वेव्हज 2025 दि. 4 मे, 2025

दि. 4 मे, 2025 वृत्त क्रमांक : ७६ समाजमाध्यमांतील ‘इन्फ्लुएंसर’ने स्वतः ची खरी ओळख जपणे गरजेचे मुंबई दि. ४ : समाजमाध्यमांतील इनफ्लुएसंर्सने स्वतः ची खरी ओळख जपणे गरजेचे असल्याचे मत ‘बेस्ट प्रॅक्टिसेस फॉर सोशल मीडिया ॲडव्हर्टायझिंग फॉर इन्फ्लुएंसर’ या परिसंवादात व्यक्त करण्यात आले. बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स येथील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये आयोजित वेव्हज २०२५ दृकश्राव्य आणि मनोरंजन समिटमध्ये या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले. यामध्ये सहभागी सहेली सिन्हा म्हणाल्या, इन्फ्लुएंसरने जबाबदारीने विविध ब्रँडसोबतची भागीदारी केली पाहिजे. ब्रँडसोबत केलेली भागीदारी ही केवळ जाहिरात करणे एवढेच नसून ती एक मोठी जबाबदारी आहे. कारण ग्राहक प्रभावी व्यक्तींवर विश्वास ठेवून त्यांनी जाहिरात केलेल्या गोष्टी विकत घेत असतात. त्यामुळे इन्फ्लुएंसरने स्वतः त्या गोष्टीची माहिती, अनुभव घेऊन मगच त्याबाबत इतरांना सांगण्याची पारदर्शकता जोपासणे आवश्यक आहे. जाहिरात करताना नेहमी अटी व शर्ती आणि त्या-त्या समाज माध्यमांचा वापर करण्यासाठीच्या सूचना, नियमावली पाळण्यास प्राधान्य दिले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. शिबानी अख्तर यांनी समाजमाध्यमांतील इन्फ्लुएंसरने प्रामाणिकपणास महत्त्व द्यावे. प्रामाणिक कंटेंट दीर्घकाळ टिकतो आणि विश्वास निर्माण करतो. आरोग्यासारख्या संवेदनशील विषयांवर ब्रँडिंग करताना विशेष सतर्कता बाळगली पाहिजे, असेही यावेळी सांगितले. विनय पिल्लई म्हणाले, कोणत्याही माध्यमातून व्यक्त होताना त्या प्लॅटफॉर्मची कार्यपद्धती नीट समजून घेऊन त्या चौकटीत आपले सादरीकरण करावे. कारण प्रत्येक सोशल मिडिया प्लॅटफॉर्मचा उपयोग वेगळ्या कारणासाठी केला जातो. हे लक्षात घेऊन आपल्याकडील वैशिष्ट्यांची ओळख करून त्यानुसारच कंटेंट बनवावा. स्वतःची विशिष्ट ओळख विकसित करावी. सोशल मिडिया प्रभावी असले तरी दूरचित्रवाणी आजही प्रभावी माध्यम असल्याचे त्यांनी सांगितले. मयंक शेखर यांनी विश्वास व विश्‍वासार्हता निर्माण करण्याची गरज असून सातत्याने अधिकृत माहिती मांडणे म्हणजे विश्‍वासार्हतेची गुरुकिल्ली असल्याचे सांगितले. प्रभावी व्यक्तींनी केवळ ट्रेंड फॉलो न करता, योग्य आवश्यक बाबी मांडल्या पाहिजेत, असेही त्यांनी सांगितले. तनू बॅनर्जीं यांनी माध्यमे सतत बदलत आहेत, त्यामुळे इन्फ्लुएंसरनेही आपल्या कार्यपद्धती बदलायला हवी. ग्राहकांना शिक्षित करणे व सजग ठेवणे देखील प्रभावी व्यक्तींची जबाबदारी आहे, असे सांगितले. 