Tuesday 29 November 2016

news 29.11.2016 dio buldana

वृक्ष लागवडीसाठी उपलब्ध जमिनीची माहिती  द्यावी
-         जिल्हाधिकारी
·        वृक्ष लागवड मोहिम यशस्वी करावी
·        यावर्षी जिल्ह्याला 10.54 लक्ष वृक्षारोपणाचे उद्दिष्ट
बुलडाणा, दि. 29 : यावर्षी 1 जुलै रोजी सर्वांनी हिरीरीने सहभाग घेवून मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड मोहिम यशस्वी केली होती. त्यानुसार पुढील वर्षामध्ये सुद्धा आपणाला समन्वयाने वृक्ष लागवड मोहिम यशस्वी करायची आहे. यावर्षी जिल्ह्याला 10.54 लक्ष वृक्षलागवडीचे उद्दिष्ट मिळाले असून राज्यभर 4 कोटी वृक्षारोपण करावयाचे आहे. त्याकरिता प्रत्येक विभागाने आपल्याकडे वृक्षारोपणासाठी उपलब्ध असलेल्या जमिनीची माहिती तात्काळ सादर करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. विजय झाडे यांनी केल्या आहेत.
      वृक्षलागवडी बाबत बैठकीचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात करण्यात आले होते. त्यावेळी आढावा घेताना जिल्हाधिकारी बोलत होते. याप्रसंगी जि.प मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती दिपा मुधोळ, निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र टापरे, उपवनसंरक्षक बी. टी भगत, सामाजिक वनीकरण विभागाचे उपसंचालक श्री. मित्र आदींसह संबंधीत विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
         प्रत्येक विभागाने आपल्याला मिळालेल्या उद्दिष्टाप्रमाणे कार्यवही करण्याचे सांगत जिल्हाधिकारी म्हणाले, जागा निश्चित झाल्यानंतर खड्डे खोदावी, अक्षांश व रेखांश देणे आदी करायची आहेत. मार्च 2017 पूर्वी सर्व जागांचे खड्डे खोदलेले असावे. मागील वर्षी केलेल्या वृक्षारोपणाचा जिवंतपणाची काळजी घ्यावी. जीवंत रोपांचे प्रमाण वाढवावे. त्याचप्रमाणे वन विभागाने रोपांची उपलब्धता ठेवावी.
  बैठकीत विभागनिहाय सूचना देण्यात आल्या. बैठकीत उपवनसंरक्षक बी.टी भगत यांनी माहिती दिली.  
                                                                                   ****
शिष्यवृत्तीचे 5 हजार 108 अर्ज महाविद्यांलयांकडे प्रलंबित
·        महाविद्यालयांनी तात्काळ अर्ज समाज कल्याण विभागाकडे सादर करावे
बुलडाणा दि‍. 29 - अनुसूचित जाती, विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती व शिक्षण, परीक्षा शुल्काचे सन 2014-15 चे 1 हजार 710 अर्ज महाविद्यालयांकडे प्रलंबित आहेत. तसेच सन 2015-16 चे 3 हजार 398 अर्ज प्रलंबित असून एकूण 5 हजार 108 अर्ज महाविद्यालयांकडे प्रलंबित आहेत.
     सदर अर्ज महाविद्यालयांकडे प्रलंबित असल्याचे डॅश बोर्डवरून निदर्शनास येत आहे. याबाबत सर्व महाविद्यालयांना यापूर्वी कळविण्यात आले होते. मात्र महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी त्यांचे स्तरावर अर्ज प्रलंबित ठेवले आहेत. प्रलंबित असलेले, पडताळणी न केलेले अर्ज छाननी व पडताळणी  करून सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयाकडे तात्काळ सादर करण्यात यावे. शिष्यवृत्ती मिळण्यापासून विद्यार्थी वंचित राहील्यास व विद्यार्थ्यांची तक्रार आल्यास संबंधित महाविद्यालयाचे प्राचार्य जबाबदार राहतील. वारंवार सूचना देवूनही प्रलंबित अर्जांची संख्या प्रचंड असल्याचे दिसून आले आहे.
        सदर अर्ज शिष्यवृत्तीसाठी पात्र असल्याची माहिती यामुळे कार्यालयाला मिळत नाही. पात्र असलेले अर्ज महाविद्यालयांनी तात्काळ विद्यार्थ्यांच्या पात्रतेची खात्री करून प्रपत्र ब तसेच प्रथम वर्षाचे आरक्षण प्रवर्गाच्या हार्ड प्रती, व्यावसायिक महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे शासकीय कोट्यातील प्रवेश असल्याचे डी.टी.ई चे प्रमाणीत याद्यांसह सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयास सादर करावे,  असे आवाहन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभाग यांनी केले आहे.
