निराधारांना अनुदानाचे तीन हजार रुपये मिळणार !

 

निराधारांना अनुदानाचे तीन हजार रुपये मिळणार !

 

*  विशेष सहाय्य योजना अनुदान वितरणाला सुरुवात

*  आधार प्रमाणीकरण असेल तरच अनुदानाचा आधार !

* १,१६,६१४ लाभार्थ्यांच्या खात्यात डिसेंबर, जानेवारीचे अनुदान जमा...

* आधार प्रमाणीकरण झालेल्या लाभार्थ्यांच्या खात्यात फेब्रुवारी व मार्च चे अनुदान ६ मार्च रोजी जमा

 

बुलडाणा, (जिमाका) दि. 6 : जिल्ह्यातील संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ योजनेंतर्गत आधार प्रमाणीकरण केलेल्या लाभार्थ्यांच्या खात्यात फेब्रुवारी व मार्च या दोन महिन्याचे तीन हजार रुपये वितरित करण्यास सुरुवात झाली आहे. या योजनेच्या एकूण १,८१,९०८ पैकी १,१६,६१४ लाभार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण झाले असल्याने त्यांना डिसेंबर २०२४ व जानेवारी २०२५ चे अनुदान देण्यात आले आहे आणि ज्या लाभार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण झाले आहे त्यांनाच फेब्रुवारी व मार्च महिन्याचे अनुदान मिळणार आहे, अशी माहिती विजय सवडे तहसीलदार संजय गांधी योजना यांनी दिली आहे.

 

जिल्ह्यात विशेष सहाय्य योजनेअंतर्गत एकूण २,३५,३०५ लाभार्थी आहेत. त्यापैकी राज्य शासनाच्या संजय गांधी व श्रावण बाळ योजनेअंतर्गत एकूण १,८१,९०८ लाभार्थी असून केंद्र शासनाच्या इंदिरा गांधी वृद्धापकाळ, दिव्यांग, विधवा पेन्शन योजनेचे ५३,३९७ लाभार्थी आहेत. या दोन्ही योजनांचे राज्य शासनाचे अनुदान लाभार्थ्यांना डिसेंबर २०२४ पासून डीबीटीद्वारे वाटप करण्यात येत आहे. लाभार्थ्यांना डीबीटीद्वारे अनुदान वाटप होण्यासाठी लाभार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण डीबीटी पोर्टलवर होणे आवश्यक आहे. आधार प्रमाणीकरणासाठी लाभार्थ्यांचे आधार अद्ययावत व आधारला मोबाईल क्रमांक जोडलेला असणे आवश्यक आहे.

 

तहसिलमध्ये आधार प्रमाणीकरणाची सुविधा

या अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांनी आधार प्रमाणीकरणासाठी तहसिल कार्यालयात उपस्थित राहुन प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे.

 

आधार व मोबाईल आवश्यक

 संजय गांधी योजना व श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांनी आधार प्रमाणीकरणासाठी अद्ययावत आधार कार्ड व आधारला जोडलेला मोबाईल क्रमांक सोबत आणणे आवश्यक आहे.

 

संजय गांधी व श्रावण बाळ योजनांचे आधार प्रमाणीकरण झालेल्या लाभार्थी यांना फेब्रुवारी व मार्च महिन्याचे अनुदान दिनांक ६ मार्च रोजी वितरित करण्यात आले आहे. तसेच केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी वृद्धापकाळ, दिव्यांग,विधवा पेन्शन योजनेतील आधार प्रमाणीकरण झालेल्या लाभार्थ्यांना माहे फेब्रुवारी व मार्च २०२५ चे राज्याचे अनुदान प्रत्येकी १२००/१३०० रुपये सोमवार दिनांक १० मार्च २०२५ रोजी डीबीटी पोर्टलद्वारे वितरित करण्यात येणार आहे, अशी माहिती संजय गांधी योजना तहसीलदार विजय सवडे यांनी दिली

 

लाभार्थ्यांनी आधार प्रमाणीकरण करावे

विशेष सहाय्य योजनेंतर्गंत ज्या लाभार्थ्यांना डिसेंबर व जानेवारी महिन्याचे अनुदान प्राप्त झाले नाही, त्यांनी आधार प्रमाणीकरण पूर्ण करणे गरजेचे आहे. जे लाभार्थी आधार प्रमाणीकरण करणार नाहीत त्यांना यापुढे संजय गांधी व श्रावणबाळ योजनेचे अनुदान मिळणार नाही, त्यामुळे लाभार्थ्यांना आधार प्रमाणीकरण पूर्ण करुन घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

स्वयं अर्थसहाय्यिता नवीन शाळांना मान्यता व दर्जावाढीची शिफारस; हरकती मागविल्या