सैलानी येथील नारळाची होळी पर्यावरण पूरकतेचा संदेश देणारी ठरावी
-जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील
बुलडाणा, दि. 23 : जिल्ह्यातील सैलानी बाबा येथील प्रसिद्ध असलेले नारळाची होळी रविवार, दि. 24 मार्च रोजी होणार आहे. यात मोठ्या प्रमाणावर नारळाचा उपयोग करून होळी पेटविण्यात येते. ही होळी पर्यावरण पूरकतेचा संदेश देणारी ठरावी, अशी अपेक्षा जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी व्यक्त केली आहे.
सैलानी बाबाच्या यात्रेमध्ये होळीच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर भाविक एकत्र येतात. या नारळाच्या होळीपासूनच येथील यात्रेला खऱ्या अर्थाने सुरुवात होते. या ठिकाणी असलेल्या दर्ग्याच्या ट्रस्टमार्फत खुल्या जागेवर होळी पेटवली जाते. या ठिकाणी कोणताही अनुचित प्रसंग होऊ नये, यासाठी परिसराची पाहणी करून योग्य सूचना देण्यात आल्या आहे. होळी हा सण एक प्रमुख उत्सवापैकी एक आहे. हा सण पर्यावरण पूरकतेचा संदेश देणारा ठरावा.
सैलानी बाबाच्या यात्रेला येणाऱ्या भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणावर असणार आहे. त्यांना योग्य सुविधा पुरविण्यासाठी प्रशासनातर्फे उपायोजना करण्यात आली आहे. दरम्यान या भागाची पाहणी केल्यानंतर भाविकांसाठी पुरेशा प्रमाणात पाणीपुरवठा करणे गरजेचे आहे. यासाठी ट्रस्टकडून 15, तर प्रशासनातर्फे दोन टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. या ठिकाणी येणाऱ्या भाविकांच्या संख्येनुसार या ठिकाणी पाणीपुरवठा करण्यात येईल.
यात्रेसाठी प्रशासनाने पूर्ण नियोजन केले आहे. गर्दीवरील नियंत्रणासाठी पोलीस चौकी, ट्रस्ट आणि प्रशासनातर्फे दर्गा आणि संदलच्या मार्गावर सीसीटीव्ही, तसेच सुरक्षेसाठी व्यवस्था करण्यात आली आहे. या ठिकाणी कोणतीही आरोग्यविषयक समस्या निर्माण होऊ नये, यासाठी उपाययोजना करण्यात आली आहे. या ठिकाणी आरोग्य पथकाची ही नियुक्ती करण्यात आली आहे.
सैलानी बाबाच्या यात्रेमध्ये अनेक भाविक या ठिकाणी यात्रेदरम्यान भेटी देतात. नागरिकांनी या ठिकाणी श्रद्धा बाळगावी, तसेच अनिष्ट चालीरीती आणि परंपरांना बंद करीत चांगल्या प्रकारचे सौदार्हपूर्ण वातावरण ठेवावे. तसेच या ठिकाणी येणारे लहान मुले, महिला, वृद्ध यांची काळजी योग्य प्रकारे घ्यावी, यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी केले आहे.
00000
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्कची कारवाई
*आचारसंहिता कालावधीत १७ गुन्हे दाखल
बुलडाणा, दि. 23 : लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्कने अवैध मध्यविक्रीबाबत कारवाई सुरू केली आहे. या कारवाईमध्ये आचारसंहिता लागू झाल्यापासून 17 गुन्हे नोंदविण्यात आले असून यात 17 आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाने चालू मार्च महिन्यात आतापर्यंत एकुण ६१ गुन्हे नोंदविले आहे. यात ६१ वारस गुन्हे, ६१ आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच २ वाहनासह एकुण २५ लाख ८१ हजार १४ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर गुन्ह्यांमध्ये १६२.७४ लिटर देशी मद्य, ३४.७४ लिटर विदेशी मद्य, २८ लिटर ताडी, १० हजार ८२५ लिटर रसायन सडवा, ५९५ लिटर हातभट्टी, ११.५ लिटर बिअर मद्य पकडण्यात आले.
आचारसंहिता कालावधीत अवैध मध्यविक्री विरोधात विशेष मोहिम राबवून एकूण १७ गुन्हे नोंदविण्यात आले आहे. यात १७ वारस गुन्हे नोंद करून १७ आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच २ वाहनासह एकुण २ लाख ५९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या गुन्ह्यांमध्ये देशी मद्य ५५.९३ लिटर, विदेशी मद्य १२.२४ लिटर, रसायन सडवा १ हजार ७८८ लिटर, हातभट्टी १२४ लिटर, बिअर ७.८ लिटर मद्य पकडण्यात आले आहे. तसेच विभागाकडून राष्ट्रीय महामार्ग व राज्य महामार्गावर सीमा तपासणी नाक्यावर चेकपोस्ट तयार करण्यात आले आहे.
तसेच दैनंदीन मद्यविक्री माहितीचा भरणा केलेला नसलेल्या हॉटेल फ्रेण्डस, गौरव वाईनबार शेगाव, हॉटेल विशाल शेगाव, हॉटेल न्यू अजय खामगाव, हॉटेल विश्वजित शेगाव, हॉटेल सुर्या शेगाव, हॉटेल ग्रीनलॅण्ड बुलडाणा आणि हॉटेल विजय शेगाव यांच्या अनुज्ञप्ती ७ दिवसांसाठी निलंबित करण्यात आल्या आहेत. यानंतरही आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन केले नसल्यास अनुज्ञप्तीधारकांविरुद्ध कार्यवाही करण्यात येणार आहे. तसेच अनुज्ञप्तींची मद्यविक्री सरासरीपेक्षा ३० टक्के जास्त किंवा कमी झाल्यास अशा अनुज्ञप्तींचे सखोल निरीक्षण करण्यात येणार आहे.