गावांच्या समृद्धीसाठी आता स्मार्ट ग्राम योजना..
·        तालुका स्मार्ट ग्रामला 10 लक्ष, तर जिल्हा स्मार्ट गावाला 40 लक्ष रूपये बक्षीस
·        ग्रामपंचायतींनी 8 ते 15 डिसेंबर 2016 पर्यंत प्रस्ताव सादर करावे
बुलडाणा दि‍. 29 गावांचा शाश्वत विकास घडवून आणण्याकरिता पर्यावरणाचे संवर्धन, जतन व संरक्षण करून समृद्ध, संपन्न गावांची निर्मितीसाठी शासनाने स्मार्ट ग्राम योजना आणली आहे. राज्यात सन 2010-11 पासून पर्यावरण संतुलीत समृद्ध ग्राम योजनेतंर्गत  उद्दिष्टे साध्य ग्रामपंचायतींना निधीच्या स्वरूपात पुरस्कार दिला जातो. सदर योजना विकासाचे एक आदर्श स्वरूप असली तरी राज्यामध्ये एक समान स्वरूपाचे निकष दिले गेल्याने काही जिल्हे व विभागांना या योजनेचा व्यवस्थित रित्या लाभ घेता आला नाही.
   सर्व विभागातील आर्थिक व सामाजिक परिस्थिती विचारात घेवून पर्यावरण संतुलीत समृद्ध ग्राम योजनेच्या निकष व स्वरूपात बदल करून राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीस योजनेत सहभागी होण्याची समान संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. या योजनेकरीता निवडण्यात येणारी ग्रामपंचायत शासनाकडून देण्यात आलेल्या निकषांच्या आधारे गुणांकन पद्धतीने पारदर्शकता ठेवून निवडली जाणार आहे. त्याकरिता गावांची विभागणी करण्यात आली आहे. त्यामध्ये 5000 पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या मोठ्या ग्रामपंचायती, शहरालगत असलेल्या ग्रामपंचायती, पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायती, आदिवासी किंवा पेसा ग्रामपंचायती व उर्वरित ग्रामपंचायती आदींचा समावेश आहे. या ग्रामपंचायतीमध्ये सामाजिक, सांस्कृतिक व आर्थिक दृष्टीकोनातून खूप मोठी तफावत दिसून येते. त्यामुळे सदरील ग्रामपंचायतीला त्यांच्या क्षमतेनुसार गुणांकन देण्यात आले आहे. स्वच्छता (sanitation), व्यवस्थापन (management), दायित्व (accountibility), अपारंपारिक उर्जा आणि पर्यावरण (renewable energy & environment), पारदर्शकता व तंत्रज्ञानाचा वापर (transparancy & technology) अशा्रपकारे संक्षिप्तमध्ये SMART या आधारावर ही गुणांकन पद्धत आहे. त्याकरिता 100 गुण ठेवण्यात आले आहे.
   योजनेकरीता गावांची निवड सहभागी ग्रामपंचायतीने स्व मुल्यांकन करून त्यांचे प्रस्ताव तपासणीकरीता संबंधीत पंचायत समिती कार्यालयास 8 ते 15 डिसेंबर 2016 पर्यंत सादर करावेत. सदर यादीपैकी सर्वाधिक गुण प्राप्त 25 टक्के ग्रामपंचायतीची यादी / प्रस्ताव तपासणीकरीता मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांच्याकडे पंचायत समितीद्वारे 8 ते 15 डिसेंबर 2016 पर्यंत सादर करण्यात येणार आहे. संबंधीत तालुक्यातील प्राप्त झालेल्या ग्रामपंचायतीच्या एकूण स्व मुल्यांकन प्रस्तावांपैकी अधिक गुण प्राप्त 25 टक्के ग्रामपंचातीची तालुका तपासणी समिती तपासणी करणार आहे. त्यानंतर त्यांना गुणांकन देण्यात येतील. तपासणी करण्याकरिता प्रत्येक तालुका स्तरावर समितीचे गठण करण्यात येणार आहे. जिल्हा स्तरावरील तालुका तपासणी समिती अन्य तालुक्यातील तपासणी करणार आहे.
