DIO BULDANA NEWS 22.07.2023

 अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सुरक्षितता बाळगावी

-जिल्हाधिकारी डॉ. ह. पि. तुम्मोड
बुलडाणा, दि 22 : जिल्ह्यात येत्या दोन दिवसात सर्वत्र अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. या इशाराच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन परिस्थिती चांगल्याप्रकारे हाताळत आहे. नागरिकांनीही सहकार्य करीत सुरक्षितता बाळगावी, तसेच घराबाहेर पडू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. ह. पि. तुम्मोड यांनी केले आहे.
जिल्ह्यात पुढील दोन दिवस चांगल्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे. गेल्या 24 तासात संग्रामपूर तालुक्यातील संग्रामपूर, सोनाळा, बाबनबीर या महसूल मंडळात अतिवृष्टी झाली आहे. तसेच संग्रामपूर तालुक्यातील नदीनाल्यांना पूर आला आहे.  
जिल्ह्यातील नागरिकांनी पाऊस सुरू असताना नदीनाल्यांमध्ये पुराचे पाणी असताना जाऊ नये. नागरिकांनी पुराचे पाणी पाहण्यासाठी नदी-नाल्याच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे.तसेच पुलावरून पाणी वाहत असल्यास पूल ओलांडून जाण्याचा प्रयत्न करू नये. तसेच धोकादायक ठिकाणी सेल्फी घेऊ टाळावे. पाऊस सुरू असताना घराबाहेर पडू नये. जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास पावसाचा अंदाज घेऊनच कामकाजाचे नियोजन करावे.
नागरिकांनी वीज पडण्यापासून संरक्षणासाठी दामिनी ॲपचा उपयोग करावा. तसेच सुरक्षितस्थळी आश्रय घ्यावा. आपत्तीच्या काळात नागरिकांनी पोलीस विभाग व स्थानिक प्रशासनाच्या संपर्कात राहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
*पूर परिस्थितीमध्ये काय करावे*
पूर परिस्थितीमध्ये नागरिकांनी उंच ठिकाणी जावे. विजेवर चालणाऱ्या उपकरणांचा वीज पुरवठा बंद करावा. गाव, घरात जंतुनाशके असल्यास ते पाण्यात विरघळणार नाहीत, याची दक्षता घ्यावी. पूरासंदर्भात पूर्वकल्पना मिळाल्यास घरातील उपयुक्त सामान व महत्वाची कागदपत्रे सुरक्षित ठिकाणी घेवून जावी.
*परिस्थितीमध्ये काय करु नये* 
पूर असलेल्या भागात विनाकारण भटकू नये. पुराच्या पाण्यात चूकुनही जावू नये. दुषित व उघड्यावरचे अन्न व पाण्याचे सेवन करणे टाळावे. पुलावरुन पाणी वाहत असताना पूल ओलांडू नये. पाऊस सुरू असताना घराबाहेर पडू नये. 
०००००
पावसाची स्थिती पाहून नागरिकांनी परतीच्या वारीत सहभागी व्हावे
-जिल्हाधिकारी डॉ. ह. पि. तुम्मोड
बुलडाणा, दि 22 : श्री संत गजानन महाराज यांची परतीची वारी सोमवार, दि. २४ जुलै रोजी खामगाववरून शेगावला परतणार आहे. या परतीच्या वारीत भाविक मोठ्या प्रमाणावर सहभागी होतात. मात्र यावर्षीची पावसाची परिस्थिती पाहून नागरिकांनी परतीच्या वारीत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. ह. पि. तुम्मोड यांनी केले आहे.
श्री संत गजानन महाराज यांच्या परतीच्या वारीचे आगमन झाले आहे. ही वारी खामगाव येथे दि. 23 जुलै रोजी मुक्कामी राहणार असून सोमवार दि. 24 जुलै रोजी खामगाववरून शेगावला परतणार आहे. या दोन्ही दिवशी भाविक मोठ्या प्रमाणावर सोहळ्याला उपस्थित असतात. मात्र यावर्षी सर्वत्र पावसाची स्थिती आहे. यामुळे भाविकांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. परतीच्या वारीच्या दिवशी वातावरणाचा अंदाज पाहून नागरिकांनी परतीच्या पालखीत सहभागी व्हावे, तसेच पावसाची परिस्थिती असल्यास नागरिकांनी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून परतीच्या वारीत सहभागी होऊ नये, असे आवाहन जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी डॉ. ह. पि. तुम्मोड यांनी केले आहे.
००००००
मंत्री अनिल पाटील यांचा आज दौरा
बुलडाणा, दि 22 : मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील हे रविवारी, दि. २३ जुलै रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.
श्री. पाटील यांच्या दौऱ्यानुसार दुपारी चार वाजता बुलडाणा येथे जिल्हाधिकारी कार्यालयात नैसर्गिक आपत्तीबाबत आढावा बैठक घेतील. त्यानंतर सायंकाळी पाच वाजता मलकापूरकडे निघून रात्री दहा वाजता विदर्भ एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण करतील.
०००००

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

स्वयं अर्थसहाय्यिता नवीन शाळांना मान्यता व दर्जावाढीची शिफारस; हरकती मागविल्या