खामगांवमधील गावे पाणीदार होणार - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
खामगांवमधील गावे पाणीदार होणार
- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
*खामगांव येथे २३६५ कोटींच्या विकासकामांचा शुभारंभ
*पाणी आरक्षणाला उपमुख्यमंत्र्याची जाहीर मंजुरी
*पांदण रस्त्यांसाठी २५ कोटी देणार
बुलडाणा,(खामगांव),दि. 6 : शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जाणारा जिगाव सिंचन प्रकल्प अतिशय वेगाने पूर्णत्वाकडे नेत आहोत. हा प्रकल्प आणि वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पांमुळे खामगांवमधील गावे पाणीदार होणार आहेत. शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पाणी येणार असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
खामगांव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदान येथे खामगांव विधानसभा क्षेत्रातील २३६५ कोटींच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. या सोहळ्याला केंद्रीय आयुष (स्वतंत्र प्रभार), आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव, आ. डॉ. संजय कुटे, आ.आकाश फुंडकर, माजी आमदार चैनसुख संचेती, माजी आमदार विजयराज शिंदे, माजी जिप अध्यक्ष उमाताई तायडे, जिल्हाधिकारी डॅा. किरण पाटील, पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात, सचिन देशमुख आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस पुढे म्हणाले, २०१४ साली जिगाव प्रकल्पाला मोठ्या प्रमाणात चालना दिली. धरण बांधण्याचा निर्णय घेतला. शेतकऱ्यांच्या शेतीपर्यंत पाईपलाईनने पाणी नेवून शेतकऱ्याला थेट बांधावर पाणी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला. आज ७ हजार कोटी रुपये जिगाव प्रकल्पासाठी दिले, त्याचे काम अतिशय वेगाने पूर्णत्वाकडे नेत आहोत. यातील एक भाग म्हणून खामगांव विधानसभा क्षेत्रातील आज झालेल्या विविध विकासकामांच्या भूमिपूजनामुळे शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पाईपलाईनने पाणी येणार आहे. यासोबतच नानाजी देशमुख कृषी समृद्धी योजना सुरू केली. या योजनेच्या माध्यमातून शंभर टक्के अनुदानावर ड्रीपद्वारे शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी उपलब्ध होणार आहे. यामुळे कोरडवाहूचा शिक्का पूर्णपणे पुसला जाईल आणि बागायती भाग म्हणून ओळखता येईल. या योजनांमुळे शेतकऱ्यांचे कल्याण होणार आहे, असेही ते यावेळी म्हणाले.
जिगाव प्रकल्पाचे पाणी आरक्षण मिळावे अशी मागणी आमदार आकाश फुंडकर यांनी केली होती. त्याअनुषंगाने पुढच्या ५० वर्ष खामगांवला पाणी पुरेल इतके पाणी आरक्षण मंजूर केल्याचे जाहीर करुन यापुढे पाणी टंचाई भासणार नाही, असे उपमुख्यमंत्री म्हणाले. वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पाला मंजूरी मिळाली. ९० हजार कोटींचा प्रकल्प आहे. नद्यांचे पाणी भंडारापासून बुलढाणा जिल्ह्यापर्यंत आणणार आहोत. १० लाख हेक्टर जमीन ओलीताखाली येईल. या प्रकल्पाच्या कामांची सुरुवात केली असून त्याचा फायदा खामगांव तालुक्याला होणार आहे. १०० टक्के सिंचनाखाली असलेला खामगांव तालुका अशी ओळख होईल. खामगांव शहराचे चित्र बदलत आहे. रस्ते, विकासकामे होत आहेत. तालुक्यातील पांदण रस्त्यांसाठी मार्चच्या बजेटमध्ये २५ कोटी देणार असल्याचेही उपमुख्यमंत्री यांनी यावेळी सांगितले.
गेल्या १५ वर्षांपासून लोकसभा क्षेत्राचा प्रतिनिधी आहे. या भागातील अनेक विकासकामे मार्गी लागली आहेत. खामगांव- जालना रेल्वेमार्गाला मान्यता मिळाली आहे. लवकरच कामाला सुरुवात होईल. ९० हजार कोटींचा नदीजोड प्रकल्प मंजूर झाला असून निविदा प्रक्रिया झाली आहे. काम सुरु झाले आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मोठ्याप्रमाणात जमीन ओलीताखाली येईल. शेतकऱ्यांना विविध पीक उत्पादन घेता येईल. खामगांव येथे ५० बेडचे आयुर्वेद रुग्णालय आणि सर्व रुग्णालयातील कामांचा प्रस्ताव द्यावा. त्याबाबत कार्यवाही केली जाईल, असे केंद्रीय आयुष (स्वतंत्र प्रभार), आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी भाषणात सांगितले.
यावेळी आमदार डॅा. संजय कुटे आणि आमदार आकाश फुंडकर यांनी मनोगत व्यक्त करुन लोकोपयोगी कामाच्या मागण्या मांडल्या. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिली.
यावेळी जलसंपदा, सार्वजनिक बांधकाम विभाग, पायाभूत सुविधा, मृद व जलसंधारण या विभागांच्या विविध विकासकामांचा शुभारंभ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच खामगांव नगरपरिषद कार्यालयाचे लोकार्पण, पात्र लाभार्थ्यांना घरकूल, शेतकऱ्यांना कृषी फवारणी पंप आदी लाभाचे वाटप करण्यात आले.
०००००
Comments
Post a Comment