जिल्ह्यात 28 हजारावर नवमतदार मतदार
*नवमतदारांनी नोंदणी करण्याचे आवाहन
बुलडाणा, दि. 13 : भारत निवडणूक आयोगाचे निर्देशानुसार दि. 1 जानेवारी 2024 अर्हता दिनांकावर आधारीत मतदारयादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमात दि. 23 जानेवारी 2024 रोजी अंतिम मतदारयादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. यात 18 वर्षे पूर्ण झालेले 28 हजार 603 नवमतदार यावर्षी पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 18 हजार 497 पुरुष, 10 हजार 105 महिला, तर 1 तृतीयपंथी मतदाराचा समावेश आहे.
पुनरिक्षण कालावधीमध्ये मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांनी दिलेल्या घरभेटी, मतदार नोंदणी कार्यालयातफें केलेली नोंदणी, शाळा महाविद्यालयातील शिबीर, ग्रामसभा, जनजागृती कार्यक्रमांतर्गत जनजागृतीमुळे मतदार नोंदणीच्या संख्येत विशेष वाढ झाली आहे. सर्व अर्जांची पडताळणी केल्यानंतर मतदारांची नोंद करण्यात आली आहे. सदर मतदारांना मतदानकार्डही देण्यात येत आहेत. भारत निवडणूक आयोगाचे निर्देशानुसार निरंतर पुनरिक्षण कार्यक्रम सुरू असल्याने मतदाराच्या आकडेवारीमध्ये भर पडण्याची शक्यता आहे.
दरवर्षी 5 जानेवारीला अंतिम प्रसिद्ध केली जाणारी मतदारयादी यावर्षी 23 जानेवारीला प्रसिद्ध करण्यात आली आहे. दरम्यान जिल्ह्यातील वरिष्ठ महाविद्यालयांत विद्यार्थ्यांच्या नोंदणीसाठी शिबिरे घेण्यात आली. या शिबिरांना चांगला प्रतिसाद लाभला. बीएलओ यांनी दिलेल्या घरभेटीमध्येही नवीन मतदारांची नोंदणी करण्यात आली. तसेच या संपूर्ण कामकाजाचा जिल्हाधिकारी यांनी वेळोवेळी आढावा घेतल्याने नवमतदारांच्या नोंदणीत वाढ झाली आहे.
जिल्ह्यात आजघडीला 20 लाख 53 हजार 125 मतदार आहेत. मलकापूर, बुलडाणा, चिखली, सिंदखेड राजा, मेहकर, खामगाव, जळगाव जामोद या विधानसभेतील हे मतदार रहिवासी आहेत. प्रारूप मतदार यादी मध्ये 18 ते 19 वयोगटातील मतदार यादीत 6 हजार 918 नवमतदार होते. तर अंतिम मतदारयादीमध्ये याच वयोगटातील मतदारांची आकडेवारी 25 हजार 977 झाली, तर सद्यस्थितीमध्ये 28 हजार 603 नवमतदार आहेत.
दरवर्षी सप्टेंबर ते जानेवारी या काळात मतदारयादीचे पुनरिक्षण केले जाते. या काळात मयत, दुबार व स्थलांतरीत मतदारांची नावे वगळणे आणि नवमतदारांची नावे समाविष्ट करणे, स्थलांतरीत मतदारांची नावे मागणीनुसार संबंधित मतदारसंघात समाविष्ठ केले जातात. त्यानुसार यावर्षी अंतिम मतदार यादीतील मतदारांची संख्या 20 लाखाहून अधिक आहे.
आगामी लोकसभा निवडणूकीसाठी मतदार नोंदणी करून मतदानाच्या हक्क बजावावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.
00000
जिल्ह्यात ज्येष्ठ मतदारांमध्ये महिला अधिक
*85 वर्षावरील मतदारांसाठी घरपोच मतदानाची सुविधा
बुलडाणा, दि. 13 : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत दि. 23 जानेवारी 2024 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. यातील आकडेवारीनुसार जिल्ह्याच्या मतदार यादीमध्ये ज्येष्ठ नागरिक असलेल्या 80 ते 110 वयोगटातील एकूण 59 हजार 625 मतदारांपैकी 23 हजार 613 पुरूष तर 36 हजार 12 महिला मतदारांचा समावेश आहे. यात महिलांची टक्केवारी 61 टक्के एवढी आहे.
जिह्यातील एकूण मतदारांमध्ये पुरुषांचे प्रमाण अधिक आहे. परंतु यावेळी 80 ते 110 वयोगटामध्ये महिलांची संख्या पुरूषांच्या तुलनेत अधिक आहे. या वयोगटातील मतदारांनी मतदानाचा हक्क बजावून मतदानाची टक्केवारी वाढवावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.
