Monday 10 October 2022

DIO BULDANA NEWS 10.10.2022

 आधारभूत किंमतीत खरेदीसाठी शेतकऱ्यांनी नोंदणी करावी

*संस्थेत छायाचित्र काढणे बंधनकारक

बुलडाणा, दि. 10 : हंगाम २०२२-२३ मध्ये जिल्ह्यामध्ये केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत योजनेंतर्गत राज्य शासनातर्फे हमी दरात मका, ज्वारी आणि बाजरी खरेदीसाठी नोंदणी करावी लागणार आहे. ही नोंदणी दि. १५ ऑक्टोबर २०२२ पर्यंत करावी लागणार आहे. यात शेतकऱ्यांना नोंदणी करण्याकरीता शेतकऱ्यांनी संस्थेत स्वत: हजर राहून छायाचित्र काढणे बंधनकारक आहे.

नोंदणी करण्यासाठी शेतकऱ्यांनी हंगाम २०२२-२३ चा सातबारा उतारा, पिकपेरा, स्पष्ट खाते क्रमांक दिसणारे बँक पासबुकची झेरॉक्स, जनधन पासबुक देण्यात येऊ नये, आधारकार्ड, ही कागदपत्रे सादर करणे बंधनकारक आहे. बँक खाते सुरु असल्याची खात्री शेतकऱ्यांनी करणे गरजेचे आहे.

जिल्ह्यामध्ये मका, ज्वारी आणि बाजरी नोंदणीसाठी १४ केंद्रांना जिल्हाधिकारी यांनी मान्यता दिली आहे. तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री समिती मर्यादित बुलडाणा, मेहकर, लोणार, देऊळगावराजा, संग्रामपूर, शेगाव, मलकापूर, जळगाव जामोद व खामगाव, तसेच संत गजानन कृषि विकास शेतकरी उत्पादक कंपनी, मोताळा, सोनपाऊल ॲग्रो प्रोड्युसर कंपनी, अंजनी खु. केंद्र - साखरखेर्डा, स्वराज्य शेतीपुरक सहकारी संस्था मर्यादित, चिखली, माँ जिजाऊ फार्मर प्रोड्युसर कंपनी, नारायणखेड, ता. देऊळगावराजा, केंद्र - सिंदखेडराजा, नांदुरा ॲग्रो फार्मर प्रोड्यूसर कंपनी, नांदुरा, केंद्र - वाडी, या केंद्रांना मान्यता दिलेली आहे.

शेतकऱ्यांनी हमीदराचा लाभ घेण्यासाठी स्वतः नोंदणी केंद्रावर उपस्थित राहून नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी पी. एस. शिंगणे यांनी केले आहे.

000000

जागतिक टपाल दिनानिमित्त डाक सप्ताहाचे आयोजन

          बुलडाणा, दि. 10 :  डाक विभागामार्फत दि. 9 ऑक्टोबर ते 13 ऑक्टोबर या कालावधीत टपाल सप्ताहाचे आयोजन केले आहे. या सप्ताहात बुलडाणा डाक विभागातर्फे संपूर्ण जिल्ह्यात विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

          दि. 11 ऑक्टोबर रोजी फिलॅटेली दिवस साजरा करण्यात येणार आहे. बुलडाणा प्रधान डाक घर येथे फिलॅटेलीस्टांचा सत्कार करून फिलॅटेली सेमिनारचे आयोजन करण्यात आले आहे. दि. 12 ऑक्टोबर रोजी मेल आणि पार्सल दिवस, दि. 13 ऑक्टोबर रोजी अंत्योदय दिवस साजरा करण्यात येत आहे.

          नागरिकांनी या कालावधीत पोस्ट ऑफिसमध्ये आयोजित विविध उपक्रमात सक्रीय सहभाग घेऊन डाक विभागाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन डाक अधिक्षक राकेश एल्लामेल्ली यांनी केले आहे.

00000

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी व्हावे

*कृषि विभागाचे शेतकऱ्यांना आवाहन

बुलडाणा , दि. 10 : प्रधानमंत्री पिक विमा योजनेंतर्गत आंबियाबहारसाठी फळबागा असणाऱ्या शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन कृषि विभागातर्फे करण्यात आले आहे.

