Thursday 28 September 2023

DIO BULDANA NEWS 28.09.2023

 पाण्याच्या उपलब्धतेसाठी वनराई बंधारे बांधण्याचे आवाहन

बुलडाणा, दि. 28 : पावसाळा संपल्यानंतरही पाण्याचा प्रवाह नाले आणि ओढ्यातून सुरू राहतो. त्यामुळे पाण्याच्या उपलब्धतेसाठी श्रमदानातून वनराई बंधारे बांधण्याचे आवाहन कृषि विभागाने केले आहे.

अल निनोच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागामार्फत श्रमदानातून वनराई बंधारे बांधण्याच्या सूचना कृषी संचालक आणि जिल्हाधिकारी यांनी केल्या आहे. सन 2023-24 मध्ये जून ते सप्टेंबर पावसाळी हंगाम संपल्यानंतर बऱ्याच कालावधीपर्यंत नाले आणि ओढ्यांमधून पाण्याचा प्रवाह सुरू राहतो. हा पाण्याचा प्रभाव पारंपारिक पद्धतीने अडवून पाण्याचा साठा करण्यात येतो. यामधील वाहून जाणारे पाणी अडवून पिकांना संरक्षित सिंचन देणे, जनावरांना पिण्याचे पाणी उपलब्ध होण्यासाठी वनराई बंधारे लोक सहभागातून घेण्यात येणार आहे.

कृषी विभागांतर्गत दरवर्षी वनराई बंधारे बांधण्याचे काम केले जाते. वनराई बंधारे बांधल्यास संरक्षित सिंचन क्षेत्रात वाढ होण्यास मदत होते. तसेच पाणीसाठा निर्माण क्षमता वाढते. रब्बी पीक घेण्यास शेतकऱ्यांना मदत होते. यावर्षी प्रत्येक कृषी सहाय्यकांना 10 वनराई बंधारे श्रमदानातून बांधण्याचे उद्दिष्ट दिले आहे. संपूर्ण जिल्ह्यात यावर्षी लक्षांकानुसार वनराई बंधारे बांधण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार जागांची स्थळनिश्चिती करण्यात आली आहे.

वनराई बंधाऱ्यांमुळे जिल्ह्यातील संरक्षित सिंचन क्षेत्रात वाढ होणार असून रब्बी क्षेत्र वाढण्यास मदत होणार आहे. शेतकऱ्यांनी सहभागी होऊन वनराई बंधारे बांधण्याकरिता कृषी विभागाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी मनोजकुमार ढगे यांनी केले आहे.

00000

बुधवारी जेम पोर्टलविषयी बुधवारी प्रशिक्षण

बुलडाणा, दि. 28 : शासनाला लागणाऱ्या सेवा आणि वस्तूंचा पुरवठा करणाऱ्या जेम पोर्टलविषयी बुधवार, दि. 4 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 11 वाजता प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात हे प्रशिक्षण होणार आहे. शासकीय कार्यालयातील अधिनस्त सर्व विभागातील कार्यालय प्रमुख आणि संबंधितांसाठी सदर प्रशिक्षण आहे. या प्रशिक्षणास लॅपटॉपसह उपस्थित राहावे लागणार आहे.

केंद्र शासनाने विकसित केलेल्या गर्व्हर्नमेंट ई-मार्केटप्लेस पोर्टलची कार्यपद्धती, राज्य शासनास वस्तू व सेवा खरेदी करण्यासाठी स्वीकृत करण्यास मान्यता दिली आहे. जेम पोर्टलचा वापर करुन पोर्टलद्वारे वस्तू व सेवांची खरेदी करण्यास शासकीय, निमशासकीय विभाग आणि स्वायत्त संस्थांना बंधनकारक आहे. उद्योग विभागाच्या सुधारीत खरेदी धोरणातील तरतुदीची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.

जेमवरील वस्तू आणि सेवा खरेदीसंदर्भात प्रशिक्षणासाठी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

000000

ज्येष्ठ नागरिक दिनी आरोग्य शिबीराचे आयोजन

बुलडाणा, दि. 28 : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे दि. 1 ऑक्टोबर 2023 रोजी ज्येष्ठ नागरीक दिनानिमित्त ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध कार्यक्रम आणि आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. यात ज्येष्ठ नागरीकांच्या आरोग्याची तपासणी करण्याच्या क्षेत्रात कार्यरत स्वयंसेवी संस्थांचे सहकार्य घेण्यात येणार आहे.

