DIO BULDANA NEWS 06.05.2024
परिवहनचे सकाळच्या सत्रात
योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरण
बुलडाणा, दि. 6 : मे महिन्यात जास्त उष्णतामान असल्यामुळे सोमवार, दि. 6 मे पासून योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरण करण्याचे कामकाज सकाळी 7 ते दुपारी 3 पर्यंत करण्यात येणार आहे, याची वाहनधारकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी केले आहे.
00000
वृद्ध साहित्यिक, कलाकारांनी आधार पडताळणी करण्याचे आवाहन
बुलडाणा, दि. 6 : राज्यातील मान्यवर वृद्ध साहित्यिक, कलावंतांना मानधन योजना सांस्कृतिक संचालनालयातर्फे राबविण्यात येते. या योजनेच्या लाभासाठी वृद्ध साहित्यिक, कलाकारांनी आधार क्रमांकाची पडताळणी करावी, असे आवाहनक करण्यात आले आहे.
साहित्यिक आणि कलावंत लाभार्थ्यांची माहिती संकलित आणि अद्ययावत करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. आतापर्यंत राज्यातील सुमारे १७ हजार लाभार्थ्यांची आधार कार्ड नोंदणी केलेली माहिती आहे. प्राप्त झालेले आधार क्रमांक व इतर माहिती योग्य असल्याबाबतची पडताळणी करण्यासाठी संचालनालयातर्फे ऑनलाईन आधार पडताळणी लिंक तयार केली आहे. कलाकारांनी आधार नोंदणी केलेली आहे, त्यांनी mahakalasanman.org/
कलाकारांना कलाकाराचे संपूर्ण नाव, जन्मतारीख, पत्ता, जोडीदाराचे नाव, कलाप्रकार, आधार लिंक मोबाईल क्रमांक, आधार कार्ड क्रमांक, बँकेचे नाव व शाखा, खाते क्रमांक, आयएफएससी कोड आदी माहिती सादर करावी लागणार आहे.
कलावंतांनी अद्याप माहिती सादर केलेली नसल्यास त्यांनी विहित नमुन्यातील माहिती भरुन तालुकास्तरावर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, तसेच जिल्हास्तरावर जिल्हा परिषद समाज कल्याण कार्यालय आणि मुंबई शहर आणि मुंबई उपनगर येथील कलावंतांनी सांस्कृतिक कार्य संचालनालय, जुने सचिवालय, महाराष्ट्र शासन, विस्तार भवन, पहिला मजला, महात्मा गांधी मार्ग, मुंबई ४०० ०३२ या कार्यालयात जमा करावेत. तसेच आधार पडताळणी करुन घ्यावी. कलावंतांची माहिती अप्राप्त राहिल्यास त्यांचे माहे एप्रिल २०२४ पासूनचे मानधन रोखण्यात येणार आहे.
00000
मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ
बुलडाणा, दि. 6 : महाडीबीटी प्रणालीवर सन 2023-24 या वर्षाकरीता भारत सरकार शिष्यवृत्ती अर्ज भरण्याकरीता मुदतवाढ देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना आता 15 जून 2024 पर्यंत महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करता येणार आहे.
इतर मागास बहुजन कल्याण विभागातर्फे प्रत्येकवर्षी विजाभज, इमाव आणि विमाप्र जाती प्रवर्गातील मॅट्रीकोत्तर शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना भारत सरकार शिष्यवृत्ती आणि राज्य शासनाची शिक्षण फी, परिक्षा फी सवलत योजनेचा लाभ देण्यात येतो. सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांस mahadbt.mahait.gov.in या पोर्टलवर ऑनलाईन अर्ज भरणे आवश्यक आहे. सदर प्रणालीवर ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा दि. 11 ऑक्टोबर 2023 पासून उपलब्ध करण्यात आली आहे.
त्यानुसार सर्व संस्था, महाविद्यालयाच्या प्राचार्य यांनी विजाभज, इमाव आणि विमाप्र जाती प्रवर्गातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी विजाभज, इमाव आणि विमाप्र जाती प्रवर्गाकरीता भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण फी, परीक्षा फी, व्यावसायिक पाठ्यक्रम निर्वाह भत्ता, राजर्शी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज करण्यासाठी दि. 15 जून 2024 पर्यंत मुदतवाढ करुन देण्यात आली आहे. पात्र मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी मुदतीत ऑनलाईन अर्ज नोंदणी करावी.
अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी अद्यापपर्यंत सन 2023-24 या शैक्षणिक वर्षातील अर्ज भरलेले नाहीत, अश्या विद्यार्थ्यांसाठी, तसेच सन 2022-23 या शैक्षणिक वर्षातील अर्ज रिअप्लाय करण्यासाठी विद्यार्थ्यांनी विहित मुदतीत अर्ज भरण्याची कार्यवाही करावी. अनुसूचित जाती प्रवर्गातील योजनेस पात्र सर्व विद्यार्थ्यांनी mahadbtmahait.gov.in संकेतस्थळावर दि. 15 जून 2024 पर्यंत अर्ज भरण्यात यावेत. तसेच सर्व महाविद्यालयाचे प्राचार्य यांनीही प्रवेशित योजनेस पात्र असलेल्या अनुसूचित जाती प्रवर्गातील सर्व विद्यार्थ्यांचे अर्ज महाडीबीटी संकेतस्थळावर विहित मुदतीपूर्वी अर्ज भरुन घेण्याची कार्यवाही करावी.
जिल्ह्यातील सर्व कनिष्ठ, वरिष्ठ व व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयांनी त्यांच्याकडे प्रवेशित विद्यार्थ्यांना महाडीबीटी पोर्टल द्वारे आवेदन पत्रे भरण्याबाबत सूचित करावे, तसेच मुदतीत मागासवर्गीय विद्यार्थी अर्ज भरण्यापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी. त्यासाठी mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज भरावेत, विहित वेळेत विद्यार्थ्यांचे अर्ज भरुन घेण्याची जबाबदारी संबंधित महाविद्यालयाची राहणार आहे. महाविद्यालय, विद्यार्थ्यांनी mahadbtmahait.gov.in संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज भरण्याचे आवाहन सहाय्यक संचालक मनोज मेरत यांनी केले आहे.
00000
जिल्हास्तरावर कृषि निविष्ठा नियंत्रण कक्ष स्थापन
बुलडाणा, दि. 6 : खरीप हंगाम 2024 मध्ये बियाणे, खते आणि किटकनाशकांबाबत शेतकरी, कंपनी प्रतिनिधी आणि बियाणे, खते व किटकनाशके विक्रेते यांना क्षेत्रीयस्तरावर अडचणी येतात. या अडचणी सोडविण्यासाठी जिल्हास्तरावर कृषि निविष्ठा नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे.
खरीप हंगामामध्ये बियाणे पेरणीचा कालावधी अत्यंत अल्प असल्याने शेतकरी, कंपनी प्रतिनिधी आणि बियाणे, खते व किटकनाशके विक्रेते यांच्या अडचणी आणि तक्रारींचे वेळेत निराकरण होणे गरजेचे आहे. बियाणे, खते व किटकनाशके यांचे उत्पादन, प्रक्रिया, वाहतूक वितरण आणि विक्री करताना अडचणी निर्माण होतात, तसेच निर्माण झालेल्या परिस्थितीत सदर निविष्ठांचा काळाबाजार आणि साठेबाजी रोखण्यासाठी उत्पादन वितरण आणि विक्री नियंत्रित करणे आवश्यक आहे.
यासाठी बियाणे, खते व किटकनाशके यांच्या गुणवत्ता व पुरवठ्याच्या अनुषंगाने येणाऱ्या अडचणीचे तात्काळ निराकरण करण्यासाठी जिल्हास्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. सदर नियंत्रण कक्षाशी दररोज सकाळी 9.45 ते सायंकाळी 6.15 या वेळेत संपर्क साधता येऊ शकणार आहे. यासाठी संपर्क क्रमांक 07262-299034, 9527546983, 8275340540 तसेच टोल फ्री क्रमांक 18002334000 या क्रमांकावरही संपर्क करता येईल. तसेच अडचणी किंवा तक्रारी dsaobuldana.qc@gmail.com मेलवर पाठवता येतील.
