एफएसएसएआयचा उपक्रम; खाद्य पदार्थ विक्रेत्यांसाठी एक दिवशीय प्रशिक्षण
केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांची प्रमुख उपस्थिती
बुलडाणा,(जिमाका)
दि.11: भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण(एफएसएसएआय) पश्चिम
क्षेत्रमार्फत ‘संकल्प स्वच्छ आहार’उपक्रमांतर्गत
रविवार दि. 12 जानेवारी 2025 रोजी बुलढाणा येथील सहकार विद्या
मंदिर शाळेत रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्रेत्यांसाठी प्रशिक्षण व जनजागृती कार्यक्रमाचे
आयोजन करण्यात आले आहे. या प्रशिक्षणात 2000 पेक्षा जास्त विक्रेते सहभागी
होणार असून विषय तज्ज्ञाव्दारे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणाचे खाद्यपदार्थ
विक्रेत्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणचे सहायक
संचालक ज्योती हरणे यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिजाऊ सभागृहात
‘संकल्प स्वच्छ आहार’उपक्रमांतर्गत
खाद्य विक्रेत्यांसाठी प्रशिक्षण व जनजागृती कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी पत्रकार
परिषदचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्या बोलत होत्या. भारतीय अन्न सुरक्षा आणि
मानक प्राधिकरण पश्चिम क्षेत्राचे सहायक संचालक अजय खैरनार, निलेश धंदाळे, शुभांगी
निकम तसेच पत्रकार बांधव उपस्थित होते.
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री
प्रतापराव जाधव या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. अन्न सुरक्षा
प्रशिक्षण आणि प्रमाणीकरण कार्यक्रमात रस्त्यावर खाद्यपदार्थ विकणारे 2000 पेक्षा जास्त विक्रेते सहभागी
होणार आहेत. हा कार्यक्रम केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण आणि रसायने आणि खते मंत्री
यांनी 2023 च्या जागतिक अन्न सुरक्षा दिनी
केलेल्या घोषणेला अनुसरून आहे. ज्यामध्ये 2025-2026 या आर्थिक वर्षाच्या अखेरीस अन्न
हाताळणी करणाऱ्या 2.5 दशलक्ष जणांना प्रशिक्षण देण्याचे
काम एफएसएसआयला देण्यात आले आहे.
एफएसएसआयचा
फोस्टॅक(FOSTAC) कार्यक्रमातंर्गत अन्न हाताळणाऱ्यांना, ज्यामध्ये रस्त्यावरील विक्रेत्यांना
अन्न सुरक्षा आणि स्वच्छता मानके राखण्यासाठी आवश्यक असलेले महत्त्वाचे ज्ञान आणि कौशल्ये
प्रदान करण्यासाठी तयार केला गेला आहे. या प्रशिक्षणात वैयक्तिक स्वच्छता, सुरक्षित अन्न हाताळणी आणि अन्नपदार्थ
दूषित होण्यास प्रतिबंध यासारख्या प्रमुख क्षेत्रांचा समावेश आहे. विक्रेत्यांना नियामक
अनुपालन आणि अन्न सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी करावयाचे उपाययोजनाची माहिती यावेळी
दिली जाणार आहे.
रस्त्यावरील खाद्यपदार्थ हे भारताच्या समृद्ध सांस्कृतिक
वारशाचे एक जिवंत उदाहरण आहे, जे
देशाच्या विविध पाककृती परंपरा, विशिष्ट
चव आणि सामाजिक परिदृश्याचे दर्शन घडवते. त्याच्या वाढत्या लोकप्रियतेसह, ग्राहकांसाठी त्याची सुरक्षितता
सुनिश्चित करणे आणि त्याचबरोबर रस्त्यावरील या आवडत्या पदार्थांची निर्मिती करणाऱ्या
विक्रेत्यांना पाठबळ देणे देखील महत्त्वाचे आहे.
Comments
Post a Comment