0000 वंदना थोरात/विसंअ/ वृत्त क्रमांक : ७५ सिनेमाच्या प्रभावी मांडणीत दिग्दर्शकाची जबाबदारी महत्वाची - रिची मेहता ‘बिहाइंड द फ्रेम : मास्टरिंग द आर्ट ऑफ द सिनेमा’ चर्चासत्र मुंबई, दि. ४ : सिनेमामध्ये एखाद्या विषयावर मांडणी करताना दिग्दर्शकाचा दृष्टीकोन जसा आहे त्याच पद्धतीच्या फ्रेममधून दिग्दर्शक सिनेम प्रेक्षकापर्यंत नेतो. आपल्या सिनेमातून नेमका काय संदेश प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायचा आहे याची जबाबदारी दिग्दर्शक म्हणून खूप महत्वाची असते, असे प्रतिपादन रिची मेहता यांनी केले. बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स येथील जिओ वर्ल्ड सेंटर मध्ये आयोजित वेव्हज २०२५ दृकश्राव्य आणि मनोरंजन समिट मध्ये ‘बिहाइंड द फ्रेम : मास्टरिंग द आर्ट ऑफ द सिनेमा’ या विषयावर आयोजित मास्टरक्लासमध्ये रिची मेहता मध्ये बोलत होते. रिची मेहता म्हणाल्या की, सिनेमा अत्यंत प्रभावी माध्यम असून त्याचा योग्य वापर करून दिग्दर्शक आपल्या विषयाला निश्चितच परिणामकारक पद्धतीने एकाचवेळी देश-विदेशात पोहचवू शकतो. स्वानुभवातून निर्माण झालेले कथानक, विषयसूत्र हे अधिक सशक्तपणे मांडता येतात, जे प्रेक्षकांनाही सहजतेने भावतात. नाटक, काल्पनिक कथानक यावर आधारित सिनेमा कोणत्याही माध्यमातून व्यक्त केल्या जाणाऱ्या आशयाची प्रामाणिकता, सत्यता ही ठळकपणे बघणाऱ्यांच्या लक्षात येते, हे लक्षात घेऊन अधिक संवेदनशीलतेने भोवतालच्या घटना, प्रसंग यांच्याकडे बघता आले पाहिजे. सिनेमा आणि वेबसिरीज यांच्या विषयांच्या मांडणीमध्ये तसेच प्रेक्षकवर्गामध्ये फरक असतो. सिनेमामध्ये विषय, पात्र आणि त्याची मांडणी यांचा प्राधान्यक्रम वेगळा असतो आणि वेबसिरीजमध्ये हे घटक सिनेमासारख्या क्रमाने येत नाही तर तिथे ते वेगळ्या पद्धतीने येतात, दोन्ही माध्यमे प्रभावी असून त्याचा सुयोग्य वापर करून दिग्दर्शक आपल्या विषयाला निश्चितच परिणामकारक पद्धतीने व्यापक प्रमाणात समाजापर्यंत पोहचवू शकतो, असे रिची मेहता यांनी सांगितले. 0000 वंदना थोरात/विसंअ/ वृत्त क्रमांक : ७४ डिजिटल माध्यमातील प्रचार प्रसिद्धी मोहिमेसाठी अचूक डेटा आवश्यक - एम. ए. पार्थसारथी 'डाटा ड्राइवेन इनसाईट अँड मेजरमेंट इन ऍडव्हर्टायझिंग' परिसंवाद मुंबई, दि. ४ : डिजिटल माध्यमातून प्रचार प्रसिद्धीसाठी योग्य डेटा (माहिती) असणे आवश्यक असून जाहिरात प्रकियेत डेटा केंद्रबिंदू आहे. कोणत्याही प्रसिद्धी मोहिमेसाठी अचूक डेटा असणे महत्त्वाचे आहे. अचूक डेटा मिळविण्यासाठी शोध घेणे, योग्य नियोजन, योजना आणि मूल्यमापन आवश्यक आहे, असे ग्रुप एम साऊथ एशियाचे मुख्य धोरण अधिकारी एम. ए. पार्थसारथी यांनी सांगितले. जिओ वर्ल्ड सेंटर येथील जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन शिखर परिषद, २०२५ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या 'डाटा ड्राइवेन इनसाईट अँड मेजरमेंट इन ऍडव्हर्टायझिंग' या विषयावर श्री. पार्थसारथी बोलत होते. श्री. पार्थसारथी म्हणाले, सामजिक संशोधनातून माहिती संग्रहित करताना नमुना निवड पद्धती, जनगणना, सर्वेक्षण, संभाव्यतेवर आधारित, निश्चित माहिती, निवडक ग्राहकांवर आधारित माहिती घेणे आवश्यक आहे. या माहितीच्या आधारे विविध डिजिटल माध्यमातून योग्य घटकांपर्यंत पोहोचणे सहज सोपे होते. डेटाचा उपयोग