Thursday 27 April 2017

news 27.4.2017 DIO BULDANA


पंतप्रधान कृषि सिंचन योजनेतंर्गत सुक्ष्म सिंचन संचासाठी ‘ई ठिबक’प्रणाली
·         1 मे 2017 पासून ऑनलाईन नोंदणीची प्रक्रिया सुरू
·        www.mahaethibak.gov.in  या संकेतस्थळावर अर्ज करावे
·        विविध टप्प्यावरील कार्यवाहीची माहिती एसएमएसद्वारे मिळणार
बुलडाणा, दि‍.27 पंतप्रधान कृषि सिंचन योजनेतंर्गत सुक्ष्म सिंचन योजना 2017-18 या वर्षाकरीता सुक्ष्म सिंचन संच बसविण्यासाठी ऑनलाईन नोंदणी करणे व शेतकऱ्यांकडून अर्ज स्वीकृती करणे याकरीता ई-ठिबक आज्ञावली विकसित करण्यात आली आहे. ही आज्ञावली 1 मे 2017 पासून सुरू होत असून या आज्ञावलीवर शेतकऱ्यांना ऑनलाईन नोंदणी करण्यास व शेतकऱ्यांकडून अर्ज स्वीकारण्यात येणार आहे. ही आज्ञावली 1 मे 2017 ते 31 डिसेंबर 2017 पर्यंत सुरू राहणार आहे.
   शेतकऱ्यांकडून सुक्ष्म सिंचन संचासाठी अर्ज केवळ www.mahaethibak.gov.in  या संकेतस्थळावरच स्वीकारण्यात येणार आहे. ई-ठिबक आज्ञावलीवर शेतकरी नोंदणीसाठी लाभार्थ्याचा आधार क्रमांक हाच लाभार्थ्याचा लॉग ईन आयडी असणार आहे. शेतकरी अर्जामध्ये E-KYC  साठी अर्जदारांची संमती असल्याबाबत ‘सुक्ष्म सिंचन योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार संबंधीत माझ्या वैयक्तिक माहितीचा उपयोग करण्यास माझी सहमती आहे’ या तरतुदीचा समावेश करण्यात आला आहे.
  ई-ठिबक आज्ञावली केंद्र शासनाच्या डीबीटी (डायरेक्ट बेनेफिट ट्रान्सफर) पोर्टलशी जोडण्यात येत आहे. यास्तव अर्जदाराच्या जन्मदिनांकाचा समावेश शेतकरी नोंदणी अर्जामध्ये करण्यात आला आहे. लाभार्थी नोंदणी करण्यासाठी आधार कार्ड यंत्रणेद्वारे आधार कार्डचा डाटा ई-ठिबक आज्ञावलीशी संलग्न करण्यासाठी कार्यवाही सुरू आहे. तोपर्यंत लाभार्थ्यांना आधार अपलोड करण्याची सुविधा निर्माण करून देण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज सादर केल्यानंतर स्वयंचलीत संगणकीय प्रणालीद्वारे शेतकऱ्यांना उपलब्ध अनुदानाच्या मर्यादेत ऑनलाईन पुर्वसंमती प्रदान करण्यात येईल. पुर्वसंमती दिल्यानंतर शेतकऱ्यांचे 30 दिवसांच्या कालावधीत सुक्ष्म सिंचन संच बसवून, देयकाची प्रत ई-ठिबक आज्ञावलीवर अपलोड करणे बंधनकारक आहे. विहीत कालावधीत शेतकऱ्यांनी देयकाची प्रत अपलोड न केल्यास लाभार्थ्याचा अर्ज ई-ठिबक आज्ञावलीतून आपोआप रद्द करण्याची व्यवस्था निर्माण करण्यात आली आहे. लाभार्थ्याचा अर्ज आपोआप रद्द झाल्यानंतर पूर्व संमती आपोआप रद्द होईल तथापी लाभार्थ्यांस योजनेचा लाभ घेण्यासाठी पुन्हा अर्ज करता येईल.
