DIO BULDANA NEWS 09.05.2024
अपघातामध्ये दुचाकीस्वारांचा मृत्यू अधिक
*परिवहन विभाग उपाययोजना करणार
बुलडाणा, दि. 9 : जिल्ह्यातील अपघाताच्या आकडेवारीमध्ये दुचाकीस्वारांचा मृत्यू होण्याचे प्रमाण अधिक आहे. हे प्रमाण कमी करण्यासाठी परिवहन विभागातर्फे विविध उपाययोजना करण्यात येणार आहे. यात प्रामुख्याने हेल्मेटचा वापराची सक्ती करण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येणार आहे. गेल्या जानेवारी ते डिसेंबर 2023 मध्ये एकूण 628 अपघात झाले आहेत. यातील 308 अपघातात 387 मृत्यू झाले आहे. यावर्षी जानेवारी ते मार्च 2024 या तीन महिन्याच्या कालावधीत 192 अपघात झाले असून 101 जणांचा मृत्यू झाला आहे. 192 अपघातांमध्ये सर्वाधिक 83 अपघात दुचाकीचे झाले आहेत. तसेच 34 चारचाकी वाहन, 69 जड वाहने, 6 तीनचाकी वाहनांचा अपघात झाला आहे. गेल्या वर्षीच्या तीन महिन्याच्या तुलनेत यावर्षी 39 अपघात, तर 21 मृत्यू वाढले आहेत.
टिप्परच्या धडकेने मृत्यू होत असल्याने टिप्परची तातडीने तपासणी करावी. याबाबत सातत्याने कार्यवाही करण्यात यावी. विना क्रमांकाच्या टिप्परवर तातडीने कार्यवाही करावी. अपघात रोखण्यासाठी गतिरोधक, माहितीसाठी फलक, वेगमर्यादेचे नियंत्रण असणे गरजेचे आहे. यासाठी बांधकाम विभागाने मोहिम घेऊन गतीरोधकांवर पांढऱ्या पट्ट्या आखाव्यात, रस्त्याच्या कडेला फलक लावून संदेश देण्यात यावे. तसेच फलकावर मदतीसाठी पोलिस, रुग्णालयाचे संपर्क क्रमांक. जवळच्या रुग्णालयाची माहिती देण्यात यावी. अपघात प्रवण क्षेत्रात सूचना देणारे फलक लावण्यात यावे. तसेच रस्ता सुरक्षेसाठी उजव्या बाजूने चालावे, यासाठी जनजागृती करण्यात येणार आहे.
दुचाकीच्या वाढत्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर परिवहन विभागातर्फे विविध उपाययोजना करण्यात येणार आहे. यात सुरवातीला एक महिना हेल्मेट वापरासंबंधी जनजागृती करण्यात येणार आहे. त्यानंतर प्रत्यक्ष कारवाई करण्यात येणार आहे. यासोबतच वेगमर्यादा पाळणे, रस्त्याच्या उजव्या बाजूने चालणे, मादक पदार्थाचे सेवन करून वाहन चालवू नये याबाबत जनजागृती करण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील अपघातामध्ये दुचाकीचे अपघात होण्याचे प्रमाण अधिक आहे. अपघातात घरातील कर्त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास कुटुंब उध्वस्त होते. तसेच महिलांवर जबाबदारी येते. त्यामुळे दुचाकी चालकांनी स्वत: आणि कुटुंबाच्या संरक्षणासाठी हेल्मेट वापरावे. दुचाकी चालविताना मोबाईलचा वापर टाळून बेकदारपणे वाहन चालविणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.
000000
अक्षयतृतीयेला बालविवाह रोखण्यासाठी उपाययोजना लागू
*बालविवाह केल्यास शिक्षा आणि दंडाची तरतूद
बुलडाणा, दि. 9 : राज्यात बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ लागू करण्यात आला आहे. शुक्रवार, दि. 10 मे रोजी अक्षय तृतीया असल्याने या दिवशी बाल विवाह होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सदर बालविवाह रोखण्यासाठी उपाययोजना करण्यात आल्या आहेत. बालविवाह केल्यास शिक्षा आणि दंडाची तरतूद आहे.
बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ लागू असून याचे नियम महाराष्ट्र बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २०२२ देखील लागू आहेत. या अधिनियमानुसार बालविवाह आयोजित करणे अजामीनपात्र गुन्हा आहे. बालविवाह प्रतिबंधक अधिनियम, २००६ नुसार बालविकास प्रकल्प अधिकारी यांना शहरी, तर ग्रामीण भागासाठी ग्रामसेवक यांना बालविवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून घोषित केले आहे. तसेच ग्रामीण भागाकरीता अंगणवाडी सेविका, तसेच शहरी भागाकरिता पर्यवेक्षिकांना सहाय्यक बालविवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे.