सदर कार्यक्रमात ज्येष्ठ नागरीकांकरीता सार्वजनिक पदयात्रा, प्रभात फेरी, सभा, विशेष कार्य केलेल्या ज्येष्ठांचा आणि ज्येष्ठ नागरीकांसाठी कार्य करणाऱ्या बिगर सरकारी संस्थांचा गौरव, आरोग्य शिबीर, चर्चासत्र, परीसंवाद, ज्येष्ठ नागरीक कायदे आणि योजनांची माहिती, वृद्धांचे हक्क, सोयीसुविधा आदीबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

यानिमित्ताने ज्येष्ठ नागरिकांनी दि. 1 ऑक्टोबर 2023 रोजी श्री स्वामी विवेकानंद संस्था, हिवरा आश्रम, ता. मेहकर येथे सकाळी 11 वाजता आरोग्य तपासणी शिबिराकरीता उपस्थित राहून आरोग्य तपासणी शिबीराचा लाभ घ्यावा, असे आवाहन समाज कल्याण सहायक आयुक्त डॉ. अनिता राठोड यांनी केले आहे.

000000

शुक्रवारी शौर्य दिनाचे आयोजन

बुलडाणा, दि. 28 : जिल्हा सैनिक कार्यालयातर्फे शुक्रवार, दि. 29 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 10.30 वाजता जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात आयोजित करण्यात आले आहे. जिल्ह्यातील माजी सैनिक, माजी सैनिक विधवा पत्नी, युध्द विधवा, विरमाता, विरपिता यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

भारतीय सैन्य दलाने दि. 29 सप्टेंबर 2016 रोजी पाकिस्तान हद्यीत शिरून सर्जिकल स्ट्राईकद्वारे अतिरेक्यांचा खात्मा केला. भारतीय सैन्याची अभिमानास्पद कामगिरी राज्यातील जनतेपर्यंत व्यापक प्रमाणात पोहचविण्यासाठी शौर्य दिन साजरा करण्यात येत आहे. यानिमित्ताने माजी सैनिक, शहिद जवानांच्या विरपत्नी, विरमाता, विरपिता आणि शौर्य पदकधारकांचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी दि. 29 सप्टेंबर रोजी शौर्य दिन साजरा करण्यात येतो. यावर्षी दि 29 सप्टेंबर रोजी शौर्य दिनाचा कार्यक्रम जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात आयोजित करण्यात आला आहे. यावेळी नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी स्कॉड्रन लिडर रूपाली सरोदे यांनी केले आहे.

00000

प्रत्येक तालुक्यात होणार सेंद्रिय शेतीचे क्लस्टर

बुलडाणा, दि. 28 : कृषी विभाग आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्माच्या माध्यमातून परंपरागत कृषी विकास योजनेंतर्गत सेंद्रिय शेती योजना राबविली जाते. आता ही योजना डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत जिल्ह्यात व्यापक पद्धतीने राबविली जाणार आहे. त्यानुसार ‘सेंद्रिय शेती, विषमुक्त शेती’साठी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात सेंद्रिय शेतीचे क्लस्टर तयार केले जाणार आहे.

सेंद्रीय शेतीसाठी परंपरागत कृषी विकास योजना, डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन, केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान या तीन योजनांच्या माध्यमातून सेंद्रिय शेतीच्या प्रसारासोबतच त्यातील शेतमालाच्या वितरणासाठी व्यवस्था निर्माण करण्यात येणार आहे. सेंद्रिय शेतीसाठी कमी खर्चाचे तंत्रज्ञान विकसित करून शेतकन्यांचा उत्पादन खर्च कमी करून उत्पन्न वाढविणे, सेंद्रिय शेतमालाच्या वितरणासाठी बाजारपेठ आणि विक्री व्यवस्था निर्माण करणे, सेंद्रिय शेतमालाच्या निर्यातीस प्रोत्साहन देणे आदी उद्दिष्टे योजनेत ठेवण्यात आली आहेत.

परंपरागत कृषी विकास योजना सेंद्रिय शेतीस प्रोत्साहन

योजनेंतर्गत प्रति गट २० हेक्टर याप्रमाणे एकूण २५ गटांचे लक्षांक जिल्ह्यास देण्यात आले आहे. त्यासाठी बुलडाणा आणि चिखली या २ तालुक्यांमध्ये हे गट स्थापन करण्यात येत आहेत. यात प्रति शेतकरी १ हेक्टर मर्यादेपर्यंत लाभ देय असणार आहे.

