Thursday 6 July 2023

DIO BULDANA NEWS 06.07.2023

 तेनझिंग नॉर्गे राष्ट्रीय साहसी पुरस्कार योजनेसाठी

प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

बुलढाणा, दि‍.06 :-  केंद्र शासनाच्या युवक कल्याण योजनेंतर्गत तेनझिंग नॉर्गे राष्ट्रीय साहसी पुरस्कार सन 2022 करीता नामांकनाचे प्रस्ताव सादर करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

सदर पुरस्काराकरीता नामांकनाचे प्रस्ताव सादर करणाऱ्या खेळाडूंची कामगिरी मागील तीन वर्षामधील म्हणजेच सन 2020, 2021, 2022 मधील कामगिरी असावी. साहसी उपक्रम हे जमीन, पाणी व हवेमधील असणे आवश्यक आहे. तसेच खेळाडूंची कामगिरी अतिउत्कृष्ठ असणे आवश्यक आहे. त्याबाबतची माहिती दोन ते तीन पानामध्ये हिंदी किंवा इंग्रजी भाषेमध्ये प्रस्तावासोबत सादर करावी. तसेच आवश्यक ती सर्व माहिती कागदपत्रे, प्रमाणपत्रे, कात्रणे आदी सोबत जोडणे आवश्यक आहे.

जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी तेनझिंग नॉर्गे राष्ट्रीय साहसी पुरस्कार सन 2022 करीता नामांकनाचे प्रस्ताव दि. 14 जुलै 2023 पर्यंत केंद्र शासनाच्या awards.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन स्विकारण्यात येतील. सदर पुरस्काराकरीता जिल्ह्यातील पात्र खेळाडूंनी ऑनलाईन प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांनी केले आहे.

                                                000000000

स्व. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना

बुलडाणा, दि. 6 : शेती व्यवसाय करताना होणारे अपघात, वीज पडणे, पूर, सर्पदंश, विंचू दंश, विजेचा शॉक आदी नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे अपघात, रस्त्यावरील अपघात, वाहन अपघात, अन्य कोणत्याही कारणामुळे होणाऱ्या अपघातामुळे शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्यास स्व. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेतून लाभ देण्यात येतो.

अपघातामुळे मृत्यू ओढावतो किंवा काहींना अपंगत्व येते. कर्त्या व्यक्तीस झालेल्या अपघातामुळे कुटुंबाच्या उत्पन्नाचे साधन बंद होऊन अडचणीची परिस्थिती निर्माण होते. अशा अपघातग्रस्त शेतकरी, त्यांच्या कुटुंबास आर्थिक लाभ देण्याकरिता राज्यातील सर्व वहितीधारक खातेदार शेतकरी आणि वहितीधारक खातेदार म्हणून नोंद नसलेले शेतकऱ्याच्या कुटुंबातील कोणत्याही एका सदस्यास आई-वडील, शेतकऱ्याची पती, पत्नी, मुलगा आणि अविवाहित मुलगी यापैकी कोणत्याही एका व्यक्ती १० ते ७५ वर्षे वयोगटातील एकूण २ जणांकरीता गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना राबविण्यात येत आहे. सदर योजना १९ एप्रिल २०२३ पासून राबविण्यात येत आहे.

योजनेच्या प्रयोजनार्थ कुटुंबातील वहितीधारक खातेदार म्हणून नोंद नसलेले १ सदस्यांमध्ये आई-वडील, शेतकऱ्याची पती, पत्नी, मुलगा व अविवाहीत मुलगी यांचा समावेश ग्राह्य धरण्यात येणार आहे. कृषि गणनेनुसार निर्धारित केलेल्या वहितीधारक खातेदार शेतकरी आणि वहितीधारक खातेदार म्हणून नोंद. नसलेले शेतकऱ्यांच्या कुटुंबातील कोणताही १ सदस्य असे एकूण २ जणांकरीता गोपीनाथ मुंडे शेतकरी सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेंतर्गत लाभ देण्यात येतो. यात अपघाताच्या बाबीमध्ये आर्थिक सहाय्यात अपघाती मृत्यू झाल्यास दोन लाख रूपये, अपघातामुळे दोन डोळे अथवा दोन हात किंवा दोन पाय निकामी झाल्यास दोन लाख रूपये, अपघातामुळे एक डोळा व एक हात किंवा एक पाय निकामी झाल्यास दोन लाख रूपये, अपघातामुळे एक डोळा अथवा एक हात किंवा एक पाय निकामी झाल्यास एक लाख रूपये अनुदान देण्यात येते.

अपघातामध्ये रस्ता, रेल्वे अपघात, पाण्यात बुडून मृत्यू, जंतूनाशके हाताळताना अथवा अन्य कारणामुळे विषबाधा, विजेचा धक्का बसल्यामुळे झालेला अपघात, वीज पडून मृत्यू, खून, उंचावरुन पडून झालेला अपघात, सर्पदंश व विंचूदंश, नक्षलवाद्याकडून झालेल्या हत्या, जनावरांचा हल्ला, चावण्यामुळे जखमी किंवा मृत्यू, बाळंतपणातील मृत्यू, दंगल, अन्य कोणताही अपघात, या अपघाताच्या बाबींचा समावेश आहे.

