Monday 19 December 2022

DIO BULDANA NEWS 16.12.2022

विभागस्तर शालेय खो-खो क्रीडा स्पर्धेला सुरुवात

 

 बुलडाणा , दि. 16: विद्यार्थ्यांचे कौशल्य विकसीत करण्यासाठी राज्य शासनाचे वतीने शालेय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येते.  त्याच धर्तीवर राज्यस्तरीय शिवशाही चषकाचे बुलढाण्यात आयोजन करण्यात येणार असुन त्यासाठी पावणेदोन कोटी रुपये स्पर्धा आयोजन, रोख बक्षीसे, इत्यादीसाठी करण्यात येणार आहे.  ज्यामध्ये 10 खेळांचा समावेश राहणार असल्याचे अमरावती विभागीय शालेय खो-खो क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी सांगीतले.

            क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, बुलढाणा व बुलढाणा जिल्हा खो-खो असोसिएशन यांचे संयुक्त विद्यमाने जिजामाता क्रीडा व व्यापारी संकुल, बुलढाणाचे मेदानावर 17,19 वर्षाआतील मुले, मुलींच्या खो-खो क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

            स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी मा.आमदार श्री.संजय गायकवाड बोलत होते.  यावेळी मंचकावर जि.प.सदस्य डी.एस.लहाने, कैलास करवंदे खो-खो संघटना, रविंद्र गणेशे क्रीडा पत्रकार, देवा दांडगे, जिवन उबरहंडे, अनिल इंगळे राज्य क्रीडा मार्गदर्शक तथा स्पर्धा संयोजक आदींची उपस्थिती होती.

            या स्पर्धेसाठी अमरावती विभागातुन पाच जिल्ह्याचे व दोन महानगर पालीका यांचे एकुण 14 संघ सहभागी झाले होते.  जवळ-जवळ 100 खेळाडू या सहभागी झाले.  दि.15 व 16 डिसेंबर 2022 अशा दोन दिवस चालणाऱ्या स्पर्धेत दि.16 डिसेंबर 2022 ला 17,19 वर्षाआतील मुलींच्या स्पर्धा होणार आहेत.   17 वर्षाआतील मुलांचा अंतीम सामना अमरावती ग्रामीण विरुध्द बुलढाणा जिल्हा असा होऊन यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील श्री शिवाजी विद्यालय, चिखली चा संघ विजेता ठरला.   गजानन धांडे राष्ट्रीय खेळाडू खो-खो, डॉ.उत्तमसिंग राजपूत,.नंदुभाऊ गायकवाड, प्राचार्य, श्री शिवाजी विद्यालय, चिखली, विजय वानखेडे, होन सर सहकार विद्या मंदीर यांनी स्पर्धेतील खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.

            स्पर्धेला पंच म्हणून संजय सावंत, सागर उबाळे, शुभम अफ्रुतकर, गणेश पेरे, महेश डोसे, गणेश राजपूत, सचिन ढोले, अक्षय सरोदे, सुरज खडके हे काम पाहत आहेत.  उद्घाटन कार्यक्रमाचे सुत्रसंचलन अनिल इंगळे राज्य क्रीडा मार्गदर्शक व श्री.सागर उबाळे यांनी आभार मानले.  सदर स्पर्धा जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव, बुलढाणा यांचे कुशल मार्गदर्शनाखाली स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी अनिल इंगळे, राज्य क्रीडा मार्गदर्शक तथा स्पर्धा संयोजक, कृष्णा नरोटे, गोपाल गोरे, सुहास राऊत, जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्र खो-खो चे खेळाडू परिश्रम घेत आहेत.