आज केवळ माहिती मिळवण्यासाठी नाही, तर संपूर्ण जाहिरात प्रक्रियेचा शोध, नियोजन, अंमलबजावणी, आणि मोजमाप या सर्व टप्प्यांमध्ये केला जातो. सध्या शासकीय, खासगी क्षेत्रात जाहिरातीचे महत्व वाढले आहे. वयोगट, लिंग, आवडीनिवडी, ऑनलाइन वर्तन यावर आधारित जाहिरातीसाठी माहिती गोळा करणे आवश्यक आहे. त्यामुळे ग्राहकासाठी डेटा गोळा करताना त्यांची स्पष्ट संमती आणि खात्री अत्यंत आवश्यक आहे, असेही श्री. पार्थसारथी यांनी सांगितले. अचूक माहिती संकलित करणे गरजेचे ग्राहक स्वतःहून वेगवेगळ्या ब्रँडला डेटा देतो. पण त्यांची संमती आवश्यक आहे. यात खरेदीची योजना, वैयक्तिक माहिती, आवडीनिवडी आणि संवादाचे माध्यम निवडण्यासारख्या बाबींचा समावेश होतो. ग्राहकांच्या थेट संवादातून माहिती संकलित केली जाते, दुसऱ्या कंपनीकडून डेटा विकत घेतला जातो. याची अचूक माहिती संकलित केली जाते. ००० गजानन पाटील/ससं/ वृत्त क्रमांक : ७३ उद्योगांनी क्लाऊड सर्विसच्या माध्यमातून व्यवसाय जागतिक स्तरावर न्यावा - ॲमेझॉन वेब सर्व्हिसेसचे व्यवसाय विकास प्रमुख मनोज पद्मनाभन यांचे आवाहन 'स्टार्टअप्सच्या व्यवसाय वाढीसाठी क्लाऊड टेक्नॉलॉजीची मदत' चर्चासत्र मुंबई, दि. ४ : नवीन 'स्टार्टअप्स'च्या व्यावसायिक यशासाठी त्यांना सर्व प्रकारचे सहाय्य मिळण्यासंदर्भात 'क्लाऊड सर्विस' प्रणाली लाभदायक ठरू शकते. त्यामुळे नवीन उद्योगांनी क्लाऊड सर्विसच्या माध्यमातून आपला व्यवसाय-उद्योग कमी कालावधीत, अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने 'लोकल टू ग्लोबल'पर्यंत न्यावा, असे आवाहन ॲमेझॉन वेब सर्व्हिसेसचे व्यवसाय विकास प्रमुख (माध्यम आणि करमणूक) मनोज पद्मनाभन यांनी केले. 'स्टार्टअप्सच्या व्यवसाय वाढीसाठी क्लाऊड टेक्नॉलॉजीची मदत' यासंदर्भात 'वेव्हज २०२५' या जागतिक परिषदेत 'वेव्हजएक्स' चर्चासत्र झाले. यावेळी ॲमेझॉन वेब सर्विसेसचे उद्योग विषयतज्ज्ञ महेश्वरन जी. यांनीही मार्गदर्शन केले. आजच्या युगात आपला व्यवसाय वाढवण्यासाठी उद्योगांना अनेक संधी आहेत. आपला कंटेंट चांगला असेल तर उद्योगांनी वेगवेगळ्या क्लाऊड सर्विसेसच्या सहाय्याने आपल्या क्षेत्राचा विस्तार करावा. त्यासाठी बाजारात 'क्लाऊड सर्विसेस'च्या विविध प्रणाली उपलब्ध आहेत. त्यांचा वापर करून उद्योगांनी आपला कंटेंट आपल्या ग्राहकांपर्यंत पोहोचवावा, असा सल्ला श्री. पद्मनाभन यांनी दिला. श्री. महेश्वरन यांनी क्लाऊड सर्विसेसमध्ये असणाऱ्या प्रत्येक टप्प्याची माहिती दिली. त्यात सॉफ्टवेअर व अप्लायन्सेस, लिंक, मीडिया कनेक्ट, मीडया लाईव्ह, मीडिया कन्वर्ट, मीडिया पॅकेज, मीडिया टेलर, व्हिडिओ सर्विस, डेडलाईन थिंकबॉक्स, डेडलाईन क्लाऊड, ॲमेझॉन क्लाऊड फ्रंट, अमेझॉन एफएसएक्स, डीसीव्ही यांचा समावेश आहे. या टप्प्यांच्या माध्यमातून कंपनी ते ग्राहक अशी साखळी निर्माण करण्यात आली आहे, असेही त्यांनी सांगितले. स्टार्टअपच्या प्रगतीसाठी इकोसिस्टीम तयार होत आहे. नवीन उद्योगांचा खर्च कमी करणे, त्यांना डेटा ॲनालिसिस उपलब्ध करून देणे, त्यांच्या कंटेंटचे मूल्यवर्धन करणे यासारख्या सुविधा उपलब्ध होत असून याचाही वापर नवीन स्टार्टअप यांनी करणे गरजेचे आहे, असे श्री. महेश्वरन यांनी सांगितले. ------- ०००------ संतोष तोडकर/विसंअ/ वृत्त क्रमांक : ७२ कृत्रिम बुद्धिमत्ता युगातील एव्हीजीसीएक्सआर क्षेत्रातील बदलता प्रवाह या परिसंवादातील सूर मुंबई, दि. 