DIO BULDANA NEWS 08.05.2024

 आपत्कालीन परिस्थितीमध्ये समन्वयाने कार्य करावे

-जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील

बुलडाणा, दि. 8 : येत्या मान्सून कालावधीत प्रशासनाने आपत्कालीन परिस्थितीमध्ये सतर्क राहावे, पूर किंवा अपघाताची स्थिती ही अचानक उद्भवल्याने यंत्रणांनी समन्वयाने कार्य करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आज मान्सून पूर्व तयारी आणि दुष्काळ व पाणीटंचाई संदर्भात केलेल्या उपाययोजनांच्या संदर्भात आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी बी. एम. मोहन, निवासी उपजिल्हाधिकारी निर्भय जैन, उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार, समाधान गायकवाड, जयश्री ठाकरे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी संभाजी पवार, तहसिलदार संजिवनी मुपडे आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ. पाटील म्हणाले, आपत्कालीन परिस्थितीमध्ये संपर्क, वाहतूक व्यवस्था आणि गोल्डन अवर या बाबी महत्वाच्या आहेत. त्यामुळे तालुका, जिल्हा आणि राज्य स्तरावरील आपत्कालीन कक्षांनी संपर्कात राहावे. पावसाळ्याच्या दिवसात वाहनांच्या अपघाताची शक्यता असल्याने प्रामुख्याने समृद्धी मार्ग असलेल्या तालुक्यातील यंत्रणांनी सतर्क राहावे. प्रामुख्याने वाहन घसरून अपघात होण्याची शक्यता असल्याने या भागात जेसीबी, गॅस कटर, रूग्णवाहिका आदींची व्यवस्था ठेवण्यात यावी.

ग्रामीण भागातील पूराची स्थिती हाताळण्यासाठी गटविकास अधिकारी यांनी सजग व्हावे. पूराच्या परिस्थितीबाबत कोतवाल आणि पोलिस पाटील यांच्याकडून दवंडी देण्यात यावी. पूरपरिस्थिती हाताळण्यासाठी तालुकास्तरावर अंतर्गत बैठक घेण्यात यावी. तसेच प्रत्येक गावात ग्राम सुरक्षा समिती स्थापन करण्यात यावी. या समितीशी आपत्कालीन परिस्थितीत संपर्क साधता येईल. अतिवृष्टीच्या काळात वीज वितरण कंपनीने वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्नशील राहावे. शहरातील मॅनहोल उघडण्यात येऊ नये. उघडल्यास बॅरेकेटींग करण्यात यावे. पुराच्या काळात नागरिकांना स्थलांतरीत करण्याची आवश्यकता भासल्यास निवारा केंद्राच्या ठिकाणी सुविधा पुरविण्यात याव्यात.

पूर परिस्थितीमध्ये पावसाच्या प्रमाणावर लक्ष ठेवण्यात यावे. त्यासाठी आंतरजिल्हा समन्वय ठेवण्यात यावा. नागरिकांना मदत करण्यासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध करावेत. पूराच्या काळात सार्वजनिक उद्घोषणेची व्यवस्था करण्यात यावी. वादळी वाऱ्यामुळे रस्त्यावरील वाळलेली झाडे उन्मळून पडून घरे, वाहनांचे नुकसान होण्याची शक्यता असते. त्यामुळे अशी झाडे तोडण्यात यावी. धरण क्षेत्रात पाऊस जादा झाल्यास पाणी सोडण्यात येते. याची माहिती बाधित क्षेत्रातील नागरिकांना देण्यात यावी. पाणी सोडल्यामुळे शेती आणि घरांचे नुकसान होऊ नये, याची काळजी घ्यावी.