00000000

जिल्हाधिकारी कार्यालयात मानवी हक्क दिवस साजरा

बुलडाणा, दि. 16 : मानवी हक्क विषयक शिक्षण वाढीस लागण्यासाठी व सर्वसामान्य लोकांमध्ये मानवी हक्क संस्कृती निर्माण होण्यासाठी दिनांक 10 डिसेंबर दिवस मानवी हक्क दिन मा.जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा येथे साजरा करण्यात आला.सदर कार्यक्रमास डॉ ह.पि.तुम्मोड जिल्हाधिकारी,बुलढाणा दिनेश गिते,निवासी उपजिल्हाधिकारी, राजेश लोखंडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी,जि.प.बुलढाणा,अॅड गजानन पदमणे,विधी अधिकारी, जि. का.बुलढाणा, सीमा आगाशे,कार्यकारी विश्वस्त, द लव  ट्रस्ट, बुलढाणा, रामेश्वर वसु, महिला व बाल विकास संरक्षण अधिकारी, मुकंदे, शिक्षणाधिकारी (माध्य),पागोरे, शिक्षणाधिकारी (प्राथ),.गणेश पांडे,जिल्हा प्रशासन अधिकारी,गणराज फाउंडेशन चिखली,कृषी समृध्दी मल्टीपर्पज फाउंडेशन आस्था शिक्षण व क्रिडा बहु.संस्था,दिव्य ज्योती बहु.संस्था,राजर्षी छत्रपती शाहु महाराज शिक्षण क्रीडा बहु.संस्था तसेच या संस्थाच्या प्रतिनिधी तसेच अंगणवाडी सेविका  व विविध शाळेचे विद्यार्थी तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

सदर कार्यक्रमाच्या अनुषंगाने जिल्हा महिला व बाल विकास विभाग व कृषिसमृध्दी मल्टीपर्पज  फाऊंडेशन यांचे संयुक्त विदयमानाने वन स्टॉप सेंटर जिल्हा सामान्य रुग्णालय बुलढाणा येथे मा.जिल्हाधिकारी बुलढाणा यांनी जनजागृतीपर प्रभात फेरीचे उदघाटन केले. जिल्हा सामान्य रुग्णालय बुलढाणा येथुन जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा पर्यंत जनजागृतीपर प्रभात फेरीदरम्यान  कलापथक ,पथनाटय आणि विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात  आले. मा.जिल्हाधिकारी महोदयांनी वन स्टॉप सेंटरला भेट देवुन पीडित महिलांना  सह्दयतेने संवाद साधला.  

निवासी उपजिल्हाधिकारी यांनी मानवी हक्क्‍ दिनाची पार्श्वभुमी विषद करून माणुस म्हणुन जगताना संविधानाने बहाल केलेल्या हक्क व अधिकारांचा उहापोह करत सदर कार्यक्रमाचे प्रस्ताविक केले. प्रमुख वक्ते ॲड.पदमणे विधी अधिकारी जि.कार्या,बुलढाणा यांनी मानवी हक्क दिन याबाबत कायदेविषयक माहिती उपस्थितांना दिली. सीमा आगाशे व प्रा.गायकवाड यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले.मा जिल्हाधिकारी महोदयांनी अध्यक्षिय भाषणामध्ये मानवाधिकारांच्या सार्वत्रिक घोषणेचा 75 वा वर्धापन दिन व या वर्षीच्या मानवी हक्क दिनाची घोषणा Dignity Freedom And Justice For All व कृती संदेश Stand Up For Human Rights याबाबत माहिती दिली तसेच माणसाने माणसाशी मणासारखे वागावे याबाबत महत्वपुर्ण संदेश दिला. सदर कार्यक्रमांमध्ये मानवी अधिकाराचा जागतीक जाहीरनामा याचे वाचन संजय बनगाळे ना.तह.जि.कार्या,बुलढाणा यांनी  केले.कार्यक्रमाचे शेवटी शामला खोत अधिक्षक जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले व मा. अध्यक्षांचे वतीने कार्यक्रम संपल्याचे जाहिर केले. सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ.साहेबराव सोळंकी,आहारतज्ञ यांनी केले.