तसेच परिसरात अवैध मद्य विक्री अथवा बनावट मद्यनिर्मिती आढळल्यास टोल फ्री नंबर १८००८३३३३३, व्हॉटसॲप नंबर ८४२२००११३३ किंवा excisesuvidha.mahaonline.gov.in या पोर्टलवर तात्काळ माहिती कळवावी, असे आवाहन राज्य उत्पादन शुल्कच्या अधीक्षक भाग्यश्री जाधव यांनी केले आहे.
00000
आचारसंहिता कालावधीत आंदोलन करण्यावर निर्बंध
बुलडाणा, दि. 23 : लोकसभा निवडणूक कालावधीत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्ह्यात धरणे आंदोलन, मोर्चा, निदर्शने, उपोषण करण्यावर निर्बंध घालण्यात आले आहे. सदरचे आदेश जिल्हाधिकारी यांनी निर्गमित केले आहे.
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी कार्यक्रम घोषीत केल्यापासून आदर्श आचारसंहिता अंमलात आली आहे. त्यानुसार निवडणूकीची संपूर्ण प्रक्रिया शांतता, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हादंडाधिकारी, उपविभागीय दंडाधिकारी, तालुका दंडाधिकारी कार्यालय तसेच जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालय, शासकीय विश्रामगृह, सार्वजनिक ठिकाणे, रस्त्यावर कोणत्याही राजकीय पक्षाने, व्यक्तीने, संघटनेने निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराने किंवा त्याच्या प्रतिनिधीने किंवा त्याच्या हितचिंतकाने धरणे आंदोलन, मोर्चा, निदर्शने, उपोषण करण्यावर निबंध घालण्यात आले आहे.
जिल्हादंडाधिकारी डॉ. किरण पाटील यांना फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करून सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालय, संस्था, शासकीय विश्रामगृह, सार्वजनिक ठिकाणे, रस्त्याच्या ठिकाणी धरणे आंदोलन, मोर्चा, निदर्शने, उपोषण करण्यावर निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत निर्बंध घालण्यात आले आहे. सदर आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. किरण पाटील दिले आहे.
00000
शासकीय परिसरात मिरवणुका काढण्यास निर्बंध
बुलडाणा, दि. 23 : जिल्ह्यात लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024चा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. यात शासकीय कार्यालये आणि विश्रामगृह परिसरात मिरवणूक काढण्यास निर्बंध घालण्यात आले आहे.
जिल्ह्यातील लोकसभा सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसिल कार्यालय, तसेच जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालय, संस्था आणि शासकीय विश्रामगृहाच्या आवारामध्ये कोणत्याही राजकीय पक्ष, निवडणूक लढविणारा उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधीने किंवा त्याच्या हितचिंतकाने सभा घेणे, सदरील आवाराचा वापर राजकीय कामासाठी करणे किंवा रॅली काढणे, निवडणूकी संबंधाने पोस्टर्स, बॅनर्स, पॉम्प्लेट्स, कटआऊट, पेंटिंग, होर्डींग लावणे, निवडणूक विषयक घोषवाक्य लिहिणे, सदरील आवारात निवडणूक विषयक घोषणा देणे, मतदाराला प्रलोभन दाखविणे आणि निवडणूकीच्या कामात बाधा निर्माण होईल, अशी कृती करणे नियंत्रित करणे आवश्यक आहे.
त्यामुळे जिल्हादंडाधिकारी म्हणून डॉ. किरण पाटील यांना फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करून सर्व शासकीय ठिकाणी निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत निर्बंध घालण्यात आले आहे. सदर आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. किरण पाटील दिले आहे.
00000
तात्पुरती पक्ष कार्यालये स्थापन करण्यास निर्बंध
बुलडाणा, दि. 23 : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत तात्पुरते पक्ष कार्यालय स्थापन करण्यास निर्बंध घालण्यात आले आहे. त्यानुसार धार्मिक स्थळे, रुग्णालय, शैक्षणिक संस्था आणि सार्वजनिक ठिकाणाजवळ तात्पुरती पक्ष कार्यालय स्थापन करण्यास निर्बंध घालण्यात आले आहे.
लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता अंमलात आली आहे. निवडणूक प्रक्रिया योग्य वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्ह्यातील धार्मिक स्थळ, रुग्णालय किंवा शैक्षणिक संस्था व सार्वजनिक ठिकाणांचा जवळ तात्पुरती पक्ष कार्यालये स्थापन करण्यावर निर्बंध घालण्यात आले आहे.
जिल्हादंडाधिकारी डॉ. किरण पाटील यांना फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करुन जिल्ह्यातील धार्मिक स्थळ, रुग्णालय किंवा शैक्षणिक संस्था व सार्वजनिक ठिकाणाजवळ तात्पुरती पक्ष कार्यालये स्थापन करण्यावर निवडणूक प्रक्रिया पुर्ण होईपर्यंत निर्बंध घालण्यात आले आहे. सदर आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. किरण पाटील दिले आहे.
00000
जिल्हाधिकारी कार्यालयात शहिद दिनानिमित्त अभिवादन
बुलडाणा, दि. 23 : जिल्हाधिकारी कार्यालयात शहिद दिनानिमित्त क्रांतीकारी भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना अभिवादन करण्यात आले.
नायब तहसीलदार संजय बंगाळे यांनी भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी नाझर गजानन मोतेकर, सांडू भगत, श्रीकृष्ण कुटे आदी उपस्थित होते. उपस्थितांनी पुष्पार्पण करून अभिवादन केले.
00000
No comments:
Post a Comment