   शेतकरी नोंदणी अर्जामध्ये ‘मी पूर्वसंमतीशिवाय सुक्ष्म सिंचन संच बसविल्यास अनुदानास पात्र असणार नाही, याची मला जाणीव आहे’ अशा आशयाच्या स्वयं घोषणापत्राचा समावेश करण्यात आला आहे. स्वयं घोषणापत्र देणे लाभार्थ्यास बंधनकारक आहे. अर्जामध्ये संच उत्पादक व वितरक यांचा समावेश असणार नाही. संच उत्पादकांचे व वितरकाचे नाव बील इनव्हाईस एंट्री नंतर मोका तपासणीच्या वेळी घेण्याची सुविधा देण्यात आली आहे.पूर्वसंमती प्राप्त केल्यानंतर 30 दिवसांच्या कालावधीत सुक्ष्म सिंचन संच बसवून ई-ठिबक आज्ञावलीमध्ये बील इनव्हाईस अपलोड करणे व अनुदान मागणीचा प्रस्ताव विहीत कालावधीत आवश्यक कागदपत्रांसह तालुका कृषि अधिकारी कार्यालयास सादर करणे आवश्यक आहे.
  अर्जदारास विविध टप्प्यावर झालेल्या कार्यवाहीची माहिती मोबाईलद्वारे एसएमएस अलर्ट पाठविण्याची सुविधा निर्माण करण्यात आली असल्यामुळे मोबाईल क्रमांक बिनचूकपणे नोंदविणे आवश्यक आहे. तसेच बँक खाते क्रमांकात बदल करण्याची सुविधा बंद करण्यात आलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी बिनचूकपणे खातेक्रमांक नोंदवावा. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी अधिकृत संकेतस्थळ www.mahaethibak.gov.in यावर अर्ज सादर करावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी प्रमोद लहाळे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी नजीकच्या कृषि विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा
                                                                                    ******
                   वस्तू व सेवा कर कायद्याविषयी जनजागृतीपर कार्यशाळेला प्रतिसाद
·        विक्री कर विभागाच्यावतीने आयोजन
बुलडाणा, दि‍.27 केंद्र सरकारने वस्तू व सेवा कर म्हणजेच जीएसटी या कायद्याविषयी जनजागृती करण्यासाठी कार्यशाळेचे आयोजन आज 27 एप्रिल 2017 रोजी स्थानिक बुलडाणा जिमखाना क्लब येथे करण्यात आले. या कार्यशाळेत जीएसटी कायद्याच्या कलमनिहाय व होणाऱ्या लाभाचे विस्तृत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी विक्रीकर उपायुक्त टी. के पाचारणे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला प्रमुख उपस्थितीत सहायक विक्रीकर आयुक्त पी. बी राठोड, के.पी ढोले, विक्रीकर अधिकारी ए.पी अवचार, पी.पी करवंदे आदी
   यावेळी प्रास्ताविक पी.बी राठोड यांनी केले. तसेच पॉवर पॉईंट सादरीकरणाद्वारे जीएसटीचे सादरीकरण विक्रीकर निरीक्षक यु.एस देशमुख व जी.एस जैस्वाल यांनी केले. याप्रसंगी व्यापारी व कर सल्लागार यांनी जीएसटीसंदर्भात विचारलेल्या प्रश्नांचे निरसन उपस्थित अधिकारी वर्गाने केले. यावेळी व्यापारी व कर सल्लागार मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार प्रदर्शन विक्रीकर निरीक्षक जी.एस धंदर यांनी केले.
****
निलक्रांती योजनेतंर्गत एकदिवसीय कार्यशाळा व चर्चासत्राचे आयोजन
बुलडाणा, दि. 27 :  केंद्र शासनाचे निलक्रांती योजनेतंर्गत मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थेच्या मच्छीमार सभासद, मत्स्यव्यवसायिकांसाठी आणि मत्स्योद्योजकाकरीता तसेच शेततळीधारक मत्स्यकास्तकारांसाठी एकदिवसीय कार्यशाळा व चर्चासत्राचे आयोजन 5 मे 2017 रोजी सकाळी 11 वाजता बसथानकासमोर, प्रशासकीय इमारतीच्या सभागृहात करण्यात आले आहे.  या कार्यशाळेत मत्स्यव्यवसाय, मत्स्योत्पादन दुपटीने वाढविणे, निलक्रांती योजना याविषयी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. कार्यशाळेकरीता मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थेचे मच्छीमार सभासद, मत्स्यव्यवसायिकांनी तसेच शेततळीधारक मत्स्यकास्तकारांनी, मत्स्यउद्योजकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय स.ई नायकवडी यांनी केले आहे.