या सेंद्रिय शेतकरी गटाची आत्मा अंतर्गत नोंदणी करावयाची आहे. प्रती गट लाभ देण्याचे क्षेत्र जास्तीत जास्त २० हेक्टरपर्यंत मर्यादित आहे. परंतू सेंद्रिय शेतीमध्ये शेत जमिनीचे प्रमाणीकरण असल्याने सर्व सदस्यांचे आठ अ मधील संपूर्ण क्षेत्र सेंद्रिय प्रमाणीकरणाखाली आणणे अभिप्रेत आहे. प्रति हेक्टर ३२ हजर १३० रुपयांप्रमाणे बाबानिहाय अनुदान पुढील 3 वर्षांकरिता उपलब्ध होणार आहे.

डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन

या १०० टक्के राज्य पुरस्कृत योजनेंतर्गत सन २०२३-२४, २०२४-२५ आणि २०२५-२६ या ३ वर्षांकरिता जिल्ह्याकरीता प्रति वर्ष १५० सेंद्रिय शेतकरी गट आणि १५ शेतकरी उत्पादक कंपनी स्थापनेचे लक्षांक प्राप्त आहे. १३ तालुक्यामध्ये १० सेंद्रिय शेतकरी गट आणि कृषी विज्ञान केंद्र बुलडाणा आणि जळगाव जामोद यांना प्रत्येकी १० याप्रमाणे एकूण १५० गट स्थापन केले जाणार आहे. पुढील ०३ वर्षामध्ये एकूण ४५० सेंद्रिय गट स्थापन केले जाणार आहे.

एक सेंद्रिय शेतकरी गट हा ५० हेक्टरचा राहणार आहे. प्रति शेतकरी जास्तीत जास्त २ हेक्टर क्षेत्र लाभासाठी ग्राह्य राहणार आहे. तालुक्यात एका गावात शक्यतो सलग क्षेत्रात हा सेंद्रिय गट स्थापन करावयाचा आहे. सेंद्रिय शेतकरी गटाची आत्मा अंतर्गत नोंदणी करावयाची आहे. प्रतिवर्ष ७ हजार ५०० रूपये हेक्टरप्रमाणे 3 वर्षात २२ हजार ५०० हेक्टर क्षेत्र सेंद्रिय गटांच्या माध्यमातून सेंद्रिय प्रमाणीकरणाखाली आणण्यात येणार आहे. प्रति गट प्रति हेक्टर १३ हजार ४६४ रुपयांप्रमाणे बाबानिहाय अनुदान पुढील 3 वर्षाकरिता उपलब्ध होणार आहे.

राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान

केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियानांतर्गत जिल्ह्यामध्ये ५० हेक्टर क्षेत्राचा १ नैसर्गिक समूह याप्रमाणे एकूण ७५ समूह स्थापन करण्यात येणार आहे. एका गावात किंवा जवळपासच्या 2-3 गावात ५० हेक्टर क्षेत्राचा एक नैसर्गिक शेतीचा समूह असणार आहे. प्रत्येक समूहामध्ये किमान ५० किंवा त्याहून अधिक शेतकरी असावे लागणार आहे.

समूहातील शेतकऱ्याला कमाल १ हेक्टर क्षेत्राचा लाभ मिळू शकतो. तथापि त्याचे उर्वरित क्षेत्र कोणतेही अतिरिक्त साहाय्य न देता संपूर्ण क्षेत्र घेण्याची मुभा राहणार आहे. निवड केलेल्या समूहास प्रथम वर्षात शेतीशाळेद्वारे नैसर्गिक शेतीबाबत जनजागृती, प्रात्यक्षिकाद्वारे अंमलबजावणी करावी लागणार आहे. त्यानंतरच्या ३ वर्षात प्रशिक्षण, क्षेत्रीय भेटी, स्वत:चे शेतीवर निविष्टा निर्मितीसाठी डीबीटीद्वारे अर्थसहाय्य आणि प्रमाणीकरण याबाबी राबविण्यात येणार आहेत. प्रत्येक समूहासाठी पूर्वीपासूच नैसर्गिक शेती करीत असेलल्या आणि त्याबाबत ज्ञान आणि संवाद कौशल्य असलेल्या व्यक्तीची चॅम्पियन शेतकरी म्हणून तर एका स्थानिक युवक शेतकऱ्याची संसाधन व्यक्ती म्हणून ग्रामपंचायतीच्या सल्ल्याने मानधन तत्वावर निवड करण्यात येणार आहे. प्रति गट प्रति हेक्टर २७ हजार २५० रुपयांप्रमाणे बाबानिहाय अनुदान पुढील ३ वर्षाकरिता उपलब्ध होणार आहे.