बियाणे, खते आणि किटकनाशके यांच्या गुणवत्ता व पुरवठा संबंधी तक्रार निवारण सुविधा केंद्राची रचना जिल्हा व तालुकास्तरावर राहणार आहे. जिल्हास्तर व्ही. एल. खोंदील, मोहीम अधिकारी, जिप 7588041008, 07262-299034, 07262-242343, डी. एम. मेरत, जिल्हा कृषि अधिकारी, जिप 9422448737, ए. के. इंगळे, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक 7588619505, जे. एस. वायाळ, ग्राम विकास अधिकारी, जिप 9404439004, ए. व्ही. सिरसाट, कृषि सहाय्यक, 8275340540 यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
तालुकास्तरावर कृषि विभाग, पंस कार्यालयात बुलडाणा भास्कर राहाणे, कृषि अधिकारी, बुलडाणा 9423961006, श्रीमती प्रीती पाटील, कृअपंस, बुलडाणा 8378874711, चिखली भगवान कुलकर्णी, कृषि अधिकारी, 9850219432, एस. आर. सोनुने, कृअपंस, चिखली 9404034477, मलकापूर गजानन पखाले, कृषि अधिकारी, 9049066291, एस. ए. गवई, कृअपंस मोताळा 7588689686, मोताळा, वाय. बी. महाजन, कृषि अधिकारी 8788399130, एस. ए. गवई, कृअपंस, मोताळा 7588689686, खामगाव एस. टी. धुमाळ, कृषि अधिकारी, खामगाव 9422646739, ए. बी. चव्हाण, कृअपंस नांदुरा 9423146207, शेगाव, जे. आर. पवार कृषि अधिकारी, 9850044808, आर. एस. नावकार कृअपंस जळगाव जामोद 9423721795, नांदुरा, शरद पाटील, कृषि अधिकारी 9405660033, संजय राऊत, कृअपंस खामगाव 8275329543, जळगाव जामोद एस. वाय. सावंत, कृषि अधिकारी जळगाव जामोद 9423001446, ए. बी. चव्हाण, कृअपंस नांदुरा 9423146207, संग्रामपूर, एस. एन. पाटोळे, कृषि अधिकारी, संग्रामपूर 9421890778, आर. एस. नावकार, कृअपंस संग्रामपूर 9423721795, मेहकर उद्धव काळे, कृषि अधिकारी मेहकर 7020278840, एस. आर. परिहार कृअपंस मेहकर 9511786145, लोणार एस. एन. कावरखे कृषि अधिकारी, लोणार 9921800999, एस. बी. गायकवाड कृअपंस लोणार 9423417044,
सिंदखेडराजा गोपाल बोरे, कृषि अधिकारी सिंदखेड राजा 9545006309, अंकुश म्हस्के कृअपंस सिंदखेडराजा 9130407647, देऊळगाव राजा एम. ए. इल्लरकर कृषि अधिकारी देऊळगाव राजा 9767587641, कुणाल चिंचोले कृअपंस देऊळगाव राजा 8275231914 यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
कृषि निविष्ठाबाबत बियाणे, खते व किटकनाशके याबाबत तक्रारी असल्यास संबंधीतास संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी मनोजकुमार ढगे यांनी केले आहे.
00000
शेतकऱ्यांनी बियाणे उगवण क्षमता तपासणी करावी
*कृषि विभगाचे आवाहन
बुलडाणा, दि. 6 : येत्या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांनी बियाणांची उगवण क्षमता तपासावी, असे आवाहन कृषि विभागाने केले आहे.
शेतकऱ्यांमध्ये प्रत्येक वर्षी नवीन बियाणे खरेदी करुनच पेरणी करावी, असा समज आहे. परंतू सोयाबीन, मूग, उडीद, चवळी, हरभरा, भुईमुग, गहू या पिकांमध्ये स्वपरागसिंचन होत असल्याने कोणतेही संकरीत वाण या पिकांमध्ये उपलब्ध नाही. त्यामुळे सरळ वाणांचे बियाणे एकदा विकत घेतल्यानंतर त्यापासून तयार होणारे पिक आपण पुढे दोन वर्ष बियाणे म्हणून वापरु शकतो. त्यामुळे अनावश्यकपणे बाजारामधून दरवर्षी बियाणे खरेदी करण्याची आवश्यकता नाही. त्याचबरोबर बाजारातून विकत आणलेले महागडे बियाणे उगवण आले नसल्यामुळे पेरणीकरीता वापरलेली खते, मनुष्यबळ आदी वाया जाते. तसेच लेखी तक्रार, पंचनामा यामुळे पेरणीचा कालावधी निघून जाण्याचा धोका असतो. त्यामुळे कंपनीचे विकत घेतलेले बियाणे असले तरी बियाणे उगवण क्षमता तपासूनच शेतकऱ्यांनी पेरणे करावी.