भारताच्या निवडणूक आयोगाच्या शिफारसीनुसार, कायदा आणि न्याय मंत्रालयाने सुधारणा केली आहे. त्यामध्ये घरपोच मतदानाची सुविधा देण्यात येणार आहे. यात ज्येष्ठ नागरिकांचे वय 80 वरील 85 वर्षे करण्यात आली आहे. त्यानुसार 85 पेक्षा जास्त वय असलेल्या पात्र मतदारांना त्यांच्या मागणीनुसार घरपोच मतदानाचा पर्याय वापरण्यासाठी फॉर्म 12 डी प्रदान केला जाणार आहे. ही संपूर्ण प्रक्रीया जिल्हा निवडणूक अधिकारी व सहाय्यक निवडणूक अधिकारी यांच्यास्तरावरून करण्यात येणार आहे.
000000
निवडणुकीतील खर्चावर राहणार आयोगाचे लक्ष
*लोकसभेसाठी 95 लाख रूपयांची मर्यादा
बुलडाणा, दि. 13 : येती लोकसभा सार्वत्रिक निवडणूक पारदर्शक आणि निर्भय वातावरणात पार पाडाव्यात यासाठी निवडणूक आयोगाकडून मार्गदर्शक सूचना आणि आदेश देण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर बुलडाणा जिल्ह्यात उमेदवार, राजकीय पक्ष यांचाकडून होणाऱ्या निवडणूक खर्चावर संनियंत्रण, परिक्षण करण्याची तयारी करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील दिली.
भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी प्रति उमेदवार 95 लाख रुपये कमाल खर्चाची मर्यादा निश्चित केली आहे. निवडणुकीदरम्यान सदर खर्च मर्यादेचे पालन होण्यासाठी उमेदवारांना उमेदवारी अर्ज दाखल केल्याच्या दिनांकापासून विहित नमुन्यात दैनंदिन निवडणूक खर्चाशी संबंधित समन्वय अधिकारी यांच्याकड़े सादर करावा लागणार आहे, निवडणूक कार्यक्रमादरम्यान गैरप्रकार रोखण्यासाठी विधानसभा मतदार संघनिहाय प्रत्येकी स्थायी निगरानी पथक, भरारी पथक, चलचित्र निगराणी पथके, तैनात करण्यात आली आहे. सदर पथके राजकीय सभा, रॅली यासारख्या प्रत्येक कार्यक्रमावर सूक्ष्म नजर ठेवणार आहे. तसेच प्रत्येक बाबीचे चित्रीकरण करण्यात येणार आहे.
सदर पथकातील कर्मचाऱ्यांचे आदेश निर्गमित करण्यात आले आहे. तसेच त्यांचे प्रशिक्षणही घेण्यात आले आहे. सर्व विधानसभा मतदारसंघनिहाय दैनदिन खर्चाकरिता नेमलेल्या समन्वय अधिकारी यांच्याकडून आढावा घेण्यात येणार आहेत. तसेच निवडणूक खर्चाबाबत प्राप्त होणाच्या तक्रारींची पडताळणी करण्यात येणार आहे.
00000
नागरिकांनी उष्णतेच्या लाटेपासून संरक्षण करावे
*जिल्हा प्रशासनाचे आवाहन
बुलडाणा, दि. 13 : हवामान खात्याच्या अंदाजानुसार उन्हाळ्यात उष्णतेच्या लाटे प्रभावी राहणार आहे. कोणत्याही प्रकारची जीवितहानी होऊ नये, यासाठी उष्णतेच्या लाटेपासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
उष्णतेची लाट आणि उष्माघातापासून बचावासाठी तहान लागलेली नसली तरी अधिक पाणी प्यावे, हलकी, पातळ आणि सच्छिद्र सुती कपड्यांचा वापर करावा, बाहेर जाताना गॉगल्स, छत्री, टोपी, बुट आणि चपलाचा वापर करावा, प्रवास करताना पाण्याची बाटली सोबत घ्यावी, उन्हात काम करीत असलेल्या व्यक्तींनी डोक्यावर टोपी किंवा छत्रीचा वापर करावा. तसेच ओल्या कपड्यांनी डोके, मान व चेहरा झाकण्यात यावा. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत असल्यास ओआरएस, घरी बनविण्यात आलेली लस्सी, तोरणी, निंबूपाणी, ताक आदींचे नियमित सेवन करावे.