या तीनही योजनांमध्ये शेतकरी प्रशिक्षण, सेंद्रिय शेतीमध्ये रुपांतरणासाठी अर्थसहाय्य, शेतकरी उत्पादक कंपनी स्थापनेस सहाय्य आणि पूरक भागभांडवल देणे, कंपनी स्तरावर जैविक निविष्टा निर्मिती केंद्र स्थापन करणे, सेंद्रिय शेती प्रमाणीकरण आदी बाबीसाठी मापदंडानुसार अर्थसहाय्य करण्यात येणार आहे. या योजनांमध्ये सहभागी होण्याकरिता इच्छुक शेतकऱ्यांनी संबंधित तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक, कृषी सहायक, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक, सहायक तंत्रज्ञान व्यवस्थापक यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

00000

शेतकऱ्यांसाठी रब्बी ज्वारी पिक लागवड तंत्रज्ञान

बुलडाणा, दि. 28 : येत्या रब्बी हंगामात शेतकऱ्यांकडून रब्बी ज्वारीची लागवड जिल्ह्यात होते. ज्वारीची उत्पादकता वाढावी, यासाठी कृषि विभागाकडून रब्बी ज्वारी पिक लागवड तंत्रज्ञान देण्यात येते. शेतकऱ्यांनी या तंत्रज्ञानाचा उपयोग करावा, असे आवाहन कृषि विभागाने केले आहे.

रब्बी ज्वारीचे लागवड तंत्रामध्ये विदर्भात रब्बी ज्वारीची लागवड कोरडवाहू आणि ओलिताखाली या दोन्ही क्षेत्रात केली जाते. ज्वारीचे पिक घेताना जमीन आणि पूर्वमशागतीमध्ये रब्बी ज्वारीच्या पेरणीकरीता मध्यम ते खोल, भारी व जास्त जलधारणा असलेली, पाण्याचा चांगला निचरा होणारी जमिनीची निवड करावी. खरीपातील उडीद किंवा मुंग काढल्यावर वखराच्या 3 ते 4 खोल पाळ्या देऊन जमिनीची चांगली पूर्वमशागत करावी. भरखते देताना रब्बी ज्वारीला हेक्टरी 10-15 गाड्या चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत द्यावे आणि त्यानंतर वखराची पाळी देऊन जमिनीत चांगले मिसळावे.

रासायनिक खते देताना कोरडवाहू रब्बी ज्वारीकरीता 50 किलो नत्र, 25 किलो स्फुरद आणि 25 किलो पालाश यात 110 किलो युरिया अधिक 126 किलो सिंगल सुपर फॉस्फेट अधिक 42 किलो म्युरेट ऑफ पोटॅश प्रत्येक हेक्टरी या खत मात्रेची शिफारस केली आहे. कोरडवाहू रब्बी ज्वारीला खताची संपूर्ण मात्रा पेरणीच्या वेळी द्यावे. परंतू रब्बी ज्वारी ओलिताखाली घ्यावयाची असल्यास 80 किलो नत्र, 40 किलो स्फुरद आणि 40 किलो पालाश यात 200 किलो सुफला २०:२०:०० अधिक 76 किलो  म्युरेट ऑफ  पोटॅश अथवा 87 किलो युरिया अधिक 250 किलो सिंगल सुपर फॉस्फेट अधिक 76 किलो म्युरेट ऑफ पोटॅश प्रति हेक्टरी द्यावे. यापैकी 40 किलो नत्र, संपूर्ण स्फुरद व पालाश पेरणीसोबतच द्यावे व उरलेली 40 किलो नत्राची मात्रा 78 किलो युरिया पिक 25 ते 30 दिवसांचे असताना द्यावे. वरखत देताना जमिनीत पुरेसा ओलावा असल्याची खात्री करून द्यावी. मृद चाचणीत आवश्यकता भासल्यास पालाशची मात्रा द्यावी.

रब्बी ज्वारीची पेरणी साधारणत: 25 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर यादरम्यान करावी. पेरणीस उशीर झाल्यास मुरमाशीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. त्यामुळे झाडांची योग्य ती संख्या मिळत नाही. रब्बी ज्वारीसाठी प्रति हेक्टरी 7.5 ते 10 किलो प्रमाणित बियाणे पुरेसे आहे. पेरणी 45 सेंमी म्हणजेच 1.5 फुटाच्या तिफणीने करावी. पेरणीसाठी दोन चाड्याच्या तिफणीचा उपयोग करावा, जेणे करून पेरणीसोबतच खते देणे सोईचे होईल. पेरणीपासून 15  ते 20 दिवसांनी  विरळणी करावी.  त्यासाठी  दोन  झाडातील अंतर  15 ते 20 सेंमी ठेवावे. हेक्टरी झाडांची संख्या 1.50 लाखापर्यत ठेवावी. विरळणी करताना खोडमाशी ग्रस्त रोपे काढावीत.