उन्हाळाच्या कालावधीत चाराटंचाई जाणवणार नाही, यासाठी नियोजन करण्यात यावे. शहरातील पाणी पुरवठा सुरळीत राहण्यासाठी प्रयत्न करावेत. आवश्यकता पडल्यास टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. तसेच कुपननलिका आणि विंधन विहिरी अधिग्रहित करण्यात येत आहे. येत्या कालावधीत आवश्यकतेनुसार पाणी पुरवठ्याच्या उपाययोजना करण्यात येतील. जलजीवन मिशनचा आढावा घेण्यात यावा. गाळमुक्त धरण, गाळयुक्त धरण उपक्रम राबविण्यात येत आहे. स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने गाळ काढण्यात येत आहे. यामुळे पाणीसाठा वाढण्यास मदत होणार असल्यामुळे यंत्रणांनी सहकार्य करावे. तसेच पाणीपुरवठा करणाऱ्या योजनांनी पाण्याचे स्त्रोत तपासण्यात यावे, अशा सूचनाही जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी दिल्या.

00000



बियाणे, खते, किटकनाशकांच्या तक्रारीबाबत कार्यपद्धती निश्चित

बुलडाणा, दि. 8 : येत्या खरीप हंगामाच्या पूर्वतयारीला सुरवात करण्यात आली आहे. त्यानुसार कृषि निविष्ठा असलेल्या बियाणे, खते, किटकनाशकांच्या तक्रारीबाबत कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी या कार्यपद्धतीचा अवलंब करावा, असे आवाहन कृषि विभागाने केले आहे.

खरीप हंगाम 2024 करीता गुणवत्ता नियंत्रण कामाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार शेतकऱ्यांना कृषि निविष्ठा विक्रेत्याकडून विक्री होणाऱ्या बियाणे, खते, किटकनाशके आदी निविष्ठांचा दर्जा निकृष्ट असणे, त्यात भेसळ असणे अथवा बोगस असणे आदीबाबत शेतकऱ्यांकडून प्रत्यक्ष अथवा अन्य व्यक्ती, संस्था, प्रसिद्धी माध्यमाद्वारे तक्रारी प्राप्त होतात.

सदर तक्रारी सादर करताना शेतकऱ्यांनी अर्ज, मुळ देयक, बियाणे, खते व किटकनाशकाची पिशवी, टॅग, वेष्टन आदी तालुका तक्रार निवारण समितीचे सदस्य सचिव, कृषि अधिकारी, पंचायत समिती यांच्याकडे सादर करावेत. त्यासाठी बियाणे, खते, किटकनाशके आदी निविष्ठांच्या गुणवत्ता नियंत्रणाच्या अनुषंगाने कार्यवाहीबाबत तक्रार निवारण समिती कार्यरत आहे.  या समितीचे अध्यक्ष, उपविभागीय कृषि अधिकारी, तर तालुका कृषि अधिकारी, कृषि विद्यापीठ, कृषि संशोधन केंद्र, कृषि विज्ञान केंद्राचे प्रतिनिधी, महाबीज प्रतिनिधी, कृषि अधिकारी, पंचायत समिती हे सदस्य राहणार आहेत.

तक्रार करावयाच्या कार्यपद्धतीबाबत शेतकऱ्यांनी कृषि अधिकारी, पंचायत समिती यांच्याकडे तक्रार अर्ज सादर केल्यानंतर तालुका तक्रार निवारण समिती ही स्थळ पाहणी करेल. तसेच तक्रारदार शेतकऱ्यांना पंचनामा देतील. या पंचनाम्याच्या आधारे शेतकऱ्यांना जिल्हा ग्राहक न्यायालय येथे दाद मागता येऊ शकेल. जिल्हा ग्राहक न्यायालय येथे दाद मागण्याकरीता आवश्यक दस्ताऐवज व मागदर्शन करण्यात येणार आहे, असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी मनोजकुमार ढगे यांनी कळविले आहे.

000000

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

स्वयं अर्थसहाय्यिता नवीन शाळांना मान्यता व दर्जावाढीची शिफारस; हरकती मागविल्या