DIO BULDANA NEWS 17.05.2024









 आंबा महोत्सवात 40 आंब्याच्या प्रजातींचे प्रदर्शन

*नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

बुलडाणा, दि. 17 : कृषी विज्ञान केंद्रातर्फे आंबा महोत्सव प्रदर्शनी व विक्रीचे आयोजन करण्यात आले. या महोत्सवा आंब्याच्या विविध 40 प्रजातींचे प्रदर्शन ठेवण्यात आले. या प्रदर्शन आणि विक्री महोत्सवास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी या प्रदर्शनी आज उद्घाटन केले.

जिल्ह्यातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांना आंबा उत्पादनासाठी वाव मिळावा आणि नागरिकांना विविध जातींच्या आंब्याची चव चाखता यावी, यासाठी अजिंठा रोडवरील कृषि विज्ञान केंद्रात शुक्रवार, दि. १७ मे रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत आंबा महोत्सव प्रदर्शनी व विक्री पार पडली. या महोत्सवानिमित्ताने जिल्ह्यातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी त्यांच्याकडील एकूण ४० जातींचे आंबे प्रदर्शनीमध्ये विक्रीसाठी ठेवले होते. तसेच आंब्यावर प्रक्रिया आणि मूल्यवर्धन केलेल्या विविध खाद्य पदार्थांचे महिला बचतगटांचे ७ दालन होते.

आंबा महोत्सवाच्या उद्घाटनाला डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख अध्यक्षस्थानी होते. प्रमुख उपस्थिती म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब मोहन, संचालक डॉ. धनराज उंदीरवाडे, सहयोगी अधिष्ठाता डॉ. सावजी, जनसंपर्क अधिकारी डॉ. किशोर बिडवे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोजकुमार ढगे, आत्माचे प्रकल्प संचालक पुरुषोत्तम उन्हाळे, कृषी संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ. दिनेश कानवडे, कृषी तंत्र विद्यालयाचे प्राचार्य डॉ. सतीशचंद्र जाधव, माविमचे सहजिल्हा समन्वय अधिकारी समीर देशमुख, विनायक सरनाईक उपस्थित होते.

कुलगुरू डॉ. शरद गडाख यांनी आंबा घन लागवड पद्धतीचे फायदे सांगितले. तसेच भारतीय आंबा फळाला आंतरराष्ट्रीय, तसेच देशांतर्गत बाजारपेठेत प्रचंड मागणी असल्याने त्याच्या लागवडीखालील क्षेत्राचा विस्तार व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.

आंबा महोत्सव आयोजनाबाबत वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल तारू यांनी माहिती दिली. पुरुषोत्तम उन्हाळे यांनी आंब्याच्या स्थानिक जाती व जैवविविधतेची सांगड घालून शेतकऱ्यांनी आंबा लागवड करावी असे आवाहन केले. मनोजकुमार ढगे यांनी आंबा फळबाग लागवड आणि शासनाच्या योजनांविषयी मार्गदर्शन केले. डॉ. धनराज उंदिरवाडे यांनी जिल्ह्यात आंब्याचे क्षेत्र वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन केले.

महोत्सवात स्थानिक आंबा जातींची ओळख, आंबा फळाच्या विविध वाणांची प्रदर्शनी व विक्री, आंबा लागवड व व्यवस्थापनासाठी तज्‍ज्ञांचे मार्गदर्शन आणि आंब्याच्या वाणांची कलम विक्री, तसेच आंब्यापासून बनविलेले विविध प्रक्रिया पदार्थ विक्रीसाठी ठेवण्यात आले.

मनेश यदुलवार यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. भारती तिजारे यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी कृषी विज्ञान केंद्राचे डॉ. अनिल तारू, डॉ. एन. एस. देशमुख, डॉ. भारती तिजारे, प्रवीण देशपांडे, मनेश यदुलवार, कृतिका गांगडे, कोकिळा भोपळे. अनुराधा जाधव, अनिल जाधव, शिवाजी पिसे, नयन चव्हाण यांनी पुढाकार घेतला.

00000

चिखली, शेगाव येथील वसतीगृहातील प्रवेश प्रक्रियेस सुरवात

बुलडाणा, दि. 17 : सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाच्या अधिनस्त वसतीगृह मागास व आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृह, चिखली आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतीगृह, शेगाव येथील वसतीगृहातील शैक्षणिक वर्ष 2024-2025 करिता प्रवेश प्रक्रिया सुरु करण्‍यात आली आहे.