ओलीताचे व्यवस्थापन करताना रब्बी ज्वारीला ओलिताची अत्यंत आवश्यकता असते. रब्बी  हंगामात पावसाचे प्रमाण  फार  कमी  असते. त्यामुळे पाण्याच्या उपलब्धतेनुसार पिकाच्या विविध अवस्थेत पाण्याचे योग्य व्यवस्थापन करावे. पिकांची जोमदार वाढीची सुरुवात ही 35 ते 40 दिवसांनी होत असते. पिक हे पोटरीत येण्याचा काळ हा 60 ते 65 दिवसांचा असतो. पिक फुलोऱ्यात येण्याचा काल हा 70 ते 75 दिवसाचा असून दाणे भरण्याचा काळ हा 85 ते 95 दिवसाचा आहे. 

ज्वारीच्या पिकाची वेळोवेळी आंतरमशागत करून पिक 40-45 दिवसाचे होईपर्यत 2-3 कोळपण्या घ्याव्यात आणि एक-दोन वेळा खुरपणी करावी. रब्बी ज्वारीचे पिक परिपक्व झाल्यावर ताबडतोब कापणी व मळणी करावी. ज्यामुळे ज्वारी खराब होणार नाही. ज्वारी साठवणुकीच्या वेळी दाण्यातील ओलाव्याचे प्रमाण 10 ते 20 टक्क्याच्या वर असू नये. शेतकऱ्यांनी रब्बी ज्वारी लागवड तंत्रज्ञानाचा उपयोग करून लागवड करावी, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांनी केले आहे.

00000

कृषि विभागाकडून रब्बी मका पिक लागवडीसाठी मार्गदर्शन

            बुलडाणा, दि. 28 : जिल्ह्यात रब्बी हंगामात मका पिकाची लागवड करण्यात येते. या पिकाची लागवड करण्यासाठी कृषि विभागाकडून मार्गदर्शन करण्यात येते. या मार्गदर्शनाचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

मका हे राज्याचे महत्वाचे पिक आहे. या पिकाखाली सुमारे 7.08 लक्ष हेक्टर क्षेत्र आहे. पिकाची सरासरी हेक्टरी उत्पादकता 1 हजार 928 किलो प्रती हेक्टर आणि उत्पादन 13.65 लक्ष टन आहे. तृणधान्य पिकांच्या उत्पादनामध्ये गहू आणि भात या पिकानंतर मक्याचा जगात तिसरा क्रमांक आहे. अन्न धान्याव्यतिरीक्त मक्याचा उपयोग लाह्या, ब्रेड, स्टार्च, सायरप, अल्कोहोल, अँसिटीक व लॅटीक अँसिड, ग्लुकोज, डेक्स्ट्रोज, प्लॅस्टीक धागे, गोंद, रंग, कृत्रिम रबर, रेग्जीन तसेच बुट पॉलीश आदी पदार्थ तयार करण्यासाठी होतो.

मका पिकासाठी हवामान हे उष्ण, समशीतोष्ण आणि शीत (थंड) अशा वेगवेगळ्या हवामानाशी समरस होण्याची क्षमता असणारे पीक आहे. समुद्र सपाटीपासून ते 2700 मीटर उंचीच्या ठिकाणी देखील मका लागवड करता येते. परंतू पिक वाढीच्या कोणत्याही काळात धुक्याचे हवामान मक्यास मानवत नाही. मका उगवणीसाठी 18 डिग्री सेल्सियस तापमान योग्य आहे, त्यापेक्षा कमी तापमान असल्यास थंड आणि ओलसरपणामुळे अनेक रोगांचा प्रादुर्भाव होऊन पिकाच्या उगवणीवर प्रतिकुल परिणाम होतो.

मका पिकाच्या योग्य वाढीसाठी 25 ते 30 डिग्री सेल्सियस तापमान चांगले असते. परंतु जेथे सौम्य तापमान 20 ते 25 डिग्री सेल्सियस आहे, अशा ठिकाणी मका पिक वर्षभर घेता येते. 35 डिग्री सेल्सियसपेक्षा अधिक तापमान असल्यास पीक उत्पादनात घट येते. परागीभवनाचे वेळी अधिक तापमान आणि आर्द्रता कमी असल्यास त्याचा विपरीत परिणाम परागीभवन आणि फलधारणेवर होऊन उत्पादनात घट येते.

