठी उत्पादित व सेवा अतिलहान व सूक्ष्म उपक्रम पात्र आहेत. या योजनेमध्ये पात्र उद्योग आणि सेवा उद्योगाच्या प्रकल्प किंमतीची कमाल मर्यादा 2 लाख रूपये आहे. उद्योग घटकाच्या प्रकल्प किंमतीच्या एकूण स्थिर भांडवली गुंतवणूक व खेळत्या भांडवलाचे सिमांतिक भांडवल स्थिर भांडवलाच्या कमाल 30 टक्के मर्यादित राहणार आहे.

            बीजभांडवल सहाव्याचा आकृतीबंध हा सर्वसाधारण आणि अनुसूचित जाती व जमातीमधील लाभार्थीची स्वंगुतवणुकीचे प्रमाण पाच टक्के असणार आहे. योजनेंतर्गत देण्यात येणाऱ्या बीज भांडवलाची रक्कम मृदू कर्ज म्हणून दरसाल 4 टक्के व्याजाने देण्यात येणार आहे. बीज भांडवल परतफेडीचा कालावधी हा 4 वर्षे 6 महिने आहे. बिज भांडवल मिळाल्यानंतर 6 महिन्यात परतफेड देय राहणार आहे. परतफेड विहित कालावधी केली नसल्यास 1 टक्के दंड आकारण्यात येणार आहे, असे जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक सुनिल पाटील यांनी केले आहे.

00000

भगरीतून विषबाधा रोखण्यासाठी काळजी घेण्याचे आवाहन

*भगरीतून झालेल्या विषबाधेप्रकरणी कारवाई

बुलडाणा, दि. 22 : सोमठाणा, ता. लोणार येथे भगरीतून झालेल्या‍ विषबाधाप्रकरणी अन्न व औषध प्रशासन विभागाने कार्यवाही केली आहे. भगरीतून विषबाधा रोखण्यासाठी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

खापरखेर्डा, सोमठाणा येथे दि. २० फेब्रुवारी २०२४ रोजी विठ्ठल मंदिरात आयोजित हरिनाम सप्ताहामध्ये भगर आमटीचा प्रसाद वाटप करण्यात आला. त्याच्या सेवनाने रात्री उशिरा साधारणतः २०० जणांना पोटदुखी, उलटी व मळमळीचा त्रास सुरु झाला. सदर घटनेच्या अनुषंगाने अन्न व औषध प्रशासन कार्यालयाचे अन्न सुरक्षा अधिकारी र. द्वा. सोळंके, जी. के. बसावे यांच्या पथकाने घटनास्थळी जाऊन तपासणी केली. त्यानुषंगाने भगर आमटी तयार करण्यासाठी वापरण्यात आलेल्या कच्चे अन्न पदार्थ भगर, रिफाईंड सोयाबीन तेल, मिरची पावडर, शेंगदाने यांचे नमूने विश्लेषणासाठी घेतले आहे. भगर या अन्न पदार्थाच्या २६ कि.ग्रॅ., रिफाईड सोयाबीन तेलाचा ४४८.४ कि. ग्रॅ., मिरची पावडर २ कि.ग्रॅ. ६० ग्रॅ. असा एकूण ६० हजार ७०१ रूपये किंमतीचा साठा जप्त करण्यात आला आहे. सदरचे अन्न नमूने विश्लेषणासाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहे. विश्लेषण अहवालाच्या अनुषंगाने अन्न सुरक्षा व मानदे कायदा २००६ अंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे.

अन्न विषबाधा रोखण्यासाठी बाजारातून भगर आणल्यानंतर ती निवडून स्वच्छ करावी. शक्यतो पाकिटबंद भगर घ्यावी. ब्रॅण्डचे नाव नसलेली किंवा लेबल नसलेली भगर घेऊ नये. भगर घेतांना पाकिटावरचा पॅकिंग दिनांक व अंतिम वापर दिनांक तपासून घ्यावा. भगर साठवितांना स्वच्छ, कोरडया ठिकाणी, व्यवस्थित झाकणबंद डब्यात ठेवावी. जेणेकरुन वातावरणातील ओलाव्यामुळे बुरशीची वाढ होणार नाही. जास्त दिवस भगर साठवणूक करु नये किंवा जास्त दिवस साठविलेली भगर खाऊ नये. शक्यतोः भगरीचे पिठ विकत आणू नये. भगरीच्या पिठामध्ये बाताबरणातील ओलावा शोषण घेण्याची क्षमता अधिक असते. त्यामुळे पिठाला बुरशीची लागण होण्याची शक्यता अधिक असते. भगरीचे पिठ आवश्यक तेवढेच दळून घ्यावे. जास्त दिवस पिठ साठवू नये व तसेच बाहेरुन दळून आणू नये, शक्यतो भगर पिठ घरीच दळून घ्यावे. भगर आणि शेंगदाने हे अधिक प्रथिनयुक्त पदार्थ आहे. दोन तीन दिवस सलग उपवास असतांना या पदार्थाच्या सेवन अॅसिडीटी वाढविण्यास कारणीभूत ठरते. त्यामुळे उलटी, मळमळ व पोटाचे त्रास घेतात. या पदार्थाचे सेवन पचनशक्तीनुसार मर्यादीतच करावे.

धार्मिक कार्यक्रमात किंवा भंडारा असणाऱ्या ठिकाणी भगर खिचडी/भात तयार करतांना ती स्वच्छ व आरोग्यदायी ठिकाणी तयार करावी. भगरीचा भात किंवा खिचडी पूर्णपणे शिजवावी; अर्धवट शिजवू नये. भगर भात/खिचडी तयार केल्यानंतर ती लगेचच खाण्यासाठी वापरावी. भगरीचा भात किंवा खिचडी तयार करुन जास्त वेळ सामान्य तापमानात ठेवल्यास त्यामध्ये घातक सुक्ष्मजीवांची वाढ होण्याची शक्यता असते. भगरीचा भात किंवा खिचडी तयार केल्यानंतर ती 60 पेक्षा जास्त तापमानाला ठेवावी. लगेच खाने शक्य नसल्यास सदरची भगर ही रेफ्रीजरेटरमध्ये ठेवावी. जेणेकरुन घातक सुक्ष्मजीवांची त्यात वाढ होणार नाही. भगरीचे सेवन करतांना उपरोक्त नमूद गोष्टी लक्ष्यात घेतल्यास संभाव्य अपाय टाळता येतील, असे सहायक आयुक्त स. द. केदारे यांनी केले आहे.

000000