विशेष लेख : अनाथ बालकांच्या पालकत्वासाठी प्रतिपालकत्व योजना

 

विशेष लेख :

अनाथ बालकांच्या पालकत्वासाठी प्रतिपालकत्व योजना

प्रत्येक बालकाला प्रेमळ कुटुंब मिळावे, हा त्याचा अधिकार आहे. बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम आणि नियमांच्या तत्वानुसार प्रत्येक मुलाला घर मिळावे, कुटुंबात मुलांचे संगोपन व्हावे आणि अनाथालय, बालआश्रम, बालगृह, निरीक्षणगृह हे समाजातील दुर्लक्षित आणि देखभालीची आवश्यकता असणाऱ्या बालकांसाठी शेवटचा पर्याय असावा, हे कायद्याचे तत्व आहे. मात्र समाजातील अनेक बालके बेसहारा व निराश्रीत होऊन संस्थेत राहुन आपले जीवन जगत असतात. अशा बालकांना कौटुंबिक वातावरण मिळावे यासाठी प्रतिपालकत्व योजना राबविण्यात येत आहे.

केंद्र शासनाने बालकाची काळजी व संरक्षणासाठी बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम 2015 व सुधारित 2021 कार्यान्वित केला आहे. या कायद्यातील कलम 2 मध्ये विधीसंघर्षग्रस्त बालक आणि काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या बालकांना यथासंभव त्यांना आवश्यक सुविधा पुरवून पुनर्वसनाद्वारे त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याबाबत तरतूद करण्यात आली आहे. या बालकांच्या पुनर्वसनाकरीता संस्थेंतर्गत आणि संस्थाबाह्य अशा दोन प्रकारे सुविधा पुरवून विकास करायचा प्रयत्न करण्यात येत आहे.

अर्जदारांसाठी पात्रता: अर्जदारांसाठी काही पात्रता निकष ठरविण्यात आले आहेत. त्यानुसार अर्जदार हे शारीरिक, मानसिक, भावनिक व आर्थिकदृष्ट्या सक्षम असावेत, अर्जदारांना कोणतीही जीवघेणी वैद्यकीय स्थिती नसावी, अर्जदार हे कोणत्याही स्वरुपाच्या गुन्हेगारी कृत्यामध्ये किंवा कथितरित्या दोषी नसावे, विवाहित जोडप्याच्या बाबतीत दोन्ही जोडीदारांची संमती असणे आवश्यक आहे. एकल महिला ही मुलगा किंवा मुलगी दोन्ही पैकी कोणाचेही निवड करु शकते, परंतु एकल पुरुष फक्त मुलाची निवड करु शकतो.  अर्जदार हे प्रेमळ, काळजी घेणारे आणि मुलाच्या वाढीसाठी फायदेशीर असे कौटुंबिक वातावरण तयार करण्यासाठी वचनबध्द असणे गरजेचे आहे.

मुलांचे पालनपोषण करण्यासाठी वयाचे निकष:- सहा वर्षापेक्षा जास्त आणि 12 वर्षापर्यंतचे मुले असल्यास समिश्र विवाहित जोडी अर्जदारांचे किमान वय हे 70 वर्ष, तर एकल वय-35 वर्ष असावे आणि कमाल वय 110 वर्ष, एकल वय -55 वर्ष असावे. 12 वर्षापेक्षा जास्त आणि 18 वर्षापर्यंतचे मुले असल्यास संमिश्र विवाहित जोडी अर्जदारांचे वय किमान 70 वर्ष, तर एकल वय 35 वर्ष आणि कमाल 115 वर्ष-एकल वय-60 वर्ष असावे.

अर्ज कसा आणि कुठे करावा- मुलांचे संगोपन करण्यास इच्छुक पालकांनी carings.wcd.gov.in या ऑनलाईन पोर्टलवर नोंदणी करुन पालकांनी पोर्टलवरील मार्गदर्शक तत्वांच्या अनुसूची 1 नुसार आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे.

अर्ज केल्यानंतरची प्रक्रिया- ऑनलाईन अर्ज केल्यानंतर सदर अर्ज हा जिल्हा बाल संरक्षण कक्ष यांचे पोर्टला दिसल्यानंतर अर्जाची पडताळणी होईल. सदर अर्जाची पडताळणी झाल्यानंतर जिल्हा बाल संरक्षण कक्षामार्फत नमुना 30 नुसार गृह अभ्यास अहवाल पूर्ण केला जाईल. गृह भेट अहवाल पोर्टलवर अपलोड केल्यानंतर अर्जदारांनी निवडलेल्या बालक किंवा बालिका यांची योग्यतेची शिफारस बाल कल्याण समिती, बुलढाणा यांच्याकडे करावी. सदर शिफारसी नंतर बाल कल्याण समिती मार्फत पालकांना बालक, बालिका पालनपोषणासाठी देण्यात येईल.

पालनपोषणाचा कालावधी- अल्पकालीन प्रायोजकत्वाचा कालावधी हा एक वर्ष असेल तर, दिर्घ कालवधी हा एक वर्षापेक्षा जास्त आणि पालक कुटुंबाशी मुलाच्या सुसंगततेच्या मुल्यांकनाच्या आधारे बालक, बालिका वयाच्या 18 वर्षापर्यंत ठेवता येईल.

प्रायोजकत्वाची समाप्ती- बाल कल्याण समिती, प्रायोजकत्व आणि प्रतिपालकत्व मंजुरी समितीची शिफारस आणि जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या अहवालावर विचार केल्यानंतर पालनपोषणाची नियुक्ती समाप्त करण्याचा अधिकार राहील.

कायमस्वरुपी दत्तक विधान- अर्जदारांनी प्रतिपालकत्व योजनेअंतर्गत जर बालक, बालिका पालनपोषणासाठी घेतलेले असेल आणि पालकांच्या काळजीच्या कालावधीत मुलांचे पालनपोषण कुटुंबासोबत चांगल्याप्रकारे जुळवुन घेतलेल्या प्रकरणांमध्ये आणि पालक कुटुंब व पालनपोषणासाठी असलेले बालक, बालिका दोघेही दोन वर्षाच्या कालावधीनंतर दत्तक घेण्यास पात्र असु शकतात.

अधिक माहितीसाठी जिल्हा बाल संरक्षण कक्ष, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, बस स्टँड मागे, मुठ्ठे ले आऊट, डॉ जोशी नेत्रालय, बुलढाणा येथे किंवा दुरध्वनी क्रमांक 02762-299366, dcpubuldana@gmail.com या मेलवर संपर्क साधावा.

: संकलन :

सतिश आनंदराव बगमारे

माहिती सहायक,

जिल्हा माहिती कार्यालय, बुलढाणा

0000000000

 

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

स्वयं अर्थसहाय्यिता नवीन शाळांना मान्यता व दर्जावाढीची शिफारस; हरकती मागविल्या