   तालुका स्तरावरील सर्वाधिक गुण प्राप्त झालेली ग्रामपंचायत तालुका स्मार्ट ग्राम असणार आहे. सदर ग्रामपंचायत जिल्हा स्तरावरील द्वितीय स्पर्धेकरीता पात्र असेल. जिल्हा स्तरावर मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समितीद्वारे करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व तालुका स्मार्ट ग्राम यांचे सर्वसाधारणपणे तीन महिन्यानंतर पुर्नमुल्यांकन करण्यात येणार आहे. यामधून सर्वाधिक गुण मिळालेल्या ग्रामपंचायतीस जिल्हा स्मार्ट ग्राम म्हणून घोषीत करण्यात येणार आहे.
  तालुकास्तराव प्रथम निवडण्यात आलेल्या ग्रामपंचायतीस 10 लक्ष, जिल्हास्तरावर निवडण्यात येणाऱ्या ग्रामपंचायतीस 40 लक्ष आणि जिल्हास्तरावर स्मार्ट ग्राम म्हणून निवडण्यात येणाऱ्या ग्रामपंचातीस 50 लक्ष रूपये पारितोषिक देण्यात येणार आहे. तरी या योजनेत सहभागी होवून दिलेल्या मुदतीमध्ये स्व मुल्यांकनाचा प्रस्ताव पंचायत समितीला सादर करण्याचे आवाहन जि.प अध्यक्षा श्रीमती अलकाताई खंडारे, उपाध्यक्ष पांडुरंग खेडेकर व मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती दीपा मुधोळ यांनी केले आहे.
                                                               ********







सन 2017-18 चे बाजारमुल्य  दरतक्ते तयार करणे सुरू
·        नागरिकांनी सुचना व अभिप्राय 7 डिसेंबर 2016 पर्यंत सादर करावे
बुलडाणा दि 29- नोंदणी व मुद्रांक विभागाकडुन  जिल्ह्यातील  सर्व नगर परीषदा, नगर पंचायती  तसेच प्रभाव क्षेत्र , ग्रामीण क्षेत्राचे सन 2017-2018  या आर्थीक वर्षाचे  मुद्रांक शुल्क  आकारणीसाठी उपयोगात  येणारे बाजारमुल्य 2017-2018 चे दर तक्ते तयार करण्याचे काम सुरु आहे. प्रस्तावित होणाऱ्या बाजार मुल्य दर तक्त्याबाबतीत  नागरीकांच्या सुचना / अभिप्राय असल्यास आपल्या तालुक्यातील दुय्यम निबंधक कार्यालया किंवा सह जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालय ,बुलडाणा यांचेकडे 7 डिसेंबर 2016 पर्यत सादर कराव्यात, असे आवाहन जिल्हा निबंधक तथा जिल्हाधिकारी यांनी कळविले आहे.
                                                           **********
                महाविद्यालयाचे  प्राचार्य  व शिष्यवृत्ती संबंधीत लिपीक यांच्या कार्यशाळेचे आयोजन
             बुलडाणा दि 29- भारत सरकार  शिष्यवृत्ती  /शिक्षण फी  परीक्षा  फी प्रदानाबाबत व महाविद्यालय स्तरावर प्रलंबीत  असलेल्या अर्जाचा आढावा घेणेबाबत  महाविद्यालयाचे प्राचार्य व शिष्यवृत्ती संबंधीत कामकाज सांभाळणारे लि‍पीक यांची कार्यशाळेचे आयोजन  1 डिसेंबर 2016 रोजी सकाळी 11.00 वाजता  डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतीक भवन चिखली रोड, बुलडाणा येथे करण्यात आले आहे, तरी या कार्यशाळेला प्राचार्य व संबंधीत लिपिक यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांनी केले आहे.

                                                                                   *****

Friday 25 November 2016

news 25.11.2016 dio buldana

मतदारांनी  निर्भिडपणे मतदान करावे
                                                                                    - विभागीय आयुक्त जे.पी.गुप्ता
·         मतदारांनी बुथ क्रमांक तसेच इतर माहितीसाठी True Voter या मोबाईल ॲप चा वापर करावा
·        निवडणूक कर्तव्यावर असणाऱ्या पोलीसांनाही मिळणार भत्ता
·        मतदान केंद्रावर मतदारांना मोबाईल सोबत नेण्यावर बंदी
बुलडाणा, दि. 25 :  जिल्हयात बुलडाणा, चिखली, मेहकर, मलकापूर, दे.राजा, शेगांव, जळगांव जामोद, नांदुरा व खामगांव या नऊ नगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुका होत आहे. या निवडणूकीकरीता रविवार, 27 नोव्हेंबर 2016 रोजी मतदान व 28 नोव्हेंबर 2016 रोजी मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले असून आदर्श आचार संहितेचे काटेकोरपणे पालन व्हावे. मतदारांनी कुठल्याही प्रकारची भिती, दबावाला बळी न पडता निर्भिड वातावरणात मतदान करावे, असे आवाहन विभागीय महसुल आयुक्त जे.पी. गुप्ता यांनी केले आहे. 
    जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात  नगरपालीका निवडणुकी संदर्भात घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत मार्गदर्शन करताना  ते बोलत होते. यावेळी  जिल्हाधिकारी डॉ. विजय झाडे, जिल्हा पोलीस अधीक्षक संजयकुमार बावीस्कर, अति. मुख्यकार्यकारी अधिकारी बी.बी नेमाने, अप्पर जिल्हाधिकारी शिवानंद टाकसाळे, निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र टापरे आदी मंचावर उपस्थित होते.
    प्रत्येक मतदाराला शासनातर्फे वोटरस्लीपचे वाटप होणे आवश्यक असुन वोटरस्लीपचा उपयोग मतदानाच्यावेळी  इतर अधिकृत ओळखपत्र उपलब्ध नसल्यास ओळखपत्र म्हणुन ग्राहय धरण्यात यावा अशा सूचना करीत विभागीय आयुक्त श्री. गुप्ता म्हणाले,  या वोटरस्लीपवर प्राधिकृत अधिकाऱ्यांची सही व शिक्का आवश्यक आहे. मतदान केंद्रावर मतदान प्रक्रीयेत भाग घेत असलेल्या अधिकारी व कर्मचारी व्यतिरिक्त इतर कोणालाही मोबाईल सोबत ठेवण्यास  व त्याचा वापर करण्यास बंदी आहे.  सदर निवडणुकीमध्ये मद्यवाटप तसेच मतदारांना आकर्षित करण्यासाठी पैसे तसेच भेट वस्तूचे वाटप होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी  पोलीस विभागासह  इतर निवडणुकीसाठी नियुक्त केलेल्या निरीक्षकांनी  लक्ष ठेवुन कार्यवाही करणे आवश्यक आहे.
ते पुढे म्हणाले, नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या संदर्भात आदर्श आचार संहितेची प्रभावी अंमजबजावणी व खर्चावर नियंत्रण ठेवणे, आर्थिक बळाचा दुरूपयोग टाळणे  व मतदारांवर प्रभाव टाकणा-या वस्तूंच्या  वाटपावर अंकुश ठेवणे याकरिता कार्यवाही करण्यात यावी. चलनातून रद्द करण्यात आलेल्या  500 व 1000 रूपयांच्या चलनी नोटांचे वितरण मतदारांना आकर्षीत करण्यासाठी  निवडणूक काळात  मोठया प्रमाणात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यासाठी पोलीस विभागाने लक्ष ठेवून यावर अंकुश ठेवणे आवश्यक असल्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या. मतदारांना बुथ क्रमांक तसेच अन्य माहितीसाठी मतदारांकरीता  शासनाने True voter हे ॲप विकसित केले आहे. या ॲप्सच्या माध्यमातून मतदारांनी आपला बुथ क्रमांक आणि अन्य निवडणूक विषयक माहिती जाणून घ्यावी, असे आवाहनही विभागीय आयुक्त यांनी यावेळी केले.
 जिल्हयात निवडणुकी दरम्यान अवैध मद्यविक्रीचे प्रमाण वाढण्याची शक्यता लक्षात घेवून नियंत्रण ठेवण्याची आवश्यकता असल्याचे सांगत ते म्हणाले,  महावितरणने  मतदानाच्या पहिल्या दिवशी व मतदानाच्या दिवशी तसेच मतमोजणीचे दिवशी संबंधीत भागातील विद्युत पुरवठा खंडीत न होण्यासाठी कार्यवाही करावी. तसेच सध्या सायंकाळ लवकर होत असल्यामुळे मतदानाच्या दिवशी सायंकाळी प्रकाश व्यवस्था करावी. ऐनवेळी वीज पुरवठा खंडीत झाल्यास पर्यायी वीज पुरवठ्याची व्यवस्था करावी. निवडणूक कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनाही आता निवडणूकीचा भत्ता मिळणार आहे. त्यासाठी अशा पोलीस कर्मचाऱ्यांना नगर परिषद निवडणूकीचा भत्ता देण्यात यावा,  अशा सूचनाही विभागीय आयुक्त यांनी यावेळी दिल्या.
