घाबरू नका ! हातापायाला भेगा पडण्याचा आजार संसर्गजन्य नाही ; आरोग्य विभागाच्या उपाययोजना सुरु
घाबरू नका ! हातापायाला भेगा पडण्याचा आजार संसर्गजन्य
नाही ;
आरोग्य विभागाच्या उपाययोजना सुरु
·
१४
रुग्णांना एक्झामा आजाराचे निदान
·
आजाराचा पाण्याशी कोणताही संबंध नाही
·
बाधितांना
आजाराचा पूर्वइतिहास
बुलढाणा, दि.१७ : मेहकर
तालुक्यातील शेलगांव देशमुख या गावात हात व पायाच्या तळव्यांना भेगा पडत असलेले रुग्ण
आढळून आले आहेत. हा आजार संसर्गजन्य नसून पाण्याशी कोणताही संबंध नाही. नागरिकांनी
घाबरुन न जाता लक्षणे आढळल्यास डॅाक्टरांचा सल्ला व उपचार घेण्याचे आवाहन जिल्हा आरोग्य
अधिकारी डॅा. अमोल गिते यांनी केले आहे.
मेहकर
तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र डोणगांवअंतर्गत शेलगांव देशमुख या गावामध्ये अनेक
व्यक्तींना तळहात व तळपायावर भेगा पडणे, साल जाणे, खाज येणे इत्यादी लक्षणे उद्भवत
असल्याबाबत माहिती मिळताच उपकेंद्र शेलगांव देशमुख व आयु. दवाखाना शेलगाव देशमुख येथील
वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, आशा यांचे मार्फत १४ व १५ जून रोजी
घरोघरी शीघ्र सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणामध्ये २० लोकांना अशा प्रकारची लक्षणे
असल्याचे निदर्शनास आली. यानुषंगाने १५ जून रोजी जिल्हास्तरावरुन शीघ्र प्रतिसाद पथकाने
भेट देऊन परिस्थीतीचा आढावा घेतला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य प्रशासनाने दिली आहे.
या
आजाराविषयी जिल्हा साथरोग तथा सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रशांत तांगडे, वैद्यकीय अधिकारी
तथा त्वचारोग तज्ञ डॉ. बालाजी आगट यांनी केलेल्या तपासणीअंती २० पैकी १४ रुग्णांना
एक्झामा / पामोप्लांटर केराटोडर्मा / पामोप्लांटर सोरायसीस हे आजार असल्याचे निदान
झाले. या व्यक्तींना हे आजार मागील एक ते ५ वर्षांपूर्वीपासून असल्याचा रुग्ण इतिहास
आहे. या रुग्णांचे बुलढाणा व अकोला येथील त्वचारोग तज्ञांकडे उपचार सुरु आहेत.
हा
आजार संसर्गजन्य नाही. या आजाराचा पाण्याशी कोणताही संबंध नाही. विविध प्रकारच्या प्रतिजन/हानिकारक
पदार्थांच्या संपर्कात व्यक्ती आल्यास स्वयंप्रतिकार पध्दतीचा हा आजार उद्भवू शकतो.
ही लक्षणे दीर्घकाळपर्यंत राहू शकतात. हा आजार संसर्गजन्य नसल्याने एका व्यक्तीकडून
दुसऱ्या व्यक्तीस संक्रमण होत नाही. त्यामुळे कोणीही घाबरून जाऊ नये, असे जिल्हा आरोग्य
प्रशासनाने स्पष्ट केले आहे. तसेच अशी लक्षणे उद्भवल्यास तात्काळ नजीकच्या शासकीय रुग्णालयात
जाऊन उपचार व सल्ला घ्यावा. डॉक्टरांनी सांगितलेला औषधोपचार व पथ्याचे पालन करावे,
असे आवाहन देखील जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ अमोल गीते यांनी केले आहे.
००००
Comments
Post a Comment