पशुसंवर्धन विभाग अंतर्गत विविध वैयक्तीक लाभाच्या योजनासाठी अर्ज करण्याचे आवाहन

बुलडाणा, दि. 16 : ग्रामीण भागातील सुशिक्षित व बेरोजगार युवकांना पशुपालक व शेतकरी बांधवांना स्वयंरोगाराचे साधन उपलब्ध करुन देण्यात येत आहे. नाविन्यपुर्ण राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय योजनेअंतर्गत दुधाळ गाई-म्हैसीचे गट वाटप . 1 हजार मांसल कुक्कुट पक्ष्यांच्या संगोपनासाठी निवारा शेड उभारण्यासाठी अर्थसहाय्य करण्यात येत आहे. शंभर कुक्कुट पिल्लाचे वाटप व 25+3 तलंगा गट वाटप या योजनासाठी ऑनलाईन पध्दतीने लाभार्थि निवड प्रक्रीया सन 2022-23 या वर्षात राबविले जाणार आहे. या योजनेचे लाभ पुढील 5 वर्षापर्यंत म्हणजे 2025-26 पर्यंत या योजनेचे लाभ घेता येईल. पशुपालकांना डेअरी, पोल्ट्री किंवा शेळी पालन या पैकी ज्या बाबीमध्ये अर्ज कराववयाचा आहे त्याची निवड करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. पशुपालक/शेतकरी बांधवांना व सुशिक्षित व बेरोजगार युवक/युवती/महिलांनी या योजनांचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज दाखल करण्याचे आवाहन डॉ. प्रविण कुमार घुले  जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त,बुलडाणा यांनी केले आहे. ऑनलाईन अर्ज भरण्याचे संकेतस्थळ ah.mahabms.com, ऑनलाईन मोबाईल ॲप- AAH-MAHABMS  , अर्ज करण्याचा कालावधी 11 जानेवारी 2023 मदुतीपर्यंत उपलब्ध. अर्ज फक्त्‍ ऑनलाईन पध्दतीने स्वीकारले जातील. पशुपालकांनी अर्ज भरण्याकरीता स्वत:चे मोबाईलचा जास्तीत जास्त वापर करावा. अर्ज भरताना अर्जदाराने नोंदविलेल्या मोबाईल क्रमांकावर अर्जाच्या स्थिती बाबत संदेश पाठविण्यात येणार असल्यामुळे कोणत्याही अर्जदाराने आपला मोबाईल क्रमांक बदलु नये.  अधिमाहिती करिता योजनेचे टोल फ्री क्रमांक 1962 किंवा 1800-233-0418 संपर्क साधवा.   0000000

तूर पिक संरक्षण सल्ला

बुलडाणा, दि. 16 : जिल्हयात मोठ्या प्रमाणात पाऊस झालेल्यामुळे पिकांना अनेक कीड व रोगांना तोंड द्यावे लागत आहे. सद्यास्थितीत तूर पिकावर काही ठिकाणी मारुका तसेय शेंगा पोखरणाऱ्या अळया या किडीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. ढगाळ वातावरण यामुळे आर्थिक नुकसान पातळीच्या पुढे जाऊन आर्थिक नुकसान सुध्दा होऊ शकते. मारुका ही कडधान्य पिकावरील पाने गुंडाळणारी व शेंगा पोखणारी किड आहे. या किडीचा पतंग करड्या रंगाचा असून मागील पंखावर पांढरे पट्टे आढळून येतात. मादी पतंग कळया,फुले व शेंगावर अंडी घालतात. अळी पांढुरक्या रंगाची व अर्धपारदर्शक असते. तिच्या पाठीवर काळ्यारंगाच्या सहा ठिपक्यांच्या जोड्या असतात. अंड्यातून निघालेली अळी कळ्या, फुले,  व शेंगांना एकत्रित करुन जाळयाने‍ चिटकून झुपके तयार करुन त्या आतमध्ये राहून कळया फुले खातात. तिसऱ्या व चौथ्या अवस्थेतील अळी शेंगा पोखरुन आतील दाणे खाते. अळी शेंगाच्या झुपक्यात किंवा मातीमध्ये कोषावस्थेत जाते. या किडीचा जीवनक्रम 18 ते 35दिवसात पूर्ण होतो. आर्थिक नुकसान टाळण्यासाठी शेतकरी बांधवांना तूर पिकात किडीच्या नियंत्रणासाठी खालीलप्रमाणे उपाययोजना कराव्यात. 10 ते 20 प्रती झाड (इथीओंन 50 ई.सी 15 मिली किंवा फ्लूबेंडामाइड 20 डब्ल्यू जी 5 ग्रॅम किंवा इंडोक्झाकार्ब 15.8 ई.सी. 7 मिली. किंवा इमामेक्टीन बेन्झोएट 5 एस.जी. 4.4 ग्रॅम किंवा क्लोरॅनट्रानिलीप्रोल 18.5 एस. सी. 2.5 मिली पैकी कोणत्याही एका किटकनाशकाची प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी बुलडाणा व वरिष्ठ शास्त्र कृषी विज्ञान केंद्र बुलडाणा यांनी केले आहे.

