वेव्हज २०२५
दि. २ मे २०२५
वृत्त क्रमांक : २६
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते
‘लोकराज्य'चा वेव्हज विशेषांक प्रकाशित
मुंबई, दि. २ : मुंबईत सुरू असलेल्या 'वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिट' अर्थात 'वेव्हज् २०२५' या जागतिक परिषदेच्या निमित्ताने ‘लोकराज्य’ आणि ‘महाराष्ट्र अहेड’च्या विशेषांकाचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.
जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये सुरू असलेल्या 'वेव्हज' परिषदेत आयोजित या प्रकाशन सोहळ्यास राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, उद्योग विभागाचे सचिव पी. अन्बलगन , एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. वेलारासू, सिडकोचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, विकास आयुक्त (उद्योग) दीपेंद्रसिंह कुशवाह, 'लोकराज्य' चे प्रबंध संपादक तथा संचालक (माहिती) हेमराज बागुल, संचालक (माहिती) तथा वेव्हजविषयक प्रसिद्धी मोहिमेचे समन्वयक किशोर गांगुर्डे, संचालक (वृत्त-जनसंपर्क) डॉ. गणेश मुळे, उपसंचालक (वृत्त) श्रीमती वर्षा आंधळे आदी उपस्थित होते.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव तथा महासंचालक आणि 'लोकराज्य'चे मुख्य संपादक ब्रिजेश सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकाशित झालेल्या या विशेषांकात 'वेव्हज'शी संबंधित विविध विषयांवर मान्यवरांचे महत्त्वपूर्ण लेख आहेत.
यासोबतच या अंकात सागरी किनाऱ्यांच्या सुरक्षेसाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजना, सिंहस्थ कुंभमेळा, अन्नसुरक्षा, जलसाक्षरतेतून जल व्यवस्थापन अशा विविध विषयांचा देखील मागोवा घेण्यात आला आहे.
-----०००----
संतोष तोडकर/विसंअ/
वृत्त क्रमांक : २५
Making India AI Ready
माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रात एआय तंत्रज्ञानामुळे क्रांती;
‘मेकिंग इंडिया एआय रेडी’ चर्चासत्रात तज्ज्ञांचे मत
मुंबई, दि. २ : ‘एआय’ तंत्रज्ञान हे जगभरात मोठ्या प्रमाणावर विकसित होत आहे. मनोरंजन क्षेत्रात या तंत्रज्ञान वापरामुळे मोठी क्रांती होत असल्याचे मत ‘मेकिंग इंडिया एआय रेडी’ चर्चासत्रात व्यक्त करण्यात आले.
वेव्हज परिषदेत वेव्हज एक्स संवादामध्ये गुगलच्या तंत्रज्ञांचे ‘एआय’ विषयी चर्चासत्र झाले.
‘एआय’ तंत्रज्ञानाने चित्रपट निर्मिती क्षेत्रात मोठे बदल घडून येत असल्याचे सांगून गुगलचे व्यवस्थापक म्हणाले की, या माध्यमातून चांगल्या प्रकारे कल्पना पडद्यावर मांडता येतात. ‘एआय’चा वापर करून एका फोटोपासून कल्पनातीत व्हिडिओ तयार केले जाऊ शकतात.
‘एआय’ तंत्रज्ञान, रिल्स आणि चित्रपटनिर्मिती याबाबत या चर्चासत्रात माहिती देण्यात आली. वेगवेगळ्या प्रकारे आपल्या कल्पना शब्दात मांडून व्हिडिओ तयार करता येतात याचे प्रात्यक्षिकही यावेळी सदर करण्यात आले. देशातील तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्या आणि व्यक्ती यांनी आता ‘एआय’ आत्मसात करून प्रगती साधण्याची गरजही व्यक्त करण्यात आली.
००००
हेमंतकुमार चव्हाण/विसंअ/
वृत्त क्रमांक : २४
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारत पॅव्हेलियनला भेट दिली
मुंबई, दि. १ : बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स येथील वर्ल्ड जिओ सेंटर येथे ‘ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिट’ वेव्हज - २०२५ जागतिक परिषदेनिमित्त उभारण्यात आलेल्या भारत पॅव्हेलियनला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिली.
भारत पॅव्हेलियनमध्ये हरियाणा, पंजाब, राजस्थान, मध्यप्रदेश, आंध्र प्रदेश, तेलंगणा,गोवा राज्यांचे पॅव्हेलियन उभारण्यात आले आहेत. याशिवाय करमणूक क्षेत्रातील नेटफ्लिक्स, जिओ, यू ट्यूब, मेटा,स्टार्टअप, विविध मनोरंजन आणि वृत्त वाहिन्या, चित्रपट निर्मिती संस्थाचे पॅव्हेलियन उभारण्यात आले आहेत .
सर्जनशीलता, सुसंवाद आणि सांस्कृतिक वारशाचे दर्शन आणि येणाऱ्या काळात या क्षेत्रात भारताची भविष्यातील कशी वाटचाल याचे दर्शन भारत पॅव्हेलियनला मध्ये पाहायला मिळत असल्याचे मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी सांगितले.