जमीन

मक्यासाठी मध्यम ते भारी, खोल, रेतीयुक्त, उत्तम निचऱ्याची, अधिक सेंद्रिय पदार्थ आणि जलधारणा शक्ती असलेली जमीन चांगली असते. विशेषतः नदीकाठच्या गाळाच्या जमिनीत हे पिक फार चांगले येते. परंतु अधिक आम्ल सामू 4.5 पेक्षा कमी आणि चोपण अगर क्षारयुक्त 8.5 पेक्षा अधिक सामू असलेल्या जमिनीत मका घेऊ नये. तसेच दलदलीची जमीनसुद्धा टाळावी. पिकासाठी जमिनीचा सामू 6.5 ते 7.5 दरम्यान असावा.

पूर्वमशागत

जमिनीची खोल 15 ते 20 सेंमी नांगरट करावी. पिकाची धसकटे, अवशेष, काडीकचरा आदी खोल नांगरटीमुळे जमिनीत गाडल्याने जमिनीत सेंद्रिय पदार्थ मिळतो व जमिनीचा पोत सुधारतो. कुळवाच्या 2-3 पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी. शेवटच्या कुळवाच्या पाळीच्या वेळी हेक्टरी 10 ते 12 टन साधारणत: 25 ते 30 गाड्या चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत जमिनीत चांगले मिसळावे. हिरवळीचे खत जमिनीत गाडले असल्यास शेणखताची आवश्यकता भासत नाही.

सुधारीत वाण

सुधारित वाणांचा वापर केल्यास अधिक उत्पादन मिळते. मक्याच्या संमिश्र व संकरीत जाती या स्थानिक वाणांपेक्षा 60 ते 80 टक्के अधिक उत्पादन देतात. विविध कालावधीमध्ये पक्व होणाऱ्या मक्याच्या संमिश्र आणि संकरीत जाती उपलब्ध असून पाऊस आणि जमिनीच्या मगदुराप्रमाणे योग्य वाणाची निवड करावी.

पेरणीची वेळ

मका हे खरीप, रब्बी आणि उन्हाळी हंगामात घेतले जाते. खरीप हंगामात जून ते जुलै दुसरा आठवडा खरिपातील पेरणीस उशीर करू नये, उशीर झाल्यास खोडकिडीचा प्रादुर्भाव होतो. त्यामुळे रोपांची संख्या योग्य राहत नाही. रब्बी हंगामात 15 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर, उन्हाळी हंगामात जानेवारी ते फेब्रुवारी दुसऱ्या आठवड्यात पेरणी करावी. धान्य पिकासाठी 15-20 किलो बियाणे प्रती हेक्टरी चारा पिकासाठी 75 किलो बियाणे प्रती हेक्टरी उपयोगात आणावे.

पेरणीची पद्धत

पेरणी टोकण पद्धतीने करावी. सरी वरंब्यावर पेरणी करावयाची असल्यास सरीच्या बगलेत मध्यावर एका बाजूला जातीपरत्वे अंतर ठेऊन पेरणी करावी. उशिरा आणि मध्यम कालावधीत पक्व होणाऱ्या जातींसाठी 75 सेंमी अंतरावर मार्करच्या साह्याने ओळी आखून 20 ते 25 सेंमी अंतरावर टोकण करावी. लवकर तयार होणाऱ्या जातींसाठी दोन ओळींत 60 सेंमी आणि दोन रोपात 20 सेंमी अंतर ठेवून टोकण करावी. रब्बी हंगामात मक्याची पेरणी 60 सेंमी अंतरावर काढलेल्या सरीच्या बगलेत निम्म्या उंचीवर एका बाजूला 20 सेंमी अंतरावर 2 बिया 4-5 सेंमी खोल टोकण करून करावी. एक हेक्टर पेरणीसाठी 15-20 किलो बियाणे लागते. अश्याप्रकारे काढणीच्या वेळी प्रति हेक्टरी 90 हजार रोप संख्या मिळते आणि परिणामी अधिक उत्पन्न मिळते.

शेतकऱ्यांनी कृषि विभगाच्या सल्ल्याने मका पिकाची लागवड करावी, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांनी केले आहे.

00000

वैयक्तिक शेततळे योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

बुलडाणा, दि. 28 : मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेंतर्गत वैयक्तिक शेततळे ही योजना कृषी विभागातर्फे राबविण्यात येत आहे. या योजनेसाठी शेतकऱ्यांनी अर्ज करावा, असे आवाहन कृषि विभागातर्फे करण्यात आले आहे.