*****
जिल्हाधिकारी कार्यालयात
2 मे रोजी लोकशाही दिन
  बुलडाणा, दि. 27 : नागरिकांच्या तक्रारींचा निपटारा जलदगतीने व्हावा, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. मात्र या सोमवारला 1 मे महाराष्ट्र दिनाची शासकीय सुट्टी असल्यामुळे येणारा लोकशाही दिन मंगळवार, दि. 2 मे 2017 रोजी दुपारी 1 वाजता आयोजित करण्यात आला आहे.  या दिवशी जिल्हाधिकारी व इतर शासकीय अधिकारी,नागरिकांच्या तक्रारींचे निरसन करणार आहेत. तसेच तालुका स्तरावर तहसील कार्यालयात महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येत आहे.
         जिल्ह्यातील शासकीय, निम शासकीय कार्यालयातील अडचणी व तक्रारी संबंधी ज्या नागरिकांना आपली निवेदने लोकशाही दिनी सादर करावयाची आहेत, त्यांनी जिल्हाधिकारी यांच्या नावे विहित नमुन्यात अर्ज करावा. विहित नमुन्यातील अर्ज व सोबत अर्जाची आगाऊ प्रत जोडून लोकशाही दिनाच्या 15 दिवस आधी पाठविणे आवश्यक आहे. अर्जदाराने लोकशाही दिनाच्या दिवशी मूळ अर्जासोबत उपस्थित रहावे. जिल्हाधिकारी कार्यालयात लोकशाही दिनी संबंधीत नागरिकांनी उपस्थित राहून दोन प्रतींमध्ये आपली निवेदने जिल्हाधिकारी यांना सादर करावीत. अन्य व्यक्तीमार्फत पाठविलेली निवेदने स्विकारली जाणार नाहीत. तालुका स्तरावरील लोकशाही दिनानंतर 1 महिन्याने जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही दिनात अर्ज करता येतो. तसेच तक्रारदारांबरोबर त्रयस्थाने येऊ नये. अर्जदाराने एका अर्जात एकच तक्रार सादर करावी. एकापेक्षा जास्त तक्रारी असलेला अर्ज स्विकारला जाणार नाही.

   
   तक्रार, निवेदन वैयक्तिक स्वरुपाची असावी, त्याचप्रमाणे न्यायप्रविष्ठ प्रकरणे, राजस्व/ अपिल, सेवा व आस्थापना विषयक बाबी, विहित नमुन्यात नसलेले तसेच आवश्यक त्‍या कागदपत्रांच्या प्रती न जोडलेले अर्ज, विविध न्यायालयात, प्राधिकाऱ्यांकडील, लोकआयुक्त यांच्याकडे प्रलंबित असलेल्या प्रकरणांच्या तक्रारी स्विकारल्या जाणार नाहीत, असे अर्ज संबंधित विभागाकडे आवश्यक कार्यवाहीसाठी 8 दिवसात पाठविण्यात येतील. त्याची एक प्रत अर्जदारास पाठविण्यात येईल,  असे जिल्हाधिकारी यांनी कळविले आहे.