यावेळी श्री.फडणवीस यांनी विविध पॅव्हेलियनला भेट देऊन उपस्थित कंपन्यांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली.
0000
काशीबाई थोरात/विसंअ/
वृत्त क्रमांक : २३
‘एआय’ आणि मनोरंजन क्षेत्रात भारताला नेतृत्वाची संधी
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मनोरंजन क्षेत्रातील अत्याधुनिक ‘एआय’ तंत्रज्ञान शिक्षणासाठी
नवी मुंबई येथे एज्युकेशन सिटी उभारणार
मुंबई, दि. २ : जागतिक स्तरावर मनोरंजनक्षेत्रात ‘एआय’चा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. येत्या काळात नवी मुंबई येथे ‘एआय’ तंत्रज्ञानची शिक्षणनगरी उभारण्यात येणार आहे. त्यामुळे आता ‘एआय’ आणि मनोरंजन क्षेत्राचे जागतिक नेतृत्व करण्याची संधी भारताला मिळणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
वेव्हज परिषदेदरम्यान महाराष्ट्र पॅव्हेलियन येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, वेव्हज परिषदेसारख्या एका व्यासपीठाची जागतिक पातळीवर गरज होती. ही गरज ओळखून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पहिल्या वेव्हज परिषदेचे आयोजन केले आणि त्याचे यजमानपद महाराष्ट्राकडे दिले राज्यासाठी ही एक मोठी संधी आहे.
वेव्हज परिषदेच्या निमित्ताने महाराष्ट्र सरकारने काही अत्यंत महत्त्वाचे सामंजस्य करार (MoUs) केलेले आहेत. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा, एनएसईने (NSE) वेव्हज निर्देशांक सुरू केलेला आहे. ४३ कंपन्या, या दृकश्राव्य क्षेत्रातल्या आहेत, या कंपन्यांचा निर्देशांक सुरू झालेला आहे. त्यामुळे या क्षेत्रामध्ये गुंतवणूक करत आणि एकूणच फायनान्शियल इकोसिस्टीम तयार करण्याकरिता हे अत्यंत महत्त्वपूर्ण पाऊल उचललेले आहे. हा वेव्हज इंडेक्स म्हणजे वेव्हजच्या यशामधला एक मुकुटमणी असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
ऑस्ट्रेलिया आणि न्यूयॉर्क या दोन जागतिक विद्यापीठांसोबत आज सामंजस्य करार केल्याचे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंतर्गत, परदेशी विद्यापीठांना देशामध्ये त्यांचे केंद्र उघडण्याची परवानगी मिळाली असून नवी मुंबई इथे सिडकोच्या पुढाकाराने एज्युसिटी उभारण्यात येणार आहे. या एज्युसिटीमध्ये जागतिक दर्जाची 10 ते 12 विद्यापीठे आपले कॅम्पस सुरू करणार आहेत. त्यातील दोन विद्यापीठांशी सामंजस्य करार करण्यात आला. सुरुवातीला दीड हजार कोटींची गुंतवणूक होणार आहे. पण भविष्यात ही गुंतवणूक वाढत जाणार आहे. आणखी तीन महत्त्वाच्या विद्यापीठांशी चर्चा सुरू आहे. देशातले जागतिक विद्यापीठ एकत्र असलेले पहिले कॅम्पस नवी मुंबईमध्ये सुरू होत आहे.
यासोबत प्राइम फोकससोबत (Prime Focus) सामंजस्य करार करण्यात आला आहे, ज्याच्यामध्ये प्राइम फोकस एक फिल्मसिटी या ठिकाणी तयार करणार आहे, ज्यामध्ये जवळपास 3 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असून किमान 10 हजार लोकांना रोजगार मिळेल. ‘एआय’ (AI) पॉवर आणि जगातली उत्तम तंत्रज्ञानही त्या ठिकाणी असणार आहे.
