विशेष लेख शीतलहरीच्या प्रभावापासून संरक्षणासाठी उपाययोजना; काय करावे, काय करु नये

 


विशेष लेख

शीतलहरीच्या प्रभावापासून संरक्षणासाठी उपाययोजना;  काय करावे, काय करु नये

        राज्यभरात थंडीचा कडाका वाढत असल्याने वातावरणात आमूलाग्र बदल दिसून आहे. ज्यामुळे विशिष्ट क्षेत्रातील तापमान सरासरीपेक्षा खूप कमी होते. ही घटना अचानक घडू शकते किंवा काही दिवसांपर्यंत टिकू शकते. ज्यामुळे मानवी जीवन, शेती, पशुधन आणि आर्थिक व्यवस्था प्रभावित होतात. त्यामुळे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन विभाग, मुंबई यांनी शीतलहरीच्या प्रभावापासून संरक्षणासाठी उपाययोजनाबाबत काय करावे, काय करु नये याबाबत मार्गदर्शक सूचना जाहिर केल्या आहेत. ते याप्रमाणे :

 

पूर्व तयारी :  रेडिओ ऐका, टीव्ही पहा, स्थानिक हवामान अंदाजासाठी वर्तमानपत्रे वाचा आणि थंडीची लाट आहे की नाही हे जाणून घ्या. हिवाळ्यातील कपड्यांचा पुरेसा साठा करावा. एकापेक्षा अधिक थराचे कपडे असल्यास उपयुक्त राहील. आपत्कालीन पुरवठा तयार ठेवावा. फ्लू, वाहते/नाक भरून येणे किंवा नाकातून रक्त येणे, दिर्घकाळ सर्दी अशी लक्षणे असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. हवामान आणि आपत्कालीन  सूचनांचे बारकाईने पालन करावे आणि दिलेल्या सल्ल्यानुसार कार्य करावे. शक्य तितके घरात राहावे आणि थंड वाऱ्याचा संपर्क टाळण्यासाठी प्रवास कमी करावा. सैल फिटिंगचे, हलके, वारारोधक उबदार लोकरीचे कपडे घालावे, जाड कपड्यांचा एकापेक्षा जास्त थर असावा. घट्ट कपड्यांमुळे रक्ताभिसरण कमी होण्याची शक्यता असते.

 

शीतलहरीमध्ये स्वतःला कोरडे ठेवावे. आपले डोके, मान, हात आणि पायाची बोटे पुरेशी झाकून ठेवावे. हातमोजेपेक्षा मिटन्सला प्राधान्य द्या. मिटन्स हे थंडीपासून अधिक उबदारपणा आणि इन्सुलेशन प्रदान करतात. टोपी, मफलर, इन्सुलेटेड व वॉटरप्रूफ जोडे वापरा. शरीराचे तापमान समतोल राखण्यासाठी सकस आहार घ्यावा. रोगप्रतिकारक शक्ती राखण्यासाठी व्हिटॅमिन-सी युक्त फळे आणि सकस आहार घ्यावा. गरम द्रवपदार्थ नियमितपणे घ्यावे. कारण यामुळे थंडीशी लढण्यासाठी शरीरातील उष्णता टिकून राहते. तेल, पेट्रोलियम जेली किंवा बॉडी क्रीम त्वचेची काळजी घेण्यासाठी नियमितपने वापरावी. वृद्ध लोकांची आणि मुलांची काळजी घ्यावी आणि एकटे राहणाऱ्या शेजारील वृद्धांना त्यांच्या आरोग्याबाबत विचारपूस करावी. आवश्यकतेनुसार अत्यावश्यक पुरवठा व पुरेसे पाणी साठवून ठेवावे. गैर-औद्योगिक इमारतींसाठी उष्णता इन्सुलेशनच्या मार्गदर्शक सूचनांचे अनुसरण करावे. शीतलहरींच्या संपर्कात असताना सुन्नपणा, बोटे, कान आणि नाक पांढरे किंवा फिकट दिसणे यासारख्या हिमबाधाच्या लक्षणांकडे लक्ष द्या. थंडीच्या दीर्घकाळापर्यंत संपर्कामुळे त्वचा फिकट, कडक आणि बधीर होऊ शकते आणि बोट,तळपाय, नाक किंवा कानात काळे फोड आल्यास ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या. प्रभावित झालेल्या भागांवर कोमट पाण्याने उपचार करा. कांपण्याकडे दुर्लक्ष करू नका. शरीरातील उष्णता कमी होत असल्याचे पहिले लक्षण असून त्याकडे दुर्लक्ष करु नये. हिमबाधा/हायपोथर्मियाने ग्रस्त असलेल्या व्यक्तीसाठी शक्य तितक्या लवकर वैद्यकीय मदत घ्यावी. पशुधन किंवा पाळीव प्राण्यांना थंड हवामानापासून सुरक्षित ठेवावे. शीतलहरींच्या तीव्र संपर्कामुळे शरीराच्या तापमानात घट होऊन हायपोथर्मिया होऊ शकतो. ज्यामुळे थरकाप, बोलण्यात अडचण, तंद्री, स्नायू कडक होणे, स्वास घेण्यात त्रास होणे, अशक्तपणा किंवा चेतना नष्ट होऊ शकते. त्यामुळे हायपोथर्मिया ही एक वैद्यकीय आणीबाणी असून त्यावर त्वरित वैद्यकीय उपचार आवश्यक आहे. विशेषत: कोविड-19 च्या काळात विविध आजार, वाहते किंवा नाक भरणे यासारख्या लक्षणांसाठी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. राष्ट्रीय आपत्ती व्यावस्थापना विभागाचे (एनडीएमए) चे मोबाईल ऍप्लिकेशन डाउनलोड करावे.