*****
जिल्ह्यात तीन गावांसाठी पाण्याचे टँकर मंजूर
·        मेरा बु, असोला बु व गोरेगाव गावाचा समावेश
बुलडाणा, दि‍.27 - पाणी टंचाई आराखड्यामध्ये समाविष्‍ट जिल्ह्यातील 3 गावांसाठी पिण्याचे पाण्याचे टँकर मंजूर करण्यात आले आहे. त्यामध्ये चिखली तालुक्यातील मेरा बु, असोला बु व सिंदखेड राजा तालुक्यातील गोरेगांव गावाचा समावेश आहे. मेरा बु येथील लोकसंख्या 1100 असून गावाकरिता 24 मेट्रीक टन क्षमतेचे 1 टँकर दिवसातून 3 फेऱ्या मारणार आहे. असोला बु च्या 2400 लोकसंख्येसाठी 24 मेट्रीक टन क्षमतेचे 1 टँकर दिवसातून 3 फेरी मारणार आहे. तर गोरेगांव 1945 लोकसंख्येकरीता याच क्षमतेचे एक टँकर दिवसातून 3 फेऱ्या मारणार आहे.
   गटविकास अधिकारी यांनी संबंधित गावांना वेळोवेळी भेटी देवून टँकरच्या खेपांची नोंद तपासावी. ग्रामपंचायतीने नोंद व्यवस्थित घ्यावी. टँकरचे पाणी शुद्ध करूनच पुरविल्या जात असल्याबाबत दक्षता घ्यावी, असे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पाणी टंचाई निवारण कक्षाने कळविले आहे.
*****
राष्ट्रध्वजाचा राखा सन्मान.. वाढेल देशाचा अभिमान !...
·         हँण्ड स्पून राष्ट्रध्वज पायदळी तुडवू नका
 बुलडाणा,दि.27: दरवर्षी 26 जानेवारी, 1 मे, 15 ऑगस्ट व अन्य राष्ट्रीय कार्यक्रम, महत्वाचे सांस्कृतिक कार्यक्रम व क्रीडा सामन्यांच्या वेळी विद्यार्थी व नागरिक प्लास्टीक राष्ट्रध्वजाचा वापर करण्यात येतो. सदर कार्यक्रम पार पाडल्यानंतर फाटलेले कागदी राष्ट्रध्वज तसेच प्लास्टीकचे राष्ट्रध्वज मैदानात, रस्त्यावर तसेच कार्यक्रमाच्या ठिकाणी इतस्तत: पडलेले दिसतात, असे राष्ट्रध्वज पायदळी तुडविले जातात. त्यामुळे राष्ट्रध्वजाचा अवमान होतो.                                   राष्ट्रध्वजाचा उचित सन्मान राखण्यासाठी भारतीय ध्वज संहितेच्या कलम 1.2 ते 1.5 मध्ये राष्ट्रध्वजाच्या उचित वापराबाबतच्या तरतुदी आहेत. राष्ट्रध्वज हा हँण्ड स्पून आणि हस्तनिर्मित वूल, कॉटन, सिल्क आदीमध्ये असावा. राष्ट्रध्वजाचा आकार आयाताकृती, त्याची उंची व रुंदी 3:2 असावी. राष्ट्रध्वजाचा आकार 9 प्रकारात पुढीलप्रमाणे असायला पाहिजे. त्याचा आकार प्रकारानुसार लांबी व रुंदी दिली आहे. प्रकार 1 लांबी, रुंदी अनुक्रमे 6300 व 4200 मीटर, प्रकार 2 लांबी, रुंदी अनुक्रमे 3600 व 2400, प्रकार 3 लांबी, रुंदी अनुक्रमे 2700 व 1800, प्रकार 4 लांबी, रुंदी अनुक्रमे 1800 व 1200, प्रकार 5 मध्ये लांबी, रुंदी अनुक्रमे 1350 व 900, प्रकार 6 मध्ये लांबी, रुंदी अनुक्रमे 900 व 600, प्रकार 7 मध्ये लांबी, रुंदी अनुक्रमे 450 व 300, प्रकार 8 लांबी, रुंदी अनुक्रमे 225 व 150, प्रकार 9 लांबी, रुंदी अनुक्रमे 150 व 100 मीटर असावी. राष्ट्रध्वजाचा व्हीव्हीआयपी विमानासाठी आकार 450 बाय 100 मीटर, मोटार कारसाठी 225 बाय 150 मीटर आणि टेबलसाठी 150 बाय 100 मीटर असावा.