पनवेल येथे चित्रपट सृष्टी उभारण्यासाठी गोदरेज सोबतही दोन हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीबाबत सामंजस्य करार करण्यात आला आहे. एकूण 8000 कोटी रुपयांचे सामंजस्य करार करण्यात आले असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
फिल्मसिटी म्हणजे तंत्रज्ञान
फिल्मसिटी म्हणजे लोकेशन नाही, आता फिल्मसिटी म्हणजे टेक्नॉलॉजी असल्याचे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, सर्व तंत्रज्ञानाने परिपूर्ण चित्रपट सृष्टी असेल. तेथे चित्रपट निर्मिती क्षेत्रातील सगळ्या गोष्टींसाठी परिसंस्था असतील. आतापर्यंत आपले लोक तिथे वेस्टर्न ऑस्ट्रेलियाच्या विद्यापीठामध्ये प्रवेश घेण्याकरिता प्रयत्न करायचे, मात्र जे लोकं जाऊ शकत नाहीत, त्यांना तेच शिक्षण या ठिकाणी मिळणार आहे. आज वेगाने विकसित होणारी अर्थव्यवस्था जर कुठली असेल, तर ती दृकश्राव्य माध्यमाची अर्थव्यवस्था आहे. सर्वात जास्त रोजगाराची संधी यात असून, या क्षेत्रात भारताला नेतृत्व करण्याची संधी आहे. कारण कंटेंट क्रिएटर्स, कंटेंट वापर, आपल्याकडे सगळ्यात जास्त आहेत. या क्षेत्रात नेतृत्व करणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. वेव्हजमुळे, हे शक्य झाले आहे आणि मुंबई, ही दृकश्राव्य माध्यमाची जणू राजधानीच या संमेलनामुळे झालेली असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
००००
हेमंतकुमार चव्हाण/विसंअ/
वृत्त क्रमांक : २२
वेव्हज २०२५ मध्ये माध्यम आणि मनोरंजनासह
साहस, समानतेचा उत्सव
मुंबई, दि. २ : कथानकांमध्ये बदल घडवण्यासाठी आणि लोकांना एकत्र आणण्यासाठी एक व्यासपीठ वेव्हज २०२५ ने उपलब्ध करून दिले आहे. चित्रपटसृष्टीत नवीन संधी निर्माण करण्यासाठी महिलांनी एकत्र येणे महत्वाचे आहे. धैर्याने पुढे येण्यासाठी, एकमेकांना पाठिंबा देण्यासाठी आणि परिवर्तनाच्या बाजूने उभे राहण्यासाठी चळवळ उभी करण्याचे आवाहन इस्त्राइलच्या अभिनेत्री रोना ली शिमोन यांनी केले. या चळवळीत समाजमाध्यमांची भूमिका महत्त्वाची आहे, कारण हे माध्यम महिलांना त्यांचा आवाज आणि कथा सामायिक करण्याची ताकद देतो, असेही त्यांनी सांगितले.
बीकेसी मुंबई येथे वेव्हज २०२५ जागतिक शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये "प्रतिकूल परिस्थितींना धैर्याने सामोरे जात , एका कथेची नवीन पटकथा लिहिणे " या विषयावरील चर्चासत्रात सुप्रसिद्ध इस्रायली अभिनेत्री रोना-ली शिमोन, इटालियन मॉडेल आणि कर्करोगातून बरी झालेली बियांका बाल्टी, माजी जर्मन फुटबॉलपटू आणि विश्वविजेती एरिअन हिंगस्ट यांनी सहभाग घेतला.
रोना-ली शिमोन यांनी सांगितले की, चित्रपटसृष्टीत नवीन संधी निर्माण करण्यासाठी महिलांनी एकत्र यावे, धैर्याने व एकमेकांना पाठिंबा देण्यासाठी आणि परिवर्तनाच्या बाजूने न घाबरता उभे राहण्याचे आवाहन त्यांनी केले. इथल्या प्रत्येक वक्त्याने वैयक्तिक किंवा व्यावसायिक अडचणींचा सामना केला आहे आणि त्यांचा आयुष्य़ावर परिणाम होऊ देण्याऐवजी त्यांनी त्या क्षणांचा उपयोग स्वतःची कथा नव्याने लिहिण्यासाठी केला आहे. वेव्हज २०२५ याच गोष्टीचे प्रतीक आहे. अशा व्यक्ती जे केवळ आव्हानांना सामोरे जात नाही, तर त्यांना परिवर्तन आणि प्रेरणेसाठी व्यासपीठात रूपांतरित करतात.
एरिअन हिंगस्ट हिने पुरुषप्रधान खेळात व्यावसायिक फुटबॉलपटू म्हणून आपला प्रवास सांगितला. लिंगभेदावर मात करून जगज्जेता बनण्याबाबत आणि आता खेळांमध्ये निष्पक्षता आणि समानतेला प्रोत्साहन देण्यासाठी ती करत असलेल्या प्रयत्नांबद्दल तिने माहिती दिली. पुरुषांच्या तुलनेत महिला फुटबॉलला प्रसारमाध्यमांकडून मिळणारी कमी प्रसिध्दी आणि योग्य व्यासपीठांचा अभाव असल्याची बाब तिने अधोरेखित केली आणि महिला खेळाडूंना समान संधी आणि ओळख मिळण्याची गरज असल्याचे सांगितले.
मॉडेल आणि कर्करोगातून बरी झालेली बियांका बाल्टी हिने बरे झाल्यानंतर कामावर परतण्याची तिची यशकथा सांगितली. मॉडेलिंग उद्योगात महिला आणि पुरुषांच्या वेतनातील तफावत, महिला मॉडेल्सना त्यांच्या पुरुष सहकाऱ्यांपेक्षा मिळणारे कमी पैसे, यामुळे माध्यमांत अजूनही पुरूषप्रधान संस्कृती असल्याचे तिने स्पष्ट केले. समाजमाध्यमांमध्ये बदल घडवून आणण्याची ताकद असल्याचे तिने सांगितले.