        ते पुढे म्हणाले, व्हिडीओग्राफी सर्व्हेलियन्स पथक, भरारी  पथक, चेक पोस्टसाठी पथक, तक्रार निवारण कक्ष यांनी मतदान व मतमोजणी दिवशी सज्ज रहावे. प्रभागनिहाय इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र राखीव स्थितीत ठेवावे. ज्यादा यंत्रांची व्यवस्था करून ठेवावी. ऐनवेळी मतदान यंत्रामध्ये बिघाड झाल्यास 15 मिनीटात दुसऱ्या ईव्हिएम उपलब्ध करून द्यावे. जेणेकरून मतदान थांबणार नाही. मतदान केंद्रामध्ये यापूर्वी उमेदवार किंवा त्यांनी नेमलेले इलेक्शन एजंट, पोलींग एजंट कितीही वेळा जायचे. या निवडणूकीला मात्र उमेदवार किंवा त्यांनी नेमलेले एजंट तीनपेक्षा जास्त वेळ मतदान केंद्रात जाणार नाहीत, याची दक्षता घ्यावी.
  याप्रसंगी संविधान शपथ देण्यात आली. बैठकीला उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, नगरपालिका मुख्याधिकारी यांच्यासह संबंधीत यंत्रणेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.  
डाव्या हाताच्या बोटांवर शाई असणाऱ्यांनी प्रमाणपत्र प्राप्त करून घ्यावे
डाव्या हाताच्या बोटांना  बँकेकडुन शाई लावली असेल, तर अशा मतदारांनी 26 नोव्हेंबर रोजी 5 वाजेपर्यंत आपल्या निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात जाऊन शाई लावलेले बोट दाखवुन त्यांच्या कडून प्रमाणपत्र प्राप्त करुन घ्यावे. ते मतदानाकरीता आवश्यक आहे. बँकेमार्फत मतदारांच्या उजव्या हाताच्या बोटाला शाई लावली असल्यास काळजी नसावी.  असे मतदार थेट मतदान केंद्रावर जाऊन मतदान करु शकतात.
*****
नगर परिषद निवडणूकीरिता जिल्ह्यात दारूबंदी जाहीर
·        26, 27 व 28 नोव्हेंबर रोजी दारूबंदी
बुलडाणा, दि. 25 :  जिल्हयात बुलडाणा, चिखली, मेहकर, मलकापूर, दे.राजा, लोणार, जळगांव जामोद, नांदुरा व खामगांव या नऊ नगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुका होत आहे. या निवडणूकीकरीता रविवार, 27 नोव्हेंबर 2016 रोजी मतदान व 28 नोव्हेंबर 2016 रोजी मतमोजणी होणार आहे. या निवडणकीदरम्यान संपूर्ण जिल्ह्यात मतदानाच्या आदल्या दिवशी 26 नोव्हेंबर, मतदान दिवशी 27 नोव्हेंबर आणि मतमोजणी दिवशी 28 नोव्हेंबर 2016 रोजी दारूबंदी जाहीर करण्यात आली आहे.
     मुंबई दारूबंदी कायदा, 1949 च्याय कलमान्वये जिल्ह्यातील सर्व देशी, विदेशी मद्य विक्री दुकाने, परवाना कक्ष व बिअर शॉपी अनुज्ञप्ती उपरोक्त दिवशी बंद राहतील. तरी सर्व संबंधी अनुज्ञप्तीधारकांनी आपल्या अनुज्ञप्त्या बंद ठेवाव्यात. सदर आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या अनुज्ञप्तीधारकांविरूद्ध कठोर कार्यवाही करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी यांनी कळविले आहे.
********
मलकापूर व नांदुरा नगर पालिका क्षेत्रात कलम 144 लागू
·        मतदान व मतमोजणी केंद्र परीसरात जमाव करण्यास बंदी
बुलडाणा,दि. 25 -  मलकापूर व नांदुरा नगर परिषद मतदार संघाकरिता 27 नोव्हेंबर 2016 रोजी मतदान होत असून  28 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.  या दोन्ही नगर परिषद क्षेत्रातील सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी आणि निवडणूका निर्भयपणे, निपक्षपातीतपणे पार पाडण्याच्यादृष्टीने मतदान केंद्र व मतमोजणी केंद्र परीसरात  कलम 144 लागू करण्यात आली आहे.
