DIO BULDANA NEWS 27.05.2024
जिल्ह्यात दिव्यांग, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाचे सर्व्हेक्षण
सर्व्हेक्षणास नागरिकांनी सहकार्य करावे
-जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील
बुलडाणा, दि. 27 : जिल्ह्यातील दिव्यांग आणि आत्महत्याग्रस्त कुटुंबाचे सर्व्हेक्षण करण्यात येत येत आहे. आशा आणि अंगणवाडी सेविकांच्या मदतीने औरंगाबाद येथील महात्मा गांधी सेवा संघ घरोघरी जाऊन प्रत्येक कुटुंबाचे सर्व्हेक्षण करीत आहे. यातून जिल्ह्यातील दिव्यांग, एकल महिला, परितक्त्या आणि आत्महत्याग्रस्त कुटुंबाची स्थिती समोर येण्यास मदत होणार आहे. नागरिकांनी या सर्व्हेक्षणास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.
जिल्ह्यात सर्व्हेक्षण करताना मागील काळात कुटुंबातील सदस्यानी केलेली आत्महत्या, आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचा व्यवसाय, आत्महत्येचे कारण, आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे वय, आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीला असणारी मुले व मुली, आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीच्या पत्नी किंवा पतीचे नाव, कुटुंबात असणाऱ्या एकल महिला, विधवा, परित्यक्ता, तृतीयपंथी यांच्याबाबत माहिती घेण्यात येणार आहे.
दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, २०१६ नुसार दिव्यांग व्यक्तींचे २१ प्रकार निश्चित करण्यात आले आहेत. त्यानुसार दिव्यांग व्यक्तीच्या संख्येत लक्षणीय वाढ झालेली आहे. तसेच कायदा लागू झाल्यानंतर दोन वर्षात राज्यातील सर्व दिव्यांग विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण करण्याचे सूचित केले आहे. त्याचप्रमाणे राज्य शासन आणि स्थानिक स्वराज्य संस्थांनी दिव्यांग व्यक्तीसाठी आरोग्य सुविधा, तसेच दिव्यांगत्व प्रतिबंधात्मक उपाय करण्यासाठी उपक्रम, योजना तयार कराव्यात. त्यानुसार दिव्यांगाचे सर्वेक्षण, तपासणी आणि दिव्यांगत्वाचे कारण शोधण्यासाठी संशोधन करण्यात येणार आहे.
दिव्यांगांच्या एकूण लोकसंख्येची किंवा त्यांची सामाजिक-आर्थिक स्थिती शासनाकडे अचूक नोंद उपलब्ध होण्यासाठी सदर सर्वेक्षण उपयुक्त ठरणार आहे. या सर्वेक्षणातून माहितीच्या आधारे दिव्यांग व्यक्तीच्या सर्वांगिण विकासाकरिता विविध उपक्रम व योजनांचे नियोजन करण्यात येणार आहे. दिव्यांग व्यक्तीकरीता योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी माहितीचे संकलन करणे, दिव्यांग व्यक्ती विषयक संशोधन करण्यासाठी दिव्यांग व्यक्तींच्या समस्या, गरजा ओळखणे व त्यांचे सर्वांगीण पुनर्वसन करुन त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याच्या दृष्टीने माहिती संकलित करण्यासाठी दिव्यांग व्यक्तींचे घरोघरी जावून सर्वेक्षण करण्यात येत आहे.
दिव्यांगांना आरोग्य, रोजगार, स्वयंरोजगार, शिक्षण, प्रशिक्षण, दिव्यांगत्वाचे कारण समजून घेण्याकरिता समाजामध्ये जागरूकता मोहीम राबविणे, लहान वयातच दिव्यांगत्व ओळखून, ते कमी करण्यासाठी, त्याचा शोध घेवून शीघ्र निदान व त्वरीत उपचार करणे, त्यांच्या पुनर्वसनास प्रोत्साहन देणे आदी उपाययोजना करण्यासाठी दिव्यांग व्यक्तींचे सर्वेक्षण सुरू आहे.
दिव्यांग व्यक्तींचे सर्वेक्षण जिल्ह्यातील सर्व शहरे, गावे, वाडी-वस्ती, तांडे व पाड्यामध्ये करण्यात येणार आहे. तसेच सर्व महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत, ग्रामपंचायत, कटक मंडळामध्ये राबविण्यात येणार आहे. सर्व्हेक्षण करण्यासाठी आशा गट प्रवर्तकांकडून गावस्तरावरील आशा, अंगणवाडी सेविकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. यात जनतेचा सहभाग वाढावा, यासाठी लोकप्रतिनिधींनाही सहभागी करण्यात येणार आहे.
000000
शेळी, कुक्कुट, गाय, म्हैस पालन प्रशिक्षण
बुलडाणा, दि. 27 : महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रातर्फे शेळी, कुक्कुट, गाय आणि म्हैस पालन प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. इच्छुकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राद्वारा जिल्हा उद्योग केंद्रामार्फत उद्योग, व्यवसाय सुरु करू इच्छिणाऱ्या सुशिक्षित बेरोजगार युवक, युवतींसाठी बुलडाणा येथे शेळी, कुक्कट, गाय, म्हैस पालन प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन दि. 1 ते 5 जून 2024 या पाच दिवसाच्या कालावधीत करण्यात आले आहे. या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश सुशिक्षित बेरोजगारांनी तंत्रशुद्ध प्रशिक्षण घेऊन स्वत:चा उद्योग व्यवसाय सुरु करावा हा आहे.