 

हायपोथर्मियाची लक्षणे असल्यास काय करावे : हायपोथर्मियाची लक्षणे असलेल्या व्यक्तीला उबदार ठिकाणी घेऊन जावे आणि त्यांचे कपडे बदलावे.  ब्लँकेटचे थर, कपडे, टॉवेल किंवा चादरी वापरून व्यक्तीचे शरीर उबदार करावे. शरीराचे तापमान वाढण्यास मदत करण्यासाठी उबदार पेय द्यावे. मद्य सेवन करु नये. परिस्थिती बिघडल्यास तातडीने वैद्यकीय मदत घ्यावी.

 

 

काय करू नये : दीर्घकाळापर्यंत थंडिचा संपर्क टाळावा. मद्य सेवनाने शरीराचे तापमान कमी होवून रक्तवाहिन्या अरुंद होवून हायपोथर्मियाचा धोका वाढू शकतो. हिमबाधा झालेल्या भागाची मालिश करू नका. यामुळे अधिक नुकसान होऊ शकते. शरीर थरथरने हे उष्णता कमी होत असल्याचे हे पहिले लक्षण आहे, त्याकडे दुर्लक्ष करू नका. घरातच राहण्याचा प्रयत्न करा. प्रभावित व्यक्तीला कोणतेही द्रव देवू नका.

 

> शेतीविषयी उपाययोजना

 

शितलहरीच्या प्रभावामुळे काळी गंज, पांढरा गंज, उशीरा होणारा तुषार इत्यादी रोगांसह पिकांचे नुकसान होते. तसेच पिकांची उगवण, वाढ, फुलोरा उत्पन्न आणि साठवण क्षमतेत विविध प्रकारचे व्यत्यय येतात.

 

काय करावे : पिकांच्या मुळांची चांगली वाढ होण्यासाठी बोर्डोत मिश्रण किंवा कॉपर ऑक्सी-क्लोराईड, फॉस्फरस (पी) आणि पोटॅशियम (के) ची फवारणी करावी. शीतलहरी दरम्यान शक्य तिथे हलके आणि वारंवार स्प्रिंकलरद्वारे जमिनिचे सिंचन करावे. बागायती आणि फळबागांमध्ये आंतरपीक शेती पध्दतीचा वापर करावा. भाजीपाल्यास थंड वाऱ्यापासून संरक्षण मिळेल असे नियोजन करावे. किरणोत्सर्गाचे शोषण वाढवा आणि हिवाळ्यात रोपवाटिका आणि कोवळ्या फळांच्या झाडांना झाकून उबदार वातावरण तयार करावे. सेंद्रिय अच्छादन व थंड वाऱ्याचा वेग कमी करण्यासाठी उपाययोजना कराव्यात.

 

> पशुसंवर्धन, पशुधनाविषयी उपययोजना

 

शीतलहरींच्या काळात ऊर्जेची गरज वाढते म्हणून प्राणी आणि पशुधनांना उदरनिर्वाहासाठी अधिक अन्न लागते. म्हैस/गुरे यांच्या इष्टतम प्रजनन हंगामात तापमानातील फरक प्राण्यांच्या प्रजनन दरावर परिणाम करू शकतो.

 

काय करावे : रात्रीच्या वेळी प्राण्यांचे निवारा स्थान (गोठे) चारही बाजूंनी झाकून ठेवावे. थंडीच्या दिवसात प्राण्यांना, विशेषतः लहान प्राण्यांना झाकून ठेवावे. पशुधन आणि कुक्कुटांचे थंड हवामानापासून संरक्षण करावे. प्राण्यांच्या आहारात उच्च दर्जाच्या चारा किंवा कुरणांचा वापर करावा, चरबी पूरक खाद्य द्यावे. हिवाळ्यात जास्तीत जास्त सूर्यप्रकाश आणि उन्हाळ्यात कमी रेडिएशन देणारे स्मार्ट शेडचे बांधकाम करावे.

 

काय करू नये : थंडीच्या वातावरणात जनावरांना मोकळ्या जागेत किंवा बाहेर फिरत सोडू नये. जनावरांचे वाहतूक(पशुमेळावा) टाळावे. जनावरांना थंड चारा व थंड पाणी देणे टाळावे. प्राण्यांच्या निवास स्थानात ओलसरपणा आणि धूर टाळावा. रात्री आणि थंडीच्या वेळी जनावरांना उघड्यावर ठेवू नका. मृत जनावरांचे शव जनावरांच्या चरण्याच्या मार्गावर टाकू नयेत.

 

संकलन : जिल्हा माहिती कार्यालय, बुलढाणा

00000000

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

स्वयं अर्थसहाय्यिता नवीन शाळांना मान्यता व दर्जावाढीची शिफारस; हरकती मागविल्या