000
सागरकुमार कांबळे/ससं/
वृत्त क्रमांक : २१
वेव्हज २०२५ : कृत्रिम बुद्धिमत्ता आणि सर्जनशीलतेचा मेळ
विविध साधने पुरविणारे ‘एआय’ सर्जनशीलतेची जागा घेणार नाही
मुंबई, दि. २ : ५०० दशलक्षाहून अधिक भारतीय ऑनलाइन आशय वापरत आहेत आणि प्रादेशिक भाषांकडे मोठ्या प्रमाणात वळत आहेत. सर्जनशीलता आणि उत्पादन सशक्त करणे, व्यवसाय मॉडेल्समध्ये नावीन्य आणणे, एआय-कुशल कार्यबलाचे नेतृत्व करणे आणि उद्योजकता वाढवणे यामध्ये भारत आघाडीवर आहे. इंटरनेटपासून मोबाइल आणि आता कृत्रिम बुद्धिमत्तेपर्यंतच्या डिजिटल प्रवासात भारताची भूमिका महत्वाची असल्याचे अॅडोबचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी शंतनू नारायण यांनी सांगितले.
बीकेसी येथे सुरू असलेल्या वेव्हज २०२५ मध्ये शिखर परिषदेच्या उद्घाटनाच्या दिवशी जागतिक उद्योग क्षेत्रातील मान्यवरांच्या नेतृत्वाखाली झालेल्या तीन सत्रांमध्ये माध्यम, कथाकथन आणि डिजिटल उत्पादनात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या गतिमान प्रवेशाचा वेध घेण्यात आला.
वेव्हज २०२५ : ‘एआय’च्या नेतृत्वाखाली सर्जनशील परिवर्तनासाठी भक्कम पाया
सत्रांमधील चर्चेदरम्यान, एआय हे सक्षमीकरणाचे साधन आहे. ते कोणाची जागा घेणार नाही, असा एकंदर सूर उमटला. डिझाइन, चित्रपट, अॅनिमेशन किंवा कथाकथन असो, जे मूलभूत गोष्टी समजून घेतील, नवीन साधनांचा जबाबदारीने वापर करतील आणि नीतिमत्ता, सर्जनशीलता आणि सर्वसमावेशकतेवर आधारित प्रणाली तयार करतील अशांचे भविष्य निश्चितच उज्ज्वल असेल. जागतिक स्तरावर सर्जनशील आणि तंत्रज्ञानाधारित परिसंस्थेमध्ये भारताच्या महत्त्वपूर्ण भूमिकेचा सबळ पुरावा म्हणजे वेव्हज २०२५ आहे.
"कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात संरचना, माध्यम आणि सर्जनशीलता" या विषयावर अॅडोबचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी शंतनू नारायण विकसित होत असलेल्या सर्जनशील अर्थव्यवस्थेवर विस्तृत दृष्टिकोन मांडताना बोलत होते. ‘एआय’ संचालित चौकट तयार करण्यात भारताचे अद्वितीय स्थान अधोरेखित करताना अनुप्रयोगांपासून डेटा पायाभूत सुविधांपर्यंत श्री. नारायण यांनी चार-स्तरीय धोरणाची रूपरेषा मांडली.
एनव्हीडीओ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक विशाल म्हणाले की, "पीसी कार्यालयीन वेळेनंतर निद्रिस्त व्हायचे पण मानवाचे तसे नाही." एनव्हीआयडीआचा सुरुवातीचा दृष्टिकोन पीसींना सर्जनशील साथीदार म्हणून कल्पना करणे हा आहे. आता कृत्रिम प्रज्ञा समर्थित जगात याचा प्रतिध्वनी कसा उमटतो, याबाबत त्यांनी त्यांचे विचार स्पष्ट केले.
एनव्हीआयडीआचे उपाध्यक्ष रिचर्ड केरिस यांनी, जनरेटिव्ह एआय सह, आपण संकल्पनेपासून निर्मितीकडे खूप वेगाने प्रगती करू शकतो. असे सांगताना त्यांनी मूलभूत गोष्टींशी संपर्क गमावण्याविरोधात सजग केले. आपल्या सर्वांच्या फोनवर कॅमेरा असल्याने आपण सर्वजण उत्तम छायाचित्रकार बनत नाही. एआय तुमच्या हातात विविध साधने देते. परंतु कला, मूलभूत गोष्टी जाणून घेणे आजही तितकेच आवश्यक आहे. सर्जनशील लोक त्यांचे काम अक्षरशः जगतात. कृत्रिम बुद्धिमत्ता त्याची जागा घेत नाही तर ते लोकांना अधिक सक्षम करत असल्याचे त्यांनी सांगितले.