  त्यामुळे मतदानाचे दिवशी मतदान केंद्र व परीसरात जमाव करण्यास, मतदारांना घाबरविण्यास, बळजबरीने मतदान करण्यास किंवा मतदान न करण्यास प्रवृत्त करणे, उमेदवाराच्या निवडणूक चिन्हाचे प्रदर्शन करणे, मोबाईल फोन, कॉर्डलेस फोन, पेजर, वायरलेस सेट व अन्य इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर करणे, वाहनांचा प्रवेश, मतदान केंद्रामध्ये अनधिकृत प्रवेश यावर बंदी घालण्यात येत आहे.  या आदेशाचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आल्यास भारतीय दंड संहिता 1960 चे कलम 188 नुसार कारवाई करण्यात येईल, असे मलकापूरचे उपविभागीय अधिकारी यांनी कळविले आहे.

*******



राष्ट्रीय एकात्मता दिन साजरा
बुलडाणा,दि. 25 -  जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी सभागृहात माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त  नुकताच राष्ट्रीय एकात्मता दिवस साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा श्रीमती अलकाताई खंडारे यांच्याहस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तसेच सर्व कमचाऱ्यांना यावेळी प्रभारी शिक्षणाधिकारी ए. बी अकाळ यांनी राष्ट्रीय एकात्मतेची शपथ दिली. यावेळी शिक्षण विभागातील सर्व कर्मचारी उपस्थित होते.
****
जिल्हा स्तर युवा महोत्सवाचे 2 डिसेंबर रोजी आयोजन
·              18 प्रकारचे स्पर्धा प्रकार
·              युवकांनी 30 नोव्हेंबर पर्यंत प्रवेश निश्चित करावा
बुलडाणा,दि.25 - क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणेद्वारा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्यावतीने जिल्हास्तर युवा महोत्सवाचे आयोजन 2 डिसेंबर 2016 रोजी करण्यात येणार आहे. महोत्सव सकाळी 10 वाजेपासून सुरू होणार असून जिल्हा क्रीडा संकुल, क्रीडानगरी, जांभरून रोड, बुलडाणा येथे होत आहे.
   या महोत्सवात 18 प्रकारच्या बाबींवर स्पर्धा होणार आहे. प्रत्येक स्पर्धेत कलाकारांची संख्या व वेळ मर्यादा दिलेली आहे. त्याप्रमाणे सादरीकरण करावयाचे आहे. महोत्सवात लोकनृत्यसाठी 20 कलाकारांना 15 मिनीटांचा वेळ दिलेला असून लोकगित प्रकारासाठी 6 कलाकारांना 7 मिनीट वेळ राहील. त्याचप्रमाणे एकांकिका (हिंदी व इंग्रजी) 12 कलाकारांना 45 मिनीटे, शास्त्रीय गायन 1 कलाकाराला 15 मिनीटे, शास्त्रीय नृत्य एका कलाकाराला 15 मिनीटे, सितार एका कलाकार व 15 मिनीट वेळ, बासरीकरीता एका कलाकाराला 15 मिनीट, तबलासाठी 1 कलाकाराला 10 मिनीटे, विणा प्रकारासाठी एका कलाकाराला 15 मिनीट, मृदुंगकरीता एक कलाकार 10 मिनीट, हार्मोनियम एक कलाकाराला 10 मिनीटे, गिटारसाठी एका कलाकाराला 10 मिनीट, मणिपुरी नृत्य, ओडीसी नृत्य, भरतनाट्यम व कुचीपुडी नृत्याकरीता एका कलाकाराला प्रति स्पर्धा 15 मिनीटे आणि हिंदी, इंग्रजी भाषेतील वक्तृत्व स्पर्धेसाठी एका स्पर्धकाला 4 मिनीटांचा वेळ दिल्या जाणार आहे.
    त्याअनुषंगाने जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये, युवा मंडळे, संगीत विद्यालय, स्वयंसेवी संस्थेतील 13 ते 35 वर्ष वयोगटातील युवक-युवतींनी जास्तीत जास्त संख्येने युवा महोत्सवात सहभाग घ्यावा. महोत्सवात आपला प्रवेश निश्चित करण्यासाठी 30 नोव्हेंबर 2016 पर्यंत जन्मतारखेच्या दाखल्यासह जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात नोंदवावा. अधिक माहिती, नियम व अटीकरीता जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाशी संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी अशोक गिरी यांनी केले आहे.    

******