4 : कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) नवीन तंत्रज्ञानामुळे शिक्षण, उद्योग क्षेत्रात नवनवीन संशोधन सुरू झाले आहे.अ‍ॅनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग, कॉमिक्स आणि एक्स्टेंडेड रिअॅलिटी क्षेत्रात मोठे बदल होत आहेत. ऍनिमेशन क्षेत्रात एआयचा वापर वाढला असला तरी सर्जनशीलता येणार नाही, ते कृत्रिम दिसेल, नैसर्गिक हे नैसर्गिकच राहणार असल्याचे या परिसंवादात तज्ज्ञांनी मत मांडले. बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्समधील जिओ वर्ल्ड सेंटर येथे पार पडलेल्या जागतिक दृकश्राव्य मनोरंजन परिषदेत 'चेंजिंग डायनामिक्स ऑफ एव्हीजीसी एक्सआर इन एआय एरा : हाऊ टू ब्रिज इंडस्ट्री अँड अकॅडमी' या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. यामध्ये अमेरिकन शिक्षणतज्ज्ञ ब्रियना याऱ्हौसे, अमेरिकेतील ऍनिमेशन तज्ञ प्रमिता मुखर्जी, अस्पाचे संचालक संजय खिमेसरा सहभागी झाले होते. तर समन्वयक म्हणून विनिता बच्चानी यांनी काम पाहिले. कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे सर्जनशीलतेचा नवा अध्याय - ब्रियना याऱ्हौसे विद्यार्थ्यांनी एक एआयचा वापर नवीन कल्पना, संशोधन आणि कलेतील नव्या कल्पकता शोधण्यासाठी करावा. विद्यार्थ्यांना शाळा,महाविद्यालयातसुद्धा नवीन तंत्रज्ञान याचे प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. त्यामुळे विद्यार्थी तंत्रज्ञानासोबत लवकर जुळवून घेऊन सर्जनशीलतेसह नेतृत्व करतील, असे श्रीमती याऱ्हौसे यांनी सांगितले. विद्यार्थ्यांसाठी रोजगाराभिमुख शिक्षण आवश्यक - संजय खिमेसरा देशाच्या अर्थव्यवस्थेत शिक्षणाचा महत्त्वपूर्ण वाटा आहे. कुशल मनुष्यबळ निर्माण करणे, नवसंशोधनाला चालना देणे आणि उद्योगांच्या गरजा पूर्ण करणे महत्वाचे आहे. यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP 2020) प्रभावीपणे राबवण्यासाठी विविध अभिनव आणि परिवर्तनशील उपक्रम हाती घेतले पाहिजे. विद्यार्थ्यांसाठी रोजगाराभिमुख शिक्षण आणि प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देणे महत्वाचे आहे त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी कौशल्यवृद्धी, प्रत्यक्ष औद्योगिक अनुभव आणि रोजगारक्षमतेच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरेल, असे अस्पाचे संचालक संजय खिमेसरा यांनी सांगितले. कृत्रिम बुद्धिमत्ता ही संधी आहे, धोका नाही - प्रमिता मुखर्जी अ‍ॅनिमेशन हे सर्जनशील क्षेत्र आहे. एआय हे रिपिटेटिव्ह, प्रक्रियात्मक कामे, डेटा ट्रान्सफर, प्लगइन