0000000

नेहरू युवा केंद्र बुलडाणा व्दारा विजय दिवस कार्यक्रम व शिवण कला प्रशिक्षण उद्घाटन संपन्न

बुलडाणा, दि. 16 :  भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालया अंतर्गत असलेल्या नेहरू युवा केंद्र बुलडाणा व्दारा 16 डिसेंबर विजय दिवस कार्यक्रम  व शिवण कला प्रशिक्षणाचे उद्घाटन मा. फुले शाहू डॉ.आंबेडकर वाचनालय शेलापूर येथे उत्साहात संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी् सरपंच सौ.कलावती सावळे तर प्रमुख अतिथी म्हणून कार्यक्रम पर्यवेक्षक अजयसिंग राजपूत, ग्राम विकास अधिकारी निता भोपळे, सामाजिक कार्यकर्ते तथा सरपंच आत्माराम सावळे, उपसरपंच दिनेश धुरंदर हे होते तर प्रशिक्षक फकिरा चित्ते, माकोडी युवा मंडळाचे प्रमोद सातव, राष्ट्रीय युवा स्वयंसेवक इरफान शहा, समाधान मोरे, रमेश मोरे, गौतम मोरे, समाधान गायकवाड, दशरथ खराटे, सुभाष मोरे, देवचंद मोरे, प्रकाश मोरे यांची प्रामुख्याने उपस्थित होती. 

कार्यक्रमाच्या सुरुवातीला राष्ट्रमाता जिजाऊ व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन व व्दीपप्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.  आपल्या मार्गदर्शनात कार्यक्रम पर्यवेक्षक अजयसिंग राजपूत यांनी सांगितले की, नेहरु युवा केंद्राद्वारे कौशल्यावर आधारित उद्दोजकता कार्यक्रमा अंतर्गत शिवण्‍ कला व्यवसाय प्रशिक्षणाचे आयोजन तीन महिन्याकरीता करण्यात आलेले आहे. ग्रामसेविका निता भोपळे यांनी  महिलांनी आर्थीक सक्षम  होण्यासाठी स्वत:चा स्वयंरोजगार उभारण्यासाठी पुढाकार घ्यावा असे सांगून पाणी आडविण्याकरीता बंधारा बांधण्यासाठी युवकांनी व महिलांनी पुढाकार घेण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्ष सरपंच सौ.कलावती सावळे यांनी प्रशिक्षणासाठी आवश्यक ती मदत करण्यात येईल  असे सांगून प्रशिक्षणार्थींना शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे वैविध्यपुर्ण संचलन मा.फुले शाहु आंबेडकर वाचनालयाचे अध्यक्ष दिनेश वानखेडे यांनी केले प्रास्ताविक फकिरा चित्ते यांनी तर आभार प्रदर्शन स्वयंसेवक इरफान शहा यांनी केले.  

000000000

राष्ट्रीय उर्जा संवर्धन सप्ताहाला आजपासून सुरुवात

बुलडाणा, दि. 16 : अपारंपरिक उर्जा स्त्रोतांचा वापर वाढविणे व ऊर्जा संवर्धन करणे या बाबींना प्राधान्य देण्यासाठी महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण मार्फत (महाऊर्जा ) राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन सप्ताहाला आजपासून सुरुवात झाली आहे. हा सप्ताह 20 डिसेंबरपर्यंत चालणार आहे.

पारंपारिक ऊर्जा निर्मितीचे स्त्रोत सिमित असल्याने सद्य स्थितीत ऊर्जा बचत शिवाय पर्याय नाही. अपारंपारिक ऊर्जा स्त्रोतांचा वापर वाढवून ऊर्जा संवर्धन करण्याच्यादृष्टीने राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन सप्ताह राबविण्यात येत आहे. यासाठी जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांचा सहभाग तसेच भविष्यातील ऊर्जा संकटाबाबत नागरिकांमध्ये जागृती करणे व अपारंपारिक ऊर्जा स्त्रोतांच्या वापराविषयी प्रबोधन करण्यासाठी प्रत्येक शाळेतील विद्यार्थ्यांकडून ऊर्जा बचत संबंधीचे संदेश जास्तीत-जास्त नागरिकांपर्यंत पोहचविण्याचे आवाहन विभागीय महाव्यवस्थापक प्रफुल्ल तायडे यांनी केले आहे.

जगभरातील हरितवायू उत्सर्जन करणाऱ्या देशांपैकी भारत प्रमुख देश म्हणून गणला जातो. भारताने पॅरिस वैश्विक हवामान बदल करारनाम्यानुसार आपल्या सक्रिय सहभागस अनुमती दर्शविली. या अनुषंगाने भारत 17 शाश्वत विकास ध्येय अत्यंत वेगाने व नविनतम पध्दतीने साध्य होण्यासाठी ध्येय धोरणे राबवित आहेत. जास्तीत-जास्त नागरिकांपर्यंत ऊर्जा बचतीचे महत्त्व पोहचविणे हा राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन सप्ताहाचा उद्देश आहे.

0000000


No comments:

Post a Comment