उगवण क्षमता तपासणी करण्याच्या सोप्या पद्धती आहेत. यात गोणपाट वापरुन बियाण्याच्या प्रत्येक पोत्यातून खोलवर हात घालून मुठभर धान्य बाहेर काढावे. सर्व पोत्यातून काढलेले धान्य एकत्र करुन घ्यावे. गोणपाटाचे सहा चौकोनी तुकडे घेऊन स्वच्छ धुवून घ्यावे. एक तुकडा जमिनीवर पसरावे. पोत्यातून काढलेल्या धान्यातून सरसकट १०० दाणे मोजून दीड-दोन सेंमी अंतरावर साधारणपणे बोटाचे एक कांड अंतरावर १०-१०च्या रांगेत गोणपाटाच्या एक तुकड्यावर ओळीत ठेवावे. अशा प्रकारे १०० दाण्याचे ३ नमुने तयार करावेत. गोणपाटावर चांगले पाणी शिंपडून ओले करावे. बियाण्यांवर दुसरा गोणपाटाचा तुकडा अंथरुन पुन्हा चांगले पाणी मारावे. गोणपाटाच्या तुकड्याची बियाण्या सकट गुंडाळी करुन थंड ठिकाणी सावलीत ठेवावे. त्यावर अधून-मधून पाणी शिंपडून ओले ठेवावे. ६-७ दिवसानंतर ही गुंडाळी जमिनीवर पसरुन उघडावे. चांगले कोंब आलेले दाणे वेगळे करून मोजावेत. तिनही गुंडाळ्याची सरासरी काढून १०० दाण्यांपैकी ७० किंवा त्यापेक्षा जास्त दाणे, जर चांगले कोंब आलेले असतील तर बियाणे बाजारातील बियाण्यासारखेच गुणवत्तेचे आहे, असे समजावे आणि शिफारशीप्रमाणे मात्रेत पेरणीसाठी वापरावे. उगवण झालेल्या बियाण्याची सरासरी संख्या ७० पेक्षा कमी असेल तर एकरी बियाण्यांचे प्रमाण थोडे वाढवून पेरणी करावे. पेरणी करताना बियाण्यास बुरशीनाशक आणि जिवाणू संवर्धकाची प्रक्रिया करावी.
वर्तमान पत्राचा कागद वापरून बियाणांची उगवण क्षमता तपासता येते. यासाठी वर्तमानपत्राचा एक कागद घेऊन त्याच्या चार घड्या पाडाव्यात, त्यामुळे कगदाची जाडी वाढेल नंतर तो पुर्ण कागद पाण्याने ओला करावा. प्रत्येकी दहा बिया घेऊन त्या एका रांगेत समान अंतर सोडून वर्तमानपत्राच्या टोकाच्या भागावर ठेवून त्याची गुंडाळी करावी. अशारितीने शंभर बियांच्या दहा गुंडाळ्या तयार कराव्यात. त्या गुंडाळ्या पॉलिथिन पिशवीत चार दिवस तशाच मोजावे. चार दिवसानंतर त्यामधील अंकुर मोजावेत.
