DIO BULDANA NEWS 10.05.2024
जिल्हाधिकारी कार्यालयात महात्मा बसवेश्वर जयंती साजरी
बुलडाणा, दि. 10 : जिल्हाधिकारी कार्यालयात आज महात्मा बसवेश्वर जयंती साजरी करण्यात आली.
जयंतीनिमित्त उपजिल्हाधिकारी सुरेश थोरात यांनी प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार, नाझर गजानन मोतेकर, अपेक्षा जाधव, वर्षा मुळे आदी उपस्थित होते. उपस्थितांनी महात्मा बसवेश्वर यांना अभिवादन केले.
000000
शेंदरी बोंड अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू
बुलडाणा, दि. 10 : बुलडाणा जिल्ह्यात खरीप 2017 च्या हंगामात शेंदरी बोंड अळीचा प्रादुर्भाव झाला होता. खरीप 2018 ते 2023 मध्ये राबविण्यात आलेल्या उपाययोजनांमुळे शेंदरी बोंड अळीचा प्रादुर्भाव अत्यल्प प्रमाणात आढळून आला आहे. येत्या खरीप 2024 च्या हंगामामध्ये शेंदरी बोंड अळीचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी क्षेत्रिय पातळीवर आतापासूनच प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येत आहे.
शेंदरी बोंड अळीचा जीवनक्रम खंडीत झाला नसल्यास प्रादुर्भाव वाढत असल्याचे दिसून येते. हंगामपूर्व कापूस लागवड झाल्यास शेंदरी बोंड अळीचा जीवनक्रमास पोषक वातावरण निर्माण होऊन प्रादुर्भाव वाढण्याचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेता खरीप 2024 मध्ये शेंदरी बोंड अळीच्या प्रादुर्भावास आळा घालण्याकरिता शेंदरी बोंड अळीचा जीवनक्रम खंडित होण्यासाठी अनेक उपाययोजनांपैकी एक उपाययोजना म्हणून हंगामपूर्व कापसाची लागवड होणार नाही, यादृष्टीने काळजी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी मान्सूनपूर्व लागवड टाळण्याबाबत आवाहन करण्यात आले आहे.
उपाययोजना म्हणून दि. 16 मे 2024 पासून शेतकऱ्यांना बियाणे उपलब्ध करून प्रत्यक्ष लागवड ही दि. 1 जून 2024 नंतरच केल्यास शेंदरी, गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव प्रभावीपणे नियंत्रित करणे शक्य होईल. याकरिता क्षेत्रीय स्तरावरील कटाक्षाने पालन करण्याबाबत तंत्र अधिकारी, तालुका कृषि अधिकारी, कृषि अधिकारी, सर्व पंचायत समिती यांच्यामार्फत काटेकोर नियोजन करून अंमलबजावणी करण्यात येत आहे. उपविभागीय कृषि अधिकारी यांच्यामार्फत सनियंत्रण ठेवण्यात येणार आहे. शेंदरी बोंड अळीचे चक्र भेदण्यासाठी मान्सूनपूर्व कपाशीची लागवड थांबविण्याबाबत कापूस बियाणे पुरवठा करण्याबाबत दि. 1 ते 10 मे 2024 दरम्यान उत्पादक कंपनी ते वितरक, दि. 10 मे 2024 नंतर वितरक ते किरकोळ विक्रेता, दि. 15 मे 2024 नंतर किरकोळ विक्रेता ते शेतकरी आणि दि. 1 जूननंतर शेतकऱ्यांना प्रत्यक्ष लागवडीचे नियोजन करण्यात आले आहे.
या निर्देशाचे उल्लंघन झाल्यास संबंधीत कंपनी, वितरक, किरकोळ विक्रेता यांच्यावर महाराष्ट्र कापूस बियाणे पुरवठा, वितरण, विक्री व विक्रीच्या किंमतीचे निश्चितीकरण यांचे विनियमन अधिनियम 2009 नुसार कारवाई करण्यात येणार आहे, असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी मनोजकुमार ढगे यांनी कळविले आहे.