तिसऱ्या सत्रात, एनव्हीडीआचे सोल्युशन्स आर्किटेक्ट अनिश मुखर्जी यांनी "जनरेटिव्ह एआय सह गोष्टी सत्यात आणणे" हे सत्र हार्डवेअरच्या पलीकडे जाऊन परिवर्तनात्मक साधनांकडे वळण्याच्या एनव्हीडीआच्या दृष्टिकोनावर प्रकाश टाकते असे त्यांनी सांगितले. मुखर्जी यांनी एआय-द्वारे सक्षम उपायांचे प्रात्यक्षिक सादर केले, ज्यामध्ये स्थिर प्रतिमा डिजिटल मानवांमध्ये रूपांतरित करणे, बहुभाषिक व्हॉइस-ओव्हर आणि ऑडिओवर आधारित कॅरेक्टर अॅनिमेशन यांचा समावेश होता. एनव्हीआयडीआयएच्या फुगाटो मॉडेलचा वापर करून, त्यांनी एआयद्वारे जनरेट केलेले संगीत आणि डबिंगसाठी वास्तववादी लिप-सिंकिंग दाखवले. त्यांनी ओम्निव्हर्स प्लॅटफॉर्मद्वारे व्हिडिओ जनरेशन आणि सिम्युलेशनवर आधारित प्रशिक्षणासाठी मूलभूत मॉडेल्सचा संच 'कॉसमॉस' देखील सादर केला.
०००
सागरकुमार कांबळे/ससं/
वृत्त क्रमांक : २०
माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रासाठी शासनाचा ऐतिहासिक पुढाकार
– अभिनेते अमीर खान
मुंबई, दि. 2 : राज्य शासनाने माध्यम आणि मनोरंजन क्षेत्राच्या विकासासाठी पुढाकार घेतला आहे. या क्षेत्रासाठी सकारात्मक विचार होत असून भारत या क्षेत्रामध्ये उत्तुंग आघाडी घेईल, असा विश्वास अभिनेते अमीर खान यांनी व्यक्त केला.
जिओ वर्ल्ड सेंटर येथील जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन शिखर परिषद, 2025 मधील 'भविष्यातील स्टुडिओ : भारताला जागतिक स्टुडिओ नकाशावर नेण्यासाठी पुढाकार' या विषयावर आयोजित चर्चासत्रात ते बोलत होते, या चर्चासत्रात पीव्हीआर आणि इनॉक्सचे संस्थापक अजय बिजिली, अमेरिकन चित्रपट निर्माते चार्ल्स रोव्हेन, चित्रपट निर्माते दिनेश विजन, प्राइम फोकस लिमिटेडचे संस्थापक नमित मल्होत्रा, आणि चित्रपट निर्माते रितेश सिधवानी सहभागी झाले होते. यावेळी चित्रपट समीक्षक मयंक शेखर यांनी सूत्रसंचालन केले.
अभिनेते अमीर खान म्हणाले, मीडिया आणि मनोरंजन क्षेत्रात आघाडी घेण्यासाठी शासन या दिशेने ठोस पावले उचलत आहे. शासन आणि मनोरंजन क्षेत्र यांच्यात पहिल्यांदाच अशा पद्धतीने संवाद सुरु झाला आहे आणि ही सुरुवात निश्चित आशादायक आहे. संवादातून या क्षेत्रासाठी दूरगामी परिणाम करणारी धोरणं निश्चित तयार होऊ शकतील.
भारतातील कंटेंट क्रिएशन आणि मनोरंजन व्यवसायाची जागतिक स्तरावर दमदार छाप
- चित्रपट निर्माते चार्ल्स रोव्हेन
भारतामध्ये कंटेंट क्रिएशन, मनोरंजन व्यवसाय आणि स्ट्रीमिंग किंवा लीजिंगसारख्या विविध माध्यमांचा अनुभव घेताना जाणवते की, हा उद्योग पूर्णपणे वेगळ्या मॉडेलवर चालतो. जागतिक पातळीवर काम पाहत असताना आणि येथील काम देशांतर्गत केंद्रित आहे, त्यामुळे दृष्टिकोनही वेगळा आहे, असे मत अमेरिकन चित्रपट निर्माते चार्ल्स रोव्हेन यांनी व्यक्त केले.
श्री. रोव्हेन म्हणाले, मी चित्रपट किंवा कंटेंट तयार करताना आधीच ठरवतो की, ते स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर की, चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. पण येथे आधी कंटेंट तयार होतो आणि मग त्याचे प्रदर्शन करण्याचा मार्ग ठरवला जातो. या ठिकाणी कधी स्वतः तर कधी इतरांकडून गुंतवणूक केली जाते, ही पद्धत वेगळी आहे आणि ती खूपच छान आहे.
वेव्हज कार्यक्रमाचं सर्वात चांगलं वैशिष्ट्य म्हणजे भारत आता जागतिक स्तरावर या क्षेत्रात आपले लक्ष केंद्रीत करत आहे. खरं तर, भारताला जगाकडे पाहण्याची गरज नाही, कारण आता जगच तुमचा कंटेंट शोधून येऊ लागले आहे, असंही त्यांनी नमूद केले.
भारतीय चित्रपटांच्या जागतिक वितरणासाठी भाषा आणि सुस्पष्ट संवाद महत्त्वाचा
– चित्रपट निर्माते रितेश सिधवानी
मार्केटमध्ये पुन्हा एकदा भावना जागृत होत आहेत. पूर्वी 80 च्या दशकात, स्थानिक वितरण सर्वात मोठे मानले जात होते आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठ ही फक्त त्याचा एक भाग असायची. पण आजच्या घडीला, भाषेच्या विविधतेमुळे आणि विविध प्रेक्षकसमूहांच्या गरजांमुळे, वितरणाचे स्वरूप पूर्णपणे बदलले आहे, असे चित्रपट निर्माते रितेश सिधवानी यांनी सांगितले.