अक्षयतृतीया या दिवशी जिल्ह्यात बालविवाह होऊ शकतात. यास प्रतिबंधक म्हणून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. पुरुषाने बालवधूशी विवाह केल्यास सदर पुरुषाला दोन वर्षापर्यंत सक्त मजुरीची कैद आणि एक लाख रुपयांपर्यंतचा दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. तसेच जाणीवपूर्वक बालविवाह ठरविणाऱ्यास, सोहळा पार पाडणाऱ्यास किंवा प्रोत्साहन देणाऱ्यास दोन वर्षापर्यंत सक्त मजुरीची कैद आणि एक लाख रुपयांपर्यंतचा दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. बालविवाह झाल्यास, संबंधित वर-वधूंचे आई-वडिल किंवा पालक व अन्य नातेवाईक, मित्र परिवार, मंदिरातील विश्वस्त, फोटोग्राफर, प्रिंटिंग प्रेस, वाजंत्री, सभागृह व्यवस्थापक, कॅटरिंग अशा सर्वांनी बालविवाह घडविण्यास प्रत्यक्ष मदत केली किंवा तो रोखण्यासाठी प्रयत्न केले नाहीत, जे अशा विवाहात सामील झाले होते, अशा सर्वांना दोन वर्षांपर्यंत सक्त मजुरीची कैद व एक लाख रुपयांपर्यंतचा दंड होऊ शकतो. सोबत ग्रामसेवकांनी जन्म दाखल्याची खोटी नोंद केल्यास त्यांच्यावर कार्यवाही करण्यात येणार आहे.
दि. १० मे २०२४ रोजीच्या अक्षयतृतीयेला संभावित बालविवाहाच्या घटना रोखण्यासाठी सर्व यंत्रणांनी बालविवाह प्रतिबंधात्मक अधिनियमातील तरतुदीनुसार बालविवाह रोखण्याबाबत जनजागृती करण्यात आली आहे. तसेच बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ ची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार आहे, असे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांनी कळविले आहे.
00000
उन्हाळी प्रशिक्षण, व्यक्तिमत्व विकास शिबीराचा समारोप
बुलडाणा, दि. 9 : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्र, तसेच जिल्ह्यातील एकविध खेळांच्या संघटनांतर्फे दोन सत्रात जिजामाता क्रीडा व व्यापारी संकुलात उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण आणि व्यक्तीमत्व विकास शिबीर पार पडले. शिबीराचा समारोप शनिवार, दि. 4 मे रोजी करण्यात आला.
शिबिराच्या समारोप कार्यक्रमाला जिल्हा क्रीडा अधिकारी बी. एस. महानकर अध्यक्षस्थानी होते. प्रमुख पाहुणे म्हणून आंतरराष्ट्रीय तिरंदाजी प्रशिक्षक तथा शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारार्थी चंद्रकांत इलग, महाराष्ट्र राज्य ॲथलेटीक्स असोसिएशन उपाध्यक्ष गोपालसिंग राजपूत, तालुका क्रीडा अधिकारी लक्ष्मीशंकर यादव, नेहरु युवा केंद्राचे अजयसिंह राजपूत, मुख्याध्यापक गजानन इंगळे, प्रशिक्षक विजय वानखेडे, सागर उबाळे आदी उपस्थित होते.
यावेळी अजयसिंह राजपूत आणि गोपालसिंग राजपूत यांनी मार्गदर्शन केले. शिबीरात सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. शिबीरात राज्य क्रीडा मार्गदर्शक उज्वला लांडगे यांचे मार्गदर्शनाखाली विविध एकविध खेळ संघटनेचे तज्ज्ञ मार्गदर्शक, राष्ट्रीय खेळाडू, प्रशिक्षकांनी प्रशिक्षण दिले. विजय वानखेडे यांनी मैदानी खेळ, उज्वला लांडगे, मनोज श्रीवास, अनिल चव्हाण यांनी हॅण्डबॉल, मोहम्मद इद्रीस यांनी कबड्डी, सागर उबाळे यांनी खो-खो, चंद्रकांत इलग यांनी आर्चरी, राहुल औशलकर यांनी फुटबॉल खेळाचे मार्गदर्शन केले.
बी. एस. महानकर यांनी प्रास्ताविक केले. मनोज श्रीवास यांनी सूत्रसंचालन केले. राज्य क्रीडा मार्गदर्शक उज्वला लांडगे यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी विनोद गायकवाड, सुहास राऊत, कृष्णा जाधव, तेजस्वीनी घाडगे यांनी पुढाकार घेतला.
00000
Comments
Post a Comment