00000
शासकीय वसतीगृहात प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन
बुलडाणा, दि. 10 : विद्यार्थ्यांनी शासकीय वसतीगृहात प्रवेश मिळविण्यासाठी येत्या शैक्षणिक वर्षासाठी ऑफलाईन अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील सर्व इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या-जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या जिल्हास्तरावरील मुला-मुलींच्या शासकीय वसतीगृहात प्रवेशित विद्यार्थ्यांना सर्व सोयीसुविधा मोफत पुरविण्यात येतात. सन २०२४-२५ करीता ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यावयाचा आहे, अशा विद्यार्थ्यांनी स्थानिक वसतीगृहात प्रवेशाकरीता सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण विभाग, बुलडाणा येथे अर्ज उपलब्ध असून सदर अर्ज कार्यालय सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण विभाग, बुलडाणा येथे सन २०२४-२५ या शैक्षणिक सत्राकरीता ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करावेत.
संबंधित जिल्हास्तरावरील वसतीगृहात प्रवेशाबाबत इच्छुक विद्यार्थ्यांनी अर्ज भरुन सदर अर्ज आवश्यक कागदपत्रांसह कार्यालय सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण विभाग, सामाजिक न्याय भवन, चिखली रोड, बुलडाणा येथे सादर करावे, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहाय्यक संचालक मनोज मेरत यांनी केले आहे.
00000
मलकापूर, नांदूरा तालुक्यात कलम 144 लागू
बुलडाणा, दि. 10 : रावेर लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी, दि. 13 मे रोजी मतदान होणार आहे. या मतदारसंघात जिल्ह्यातील मलकापूर आणि नांदुरा तालुक्याचा समावेश असल्याने याठिकाणी दि. 11 मे च्या सायंकाळी 6 वाजल्यापासून दि. 13 मे 2024 रोजी मतदानाची प्रक्रीया पूर्ण होईपर्यंत निर्बंध लागू करण्यात आले आहे.
रावेर लोकसभा मतदारसंघात जिल्ह्यातील मलकापूर आणि नांदूरा तालुक्याचा समावेश असल्याने येथे दि. 13 मे 2024 रोजी सकाळी 7 वाजल्यापासून सायंकाळी 6 वाजेपर्यत मतदान होणार आहे. निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेचा जिल्ह्यातील संपूर्ण कार्यक्षेत्रात कोणताही भंग होऊ नये, सदर आचार संहितेचे यथायोग्य पालन होण्यासाठी उपाययोजना करणे आवश्यक असल्याने फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये निर्बंध लागू केले आहेत. तसेच मतदानाच्या दिवशी मतदान केंद्राच्या परिसरात विशेष निर्बंध लागू करण्यात आले आहे. फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (1) नुसार जिल्हादंडाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी रावेर लोकसभा मतदारसंघांतर्गत जिल्ह्यातील मलकापूर आणि नांदुरा तालुक्यात दि. 11 मे 2024 च्या सायंकाळी 6 वाजल्यापासून दि. 13 मे 2024 रोजी मतदानाची प्रक्रीया पूर्ण होईपर्यंत निर्बंध लागू केले आहे.
यामुळे सदर कालावधीत बेकायदेशीर जमाव जमविणे आणि सार्वजनिक प्रचार सभा आयोजनास बंदी राहील. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 करीता मतदान पथके मतदान केंद्रावर पोहचल्यानंतर मतदान केंद्राच्या 200 मीटर परिसरामध्ये ध्वनीक्षेपकांच्या वापरावर पूर्णपणे निर्बंध राहणार आहे. तसेच मतदान केंद्राच्या 200 मीटर त्रिज्येच्या परिसरात कोणत्याही सार्वजनिक किंवा खासगी जागेमध्ये ध्वनीवर्धक किंवा ध्वनीक्षेपक यासारखे मानवी आवाजाचे वर्धन करणाऱ्या किंवा जसाच्या तसा ऐकविणारे उपकरण संच लावणे, वापरणे आणि चालविण्यास प्रतिबंध घालण्यात आले आहे.
