स्व. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना
स्व. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान
योजना
बुलढाणा,दि.
12(जिमाका) : शेती व्यवसाय करताना होणारे अपघात, वीज पडणे, पूर,
सर्पदंश, विंचू दंश, विजेचा शॉक आदी नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे अपघात, रस्त्यावरील
अपघात, वाहन अपघात, अन्य कोणत्याही कारणामुळे होणाऱ्या अपघातामुळे शेतकऱ्यांचा मृत्यू
झाल्यास स्व. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेतून लाभ देण्यात
येतो.
अपघातामुळे मृत्यू ओढावतो किंवा काहींना अपंगत्व येते.
कर्त्या व्यक्तीस झालेल्या अपघातामुळे कुटुंबाच्या उत्पन्नाचे साधन बंद होऊन अडचणीची
परिस्थिती निर्माण होते. अशा अपघातग्रस्त शेतकरी, त्यांच्या कुटुंबास आर्थिक लाभ देण्याकरिता
राज्यातील सर्व वहितीधारक खातेदार शेतकरी आणि वहितीधारक खातेदार म्हणून नोंद नसलेले
शेतकऱ्याच्या कुटुंबातील कोणत्याही एका सदस्यास आई-वडील, शेतकऱ्याची पती, पत्नी, मुलगा
आणि अविवाहित मुलगी यापैकी कोणत्याही एका व्यक्ती 10 ते 75 वर्षे वयोगटातील एकूण दोन
जणांकरीता गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना राबविण्यात येत
आहे. सदर योजना 19 एप्रिल 2023 पासून राबविण्यात येत आहे. गोपीनाथ मुंडे अपघात सुरक्षा
सानुग्रह अनुदान योजनेंतगत सन 2024-25 या वर्षात जानेवारीपर्यंत 196 प्रस्ताव मंजूर
करण्यात आले आहे.
योजनेच्या प्रयोजनार्थ कुटुंबातील वहितीधारक खातेदार म्हणून
नोंद नसलेले एक सदस्यांमध्ये आई-वडील, शेतकऱ्याची पती, पत्नी, मुलगा व अविवाहीत मुलगी
यांचा समावेश ग्राह्य धरण्यात येणार आहे. कृषि गणनेनुसार निर्धारित केलेल्या वहितीधारक
खातेदार शेतकरी आणि वहितीधारक खातेदार म्हणून नोंद नसलेले शेतकऱ्यांच्या कुटुंबातील
कोणताही एक सदस्य असे एकूण दोन जणांकरीता गोपीनाथ मुंडे शेतकरी सुरक्षा सानुग्रह अनुदान
योजनेंतर्गत लाभ देण्यात येतो. यात अपघाताच्या बाबीमध्ये आर्थिक सहाय्यात अपघाती मृत्यू
झाल्यास दोन लाख रूपये, अपघातामुळे दोन डोळे अथवा दोन हात किंवा दोन पाय निकामी झाल्यास
दोन लाख रूपये, अपघातामुळे एक डोळा व एक हात किंवा एक पाय निकामी झाल्यास दोन लाख रूपये,
अपघातामुळे एक डोळा अथवा एक हात किंवा एक पाय निकामी झाल्यास एक लाख रूपये अनुदान देण्यात
येते.
अपघातांचा समावेश असणाऱ्या बाबी : अपघातामध्ये रस्ता,
रेल्वे अपघात, पाण्यात बुडून मृत्यू, जंतूनाशके हाताळताना अथवा अन्य कारणामुळे विषबाधा,
विजेचा धक्का बसल्यामुळे झालेला अपघात, वीज पडून मृत्यू, खून, उंचावरुन पडून झालेला
अपघात, सर्पदंश व विंचूदंश, नक्षलवाद्याकडून झालेल्या हत्या, जनावरांचा हल्ला, चावण्यामुळे
जखमी किंवा मृत्यू, बाळंतपणातील मृत्यू, दंगल, अन्य कोणताही अपघात, या अपघाताच्या बाबींचा
समावेश आहे.
अपघातांचा समावेश नसणाऱ्या बाबी: अपघातामध्ये नैसर्गिक
मृत्यू, विमा कालावधीपुर्वीचे अपंगत्व, आत्महत्येचा प्रयत्न, आत्महत्या किंवा जाणीवपूर्वक
स्वतःला जखमी करुन घेणे, गुन्ह्याच्या उद्देशाने कायद्याचे उल्लंघन करताना झालेला अपघात,
अंमली पदार्थाच्या अंमलाखाली असताना झालेला अपघात, भ्रमीष्टपणा, शरीरांतर्गत रक्तस्त्राव,
मोटार शर्यतीतील अपघात, युद्ध, सैन्यातील नोकरी, जवळच्या लाभधारकाकडून खून याबाबींचा
समावेश राहणार नाही.
आवश्यक कागदपत्रे : या योजनेंतर्गत लाभ प्राप्त होण्यासाठी
अर्जासोबत सातबारा उतारा, मृत्यूचा दाखला, शेतकऱ्यांचे वारस म्हणून गावकामगार तलाठ्याकडील
गाव नमुना नं. सहा क नुसार मंजूर झालेली वारसाची नोंद, वारसदाराचे ओळखपत्र, आधार कार्ड,
पॅन कार्ड, बँक पासबुक, निवडणूक ओळखपत्र, अपघातग्रस्ताचा वयाचा दाखला ज्यात जन्म दाखला,
शाळा सोडल्याचा दाखला, शाळेच्या मुख्याध्यापकाचे प्रमाणपत्र, ग्रामपंचायतीचे प्रमाणपत्र,
आधार कार्ड, पॅन कार्ड, वाहन चालविण्याचा परवाना, पारपत्र, निवडणूक ओळखपत्र यापैकी
कोणतेही एक कागदपत्र, प्रथम माहिती अहवाल, घटनास्थळ पंचनामा, पोलिस पाटील माहिती अहवाल,
अपघाताच्या स्वरूपानुसार अंतिम विमा प्रस्तावासोबत सादर करावयाची कागदपत्रे सादर करावी
लागणार आहे.
अपघातग्रस्त शेतकरी, शेतकऱ्यांचे वारसदारांनी सर्व निर्धारीत
कागदपत्रांसह परिपूर्ण प्रस्ताव संबंधीत तालुका कृषि अधिकारी यांच्याकडे 30 दिवसाच्या
आत सादर करावे लागणार आहे. यासाठी कृषि विभागाच्या सर्व क्षेत्रिय अधिकारी, कर्मचारी
यांचे मार्गदर्शन करतील. योजनेंतर्गत वारसदाराची निवड अपघातग्रस्ताची पत्नी, अपघातग्रस्त
स्त्रिचा पती, अपघातग्रस्ताची अविवाहित मुलगी, अपघातग्रस्ताची आई, अपघातग्रस्ताचा मुलगा,
अपघातग्रस्ताचे वडील, अपघातग्रस्ताची सून, अन्य कायदेशीर वारसदार याप्रमाणे करण्यात
येणार आहे.
000000
Comments
Post a Comment