अपघातामध्ये नैसर्गिक मृत्यू, विमा कालावधीपुर्वीचे अपंगत्व, आत्महत्येचा प्रयत्न, आत्महत्या किंवा जाणीवपूर्वक स्वतःला जखमी करुन घेणे, गुन्ह्याच्या उद्देशाने कायद्याचे उल्लंघन करताना झालेला अपघात, अंमली पदार्थाच्या अंमलाखाली असताना झालेला अपघात, भ्रमीष्टपणा, शरीरांतर्गत रक्तस्त्राव, मोटार शर्यतीतील अपघात, युद्ध, सैन्यातील नोकरी, जवळच्या लाभधारकाकडून खून याबाबींचा समावेश राहणार नाही. या योजनेंतर्गत लाभ प्राप्त होण्यासाठी अर्जासोबत सातबारा उतारा, मृत्यूचा दाखला, शेतकऱ्यांचे वारस म्हणून गावकामगार तलाठ्याकडील गाव नमुना नं. ६ क नुसार मंजूर झालेली वारसाची नोंद, वारसदाराचे ओळखपत्र, आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक पासबुक, निवडणूक ओळखपत्र, अपघातग्रस्ताचा वयाचा दाखला ज्यात जन्म दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, शाळेच्या मुख्याध्यापकाचे प्रमाणपत्र, ग्रामपंचायतीचे प्रमाणपत्र, आधार कार्ड, पॅन कार्ड, वाहन चालविण्याचा परवाना, पारपत्र, निवडणूक ओळखपत्र यापैकी कोणतेही एक कागदपत्र, प्रथम माहिती अहवाल, घटनास्थळ पंचनामा, पोलिस पाटील माहिती अहवाल, अपघाताच्या स्वरूपानुसार अंतिम विमा प्रस्तावासोबत सादर करावयाची कागदपत्रे सादर करावी लागणार आहे.

अपघातग्रस्त शेतकरी, शेतकऱ्यांचे वारसदारांनी सर्व निर्धारीत कागदपत्रांसह परिपूर्ण प्रस्ताव संबंधीत तालुका कृषि अधिकारी यांच्याकडे ३० दिवसाच्या आत सादर करावे लागणार आहे. यासाठी कृषि विभागाच्या सर्व क्षेत्रिय अधिकारी, कर्मचारी यांचे मार्गदर्शन करतील. योजनेंतर्गत वारसदाराची निवड अपघातग्रस्ताची पत्नी, अपघातग्रस्त स्त्रिचा पती, अपघातग्रस्ताची अविवाहित मुलगी, अपघातग्रस्ताची आई, अपघातग्रस्ताचा मुलगा, अपघातग्रस्ताचे वडील, अपघातग्रस्ताची सून, अन्य कायदेशीर वारसदार याप्रमाणे करण्यात येणार आहे.

000000

 

मालवाहू वाहनांना वाहनांना तपशील लिहिणे बंधनकारक

बुलडाणा, दि. 6 : मालवाहू परवानाधारक वाहनाच्या बॉडीच्या मागील, तसेच उजव्या व डाव्या बाजूंना पिवळ्या रंगाच्या  पार्श्वभूमीवर काळ्या रंगाच्या शाईने परवानाधारकाचे नाव, वाहनाचा परवाना क्रमांक, परवान्याची वैधता आणि वाहनाचा क्रमांक आदी तपशील नमूद करणे बंधनकारक आहे.

सदर अटींचे उल्लंघन झाल्यास परवानाधारकाद्वारे मोटार वाहन कायादा 1988 चे कलम 66/192 चा भंग केल्यामुळे 10 हजार रुपये दंड आणि एक महिन्याकरिता परवाना निलंबनाकरिता पात्र राहिल. मोटार वाहन कायदा 1988 मधील कलम 79 (7) अन्वये एक महिन्यानंतर लागू होईल. प्रादेशिक परिवहन प्राधिकरण बुलडाणा मार्फत मालवाहू परवाना प्राप्त वाहनधारकांनी एका महिन्याच्या आत सदर अटीनुसार आपल्या वाहनाच्या तिन्ही बाजूने परवानाधारकांचे नाव, वाहनाचा परवाना क्रमांक, परवान्याची वैधता आणि वाहनाचा क्रमांक आदी बाबी नमूद कराव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.

                                                000000

जात वैधता प्रमाणपत्रासाठी महिनाभर मोहिम

बुलडाणा, दि. 6 : जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना विविध व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी अनिवार्य असलेले जात वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी जिल्हा जात प्रामणपत्र पडताळणी समिती महिनाभर मोहिम राबविणार आहे.

जात प्रमाणपत्र मिळण्यासाठी जिल्ह्यात दि. 26 जुलै 2023 पर्यंत ही मोहिम राबविण्यात येत आहे. यात विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र दिली जातील. राज‍र्षि शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. मोहिमेत महाविद्यालयातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शाळेतच जात प्रमाणपत्र देण्याबरोबर अकरावी आणि बारावी विज्ञान शाखेत शिक्षण घेत असलेले, तसेच बारावी विज्ञान शाखा उत्तीर्ण होऊन सामाईक प्रवेश परिक्षा दिलेल्या आणि तृतीय वर्षी पदविका अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र दिली जाणार आहेत.

महाविद्यालयीन, विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसिलदार आणि शाळेचे मुख्याध्यापक, प्राचार्य यांच्या संयुक्त सहाकार्यातून नियोजन आणि सक्षम कार्यप्रणाली निश्चित करण्यासाठी कार्यवाही सुरु केली आहे. मागासवर्गीय प्रवर्गातील विद्यार्थी जात प्रमाणपत्रापासून वंचित राहू नये, यासाठी ही मोहिम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत शाळा आणि महाविद्यालय. आपआपल्या शाळा आणि माहविद्यालयात मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे परिपूर्ण अर्ज घेऊन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे पाठवावेत. असे आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे सदस्य सचिव मनोज मेरत यांनी केले आहे.

                                                            00000


No comments:

Post a Comment