पाण्यात भिजवून कमी वेळात उगवण तपासणीसाठी बियाण्याच्या प्रत्येक पोत्यातून खोलवर हात घालून मुठभर धान्य बाहेर काढावे. सर्व पोत्यातून काढलेले धान्य एकत्र करुन त्या नमुन्यातून १०० दाणे मोजून वेगळे काढावे, असे १०० दाण्यांचे ३ संच तयार करावे. शक्यतो काचेच्या तीन ग्लासात पाणी घेऊन त्यात हे १०० दाणे टाकावे. ५ ते ७ मिनीट तसेच राहू द्यावे. त्यानंतर पाणी फेकुन देऊन दाणे वेगळे काढून त्यामधील पूर्णतः फुगलेले, तसेच बियाण्याच्या टरफलावर सुरकुत्या पडलेले दाणे वेगळे करावे. दोन्ही प्रकारच्या दाण्यांची संख्या मोजून घ्यावी. दाणा ५६ मिनीट पाण्यात ठेवल्यानंतर चांगला टम्म फुगल्यास पेरणीसाठी अयोग्य असतो. अशा बियाण्यांच्या टरफलाला इजा झालेली असल्याने किंवा बिजांकूर कुजल्यामुळे त्यामध्ये पाणी लवकर आत शिरते. तो लवकर फुगतो. मात्र जे बियाणे चांगले असते त्याचे टरफल शाबुत असल्यामुळे त्याच्यात पाणी आत शिरत नाही, फक्त टरफलातून पाणी आत गेल्यामुळे त्यावर सुरकुत्या पडल्यासारखे दिसते. १०० दाण्यांपैकी जर सरासरी ७० किंवा जास्त दाणे अशाप्रकारे न फुगलेले, सुरकुत्या न पडलेले असल्यास बियाणे बाजारातील बियाण्यासारखेच गुणवत्तेचे आहे, असे समजावे आणि शिफारशीप्रमाणे मात्रेत पेरणीसाठी वापरावे. उगवण झालेल्या बियाण्यांची सरासरी संख्या ७० पेक्षा कमी असल्यास एकरी बियाण्यांचे प्रमाण थोडे वाढवून पेरणी करावी. पेरणी करताना बियाण्यास बुरशीनाशकांची व जिवाणू संगर्धकाची प्रक्रिया करणे आवश्यक आहे.
00000
किडींचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी बीजप्रक्रिया करावी
*कृषि विभागाचे आवाहन
बुलडाणा, दि. 6 : बियाणे जमिनीत पेरण्यापूर्वी जमिनीतून किंवा बियाण्यातून पसरणारे विविध रोग आणि किडींचा प्रादूर्भाव टाळणे, तसेच बियाण्यांची उगवण क्षमता वाढविण्यासाठी आणि रोपे सतेज आणि जोमदार वाढविण्यासाठी बियाण्यावर वेगवेगळी जैविक व रासायनिक औषधांची प्रक्रिया म्हणजेच बीजप्रक्रिया करावी, असे आवाहन कृषि विभागाने केले आहे.
बीज प्रक्रिया केल्यास जमीन आणि बियाण्या द्वारे पसरणाऱ्या रोगांचा प्रादुर्भाव टाळता येतो. बियाण्याची उगवणक्षमता वाढते. रोपे सतेज व जोमदारपणे वाढतात. पिकाच्या उत्पादनात वाढ होते. बीजप्रक्रियेसाठी कमी खर्च येतो, त्यामुळे ही कीडरोग नियंत्रणाची किफायतशीर पद्धत आहे.
जिवाणू संवर्धकाची बीजप्रक्रिया ही नत्र स्थिरीकरणासाठी सोयाबीन गटाचे (Rhizobium japonicum) रायझोबिअम २५० ग्रॅम आणि स्फुरद विरघळवणारे जिवाणू २५० ग्रॅम या जिवाणू संवर्धकाचे पाकिट प्रति १० किलो सोयाबीन बियाण्यास वापरावे. १ लिटर गरम पाण्यात १२५ ग्रॅम गूळ टाकून द्रावण तयार करावे. सोयाबीन बियाणे ओलसर करून घ्यावे. द्रावण थंड झाल्यावर त्यामध्ये २५० ग्रॅम जिवाणू संवर्धक टाकून बियाण्यास हळुवारपणे लावावे किंवा जिवाणू संवर्धकाचा लेप बियाण्यावर समप्रमाणात बसेल व बियाण्यांचा पृष्ठभाग खराब होणार नाही, याची काळजी घ्यावी. नंतर बियाणे सावलीत स्वच्छ कागदावर सुकवावे. अशा बीजप्रक्रिया केलेल्या बियाण्याची पेरणी ताबडतोब करावी. याचा पर्यावरणावर विपरीत परिणाम होत नाही. जमिनीतील सेंद्रीय पदार्थ कुजवून जमीन सुधारण्यास मदत होते.