मतदारांना पुरविण्यात आलेल्या अनौपचारिक ओळखचिठ्ठया साध्या पांढऱ्या कागदावर असाव्यात व त्यावर कोणतेही चिन्ह, उमेदवाराचे नाव किंवा पक्षाचे नाव मुद्रित करण्यावर बंदी राहणार आहे. मतदान केंद्राच्या 100 मीटर परिसरात निवडणूक कर्तव्यावरील वाहन वगळता इतर सर्व वाहनांना बंदी राहणार आहे. मतदान केंद्रात मतदार, उमेदवार आणि त्यांचे निवडणूक मतदान प्रतिनिधी याव्यतिरिक्त फक्त निवडणूक आयोगाकडून वैध प्राधिकारपत्र मिळवलेल्या व्यक्तीनाच प्रवेश राहणार आहे. या व्यतिरिक्त इतर व्यक्तींना मतदानकेंद्रात प्रवेशावर बंदी असेल. मतदारांना लाच देणे, मतदारावर गैरवाजवी दडपण, मतदारांना धाकदपट दाखविणे, तोतयेगिरी करणे, तसेच मतदान केंद्राचे 100 मीटर परीसरात प्रचार करण्यास बंदी राहणार आहे.
मतदारांना मतदानाचे दिवशी मतदान केंद्रावर ने-आण करण्याचे प्रथेस पायबंद घालण्यासाठी टॅक्सी, खासगी कार, ट्रॅक, ऑटो रिक्शा, मिनी बस, स्टेशन व्हॅन, स्कूटर, मोटार सायकल आदी सर्व प्रकारच्या वाहनावर बंदी राहणार आहे मतदानाच्या दिवशी ओळखचिठ्या वाटपाच्या ठिकाणी किंवा मतदान केंद्राचे परिसरात भित्तीपत्रके, ध्वज, चिन्ह आणि इतर प्रचार साहित्य यांचे प्रदर्शन करण्यास बंदी राहणार आहे. ज्या व्यक्तीच्या सुरक्षिततेला धोका असल्याबाबत खात्री पटल्यामुळे सरकारी सुरक्षा पुरविण्यात आली असेल, अशी कोणतीही व्यक्ती त्याच्या सुरक्षा कर्मचाऱ्यासह मतदारकेंद्राचे 100 मीटर परिसरात प्रवेश करणार नाही. तसेच अशी व्यक्ती मतदार असली तरी निव्वळ मतदान करण्याकरिता सुरक्षा कर्मचाऱ्यासह मतदार केंद्र परिसरात ये-जा करण्यावर निर्बंध राहील. विशेष सुरक्षा व्यवस्था प्रदान केल्या व्यक्तीच्या विशेष सुरक्षा पथकास शस्त्रांसह मतदान केंद्राचे केवळ दारापर्यंत संरक्षित व्यक्तीसोबत जाता येईल. एका वैयक्तिक सुरक्षा अधिकाऱ्यास शस्त्राचे प्रदर्शन न करता, तसेच मतदान प्रक्रियेत कोणत्याही प्रकारे अडथळा न करता संरक्षीत व्यक्तीस मतदान केंद्रात सोबत करता येईल.
ज्या व्यक्तीच्या सुरक्षिततेला धोका असल्याबाबत खात्री पटल्यामुळे सरकारी सुरक्षा पुरविण्यात आली असेल किंवा त्या व्यक्तीकडे खासगी सुरक्षारक्षक आहेत, अशा कोणत्याही व्यक्तीस निवडणूक प्रतिनिधी किंवा मतदान प्रतिनिधी म्हणून नियुक्ती करण्यास बंदी राहील. मतदान केंद्रात मतदानाचे दिवशी मोबाईल, स्मार्टफोन, वायरलेस सेट आदी नेण्यास प्रतिबंध राहिल. मतदान केंद्राध्यक्ष, आचारसंहिता, कायदा व सुव्यवस्था पथक प्रमुख, निवडणूकीच्या कर्तव्यावरील सुरक्षा कर्मचारी यांना सदर प्रतिबंध लागू राहणार नाही.