लेखन या गोष्टींसाठी उपयुक्त आहे, पण सर्जनशील क्षेत्र अजूनही मानवकेंद्रित राहील. सर्जनशील कलाकारांसाठी संधी कमी होणार नाहीत. कृत्रिम बुद्धिमत्तेकडे आपल्या कौशल्यात वाढ करून देणारी संधी म्हणून बघायला हवे, असे मत अ‍ॅनिमेशन क्षेत्रातील अमेरिकेतील अ‍ॅनिमेशन तज्ज्ञ प्रमिता मुखर्जी यांनी व्यक्त केले. ०००० काशीबाई थोरात/विसंअ/   वृत्त क्रमांक : ७१ जनरेटिव्ह ‘एआय’मुळे मीडिया व्यवसायात परिवर्तन घडेल जनरेटिव्ह एआय संदर्भातील चर्चासत्र मुंबई दि. 4 :- मीडिया व्यवसाय आता केवळ माहिती किंवा करमणुकीपुरता मर्यादित न राहता अत्याधुनिक डिजिटल अनुभव देणाऱ्या उद्योगात परिवर्तित झाला आहे. जनरेटिव ‘एआय’मुळे मीडिया व्यवसायात परिवर्तन झाले असून ‘एआय’ ही केवळ कल्पना नसून व्यवसायासाठी उपयुक्त ठरणारी वस्तुस्थिती असल्याचे मत जनरेटिव्ह एआय संदर्भातील चर्चासत्रात व्यक्त करण्यात आले. जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये वेव्हज-2025 समिटमध्ये वेव्हजएक्स मध्ये "जनरेटिव्ह ‘एआय’ स्टार्टअप व्यवसायाचे आणि M&E (मीडिया आणि मनोरंजन) स्टार्टअपचे Amazon द्वारे स्केलिंग" या विषयावरील चर्चा सत्र आयोजित करण्यात आले होते. या चर्चा सत्रात उद्योग विषय तज्ञ महेश्वरन जी. आणि AWS चे पुण्यब्रथा दासगुप्ता यांनी सहभाग घेतला. ‘एआय’चा वापर आता मीडिया आणि मनोरंजन क्षेत्रात नवे क्षितिज खुले करत आहे. या क्षेत्रातील कंपन्या व उद्योग एआयच्या मदतीने डिजिटल मूल्य निर्माण करत आहेत. ग्राहक अनुभव सुधारणे, उत्पादकता वाढवणे, जुन्या कंटेंटचा वापर करून नवे उत्पन्न मिळवणे आणि सर्जनशीलतेत वाढ या चार स्तंभांवर एआय आधारित यशस्वी मॉडेल तयार होत आहेत, असे या चर्चा सत्रात सांगण्यात आले. मीडिया आणि मनोरंजन उद्योगात जनरेटिव्ह ‘एआय’ (Generative AI) मुळे मोठे बदल घडत आहेत. पूर्वी एकसंध असलेला प्रेक्षक वर्ग आता विविध प्लॅटफॉर्म्सवर, वेगवेगळ्या वेळांना आणि विविध पद्धतींनी कंटेंट पाहू लागला आहे. त्यामुळे उद्योगात वैयक्तिकरण, शिफारसी, आणि स्केलेबिलिटी यासारख्या बाबींना अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. जनरेटिव्ह एआय केवळ स्क्रिप्ट लेखन किंवा व्हिडिओ निर्मितीपुरता मर्यादित न राहता, स्टोरीबोर्डिंग, टीआरपी विश्लेषण, जुना कंटेंट नव्याने सादर करणे अशा अनेक टप्प्यांवर उपयोगी ठरतो. जुनी पात्रं आणि प्रसंगही ‘एआय’च्या मदतीने नव्या रूपात पुन्हा सादर करता येतात. तसेच मीडिया उद्योगासाठी ‘एआय’ केवळ कल्पनाशक्ती वाढवण्याचे नव्हे, तर नफा वाढवण्याचेही साधन ठरत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. ०००० एकनाथ पोवार/विसंअ/   वृत्त क्रमांक : ७० शिल्पकलेला तंत्रज्ञानाची जोड दिल्यास संवाद साधण्याचे प्रभावी माध्यम ठरेल - कलादिग्दर्शक पी.एम. विचारे ‘डिजिटल स्कल्पटिंग अँड फिल्ममेकिंग युजिंग मोबाईल कॅमेरा' परिसंवाद मुंबई, दि. 