जिवाणू संवर्धक बीजप्रक्रिया करताना जिवाणू संवर्धकाची प्रक्रिया ही बुरशीनाशके किंवा किटकनाशकांची प्रक्रिया केल्यानंतर करण्यात यावी. जिवाणू संवर्धक लावण्यापूर्वी बियाण्यास किटकनाशके, बुरशीनाशके, जंतुनाशके लावलेले असतील तर जिवाणू संवर्धक नेहमीपेक्षा दीडपट जास्त प्रमाणात लावण्याची दक्षता घ्यावी.
जैविक बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया करताना सोयाबीन पिकावरील अनेक प्रकारच्या बुरशीजन्य रोगांपासून संरक्षण करण्यासाठी प्रति किलो बियाण्यास ५ ग्रॅम ट्रायकोडर्मा वापरावे. ट्रायकोडर्मा ही एक प्रकारची बुरशी असून ती पिकांना हानीकारक नसते. उलटपक्षी बियाण्यांवर रोग पसरविणाऱ्या बुरशींची वाढ न होऊ देता जमिनीमध्ये रोगकारक बुरशींचा नायनाट करून पिकांचे संरक्षण करते. ट्रायकोडर्मा बीजप्रक्रिया करताना बियाणे स्वच्छ फरशी, प्लास्टिक किंवा ताडपत्रीवर पातळ धरात पसरवून ट्रायकोडर्मा ओलसर करून शिंपडावे नंतर हलक्या हाताने बियाण्यास चोळावे. प्रक्रिया केलेले बियाणे अर्धा तास सावलीत सुकवून पेरणी करावी.
ट्रायकोडर्मा बीज प्रक्रियेबाबत ट्रायकोडर्माचा वापर रासायनिक खतासोबत किंवा रासायनिक बुरशीनाशकांचा सोबत शक्यतो करू नये. ट्रायकोडर्मा सूर्यप्रकाशापासून दूर, कोरड्या व थंड जागेत साठवावे. बीजप्रक्रिया करतेवेळी सिडड्रमचा वापर करावा, जेणेकरून बियाण्याला बीजप्रक्रियेकरिता वापरण्यात येणारे जीवाणू संवर्धक समप्रमाणात बियांना लागतील याची दक्षता घ्यावी. सिडड्रमविषयी अधिक माहितीकरीता तालुका कृषि अधिकारी कार्यालयास संपर्क साधावा.
शेतकऱ्यांनी पेरणी करते वेळेस यंदाच्या खरीप हंगामात ट्रॅक्टरचलीत बीबीएफ पेरणी करणे किंवा बैलजोडीद्वारे सरीवरंबा काढून टोकन पद्धतीने सोयाबीन पेरणी करावी. विविध कंपन्यांकडून खरेदी करण्यात येत असलेले सोयाबीन बियाणे बोगस निघून मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता असते. त्यामुळे शेतकऱ्यांनी यंदाच्या हंगामात शास्त्रशुद्ध पद्धतीने घरच्या बियाण्याची उगवण क्षमता तपासून आणि बीजप्रक्रिया करून बियाणे पेरणीसाठी वापरावेत, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी मनोजकुमार ढगे यांनी केले आहे.
00000
सैनिक कल्याण विभागाची २३ मे परीक्षा
बुलडाणा, दि. 6 : सैनिक कल्याण विभागातर्फे गट क ची भरती प्रक्रिया करण्यात येत आहे. सरळ सेवेतील पदांसाठी दि. 23 मे रोजी चार परीक्षा केंद्रावर परीक्षा घेण्यात येणार आहे.
सैनिक कल्याण विभागाच्या अधिपत्याखालील जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातील गट-क ची पदे भरणेकरीता ऑनलाईन पद्धतीने पात्र माजी सैनिकांनी अर्ज सादर केलेले आहेत, त्या पात्र माजी सैनिकांची जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातील गट-क ची सरळ सेवेतील पदांची परीक्षा टीसीएस आयओएन मार्फत दि. २३ मे २०२४ रोजी सकाळी ८.३० ते १०.३० या कालावधीत पुणे, मुबई, नागपूर, छत्रपती संभाजीनगर याचार परीक्षा केंद्रावर होणार आहे याची जिल्ह्यातील अर्ज सादर केलेल्या माजी सैनिकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन सैनिक कल्याण विभागाचे उपसंचालक (प्रशासन) यांनी कळविले आहे.
00000
Comments
Post a Comment