श्री. सिधवानी म्हणाले की, आज एकाच चित्रपटासाठी वेगवेगळ्या मार्केटसाठी वेगळे ट्रेलर्स तयार केले जातात. यूकेसाठीचा ट्रेलर अमेरिकेसाठीच्या ट्रेलरपेक्षा वेगळा असतो. युरोपियन मार्केटसाठी एक ट्रेलर असतो आणि उत्तर अमेरिकेसाठी दुसरा ट्रेलर असतो. त्यामुळे भाषांतर नक्कीच मदत करते, पण त्या माहितीचा योग्य प्रकारे संवाद आणि वितरण कसे होईल, हे अधिक महत्त्वाचे आहे.
पश्चिमेकडील देशातील प्रेक्षक फ्रेंच, इटालियन, स्पॅनिश चित्रपट सहज स्वीकारतात. ते त्यांची भाषा समजतात आणि त्या चित्रपटांकडे उत्सुकतेने पाहतात. ते आता भारतीय चित्रपटांची ओळख करून घेत आहेत. योग्य वितरण व्यवस्था आणि सादरीकरण त्यांच्यापर्यंत पोहोचणे अपेक्षित असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
तंत्रज्ञानाच्या सहाय्याने भारतीय कथा जागतिक प्रेक्षकांसाठी स्थानिक वाटू शकतात
- फोकस लिमिटेडचे संस्थापक नमित मल्होत्रा
योग्य प्रतिभा, तंत्रज्ञान आणि भविष्यातील दिशादर्शक दृष्टिकोन यांच्या योग्य संमिश्रणातून जगभरातील प्रेक्षकांना आपली गोष्ट स्थानिक वाटते. आज तंत्रज्ञानाच्या मदतीने आपण चित्रपट विविध भाषांमध्ये केवळ भाषांतरित नाही, तर त्या भाषेत 'लिपसिंक'सह प्रदर्शित करू शकतो, ज्यामुळे उपशीर्षकांची किंवा व्हॉइसओव्हरची गरज उरत नाही, असे मत प्राइम फोकस लिमिटेडचे संस्थापक नमित मल्होत्रा यांनी व्यक्त केले.
श्री.मल्होत्रा म्हणाले, भारतीय चित्रपट इंग्रजी, स्पॅनिश, जपानी अशा विविध भाषांमध्ये तयार करता येईल आणि हे तंत्रज्ञानामुळे शक्य झाले आहे. त्याच वेळी, आपली कथा, तिचे पात्र आणि त्यांचा आत्मा जपून ठेवते, आपण ती जागतिक स्तरावर पोहोचवू शकतो. कारण अनेक वेळा भाषा ही सर्वात मोठी अडचण ठरते. चांगला कंटेंट ही अडचण पार करू शकतो, पण व्यापक प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठी भाषेची अडचण दूर करणे आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
0000
वृत्त क्रमांक : १९
ऑस्करमध्ये भारताचे प्रतिनिधित्व व्यापक करण्याची गरज
‘इंडियाज रिच टू ऑस्कर्स’ या विषयावरील चर्चासत्रात तज्ज्ञांचे मत
मुंबई दि. 2 :- भारतात सध्याच्या घडीला ३५ हून अधिक भाषांमध्ये चित्रपट निर्मिती होत असून ऑस्करमध्ये एकाच प्रवेशिकेने संपूर्ण भारताचे प्रतिनिधित्व करणे कठीण आहे. ऑस्करमध्ये चित्रपट पाठविण्याच्या नियमांमुळे केवळ एकाच चित्रपटाची ऑस्करसाठी निवड होत असल्याने प्रादेशिक चित्रपट या संधीपासून वंचित राहतात. यासाठी ऑस्करमध्ये भारताचं प्रतिनिधित्व अधिक व्यापक करण्याची गरज असल्याचे मत या चर्चासत्रात मान्यवर तज्ज्ञांनी व्यक्त केले.
मुंबईच्या वांद्रे-कुर्ला संकुलातील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये वेव्हज-२०२५ समिटमध्ये आजच्या दुसऱ्या दिवशी इंडियाज रिच टू ऑस्कर्स या विषयावरील आयोजित चर्चा सत्रात चालवे गौडा, ए. श्रीकर प्रसाद, उज्वल निरगुडकर या मान्यवरांनी सहभाग घेतला.
या चर्चासत्रात चालवे गौडा म्हणाले, भारतात ३५ हून अधिक भाषांमध्ये चित्रपट तयार होतात. त्यामुळे फक्त एकाच प्रवेशिकेने भारताचं प्रतिनिधित्व करणे अवघड आहे. शिवाय, ऑस्करसाठी प्रचार मोहिमांचा खर्चही मोठा अडथळा ठरतो. प्राथमिक मोहिमेसाठी ३० ते ४० लाख रुपये, तर आरआरआर चित्रपटाच्या मोठ्या मोहिमेसाठी ५ ते ८ कोटी रुपये लागतात. तसेच चित्रपट निर्मात्यांना पात्रता निकषांची माहिती नसल्यामुळेही अनेक दर्जेदार चित्रपट स्पर्धेत सहभागी होऊ शकत नाहीत. कांतारासारख्या चित्रपटाच्या बाबतीत ही बाब स्पष्ट झाली होती. त्यामुळे राज्य शासनाने अशा चित्रपटाच्या स्पर्धांसाठी कार्यशाळा आयोजित करून माहिती प्रसारित करणे गरजेचे आहे.
