शेतकऱ्यांनो, ई-नाम प्रणालीव्दारे शेतमालाची विक्री करा

 

शेतकऱ्यांनो, ई-नाम प्रणालीव्दारे शेतमालाची विक्री करा

·        30 हजार शेतकऱ्यांची नोंदणी

·        35 लाख क्विंटल शेतमालाच्या विक्री

·        1300 कोटी रुपयांची उलाढाल

 

बुलडाणा, (जिमाका) दि. 31:   कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांच्या मालाची विक्री अधिक पारदर्शक व शेतकरी हिताची होण्यासाठी केंद्र शासनाच्या वतीने ई-नाम योजना सुरु केली आहे. या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील सात कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांना ई-लिलाव पद्धतीने शेतमाल विक्री करण्याची सुविधा उपलब्ध झाली असून आतापर्यंत सुमारे 30 हजार शेतकऱ्यांनी ई-नाम प्रणालीवर नोंदणी केली आहे. वर्षाअखेर जवळजवळ 35 लाख क्विंटल शेतमालाची विक्री झाली आहे. यातून सुमारे 1300 कोटी रुपयांहून अधिक रकमेची उलाढाल झाली असून शेतकऱ्यांना आपल्या शेतमालाला योग्य भाव मिळण्यास मदत होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी हमीभाव व बाजारभावासाठी नजीकच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ई-नाम प्रणालीवर नोंदणी करुन जास्त भाव देणाऱ्या व्यापाऱ्याकडे शेतमाल विक्री करावा, असे आवाहन सहकारी संस्थाचे जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण यांनी केले.

 

            बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर, खामगांव, शेगांव, नांदुरा, मेहकर, चिखली, लोणार या सातही कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये राष्ट्रीय कृषि बाजार(ई-नाम) योजना कार्यान्वीत करण्यात आलेली आहे. त्यापैकी मलकापूर, खामगांव, शेगांव बाजार समितीमध्ये 30 हजार 744 शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. तर नांदुरा, मेहकर, चिखली, लोणार बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांची नोंदणीची कारवाई सुरु आहे.

            ई-नाम योजनेंतर्गत सातही बाजार समितीमध्ये वर्षाअखेर 34 लाख 99 हजार 980 क्विंटल शेतमालाची विक्री झाली आहे. यातून सुमारे 1363 कोटी 97 लाख 82 हजारांहून अधिक रकमेची उलाढाल झाली आहे. यामध्ये चिखली बाजार समिती येथे 151163.07 क्विंटल विक्री झाली असून एकूण किंमत 76 कोटी 95.27 रुपये आहे. खामगांव बाजार समितीमध्ये 733860.04 क्विंटल विक्रीतून 398 कोटी 27.75 रुपये, लोणार येथे 21396.56 क्विंटल विक्रीतून 8 कोटी 33.01 रुपये, मलकापूर येथे 2484980.67 क्विंटल विक्रीतून 834 कोटी 62.94 रुपये आहे. मेहकर येथे 3.58 क्विंटल विक्रीतून 16 हजार रुपये, नांदुरा बाजार समिती येथे 17.22 क्विंटल विक्रीतून 73 हजार रुपये तर शेगांव बाजार समितीमध्ये 108558.89 क्विंटल विक्री झाली आहे, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक यांनी दिली.

 

राज्यस्तरावर महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ पुणे यांचेमार्फत नाम योजनेची अंमलबजावणी करण्यात येते. सदर योजनेची स्वतंत्रपणे वेबसाईट तयार करण्यात आलेली असून https://www.enam.gov.in या वेबसाईटवर योजनेची परिपूर्ण माहिती उपलब्ध आहे. तसेच राष्ट्रीय कृषि बाजार(ई-नाम) योजनेचे स्वतंत्र पोर्टल असून, सदर पोर्टलवर योजनेत समाविष्ठ कृषी उत्पन्न बाजार समितीमार्फत धान्यांची आवक व दैनंदिन शेतमाल भावांची माहिती उपलब्ध आहे. त्यामुळे देश व राज्यातील शेतकरी, खरेदीदार, विक्रेते यांना एका ठिकाणावरुन व्यापाक प्रमाणात शेतीमालाबाबात माहिती प्राप्त होऊन, शेतमालाची खरेदी विक्री करण्यात येते.

ई-नाम योजनेचे फायदे : लिलाव प्रक्रियेमध्ये पारदर्शकता, सुसुत्रता व अधिक स्पर्धा निर्माण होते. शेतकऱ्यांना देशातील राज्यातील बाजार समित्यांमध्ये शेतमालाच्या विक्रीचा पर्याय उपलब्ध होतो. योजनेंतर्गत ई-ट्रेडिंग प्लॅटफॉर्ममुळे शेतमाल विक्री झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होतात. शेतमाला विक्री प्रक्रियेत सहभागी शेतकरी, आडते, व्यापारी यांचेमध्ये उचित समन्वय ठेवणे सुलभ होते. थेट खरेदी, खाजगी बाजार यांच्या स्पर्धेत राज्यातील बाजार समित्यांना टिकून राहण्यासाठी मदत होते. या प्रक्रियेमुळे वेळेची, पैशाची बचत होऊन, अनावश्यक बाबी टाळण्यास मदत होते.

            नाम योजनेअंतर्गत शेतमालाचा ई-लिलाव होत असल्याने शेतकऱ्यांच्या मालाला लिलावाद्वारे जास्तीत जास्त बाजार भाव मिळण्यास मदत होते. त्यामुळे बुलढाणा जिल्हयातील सर्व शेतकऱ्यांनी आपल्या शेतमालाला ई-लिलावाद्वारे जास्तीत जास्त भाव मिळणेचे दुष्टीने कृषि बाजार (ई-नाम) पोर्टलला आपली नाव नोंदणी करावी व आपला शेतमाला बाजार समितीमध्ये विक्रीसाठी आणुन योजनेचा लाभ घ्यावा.

00000

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

स्वयं अर्थसहाय्यिता नवीन शाळांना मान्यता व दर्जावाढीची शिफारस; हरकती मागविल्या