सदर प्रशिक्षणात शेळी, कुकुट आणि गाय म्हैस पालनाचे तंत्र आणि प्रकार त्यांच्या जाती, लसीकरण, संशोधन रोग व लक्षणे, खाद्यनिर्मिती व चार्याचे प्रकार व उद्योग सुरु करण्यासाठी संपूर्ण सहकार्य त्यासोबतच उद्योजकता विकास, उद्योग संधी मार्गदर्शन, सहकार्य, शासकीय योजनांची माहिती आदी प्रशिक्षणात मार्गदर्शन तज्ज्ञ व्यक्ती करणार आहे.
प्रशिक्षणात प्रवेश घेऊ इच्छिणारा उमेदवार किमान पाचवी पास, वय १८ ते ५० वर्षे असावे. प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर प्रमाणपत्र दिले जाईल, प्रशिक्षण नोंदणीसाठी दि. १ जून २०२४ पर्यंत कार्यालयीन वेळेत गणेश गुप्ता, प्रकल्प अधिकारी, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, द्वारा जिल्हा उद्योग केंद्र, तहसील कार्यालयाजवळ, चिखली रोड, बुलडाणा संपर्क क्रमांक ८२७५०९३२०१, ९०११५७८८५४ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन विभागीय अधिकारी प्रदीप इंगळे यांनी केले आहे.
00000
नागरिकांनी डाक जीवन विमा योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन
बुलडाणा, दि. 27 : भारतीय डाक विभागामार्फत डाक जीवन विमा व ग्रामीण डाक जीवन विमा या योजनाद्वारे नागरिकांना विमा सुरक्षा देण्यात येतात. याचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन डाक विभागातर्फे करण्यात आले आहे.
यामधील डाक जीवन विमा या कल्याणकारी योजनेची सुरुवात १ फेब्रुवारी १८८४ रोजी करण्यात आली आहे, या योजनेची व्याप्ती वाढविण्यात आली आहे. यात आता केंद्र सरकारचे कर्मचारी, राज्य सरकारचे कर्मचारी, स्थानिक स्वराज्य संस्थाचे कर्मचारी, भारतीय रिझर्व बँक, सरकारी बँक, खासगी बँकेचे कर्मचारी, शैक्षणिक संस्था शाळा, महाविद्यालये, विद्यापीठाचे कर्मचारी, सनदी लेखापाल, वकील, डॉक्टर, एनएससी, बीएससीवर सूचीवद्ध झालेल्या कंपन्यांतील कर्मचारी, सर्व पदवीधर आणि डिप्लोमाधारक यांचा समावेश करण्यात आला आहे.
तसेच ग्रामीण डाक जीवन विमा ही योजना २४ मार्च १९९५ ला ग्रामीण भागातील नागरिकांना विमा सुरक्षा प्रदान करण्यासाठी सुरु करण्यात आली. यामध्ये वय वर्षे १८ ते ५५ या वयोगटातील ग्रामीण भागातील रहिवासी या योजनेचा लाभ घेऊ शकतात. डाक विभागाच्या योजना या कमी प्रीमिअम जास्त बोनस या तत्वावरील आहेत. भारतीय डाक विभागामार्फत चालविल्या जाणाऱ्या या योजना कमी प्रीमिअम जास्त बोनस यामुळे नागरिकांच्या पसंतीस उतरत आहेत. आतापर्यत जवळपास दीड कोटीहून अधिक नागरिकांनी याचा लाभ घेतला आहे. उत्कृष्ट परतावा देणाऱ्या विमा योजनेचा लाभ घेण्याकरिता नागरिकांनी जवळच्या पोस्ट ऑफिसशी संपर्क साधावा, असे आवाहन डाक अधीक्षक गणेश आंभोरे यांनी केले आहे.
000000
खामगाव आयटीआयमधील साहित्य लिलाव रद्द
बुलडाणा, दि. 27 : खामगाव औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रशिक्षणादरम्यान निकामी झालेले हत्यारे, औजारे, साहित्याचा जाहिर लिलाव दि. २२ मे २०२४ रोजी दुपारी ४.३० वाजता संस्थेत ठेवण्यात आला होता. परंतू काही तांत्रिक अडचणीमुळे सदर जाहिर लिलाव पुढील आदेशापर्यत स्थगित करण्यात आला आहे, असे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य, यांनी कळविले आहे.
00000
डाळीचा साठा दर शुक्रवारी नोंदविण्याचे आवाहन
बुलडाणा, दि. 27 : केंद्र शासनाच्या निर्देशानुसार डाळ साठा असणाऱ्यांनी दर शुक्रवारी डाळ साठाची नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती आणि त्याची उपलब्धता याबाबत देखरेख व नियंत्रण करण्यासाठी केंद्र शासनाच्या निर्देशानुसार तूर, उडीद, चना, मसूर आणि मूगाचे व्यापारी, प्रोसेसर, सर्व मिलर्स, मोठे साखळी विक्री आयातदार आदी भागदारकांनी यांच्याकडे उपलब्ध असलेला डाळीचा साठा केंद्र शासनाच्या fcainfoweb.nic.in/psp/ पोर्टलवर नोंदविण्यात यावा. तसेच सदर साठा दर शुक्रवारी अद्यावत करावा.
केंद्र शासनाच्या पोर्टलवर नोदणी केलेले भागधारकांनी जाहिर केलेल्या डाळीचा साठा व प्रत्यक्षात गोदामामध्ये असलेल्या साठ्याच तपासणी करावी. यात तफावत आढळल्यास अहवाल तयार करुन तो समन्वय अधिकारी (डाळी साठा) यांच्या निदर्शनास आणावा, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी केले आहे.
000000
Comments
Post a Comment