4 : शिल्पकला ही इतिहासाची साक्षीदार असते. एखादी शिल्पकृती पाहिली की त्यामधून प्राचीन काळातील घटना, प्रसंग आणि संस्कृती समजते. शिल्पकलेद्वारे आपल्याला इतिहास समजून घेऊन तो इतिहास पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचवू शकतो. शिल्पकलेला तंत्रज्ञानाची जोड दिल्यास ती कलात्मक अभिव्यक्ती न राहता समाजाशी संवाद साधण्याचे प्रभावी माध्यम तयार होते, असे टेक्निकल गेम्स कंपनीचे कला दिग्दर्शक पी.एम. विचारे यांनी यावेळी सांगितले. बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्समधील जिओ वर्ल्ड सेंटर येथील जागतिक दृकश्राव्य मनोरंजन परिषदेत आयोजित करण्यात आलेल्या 'वर्कशॉप ऑन डिजिटल स्कल्पटिंग अँड फिल्ममेकिंग युजिंग मोबाईल कॅमेरा' या विषयावर श्री विचारे यांनी मनोगत व्यक्त केले. श्री. विचारे यांनी स्वतः तयार केलेल्या शिल्पातून श्रोत्यांना शिल्प तयार करण्याचे तंत्रपद्धत विषद केली. त्यांनी भारतीय दंतकथेवर आधारित शिल्पकलेबद्दल त्यांनी माहिती दिली. सामाजिक जीवनातील प्रसंग, दिनचर्या आणि सामजिक संदेश शिल्पकलेतून त्यांनी मांडला आहे. वनातील सीता, अहंम ब्रह्मा यांची शिल्पे तयार करताना तंत्रज्ञानाचा वापर केल्याने विविध भावमुद्रा, हालचाली जीवंत होत असल्याचे त्यांनी उदाहरणांसह दाखवून दिले. ब्युटी अँड बिस्टमधून सामाजिक जाणिवेचा संदेश शिल्पातून कथा सांगणे किती प्रभावी होऊ शकते, याचे उदाहरण देताना त्यांनी ‘ब्युटी अँड द बीस्ट’हे शिल्प सादर केले. "सामान्यतः ब्युटी म्हणजे स्त्री आणि बीस्ट म्हणजे प्राणी, अशी समजूत असते. पण त्यांनी हे उलटे मांडले आहे. माणसंच खरे बीस्ट आहेत, जी प्राण्यांची कातडी वापरतात, त्यांना ठार करतात. प्राणी हेच खरे सौंदर्य आहेत," असा सामाजिक जाणिवेचा संदेश त्यांनी दिला. याबरोबरच त्यांनी ‘सायलंट म्युझिक’ या शिल्पाची ओळख करून दिली. "ही कलाकृती म्हणजे नाद नसलेली पण जाणवणारी संगीतातील एक अवस्था आहे. डोळ्यांनी बघताना शांततेत सुद्धा संगीताची अनुभूती येते," असं ते म्हणाले. या संकल्पनेत त्यांनी पंचमहाभूतांचा समावेश करून सर्जनशीलतेचा वापर केला आहे. शिल्पकलेमध्ये रचना महत्वाची असते. यामध्ये नैसर्गिक कृतीचा केंद्रबिंदू ठरतो, बॅलन्सिंग कला, त्रिमितीय पेंटिंग, आर्मीचर या शिल्पकलेमध्ये विविधता केली तरच प्रेक्षकांच्या मनाला भावते. शिल्प कलेमध्ये नवीन तंत्रज्ञान आणि मोबाईलच्या वापरामुळे डिजिटल मीडियाच्या माध्यमातून थेट प्रेक्षकांपर्यंत पोहोचता येते. शिवाय यातून समाज प्रबोधनाचा संदेश देता येत असल्याचे त्यांनी सांगितले. 0000 धोंडिराम अर्जुन/ससं/ वृत्त क्रमांक : ६९ अभिनय जितके प्रामाणिकपणे कराल, तितके ते उत्तम होईल – अभिनेता आमिर खान मुंबई, दि. 