जिल्ह्यात योजनेतून आतापर्यंत 62 शेततळे पूर्ण झाले आहेत. सध्याच्या पावसाच्या खंड काळात शेततळ्यामध्ये जमा झालेल्या पाण्याचा खरीप पिके, फळबागांच्या संरक्षित सिंचनासाठी उपयोग होत आहे. या योजनेत सहभागी होण्याकरिता शेतकऱ्यांकडे किमान 0.40 हेक्टर क्षेत्र असणे आवश्यक आहे. क्षेत्र धारणेस कमाल मर्यादा नाही. तसेच अर्जदार शेतकऱ्यांनी पूर्वी मागेल त्याला शेततळे, सामूहिक शेततळे यासह इतर कुठल्याही शासकीय योजनेतून शेततळे घटकाकरिता शासनाच्या अनुदानाचा लाभ घेतलेला नसणे आवश्यक आहे.

सध्याची पाणीटंचाईची परिस्थिती पाहता भविष्यात फळबाग वाचवण्यासाठी सध्या उपलब्ध असलेली विहीर आणि बोअरवेलचे, तसेच परतीच्या पावसाद्वारे उपलब्ध होणारे पाणी अस्तरीकरणासह शेततळे योजनेचा लाभ घेऊन साठवणे गरजेचे आहे. या योजनेतून अस्तरीकरणाशिवाय शेततळ्यासाठी 75 हजार रुपयांपर्यंत आणि अस्तरीकरणासह शेततळ्यासाठी 1 लाख 50 हजार रुपयांपर्यंत अनुदान मिळते. काम पूर्ण झाल्यानंतर 15 दिवसांच्या आत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर हे अनुदान जमा करण्यात येते.

शेततळे योजनेतून संरक्षित सिंचन शेतीला मिळावे हा योजनेचा मुख्य उद्देश आहे. यापूर्वी शेततळ्याचा लाभ घेतलेला नसलेल्या जिल्ह्यातील फळबागधारक शेतकऱ्यांनी राज्य शासनाच्या महाडीबीटी पोर्टलवर सीएससी केंद्रामार्फत किंवा वैयक्तिकरित्या ऑनलाईन नोंद करून मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेंतर्गत वैयक्तिक शेततळे योजनेचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी कृषी सहाय्यक, तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, मनोजकुमार ढगे यांनी केले आहे.

00000

सीईटी, जेईई, नीटची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना टॅबचे वितरण

बुलडाणा, दि. 28 : जिल्ह्यातील एमएच-सीईटी, जेईई, नीट 2025ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना टॅबचे वितरण करण्यात येणार आहे. येळगाव येथील ज्योतिबा फुले समाजकार्य महाविद्यालयात शुक्रवार, दि. 29 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 10 वाजता हा कार्यक्रम होणार आहे.

यावेळी आमदार संजय गायकवाड, जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते, पोलीस अधिक्षक सुनील कडासने उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमास पात्र विद्यार्थी आणि पालकांनी आवश्यक मुळ आणि झेरॉक्स कागदपत्रांसह उपस्थित राहावे, असे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त डॉ.अनिता राठोड यांनी केले आहे.

0000000

सोमवारी लोकशाही दिनाचे आयोजन

बुलडाणा, दि. 28 : दर महिन्यात जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार ऑक्टोबर 2023 महिन्याचा लोकशाही दिन मंगळवार, दि. 3 ऑक्टोबर 2023 रोजी दुपारी 1 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आला आहे.

तक्रारदारांनी लोकशाही दिनी उपस्थित राहावे, उपस्थित राहणे शक्य नसल्यास तक्रारी रजिस्टर पोस्टाने लोकशाही दिनाआधी जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचतील अशाप्रकारे पाठवाव्यात, असे निवासी उपजिल्हाधिकारी शरद पाटील यांनी कळविले आहे.

00000

दिव्यांग लाभार्थ्यांसाठी मिनी पिठाची गिरणी पुरविण्याची योजना

बुलडाणा,दि. 28 : जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागातर्फे 5 टक्के दिव्यांग कल्याण योजनेंतर्गत सन 2023-24 या वित्तिय वर्षासाठी ग्रामीण भागातील दिव्यांग लाभार्थ्यांसाठी मिनी पिठाची गिरणी पुरविण्याची योजना घेण्यात आली आहे.

या योजनेचे अर्ज पंचायत समितीस्तरावर उपलब्ध करुन देण्यात आले आहे. सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी ग्रामीण भागातील दिव्यांग लाभार्थ्यांनी परिपूर्ण अर्ज अनुषंगिक सर्व कागदपत्रांसह संबंधित गट विकास अधिकारी, पंचायत समिती कार्यालयामध्ये दि. 10 ऑक्टोबर 2023 पर्यंत सादर करावेत. सदर योजनेचा लाभ ग्रामीण भागातील दिव्यांग लाभार्थ्यांनी घ्यावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते, जिल्हा समाज कल्याण अधिकारी मनोज मेरत यांनी केले आहे.