मागासवर्गीय प्रवर्ग निहाय आरक्षित टक्केवारीनुसार अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या जाती, जमाती, आर्थिकदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या तसेच इतर मागास प्रवर्ग, विशेष मागास प्रवर्ग, दिव्यांग, अनाथ आदी प्रवर्गातील विद्यार्थी प्रवेशास पात्र राहणार आहेत. शालेय, कनिष्ठ महाविद्यालय व महावि‌द्यालयीन, व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमाकरीता चिखली व देऊळगाव राजा येथील नगरपालिकेच्या हद्दीतील शाळा, वि‌द्यालय, महावि‌द्यालयात प्रवेश घेतलेल्या प्रथम व द्वितीय वर्षातील प्रवेशित विद्यार्थी प्रवेश अर्ज भरण्यास पात्र आहेत. प्रवेश अर्ज करण्याची अंतिम दि. 18 मे 2024 असून प्रवेशपात्र विद्यार्थ्यांची पहिली यादी दि. 25 मे रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

पात्र विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज भरावेत. असे आवाहन चिखली वसतिगृहाचे गृहपाल व्ही. एस. शिंदे भ्रमनध्वनी क्रमांक 985046436 आणि शेगाव वसतिगृहाचे गृहपाल श्रीमती आर. जे. लेंडे भ्रमनध्वनी क्रमांक 9420433974, 9284041108 यांनी केले आहे. आधिक माहिती करिता भ्रमनध्वनीवर संपर्क साधावा किंवा प्रत्यक्ष वसतीगृहाला भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

00000

पाणीटंचाई निवारण्यासाठी विंधन विहिरींना मंजुरी

बुलडाणा, दि. 17 : पाणीटंचाई निवारणासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. यात 28 गावांसाठी 23 कुपनलिका आणि 14 गावात 18 विंधन विहिरी मंजूर करण्यात आल्या आहेत.

पाणीटंचाई निवारणार्थ जळगाव जामोद तालुक्यातील 7 गावात, शेगाव तालुक्यातील 21 गावात, 23 कुपनलिका व 18 विंधन विहिरी मंजूर करण्यात आल्या आहेत. या गावांमध्ये पाणीपुरवठ्यासाठी उपाययोजना करण्यात आल्या आहेत. विंधनविहिरी घेण्यात आलेल्या गावांमध्ये ही कामे सुरू करण्यापूर्वी व काम पूर्ण झाल्यानंतर कामाचा पंचनामा कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, यांनी करावयाचा आहे. जळगाव जामोद तालुक्यातील इस्लामपूर आदिवासी वस्ती, मैलगड पायथ्यासी, निमखेडी रेलास चोंगळटापरी, डुक्करदरी घोघरा धनसिंग महाराज, वाडी बु, पारधी वाडा, गोमाळ, चाळीस टापरी आणि शेगाव तालुक्यातील लासुरा बु., चिंचोली, नागझरी, वरखेड बु., कालखेड, येउलखेड, हिंगणा वैजनाथ, जलंब, निंबी, माटरगाव बु,, माटरगाव खु., डोलारखेड, भास्तन, कालवड, सगोडा, कठोरा, भोनगाव, बोंडगाव, खातखेड, पहूर पुर्णा, तरोडा डी, मनसगाव येथे विंधन विहिरी मंजूर करण्यात आल्या आहेत. यामुळे या गावामधील पाणीटंचाई सुसह्य होण्यास निश्चित मदत मिळणार आहे, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

00000

पाणीटंचाई निवारणार्थ टँकर मंजूर

बुलडाणा, दि‍. 17 : जिल्ह्यातील काही तालुक्यात सद्यस्थि‍तीत पिण्याच्या स्त्रोतापासून आवश्यक पाणी उपलब्ध होत नाही. त्यामुळे काही गावांना टँकरने पाणीपुरवठा करण्यास मंजूरी देण्यात आली आहे. दरडोई दरदिवशी 20 लिटर्स उपलब्ध होण्यासाठी पाणीटंचाई निवारणार्थ उपाययोजना म्हणून टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येतो. डोंगर खंडाळा, ता. बुलडाणा येथे एका टँकरने पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. डोंगरखंडाळा गावाला टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे सदर गावामधील पाणीटंचाई कमी होण्यास मदत होणार आहे, असे उपविभागीय अधिकारी, बुलडाणा यांनी कळविले आहे.

000000


Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

स्वयं अर्थसहाय्यिता नवीन शाळांना मान्यता व दर्जावाढीची शिफारस; हरकती मागविल्या