निर्बंधांचे कालावधीत रावेर लोकसभा मतदारसंघातील मलकापूर आणि नांदुरा तालुक्यामधील निवडणूक प्रचार दि. 11 मे 2024 रोजी सायंकाळी 6 वाजल्यापासून बंद होत असला तरी घरोघरी जाऊन प्रचारावर निर्बंधाचे कालावधीत प्रतिबंध असणार नाही. परंतू 5पेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास प्रतिबंध असेल. दवाखान्याच्या गाड्या, अॅम्बुलन्स, दुधगाड्या, पाण्याचे टँकर्स, विद्युत विभाग, पोलीस, निवडणूक कर्मचारी यांच्या वाहनावर बंदी राहणार नाही. विहित मार्गाने जाणाऱ्या बस गाड्यावर बंदी राहणार नाही. टॅक्सी इत्यादी वाहने बस स्टेशन, रेल्वे स्टेशन हॉस्पीटलकडे जाणारी वाहने यावर बंदी राहणार नाही. दिव्यांग, आजारी व्यक्तीस मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी जाणे-येण्याकरीता आजारी, दिव्यांग व्यक्तीचे वैयक्तीक वाहनास बंदी असणार नाही.
सदर आदेशाचे उल्लंघन झाल्यास भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 नुसार कार्यवाही करण्यात येणार आहे.
00000
पुरेसा ओलावा असल्याशिवाय पेरणी करू नये
*कृषि विभागाचे आवाहन
बुलडाणा, दि. 10 : शेतकऱ्यांनी खरीप हंगाम सन 2024 मध्ये जमिनीत पुरेसा ओलावा निर्माण झाल्याशिवाय सोयाबीन, तूर, मूग, उडीद, कपाशी बियाण्याची पेरणी करू नये, असे आवाहन कृषि विभागातर्फे करण्यात आले आहे.
शेत जमिनीची ओल 4 ते 6 इंच किंवा 100 मीमी पाऊस झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी कोणत्याही बियाण्याची पेरणी करू नये, जमिनीमध्ये पुरेसा ओलावा नसताना पेरणीची घाई केल्यास जमिनीतील उष्णतेमुळे पेरलेले बियाण्यांचे अंकुरण होणार नाही किंवा अंकुरण होऊन जळण्याची भिती आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट येण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच शेतकऱ्यांचा वेळ व आर्थिक नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शेतकऱ्यांनी आर्थिक नुकसान होऊ नये, यासाठी कृषी विभागाच्या संदेशानुसार 100 मीमी पाऊस पडल्यानंतरच किंवा जमिनीची ओल 4 ते 6 इंच किंवा जमिनीमधील उष्णता जाईपर्यंत शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये. शेतकऱ्यांनी कोणत्याही पिकाची धूळपेरणी करू नये. खरीप हंगामातील सर्व पिके जमिनीत पुरेशी ओल म्हणजेच जमीन 4 ते 6 इंच ओल झाल्याची खात्री करूनच पेरणी करावी, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी मनोजकुमार ढगे यांनी केले आहे.
00000
बाल शक्ती पुरस्कार पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन
बुलडाणा, दि. 10 : केंद्र शासनाच्या महिला व बालविकास विभागामार्फत बाल शक्ती पुरस्कार पुरस्कार दिला जातो. या पुरस्कारासाठी पात्र व्यक्तींनी अर्ज करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी ५ वर्षे पेक्षा अधिक आणि १८ वर्षापर्यंतच्या मुलांनी शिक्षण, कला, सांस्कृतिक कार्य, खेळ नाविन्यपूर्ण शोध, सामाजिक कार्य आणि शौर्य अशा क्षेत्रात विशेष नैपूण्यपूर्ण कामगिरीसाठी हा पुरस्कार दिला जातो. प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार २०२५ करिता केंद्र शासनाने अर्ज मागविले आहेत. सदरचे अर्ज awards.gov.in संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने स्विकारले जाणार आहे. यासाठी मुलांचे वय दि. ३१ जुलै २०२४ रोजी ५ वर्षापेक्षा अधिक आणि १८ वर्षांपेक्षा कमी आहे, अशा मुलांनी त्यांचे प्रस्ताव संकेतस्थळावर स्वतः मुले किंवा त्यांचे वतीने राज्य सरकार, केंद्रशासित प्रदेश, जिल्हाधिकारी, जिल्हादंडाधिकारी, पंचायत राज्य संस्था, नागरी स्वराज्य संस्था, शैक्षणिक संस्था आदी अर्ज करु शकतील. जास्तीत जास्त मुलांनी प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन जिल्हा बालसंरक्षण कक्षाने केले आहे.
00000
Comments
Post a Comment