या चर्चासत्रात ए. श्रीकर प्रसाद यांनी ऑस्कर नामांकन प्रक्रियेबाबत महत्त्वाचे मुद्दे मांडले. ते म्हणाले, लहान निर्मात्यांसाठी केवळ सरकारमार्फत अधिकृत प्रवेशिकाच एकमेव पर्याय आहे. त्यांना स्वतंत्रपणे पात्रतेचे निकष पूर्ण करणे आणि प्रचार व प्रचार खर्च उचलणे अशक्य असते. आज अनेक दर्जेदार आशय असलेले चित्रपट केवळ निधीअभावी मागे पडतात. त्यामुळे सरकारने किंवा इतर संस्थांनी प्रचारासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून दिल्यास निर्मात्यांना प्रसिद्धी तज्ज्ञांशी थेट संपर्क साधता येईल. पात्रता निकषांची पूर्तता करणाऱ्या चित्रपटांना सर्वोच्च प्राधान्य द्यायला हवे.
जागतिक प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी आशयाचे स्वरूपही महत्त्वाचे असल्याचे नमूद करून श्री. प्रसाद म्हणाले सामाजिक भावना, मानवी मूल्ये आणि सार्वत्रिक भावनांवर आधारित कथा अधिक प्रभावी ठरतात. गेल्या काही वर्षांत चित्रपटांच्या प्रेक्षकवर्गात आणि व्याप्तीत मोठा बदल झाला असल्याचेही ते म्हणाले.
ऑस्कर परीक्षक आणि चित्रपट तज्ज्ञ उज्वल निरगुडकर यांनी सांगितले की, भारतातील निर्माते आणि संस्थांनी ऑस्करमध्ये केवळ "बेस्ट इंटरनॅशनल फिल्म" श्रेणीतच नव्हे, तर लाईव्ह अॅक्शन शॉर्ट फिल्म, डॉक्युमेंटरी शॉर्ट फिल्म, ऍनिमेशन फिल्म, आणि स्टुडंट फिल्म या चार महत्त्वाच्या श्रेणींमध्येही चित्रपट पाठवण्यावर भर द्यावा. विशेषतः स्टुडंट फिल्म श्रेणीसाठी ऑस्कर अकॅडमीदरम्यान दरवर्षी स्वतंत्र स्पर्धा आयोजित केली जाते, ज्यात विजेते चित्रपट मुख्य ऑस्कर स्पर्धेसाठी पात्र ठरतात.
श्री. निरगुडकर म्हणाले, ऑस्कर अकॅडमीद्वारे आयोजित "Nicholl Script writing Competition" आणि "Gold Mentorship Program" यासारख्या संधी भारतीय नवोदित लेखक आणि विद्यार्थ्यांसाठी मौल्यवान ठरतील. चित्रपटातील उपशीर्षक अमेरिकन इंग्रजीत असणे आवश्यक आहे. ऑस्करचे ९० टक्के परीक्षक लॉस एंजेलिसमधील असून त्यांची भाषिक समज वेगळी असते. ते म्हणाले गाण्यांचे उपशीर्षक सरळ भाषांतर न करता त्यामागचा अर्थ थोडक्यात मांडावा. ऑस्करसाठी चित्रपटाची भाषा नव्हे तर आशय, दर्जा, आणि सादरीकरण महत्त्वाचे असल्याचे ते म्हणाले.
0000
एकनाथ पोवार/विसंअ/
वृत्त क्रमांक : १८
पारंपरिक माध्यमे व डिजिटल प्लॅटफॉर्ममुळे
माध्यम विश्वात क्रांतिकारी बदल
- गॅझप्रोम मीडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी
मुंबई, दि. २ : पारंपरिक प्रसारमाध्यमे आणि डिजिटल प्लॅटफॉर्म्स यांच्या एकत्रीकरणामुळे माध्यम जगतात क्रांतिकारक बदल घडून येत असून यामुळे सशक्त ‘माध्यम इकोसिस्टम’ तयार होत आहे, असे प्रतिपादन गॅझप्रोम मीडिया होल्डिंगचे मुख्य कार्यकारी अधिकारी अलेक्झांडर झारोव्ह यांनी केले.
वर्ल्ड जिओ सेंटरमध्ये सुरू असलेल्या भारताच्या पहिल्या जागतिक ऑडिओ-व्हिज्युअल आणि मनोरंजन (WEAVES) शिखर परिषदेच्या दुसऱ्या दिवशी ‘माध्यम सामग्रीच्या एकत्रित शक्ती’ या विषयावर आयोजित विशेष सत्रात ते बोलत होते.
