बाल संरक्षणासाठी ‘बाल कल्याण समिती बालकांच्या दारी मोहीम’ ! बालसंगोपन योजनेंतर्गत १३५ बालकांचे प्रकरण मंजूर

 

बाल संरक्षणासाठी ‘बाल कल्याण समिती बालकांच्या दारी मोहीम’ !

 

 बालसंगोपन योजनेंतर्गत १३५ बालकांचे प्रकरण मंजूर

 

बुलढाणा, जिमाका दि. ६:  राज्य शासनाच्या १०० दिवसांच्या कृती आराखड्यानुसार, महिला व बालविकास विभागाने बालसंगोपन योजनेअंतर्गत लाभार्थ्यांपर्यंत जलद गतीने पोहोचण्यासाठी 'बाल संरक्षणासाठी बाल कल्याण समिती बालकांच्या दारी' हा अभिनव उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमांतर्गत, जिल्ह्यातील पाच तालुक्यातील १३५ बालकांचे बालसंगोपन योजनेचे प्रकरण मंजूर करण्यात आले.

जिल्हा बाल कल्याण समिती, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी बुलढाणा यांच्या अंतर्गत संरक्षण अधिकारी जळगाव जामोद यांच्या संयुक्त विद्यमाने ०२ मे रोजी जळगाव जामोद येथील अभय केंद्र संरक्षण अधिकारी कार्यालयात ही विशेष मोहीम पार पडली.

या मोहिमेत जळगाव जामोद, संग्रामपूर, नांदुरा, खामगाव, आणि शेगाव या पाच तालुक्यातील एकूण १३५ बालकांना हजर करण्यात आले आणि त्यांच्या बालसंगोपन योजनेची प्रकरणे तात्काळ मंजूर करण्यात आली. यामुळे अनेक गरजू बालकांना शासनाच्या या महत्त्वाकांक्षी योजनेचा लाभ मिळाला आहे.

जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी अमोल डिघुळे यांच्या निरिक्षणात ही मोहीम यशस्वी झाली. या कृती आराखडा मोहिमेत बाल कल्याण समितीचे अध्यक्ष डॉ. मनोज डांगे, सदस्या जयश्री शिंदे, सदस्या अॅड. वर्षा पालकर तसेच महिला बालविकास विभागाचे संरक्षण अधिकारी तुषार राणे, संदीप मारकड, बाल संरक्षण कक्षाचे सपकाळ आणि महिला व बाल विकास विभागाचे कर्मचारी पेठणकर, चोपडे, सांगळे यांनी सक्रिय सहभाग घेतला, अशी माहिती जिल्हा महिला व बालविकास अधिकारी अमोल डिघुळे यांनी दिली.

०००

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

स्वयं अर्थसहाय्यिता नवीन शाळांना मान्यता व दर्जावाढीची शिफारस; हरकती मागविल्या