अवकाळी पावसाने झालेल्या शेत पिकाच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा - मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील

 

अवकाळी पावसाने झालेल्या शेत पिकाच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा

-         मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील

 

बुलडाणा, (जिमाका) दि. 22 :  राज्यात गत काही दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेत पिकांचे तातडीने पंचनामे करावेत, असे निर्देश मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी विभागीय आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.

 

श्री. जाधव-पाटील म्हणाले, नैसर्गिक आपत्तींमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांप्रती राज्य शासन संवेदनशील आहे. एप्रिल व मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी. यासाठी शेतीच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करावेत. पंचनामे करण्यासाठी महसूल व कृषी व विभागाने पथके गठीत करून ही कार्यवाही गतीने पूर्ण करावी, अशा सूचना मंत्री श्री. जाधव पाटील यांनी दिल्या आहेत.

 

अतिवृष्टी, पूर, अवेळी पाऊस, दुष्काळ, वादळी वारा व गारपीट या नैसर्गिक आपत्तींमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यास शासन नेहमीच प्राधान्य देत आहे. विविध नैसर्गिक आपत्तींमुळे बाधित झालेल्या शेती पीक नुकसानीपोटी सन २०२३- २०२४ या वर्षात ५४ लाख ८० हजार पात्र शेतकऱ्यांना ४ हजार ८३३ कोटी (चार हजार आठशे तेहसतीस कोटी) रूपये तर २०२४- २०२५ या आर्थिक वर्षात ६९ लाख ३ हजार शेतकऱ्यांना ६ हजार ९८९ कोटी (सहा हजार नऊशे एकोणनव्वद) आणि १ एप्रिल २०२५ ते २१ मे २०२५ या कालावधीत ९ लाख ७ हजार शेतकऱ्यांना ९७५ कोटी रुपयेची मदत देण्यात आली असल्याचे मदत व पुनर्वसन मंत्री श्री. जाधव-पाटील यांनी सांगितले.

०००००

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

स्वयं अर्थसहाय्यिता नवीन शाळांना मान्यता व दर्जावाढीची शिफारस; हरकती मागविल्या