     भारतीय ध्वजसंहितेमध्ये दिलेल्या तरतूदीनुसार राष्ट्रध्वजाचा वापर करताना खराब झालेल्या, माती लागलेल्या ध्वजाची विल्हेवाट लावणे आवश्यक आहे. परंतु तसे होत नसल्याने राष्ट्रध्वजाचा अवमान होत असल्याचे निदर्शनास आले आहे. दरवर्षी 26 जानेवारी, 1 मे, 15 ऑगस्ट व अन्य राष्ट्रीय कार्यक्रम, महत्वाचे सांस्कृतिक कार्यक्रम व क्रीडा सामन्यांच्या वेळी विद्यार्थी व नागरिक प्लास्टीक राष्ट्रध्वजाचा वापर करण्यात येतो. याठिकाणी पायदळी तुडविलेले राष्ट्रध्वज गोळा करून तालुका व जिल्हा स्तरावर निर्मित करण्यात आलेल्या यंत्रणेस सुपूर्द करण्याचे अधिकार अशासकीय संस्था तसेच इतर संघटनांना देण्यात आले आहे. त्यांनी असे राष्ट्रध्वज जिल्हाधिकारी व तहसीलदार यांच्याकडे सुपूर्द करावे. खराब झालेले, माती लागलेले राष्ट्रध्वज गोणी किंवा कापडामध्ये व्यवस्थित बांधून शिवून बंद करावे. अशाप्रकारे बांधलेले राष्ट्रध्वज सुर्यास्तानंतर व सुर्योदयापूर्वी जिल्हाधिकारी व तहसील कार्यालयांमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली स्वच्छ जागेत सन्मानपूर्वक जाळून नष्ट करावे.हे करताना उपस्थितांनी उभे रहावे व जाळून पुर्णपणे नष्ट होईपर्यंत जागा सोडू नये, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात येत आहे.  

Wednesday 12 April 2017

news 12.4.2017 dio buldana

पालकमंत्री पांडुरंग फुंडकर यांचा दौरा
बुलडाणा, दि. 12 :  जिल्ह्याचे पालकमंत्री पांडुरंग फुंडकर गुरूवार, दि. 13 एप्रिल 2017 रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे : दि. 13 एप्रिल 2017 रोजी सकाळी 5.28 वाजता शेगांव येथे आगमन व मोटारीने खामगांवकडे प्रयाण, सकाळी 6 वाजता खामगांव येथे आगमन, राखीव व मुक्काम असेल.
                                                                        ***
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहनिमित्त रक्तदान शिबिर
बुलडाणा दि‍. 12- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहनिमित्त 8 ते 14 एप्रिल 2017 दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. या सप्ताहातंर्गत सहाय्यक आयुक्त समाजकल्याण, महात्मा ज्योतिबा फुले समाजकार्य महाविद्यालय, बुलडाणा व जिल्हा शल्य चिकित्सक यांचे संयुक्त विद्यमाने 11 एप्रिल 2017 रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. सदर शिबिर जिल्हा सामान्य रूग्णालयातील रक्त संकलन केंद्रात घेण्यात आले.
  शिबिरात ए.जे हिवाळे, राम तोंडीलायता, विजय जाधव आदी उत्साही रक्तदात्यांनी रक्तदान केले. याप्रसंगी सहायक आयुक्त समाजकल्याण कार्यालयातील जी.बी धोटे, पी.एम धर्माधिकारी, इ. आर देशमुख तसेच महात्मा ज्योतिबा फुले समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य एम. व्ही अवचार, प्रा. गायकवाड, प्रा. साखरे, प्रा. बोकाडे, प्रा. डॉ इंगळे, प्रा. गेडाम, प्रा. मोठे, प्रा. ठोंबरे व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. रक्तदात्यांना प्रमाणपत्र देवून कार्यक्रम पार पडला.