4 :- एआय तंत्रज्ञानामुळे चित्रपटसृष्टीत मोठा बदल घडत आहे. कृत्रिम बुद्धीमत्तेमुळे अभिनेत्याशिवाय दृश्य चित्रित करणे शक्य झाले आहे. चित्रपटसृष्टीत काम करताना तुमचे काम तुम्ही जितके प्रामाणिकपणे कराल, तितके ते उत्तम होईल असल्याचे सांगून ‘अभिनयाची कला’ या विषयावरील त्यांच्या अतिशय सहजसोप्या आणि उपयुक्त सल्ल्यांनी अभिनेता आमिर खान यांनी वेव्हज 2025 मध्ये अनेकांची मने जिंकली. आमिर खान पुढे म्हणाले की, मी प्रशिक्षित अभिनेता नाही. मी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये जाण्याची माझी इच्छा होती, पण जमलं नाही. मी माझ्या वाटचालीत या लहान-लहान गोष्टी शिकलो, ज्या माझ्यासाठी उपयोगी ठरल्या. चित्रपट निर्मितीच्या भविष्याबद्दल बोलताना, आमिर खान म्हणाले की, एआय तंत्रज्ञानामुळे आता अभिनेत्याशिवाय दृश्य चित्रित करणे शक्य झाले आहे! एआय आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने नंतर दृश्यात अभिनेत्याला जोडले जाऊ शकते. एखाद्या अभिनेत्यासाठी सर्वात पहिले आणि महत्त्वाचे काम म्हणजे त्या पात्राच्या मनात प्रवेश करणे, असे या अष्टपैलू अभिनेत्याने सांगितले, ज्यांनी गेल्या अनेक वर्षांत साकारलेल्या अनेक अविस्मरणीय भूमिकांची भारतीय सिनेमाला भेट दिली आहे. आणि त्या भूमिकेच्या अंतरंगात ते कशा प्रकारे सामावून जातात? त्यावर या सिनेक्षेत्राला वाहून घेतलेल्या अभिनेत्याचे उत्तर आहे, “मी स्क्रिप्टसोबत खूप वेळ घालवतो. मी पटकथा पुन्हा पुन्हा वाचतो. जर पटकथा चांगली असेल, तर तुम्हाला त्या पात्राची समज येईल, त्याचे भौतिक स्वरुप, वृत्ती इत्यादी सर्व काही त्यातूनच येईल”. याव्यतिरिक्त, दिग्दर्शकाशी पात्राबद्दल आणि कथेबद्दल चर्चा केल्याने देखील कल्पना येते. अतिशय परिश्रम करण्याच्या आपल्या वृत्तीविषयी स्पष्टीकरण देताना आमिर खान यांनी सांगितले, “माझी स्मरणशक्ती कमी आहे. त्यामुळे मी हाताने संवाद लिहितो. सर्वात आधी मी अवघड दृश्ये करायला घेतो. संवादांचे पाठांतर झालेच पाहिजे. पहिल्या दिवशी मी केवळ त्यावर काम करतो, तीन ते चार महिने मी दररोज तेच करत राहतो आणि मग त्यामध्ये शिरतो. संवाद हे तुमच्यामध्ये सामावले पाहिजेत. ते तुमचे स्वतःचे वाटले पाहिजेत. ज्यावेळी ते लिहिले गेले तेव्हा ते पटकथाकाराचे होते. पण नंतर ते तुमचे झाले आहेत. ज्यावेळी तुम्ही एक ओळ पुन्हा पुन्हा उच्चारता, तेव्हा तुम्हाला जाणीव होते की हे तुम्ही अनेक प्रकारे करू शकता. कलाकारांसाठी सर्वात कठीण काम कोणते असते? त्यावर आमिर खान म्हणाले, की कलाकाराला दररोज पुन्हा पुन्हा त्याच उत्कटतेने भावनिक अभिनय सादर करावा लागणे. नवोदित कलाकारांसाठी आमिर खान यांनी आणखी एक महत्त्वाची गोष्ट सांगितली आणि ती म्हणजे - "तुमचे काम तुम्ही जितके प्रामाणिकपणे कराल, तितके ते उत्तम होईल". तर, मग खुद्द आमिर खान त्यांच्या दृश्यांचा सराव कसा करतात? याचे उत्तर असे, की "मी शॉट्स देण्यापूर्वी त्या दृश्याची कल्पना करतो आणि त्या दृश्यांचा सराव करत असताना मी कधीच आरशात पाहत नाही." आतापर्यंतच्या सर्व चित्रपटांपैकी आमिर खान यांचा आवडता चित्रपट कोणता? अनेकांनी अंदाज लावलाच असेल, की तो चित्रपट 'तारे जमीन पर' असावा. तर होय, कारण या चित्रपटाने अनेक पालकांना त्यांच्या मुलांशी संयमाने वागायला, त्यांना प्रसंगी आधार द्यायला आणि त्यांच्या