प्रधानमंत्री पिक विमा योजनेंतर्गत पुर्नरचित हवामानावर आधारित फळपिक विमा योजना सन 2021-22, 2022-23, व 2023-24  या तीन वर्षासाठी आंबियाबहारामध्ये आंबा, केळी, डाळींब, द्राक्ष, मोसंबी आणि संत्रा अशा 6 फळपिकांचा समावेश करण्यात आला आहे. या योजनेस शासन मान्यता देण्यात आली आहे.

अवेळी पाऊस, कमी तापमान, वेगाचा वारा, जादा तापमान, जास्त पाऊस आणि गारपिट या हवामान धोक्यापासून निर्धारित केलेल्या कालावधीत शेतकऱ्यांना विमा संरक्षण आणि आर्थिक सहाय्य देणे व फळपिक नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थितीत शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखणे ही या योजनेची प्रमुख उद्दिष्टे आहेत. अधिसुचित क्षेत्रात अधिसुचित फळ पिके घेणारे कुळाणे, भाडेपट्टीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसह सर्व शेतकरी या योजनेत सहभाग घेण्यास पात्र आहेत.

सन 2021-22 पासून पुर्नरचित हवामान आधारित फळपिक विमा योजना ही कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना अधिसुचित क्षेत्रातील अधिसुचित पिकासाठी ऐच्छिक आहे. या योजनेंतर्गत केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार केंद्र शासनाने त्यांना विमा हप्ता 30 टक्के दरापर्यंत मर्यादित केला आहे. त्यामुळे 30 टक्केवरील विमाहप्ता राज्य शासन व शेतकरी यांनी स्विकारणे क्रमप्राप्त आहे. या योजनेंतर्गत 30 ते 35 टक्क्यांपर्यंतचे अतिरिक्त 5 टक्के विमा हप्ता दायीत्व राज्य शासनाने स्वीकारले आहे. 35 टक्‍क्यांवर विमाहप्ता राज्य शसान व शेतकरी यांनी समप्रमाणात भरावयाचे आहेत.

शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, यासाठी जमीन भुधारणेच्या मर्यादेत एका शेतकऱ्यास अधिसूचित फळपिकासाठी 4 हेक्टर क्षेत्र मर्यादेपर्यंत विमा नोंदणी करता येईल. अधिसुचित फळपिकापैकी एका फळपिकासाठी एका वर्षात एकाच क्षेत्रावर मृग अथवा आंबिया बहार यापैकी कोणत्याही एकाच हंगामाकरिता विमा संरक्षणासाठी अर्ज करता येईल. केवळ उत्पादनक्षम फळबागानाच विमा संरक्षणाचे कवच लागू राहणार आहे. फळपिकनिहाय निर्धारित केलेले हवामान धोके लागू झाल्यावर नुकसान भरपाई देय होते. विमा क्षेत्र घटक महसूल मंडळ राहील. बँकेकडून अधिसूचित फळ पिकांसाठी पिककर्ज मर्यादा मंजूर असलेले शेतकरी या शेतकऱ्यांनी विमा प्रस्ताव बँकाना सादर करण्याची अंतिम मुदत फळपिक निहाय असेल.

शेतकऱ्यांनी कर्जदार व बिगर कर्जदार योजनेतील सहभागाचा अर्ज सादर करणे, विमा हप्त्याची रक्कम कर्जदार किंवा बिगर कर्जदार शेतकऱ्यांच्या बँक खात्यामधून प्राथमिक सहकारी संस्था, बँक, आपले सरकार सेवा केंद्र, विमा प्रतिनिधी यांनी कपात करणे, शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम मुदत पुढील प्रमाणे आहे. द्राक्ष फळपिकारिता अंतिम तारीख 15 ऑक्टोबर 2022, मोसंबी करिता 31 ऑक्टोबर 2022, केळी करिता 31 ऑक्टोबर 2022, संत्राकरिता 30 नोव्हेंबर 2022, आंबा 31 डिसेंबर 2022, डाळींब 14 जानेवारी 2023 याप्रमाणे मुदत राहणार आहे.

फळबाग उत्पादक शेतकऱ्यांनी बँकेशी किंवा क्षेत्रीय अधिकारी जसे तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, कृषि पर्यवेक्षक, कृषि सहाय्यक यांच्याशी संपर्क साधून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी एस. जी. डाबरे यांनी केले आहे.

00000

No comments:

Post a Comment