******
जात प्रमाणपत्र पडताळणी करताना मध्यस्थांपासून सावध रहावे
·        जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे आवाहन
बुलडाणा,दि‍.12- जातीचे प्रमाणपत्राची वैधता तपासण्यासाठी आणि वैधता प्रमाणपत्र घेण्यासाठी प्रकरणे जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे सादर करण्यात येतात. खोटी माहिती सादर करणे, खेटे विधान किंवा खोटे दस्ताऐवज दाखल करणे, अन्य कोणत्याही प्रकारच्या लबाडीने जातीचे  व त्याच्या वैधतेचे खोटे प्रमाणपत्र मिळविणे, मागासवर्गीय नसतांना अशा प्रमाणपत्राचा लाभ घेणे, नोकरी व शिक्षण घेण्यासाठी, निर्वाचन पदावर निवडून येण्यासाठी वापर करणे हा दंडनीय अपराध आहे. असा अपराध दखलपात्र व अजमानती आहे.जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे सादर करताना कुठल्याही प्रकारच्या मध्यस्थ व दलालांपासून सावध रहावे, आपली फसवणूक होणार नाही, याची काळजी घ्यावी, असे आवाहन जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने केले आहे.
   तरी उक्त प्रकरणांमध्ये जातीचे प्रमाणपत्र रद्द करणे, जप्त करणे यापुरतीच ही कार्यवाही मर्यादीत नसून कायद्यान्वये अशा अपराधी व्यक्तीला दोन वर्षापर्यंत सश्रम कारावास व 20 हजार रूपयांपर्यंत द्रव्यदंडाची किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. एवढेच नव्हे, तर अशा प्रकारचा गुन्हा हा भारतीय दंड विधानातंर्गतदेखील शिक्षेस पात्र ठरणार आहे. तसेच अशा अपराधासाठी कटकारस्थान करणाऱ्या अथवा गैरकृत्य / गुन्ह्याला प्रोत्साहन किंवा साथ देणाऱ्या व्यक्तीलासुद्धा सदर दोन्ही कायद्याच्या विविध तरतूदी लागू होतात. फेर फार केलेल्या दस्ताऐवजांची, खोटे तयार केलेल्या दस्तादेवजाची शास्त्रीय पद्धतीने तपासणीसाठी सध्या खूप तंत्रज्ञान उपलब्ध आहे. असा दस्ताऐवज अर्जासोबत दाखल केल्यास संबंधित गुन्हेगारांविरूद्ध कायदेशीर कडक कारवाई केली जाणार असल्याचे आवाहनही करण्यात आले.
 जात प्रमाणपत्र मिळविण्यासाठी व त्याच्या पडताळणीकरीता लोकसेवकांकडून पैशाची मागणी होत असेल. त्यासाठी अडवणूक करणे, दिरंगाई करणे असे आढळून येत असेल, तर अशा लोकसेवकांविरूद्ध संबंधित जिल्ह्याच्या लाचलूचपत प्रतिबंधक खात्याकडे त्वरित तक्रार करावी, असे आवाहन उपायुक्त तथा सदस्य, जिल्हा जात प्रमाणत्र पडताळणी समिती यांनी केले आहे.