00000           

स्टँड अप इंडिया योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

बुलडाणा, दि. 28 : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत केंद्र शासनाच्या स्टँड अप इंडिया योजनेचा अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील नवउद्योजक लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. यासाठी दि. 15 ऑक्टोबर पर्यंत अर्ज सादर करावे लागणार आहे.

स्टँड अप इंडिया योजनेसाठी अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकातील नवउद्योजकांनी आवश्यक कागदपत्रे सादर करावीत. यात उद्योग आधार नोंदणी पत्र, जात प्रामणपत्र व बँकेचे कर्ज मंजुरीचे पत्र इत्यादी कागदपत्रे सादर करावीत. योजनेत सवलतीस पात्र नवउद्योजकांनी 10 टक्के स्व हिस्सा भरणा केल्यानंतर आणि बँकेने अर्जदारास स्टॅड अप इंडिया योजनेंतर्गत 75 टक्के कर्ज मंजूर केल्यानंतर उर्वरित 15 टक्के राज्य शासनामार्फत देण्यात येईल.

जिल्ह्यातील अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकातील नवउद्योजकांनी परिशिष्ट अ, नमुना अर्ज भरून द्यावा. अर्जात माहिती नमूद करुन त्यासह आवश्यक कागदपत्रे जोडून सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयास दि. 15 ऑक्टोबर 2023 पर्यंत सादर करावे, असे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त डॉ. अनिता राठोड यांनी केले आहे.

00000

शुक्रवारचे दिव्यांग तपासणी शिबीर रद्द

बुलडाणा, दि. 28 : जिल्हा रूग्णालयात नियमितपणे दिव्यांग तपासणी शिबी घेण्यात येते. मात्र शुक्रवार, दि. 29 सप्टेंबर 2023 रोजी तपासणीच्या दिवशी स्थानिक सुट्टी असल्यामुळे शिबीर रद्द करण्यात आले आहे.

जिल्हा रुग्णालयात नियमित शुक्रवारी मतिमंद, मनोरूग्ण, कान, नाक, घसा व नेत्र संबंधित दिव्यांग बोर्ड सुरू असते. मात्र शुक्रवार, दि. 29 सप्टेंबर 2023 रोजी ईद-ए-मिलाद निमित्त शासकीय सुट्टी असल्यामुळे या दिवशीचे दिव्यांग तपासणी शिबीर रद्द करण्यात आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी अस्थीव्यंग तपासणीसाठी येऊ नये, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी केले आहे.

00000

वैयक्तिक लाभाच्या योजना अर्ज दाखल करण्यासाठी मुदतवाढ

बुलडाणा, दि. 28 : जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागातर्फे सन 2023-24 या वितीय वर्षात विशेष घटक योजनेंतर्गत ग्रामीण भागातील महिलांना 90 टक्के अनुदानावर वैयक्तिक लाभाच्या योजना राबविण्यात येत आहेत, त्याबाबत पुर्वी लाभार्थ्यांकडून दि. 29 सप्टेंबर 2023 पर्यंत अर्ज मागविण्यात आले होते. यासाठी आता दि. 5 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

अनुसूचित जाती प्रवर्गातील महिलांना पिठाच्या चक्कीकरीता 90 टक्के अनुदान. अनुसूचित जाती प्रवर्गातील महिलांना शिलाई मशीनकरीता 90 टक्के अनुदान. अनुसूचित जाती प्रवर्गातील महिलांना मसाला उद्योग यंत्राकरीता 90 टक्के अनुदान. अनुसूचित जाती प्रवर्गातील महिलांना मिनी दालमिल यंत्राकरीता 90 टक्के अनुदान देण्यात येणार आहे.

या योजनेकरीता अर्ज घेण्याकरीता दि. 5ऑक्टोबर 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. विशेष घटक योजनेंतर्गत ग्रामीण भागातील महिलांना 90 टक्के अनुदानावर वैयक्तिक लाभाच्या उपरोक्त योजनेचे अर्ज पात्र लाभार्थ्यांकडून दि. 5 ऑक्टोबर 2023 पर्यंत एका‍त्मिक बालविकास सेवा योजना, ग्रामीण प्रकल्प कार्यालयाकडे सादर करावेत, असे आवाहन बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केले आहे.

000000

No comments:

Post a Comment