लहान मुलांशी सहानुभूतीपूर्वक वागायला शिकवले! अभिनय क्षेत्रात सुरुवात करणाऱ्या नवोदितांसाठी या ज्येष्ठ अभिनेत्याकडे आणखी कोणत्या टिप्स आहेत? "भावना या पटकथेतूनच समोर येतात. तुमचा पटकथेवर विश्वास असावा लागतो. कधीकधी चित्रपटांमध्ये अशी काही दृश्ये असतात, जी अविश्वसनीय वाटतात. पण अभिनेता तुम्हाला त्यावर विश्वास ठेवायला भाग पाडतो. त्यामुळे अभिनेत्याला प्रेक्षकांना पडद्यावर दाखवली जाणारी गोष्ट पटवून सांगावी लागते". चांगली पटकथा म्हणजे काय असते? आमिर खान यांनी उत्तरात सांगितले, की "चांगल्या पटकथेला उत्तम संकल्पनेचा आधार असावा लागतो. कथेच्या पहिल्या दहा टक्के भागात कथानकाचे ध्येय निश्चित झाले पाहिजे. नाहीतर प्रेक्षकांचा हिरमोड होईल". मात्र, चित्रपटामध्ये सहभागी असलेल्या सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाची सूचना म्हणजे - "जे त्या दृष्यामध्ये अपेक्षित आहे, ते करा आणि निव्वळ तुमच्या स्वतःच्या कामापुरता विचार करू नका". यावेळी केंद्रीय माहिती आणि प्रसारण सचिव संजय जाजू यांच्या हस्ते आमिर खान यांचा सत्कार करण्यात आला. 0000 वृत्त क्रमांक : ६८ जागतिक सृजनशील सहयोगात भारताचे एक अभूतपूर्व पदार्पण वेव्हज बझार : 800 कोटी रुपयांपेक्षा अधिक व्यवसाय व्यवहारांची नोंद मुंबई, दि.4 :- जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन शिखर परिषदेच्या (वेव्हज) छत्राखाली आयोजित केलेल्या या बाजारपेठेत चित्रपट, संगीत, रेडिओ, व्हीएफएक्स आणि अॅ‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍मेशन क्षेत्रात 800 कोटी रुपयांपेक्षा अधिक व्यावसायिक व्यवहार नोंदवले गेले. करार करण्याचे काम अजूनही सुरू असताना, काही दिवसांत एकूण मूल्यांकन 1000 कोटी रुपयांहून जास्त होण्याचा अंदाज आहे. वेव्हज बाजारामुळे 500 कोटी रुपयांहून अधिक उत्पन्न मिळाले आणि येत्या काळात अतिरिक्त करार पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. 80-आसन व्यवस्था असलेल्या स्थानी झालेल्या चित्रपटांच्या क्युरेटेड स्क्रीनिंगला उत्साही प्रतिसाद मिळाला आणि निवडक चित्रपटांना दाद मिळाली. बाजाराने उदयोन्मुख निर्मात्यांना त्यांचे आयपी खरेदीदार आणि सहयोगींच्या जागतिक नेटवर्कमध्ये सादर करण्यास मदत केली, ज्यामुळे लक्षणीय औत्सुक्य निर्माण झाले आणि नवीन भागीदारी वाढली. भारत आणि न्यूझीलंडमधील आंतरराष्ट्रीय सहकार्यातील एक मोठी कामगिरी म्हणजे, पेट्रिना डी'रोझारियो यांच्या नेतृत्वाखालील फिल्म इंडिया स्क्रीन कलेक्टिव्ह आणि स्क्रीन कॅंटरबरी एनझेड यांनी वेव्हजपासून प्रेरित होऊन न्यूझीलंडमध्ये पहिला भारतीय चित्रपट महोत्सव सुरू करण्यासाठी एक सहयोगी प्रस्ताव जाहीर केला. उभय देशांमधील पर्यटन, सांस्कृतिक देवाणघेवाण आणि सह-निर्मिती संबंध अधिक दृढ करणे हा याचा उद्देश आहे.

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

स्वयं अर्थसहाय्यिता नवीन शाळांना मान्यता व दर्जावाढीची शिफारस; हरकती मागविल्या