***
   कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत 15 व 16 एप्रिल रोजी जिल्हा दौऱ्यावर
बुलडाणा, दि. 12 :  कृषि, पणन व पाणीपुरवठा राज्यमंत्री सदाभाऊ खोत 15 व 16 एप्रिल 2017 रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे : दि. 15 एप्रिल 2017 रोजी दु 4.45 वाजता मालेगांव जि. वाशिम येथून डोणगांव ता. मेहकरकडे प्रयाण, सायं 6 वाजता डोणगांव येथे आगमन व शेतकरी मेळाव्याला उपस्थिती, रात्री 8 वाजता डोणगांव शेतकरी उत्पादक कंपनीची भेट व चर्चा, रात्री 9 वाजता डोणगांव येथून शासकीय मोटारीने बुलडाणाकडे प्रयाण, रात्री 10.30 वाजता बुलडाणा विश्रामगृह येथे आगमन व मुक्काम, दि. 16 एप्रिल 2017 रोजी सकाळी 8.15 वाजता विश्रामगृह येथून सुंदरखेडकडे प्रयाण, सकाळी 8.30 वाजता सुंदरखेड येथे राष्ट्रीय फलोत्पादन अभियान अंतर्गत उभारलेल्या महेंद्र जतकर यांचे शेडनेट हाऊसची पाहणी व चर्चा, सकाळी 8.50 वाजता सावळाकडे प्रयाण, सकाळी 9 वाजता सावळा येथे आगमन, 9 ते 11 वाजेदरम्यान सावळा येथे मागेल त्याला शेततळे अंतर्गत शेततळ्यांचे भूमीपुजन, पूर्ण झालेल्या शेततळ्याची पाहणी, पाणी पुरवठा योजनेतंर्गत कामाचे भूमीपुजन, जलसंधारण कार्यक्रमातंर्गत विविध कामांचे भूमीपुजन व लोकार्पण, शेतकऱ्यांशी संवाद, सकाळी 11 वाजता सव ता. बुलडाणाकडे प्रयाण, 11.30 वाजता सव येथे आगमन व 12.30 वाजेपर्यंत सव येथे पांडुरंग शेळके यांचे शेतावर सामुहिक शेततलाव व रोहयो अंतर्गत आवळा फळबागेची पाहणी, मृद आरोग्य पत्रिका, यांत्रिकीकरण/राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानतंर्गत अवजारे व अनुदान वितरण कार्यक्रमास उपस्थिती, दुपारी 12.30 वाजता सव येथे कृषि, फलोत्पादन, पणन,पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांची आढावा बैठकीस उपस्थित राहतील.
   दुपारी 2 वाजता सव येथून चिखलीकडे प्रयाण, दु 2.30 वाजता चिखली विश्रामगृह येथे आगमन व शेतकऱ्यांना भेटण्यासाठी राखीव वेळ, दु 3.30 वाजता हातणी ता. चिखलीकडे प्रयाण, दु 3.45 वाजता हातणी येथे आगमन व श्रमदानातून शौचालयाची उभारणी कार्यक्रम, स्वच्छ भारत मिशनची जिल्हास्तरीय आढावा बैठकीस उपस्थिती, सायं 6 वाजता हातणी येथून बुलडाणाकडे प्रयाण, रात्री 6.30 वाजता बुलडाणा येथे रविकांत तुपकर यांच्या निवासस्थानी आगमन व राखीव, रात्री 7.30 विश्रामगृह राखीव, रात्री 8 वाजता बुलडाणा येथून वाघजाळ फाटाकडे प्रयाण, रात्री 8.15 वाघजाळ फाटा येथे आगमन व शेतकऱ्यांशी चर्चा, रात्री 8.30 वाजता वाघजाळ फाटा येथून मलकापूरकडे प्रयाण, रात्री 9.25 वाजता मलकापूर रेल्वे स्थानक येथे आगमन व 9.40 वाजता मलकापूर येथून अमरावती एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण करतील.
                                                                                    ******
 निलक्रांती योजनेतंर्गत एकदिवसीय कार्यशाळा व चर्चासत्राचे आयोजन
बुलडाणा, दि. 12 :  केंद्र शासनाचे निलक्रांती योजनेतंर्गत मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थेच्या मच्छीमार सभासद, मत्स्यव्यवसायिकांसाठी आणि मत्स्योद्योजकाकरीता तसेच शेततळीधारक मत्स्यकास्तकारांसाठी एकदिवसीय कार्यशाळा व चर्चासत्राचे आयोजन 18 एप्रिल 2017 रोजी दुपारी 12 वाजता बसथानकासमोर, प्रशासकीय इमारतीच्या सभागृहात करण्यात आले आहे.

   या कार्यशाळेत मत्स्यव्यवसाय, मत्स्योत्पादन दुपटीने वाढविणे, निलक्रांती योजना याविषयी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. कार्यशाळेकरीता मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थेचे मच्छीमार सभासद, मत्स्यव्यवसायिकांनी तसेच शेततळीधारक मत्स्यकास्तकारांनी, मत्स्यउद्योजकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन सहायक आयुक्त्‍ मत्स्यव्यवसाय स.ई नायकवडी यांनी केले आहे. 