अशक्तपणा, स्थूलपणा, डोकेदुखी, सतत येणारा घाम आदी उन्हाचा झटका बसण्याची लक्षणे ओळखावी. चक्कर येत असल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. गुरांना छावणीत ठेवण्यात यावे. तसेच त्यांना पुरेसे पिण्याचे पाणी द्यावे. घरे ठंड ठेवण्यासाठी पडदे, शटर आणि सनशेडचा वापर करावा. रात्री खिडक्या उघड्या ठेवाव्यात. पंखे, ओले कपड्याचा वापर करावा. तसेच थंड पाण्याने वेळोवेळी स्नान करावे. कामाच्या ठिकाणी जवळच थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी. सूर्य प्रकाशाचा थेट संबंध टाळण्यासाठी कामगारांना सूचना देण्यात यावी. पहाटेच्या वेळी जास्तीत जास्त कामाचा निपटारा करण्यात यावा. बाहेर कामकाज करीत असताना मध्ये नियमीत आराम करावा. गरोदर महिला कामगार व आजारी कामगारांची अधिक काळजी घेण्यात यावी. रस्त्याच्या कडेला उन्हापासून संरक्षणाकरीता शेड उभारावेत.
उन्हात अतिकष्टाची कामे टाळावीत, दारू, चहा आणि कार्बोनेटेड थंड पेय घेऊ नये. उच्च प्रथिनेयुक्त पदार्थ खाण्याचे टाळावे. उष्ण कालावधीत लहान मुले व पाळीव प्राण्यांना बंद असलेल्या व पार्क केलेल्या वाहनात ठेऊ नये. तीव्र उन्हात मुख्यत: दुपारी 12 ते 3 या कालावधीत उन्हात बाहेर जाणे टाळावे, गडद, घट्ट आणि जाड कपडे घालण्याचे टाळावे, बाहेरील तापमान अधिक असल्यास शारिरीक श्रमाची कामे टाळावीत. दुपारी 12 ते 3 या कालावधीत बाहेर काम करणे टाळावे. उन्हाच्या कालावधीत स्वयंपाक करण्याचे टाळण्यात यावे. तसेच मोकळ्या हवेसाठी स्वयंपाक दारे व खिडक्या उघडी ठेवावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार यांनी केले आहे
00000000
महिला बचतगट विक्री केंद्राचे लोकार्पण
बुलडाणा, दि. 13 : महिला आर्थिक विकास महामंडळ आणि महिला व बाल विकास विभागातर्फे बचत गटातील महिलांना उत्पादित मालाला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी विक्री केंद्र उभारण्यात आले आहे. या विक्री केंद्राचा लोकार्पण सोहळा सोमवर, दि. ११ मार्च रोजी जिजामाता प्रेक्षागार येथे पार पडला.
यावेळी खासदार प्रतापराव जाधव, आमदार संजय गायकवाड, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी अमोल दिघोळे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक राजेश ईंगळे, जिल्हा अभियान व्यवस्थापक विक्रांत जाधव, नागरी जीवन्नोनती अभियानाचे व्यवस्थापक महेंद्र सोभागे आदी उपस्थित होते.
खासदार श्री. जाधव यांनी महिला बचतगटांनी उत्पादित मालाच्या विक्रीसाठी नऊ तालुक्यात केंद्र सुरु करण्यात आले आहे. यातून महिलांनी उद्योजक बनावे असे आवाहन केले. बचतगटातील महिला प्रामुख्याने ग्रामीण क्षेत्रातील असल्याने त्यांना पॅकींग, ब्रँडींगबाबत सुविधा मिळाव्यात. यासाठी जिल्ह्यातील औद्योगिक परिसरामध्ये बचत गटासाठी सामुदायिक सुविधा केंद्र उभारणीस अल्प दारात जागा उपलब्ध करून दिली आहे. त्यासोबत ब स्थानकामध्ये महिला बचतगटाकरीता विक्री केंद्र उभारण्यात येणार असल्याचे सांगितले.
आमदार श्री. गायकवाड यांनी बच गटातील महिलांसाठी १०० दुकाने उपलब्ध करून देणार आहे. तसेच बुलडाणा शहरामध्ये बचत भवनाची उभारणी करण्यात येणार आहे. महिलांनी शासनाच्या विविध योजनाचा लाभ घ्यावा, प्रधानमंत्री यांनी घोषित केलेले लखपती दीदी अभियान यशस्वी करावे, त्याकरीता उद्योग आणि बँक अर्थ सहाय्याकरीता सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासित दिले.