श्री. झारोव्ह म्हणाले, भारत-रशिया सहनिर्मितीचा ‘द लिट्ल किंग ऑफ माय हार्ट’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार असून, त्याचे चित्रीकरण मुंबई आणि जोधपूर येथील ऐतिहासिक स्थळांवर करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात भारतीय कलाकारांनी रशियन कलाकारांसोबत एकत्रित काम केले आहे. यामध्ये भारतीय सिनेमातील भावनात्मक शैली आणि रशियन विनोद यांचा सुरेख संगम या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. भारत आणि रशिया या दोन्ही प्राचीन आणि समृद्ध सांस्कृतिक परंपरांचा वारसा लाभलेले देश आहेत. या चित्रपटाच्या निर्मितीत दोन्ही देशांमधील कलावंत एकमेकांच्या संस्कृती समजून घेऊन काम करत होते,असेही झारोव्ह यांनी यावेळी नमूद केले.
तसेच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही या उपक्रमाचे कौतुक केले आहे, असेही यावेळी त्यांनी सांगितले. चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी सोशल मीडियावरील ब्लॉगर आणि कंटेंट क्रिएटर्सनी मोलाची भूमिका बजावली आहे. या माध्यमातून दोन्ही देशांमधील मैत्री आणि सांस्कृतिक संबध अधिक दृढ होणार असल्याचा विश्वास श्री.झारोव्ह यांनी यावेळी व्यक्त केला.
0000
वृत्त क्रमांक : १७
मानवी भावना, सुंदर अभिनय अन चांगले कथानक,
असलेले चित्रपट प्रेक्षकांना भावतात
पॅन इंडियन सिनेमा या विषयावरील चर्चासत्राने दुसऱ्या दिवसाच्या सत्राचा प्रारंभ
मुंबई, दि. २ : देशात विविध भाषा, जाती, धर्माचे नागरिक राहतात. भाषा कुठलीही असो, चित्रपटात जर मानवी भाव-भावना, सहज सुंदर अभिनय आणि भारतीय संस्कृतीचे दर्शन घडले तर तो प्रेक्षकांच्या हृदयाला भिडतो. भाषा, प्रेक्षक कोणतेही असले तरी तो भारतीय सिनेमा असतो हे महत्वाचे असल्याचे मत दाक्षिणात्य अभिनेते, अभिनेत्री यांनी व्यक्त केले.
बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स येथील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये आयोजित जागतिक दृकश्राव्य मनोरंजन परिषदेमध्ये आयोजित 'पॅन इंडियन सिनेमा माइथ ऑर मोमेंटम' या विषयावर चर्चासत्र झाले. चर्चासत्रात ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर, दाक्षिणात्य अभिनेते नागार्जुन, कारथी, अभिनेत्री खुशबू सुंदर यांनी सहभाग घेतला तर त्यांना नमन रामचंद्रन यांनी बोलते केले.
काही वेळा फक्त हिंदी कलाकार घेऊन किंवा सिनेमा डब करून तो पॅन-इंडिया ठरत नाही. कथेला सर्व भारतीय प्रेक्षकांनी समजून घ्यायला हवे, असाही सूर चर्चासत्रात उमटला.
श्रीमती खुशबू म्हणाल्या, आजच्या काळात प्रेक्षकांना भावणारी कथा वेगळी नसते तर तिची मांडणी वेगळी असते, साऊथ आणि हिंदी सिनेमात जास्त फरक नाही. विविध कलाकार साऊथमधून आले आणि हिंदी सिनेमात स्थिरच नाहीतर नावही कमावले. प्रादेशिक भाषेतील सिनेमाला वेगळे समजू नये, तोही भारतीय सिनेमा आहे.
नागार्जुन म्हणाले की, चित्रपटाची भाषा महत्वाची नसते, तर त्यामध्ये भारतीय संस्कृती आणि मानवी भावना यांचा स्पर्श असेल तर तो सिनेमा अधिक लोकप्रिय होतो. तो सिनेमा बॉलिवूड असो की टॉलिवूड फरक पडत नाही. विविध प्रादेशिक भाषेतील सिनेमांचे हिंदीमध्ये डबिंग झाले आहे, होत आहेत.
कारथी म्हणाले की, प्रामाणिकपणा हा कोणताही सिनेमा असो थोडा रंगवलेला असला तरी प्रेक्षकांपर्यंत पोहोचतो. म्हणूनच प्रत्येक दिग्दर्शक यशस्वी होतोच असं नाही. पहिला चित्रपट प्रामाणिक असतो, त्यातला अभिनय स्वतःच्या अनुभवांवर आधारित असतो. त्यानंतर कलाकार त्याच भावनेची नक्कल करत राहतो आणि तेव्हा ते खोटं वाटायला लागतं.
अनुपम खेर म्हणाले की, आता कलाकार, दिग्दर्शक आणि तंत्रज्ञ विविध भाषांमध्ये सहज काम करत आहेत. यामुळे प्रादेशिक भिंती कमी होत आहेत. मी तेलगू, तमिळमध्ये काम केले
Comments
Post a Comment