Tuesday 11 April 2017

news 11.4.2017 dio buldana

जिल्हाधिकारी कार्यालयात महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन
बुलडाणा दि‍. 11- जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आज महात्मा ज्योतिबा फुले यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. जिल्हाधिकारी डॉ. विजय झाडे यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच यावेळी उपस्थित सिंदखेड राजाचे आमदार डॉ. शशीकांत खेडेकर यांनीही महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण केले. याप्रसंगी जिल्हा नियोजन अधिकारी दिपक सिडाम, निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र टापरे, जिल्हा पुनर्वसन अधिकारी श्री. खांदे, तहसीलदार श्री. काळे आदींसह अधिकारी उपस्थित होते. 
******
परिवहन कार्यालयाची तब्बल 111.72 टक्के महसूल वसूली
  • 40 कोटी उद्दिष्टापेक्षा 44.97 कोटी रूपयांच्या महसूलाची वसूली
  • 73 चालक परवान्यावर निलंबनाची कार्यवाही
  • जिल्ह्यात 36 हजार 118 नवीन वाहनांची नोंदणी
  • 45 हजार 117 नवीन चालक परवाने
बुलडाणा, दि. 11 :- सन 2016-17 या आर्थकि वर्षात बुलडाणा परिवहन कार्यालयाने धडाकेबाज कामगिरी करीत महसूल वसूलीच्या उद्दिष्टापैकी तब्बल 111.72 टक्के वसूली केली आहे. त्यामुळे शासनाला कोट्यवधींचा महसूल मिळाला आहे. उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, बुलडाणा यांना शासनाने गत आर्थिक वर्षात 40.25 कोटी महसूल उद्दिष्ट दिले होते. त्यातुलनेत विभागाने 44.97 कोटी म्हणजेच 111.72 टक्के महसूलाची वसूली केली आहे.
   सन 2016-17 या आर्थिक वर्षात जिल्ह्यात एकूण 36 हजार 118 नविन वाहनांची नोंदणी करण्यात आली आहे. त्यामध्ये 31 हजार 279 दुचाकी, 1828 चारचाकी कार व जिप, 12 ऑटोरीक्षा, 181 ट्रक, 1112 डिलीव्हरी व्हॅन्स, 1684 ट्रॅक्टर व 819 प्रवासी वाहनांचा समावेश आहे. तसेच या वर्षात 45 हजार 117 नविन ड्रायव्हींग  लायसन्स,  1852 नविन वाहक परवाना परिवहन विभागाने जारी केले आहे.
  जिल्ह्याकरिता एक वायुवेग पथक मंजूर करण्यात आले असून सन 2016-17 मध्ये जिल्ह्यातील एकूण 3483 वाहनांविरूद्ध धोकादायकरित्या वाहन चालविणे, हेल्मेट न वापरणे, वाहन चालविताना मोबाईलचा वापर करणे, फॅन्सी नंबर प्लेट लावणे, ओव्हरलोड वाहतूक करणे, अवैध प्रवासी वाहतूक करणे, विना परवाना वाहन चालविणे, कराचा भरणा न करणे आदी विविध गुन्ह्यांबाबत कारवाई करण्यात येवून 1 कोटी 41 लाख 65 हजार एवढा दंड वसूल करण्यात आला. तसेच  1 कोटी 42 लाख 72 हजार इतकी कर वसूली करण्यात आली आहे. तसेच विविध गुन्ह्यांसाठी 73 व्यक्तींच्या चालक परवानावर निलंबनाची कार्यवाही करण्यात आली आहे.

  टॅक्सी, बस, टेम्पो, ट्रक आदी परवाना धारक वाहन मालकांकडून या वर्षात 79 लक्ष 25 हजार 83 रूपयांचा व्यवसाय करही वसूल करण्यात आला आहे.  कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्या सामुहिक सहभागातून व प्रयत्नांमधून कार्यालयाने उद्दिष्टपूर्तीपेक्षा जास्त महसूल वसूली साध्य केली आहे, अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीमती अर्चना गायकवाड यांनी दिली आहे.