जिल्हा समन्वय अधिकारी सुमेथ तायडे यांनी प्रास्ताविक केले. सहजिल्हा समन्वय अधिकारी समीर देशमुख यांनी सूत्रसंचालन केले. वर्षा गवई यांनी आभार मानले.
00000
उमेद अभियानात उपभोक्ता, विक्रेता संमेलन
बुलडाणा, दि. 13 : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत बुलडाणा रेसिडेन्सी क्लब येथे मंगळवार, दि. 12 मार्च 2024 रोजी उपभोक्ता आणि विक्रेता यांचे एक दिवसीय संमेलन पार पडले. जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
या संमेलनात 14 कंपन्यांनी सहभाग घेतला. तसेच उमेद अभियानांतर्गत स्थापन झालेल्या 13 शेतकरी उत्पादक कंपनी आणि 26 वैयक्तिक उद्योजकांनी सहभाग घेतला. जिल्ह्यातील सर्व शेतकरी उत्पादक कंपन्यांचे जीएसटी प्रमाणपत्र काढून त्यांची उत्पादने निर्यात होतील, यासाठी नियोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी दिल्या.
प्रकल्प संचालक राजेश इंगळे यांनी सहभागी कंपनींनी शेतकरी उत्पादक कंपन्यांनी उत्पादित मालाचे नमुने व संपर्क क्रमांक घेतले आहे. चांगले उत्पादन असणाऱ्या कंपन्यासोबत करार करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील उत्कृष्ट उत्पादन करणाऱ्यांचे लवकरच संमेलन घेण्यात येणार असल्याचे सांगितले, यावेळी मोठ्या प्रमाणावर बचतगटातील महिला प्रामुख्याने उपस्थित होत्या.
000000
जिल्ह्यातील नागरिकांनी 'आयुष्मान कार्ड' काढावे
*जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांचे आवाहन
बुलडाणा, दि. 13 : एकत्रित आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा जोतीराव फुले जनआरोग्य योजना राज्यात राबविण्यात येत आहे. आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेंतर्गत लाभार्थी प्रति कुटुंबांना प्रत्येक वर्षी ५ लाख रूपयांपर्यंत ठराविक आजारावर मोफत उपचाराचा लाभ घेता येतो. या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हान यांनी केले आहे.
आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेंतर्गत १ हजार २०९ प्रकारच्या वैद्यकीय उपचारपद्धती आणि शस्रक्रिया अंगीकृत रुग्णालयात मोफत केली जाते. जिल्ह्यामध्ये आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेंतर्गत २५ रुग्णालय अंगीकृत आहेत. आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांकडे आयुष्मान ई-कार्ड असणे आवश्यक आहे. जिल्ह्यामध्ये आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेचे एकूण १८ लाख ५ हजार ५५० लाभार्थी आहेत. त्यापैकी आतापर्यंत ६ लाख ८९ हजार ३८८ असे ३८ टक्के लाभार्थ्यांनी आयुष्मान कार्ड काढले आहेत.
आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे लाभार्थी आयुष्मान कार्ड ग्रामपंचायत अंतर्गत केंद्रचालक, खासगी आपले सरकार सेवा केंद्र, आशा सेविका, अंगीकृत रुग्णालयातील आरोग्यमित्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, राशन दुकानदार आणि स्वतः मोबाईलवर केवायसी करून काढू शकतात. लाभार्थ्यांनी स्वतः आयुष्मान कार्ड काढण्यासाठी लाभार्थ्यांनी अँड्रॉईड मोबाईल मध्ये प्लेस्टोरमध्ये जाऊन आयुष्मान ॲप डाउनलोड करावे. त्यामध्ये लाभार्थी लॉगिनमधून स्वतःचा मोबाईल क्रमांक टाकून लॉगिन करावे. त्यानंतर स्वतःचा आधारकार्ड क्रमांक टाकून आपण लाभार्थी आहोत किंवा नाही ते शोधावे. लाभार्थी असल्यास स्वतःचा आधार कार्ड क्रमांक आणि मोबाईलवर येणार ओटीपी टाकून स्वतः आयुष्मान कार्ड काढण्यासाठी केवायसी करू शकतात. त्यानंतर केवायसी अँप्रुव्हल आल्यानंतर स्वतः आयुष्मानकार्ड मोबाईलमध्ये डाउनलोड करता येते.
आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेसंबंधी अडचणी असल्यास लाभार्थ्यांनी योजनेच्या जिल्हा रुग्णालयातील कक्ष क्र. ८ येथील जिल्हा कार्यालयाशी किंवा टोल फ्री नंबर १५५३८८, १८००२३३२२००, १४५५५, १८००१११५६५ या क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच आयुष्मान अप्लीकेशन डाऊनलोड साठी मोबाईलवर गुगल प्ले स्टोअर आणि beneficiary.nha.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
लाभार्थ्यांनी तातडीने आयुष्मान कार्ड काढावे, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गीते, आयुष्मान भारत प्रधानमंत्री जण आरोग्य योजनेचे विभागीय व्यवस्थापक सुनील वाठोरे, जिल्हा समन्वयक डॉ. विवेक सावके यांनी केले आहे.
00000
आजपासून दोन दिवसीय ग्रंथोत्सवास सुरूवात
बुलडाणा, दि. 13 : जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयातर्फे दि. 14 आणि 15 मार्च रोजी दोन दिवसीय ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. गर्दे वाचनालयाच्या सभागृहातील या ग्रंथोत्सवात वाचन संस्कृतीचा प्रचार आणि प्रसार होण्यासाठी ग्रंथप्रदर्शन, ग्रंथविक्री, कविसंमेलन, व्याख्याने, तसेच विविध विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे.
गुरूवार, दि. 14 मार्च रोजी सकाळी 9.30 वाजता हुतात्मा स्मारकापासून गर्दे वाचनालयापर्यंत ग्रंथदिंडी काढण्यात येणार आहे. यावेळी आमदार संजय गायकवाड यांच्या हस्ते ग्रंथदिंडीचे उद्घाटन होणार आहे. यावेळी गोकुळ शर्मा, प्रा. डॉ. एस. एम. कानडजे, शिक्षणाधिकारी अनिल आकाळ, जिल्हा माहिती अधिकारी गजानन कोटूरवार उपस्थित राहतील.
त्यानंतर सकाळी 10.30 वाजता पालकमंत्री दिलीप वळसे पाटील, खासदार प्रतापराव जाधव, रक्षा खडसे, जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, जिल्हा पोलिस अधिक्षक सुनील कडासने, मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर, छत्रपती संभाजीनगरचे सहाय्यक ग्रंथालय संचालक सुनील हुसे उपस्थित राहणार आहेत. पंजाबराव गायकवाड उद्घाटन समारंभाचे सूत्रसंचालन करतील. दुपारी स्पर्धा परीक्षेत निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.
ग्रंथोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी दि. 15 मार्च रोजी सकाळी 10.30 वाजता वाचन संस्कृतीमध्ये समाजमाध्यमांची भूमिका विषयावर व्हाईस ऑफ मिडीयाचे अध्यक्ष अनिल म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली चंद्रकांत बर्दे, राजेंद्र काळे, लक्ष्मीकांत बगाडे, अरुण जैन, नितीन शिरसाट, सुभाष लहाने, निलेश जोशी, अजय बिलारी, वसिम शेख, गजानन धांडे, रणजितसिंग राजपूत, रफिक कुरेशी सहभागी होतील. दुपारी 12.30 वाजता सार्वजनिक ग्रंथालयांचे सामाजिक योगदान या विषयावर प्रा. कि. वा. वाघ, नेमीनाथ सातपुते, सुनिल वायाळ, डॉ. राजेंद्र गणगे, सुनील झोरे, अनंत सातव, निशिकांत ढवळे, महेंद्र बोर्डे उपस्थित राहतील.
जिल्ह्यातील ग्रंथालय कर्मचारी आणि पदाधिकारी यांनी या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी राजेश पाटील यांनी केले आहे.
00000
मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचा दौरा
बुलडाणा, दि. 13 : उच्च व तंत्र शिक्षण, वस्त्रोद्योग, संसदीय कार्य मंत्री चंद्रकांतदादा पाटील गुरूवार, दि. 14 मार्च रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे.
श्री. पाटील यांच्या दौरा कार्यक्रमानुसार, गुरुवार, दि. १४ मार्च २०२४ सकाळी ५ वाजता शेगाव रेल्वे स्थानक येथे आगमन व वाहनाने शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण करतील. सकाळी ७ वाजता शासकीय विश्रामगृह येथून श्री गजानन महाराज देवस्थान, शेगावकडे प्रयाण करतील. त्यानंतर सकाळी ७.१५ वाजता श्री गजानन महाराज देवस्थान, शेगाव येथे आगमन होईल. सकाळी ८ वाजता श्री गजानन महाराज देवस्थान, शेगाव येथून वाहनाने अकोला कडे प्रयाण करतील.
000000
No comments:
Post a Comment