DIO BULDANA NEWS 22.10.2020
नुकसानग्रस्त शेतीचे सरसकट पंचनामे करावे
- पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे
- दे. राजा तालुक्यातील पीक नुकसानीचा घेतला आढावा
बुलडाणा,(जिमाका) दि.22: नुकत्याच झालेल्या परतीच्या पावसाने दे. राजा तालुक्यातील सर्वच पिकांचे नुकसान 100 टक्के झाले आहे. पीके पाण्यात गेली. शेतकरी संकटात सापडला असून बळीराजाला मदतीसाठी पिकांचे पंचनामे सरसकट पूर्ण करावे, अशा सूचना पालकमंत्री ना. डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिल्या आहेत.
दे. राजा येथील विश्राम गृह येथे तालुक्यातील अती पावसामुळे झालेले नुकसान व रस्ते दुरूस्तीबाबात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी पालकमंत्री आढावा घेताना बोलत होते. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता रविकांत काळवाघे, पोलीस निरीक्षक संभाजी पाटील, कृषी व महसूल विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
तालुक्यात पावसामुळे सर्वच पिकांचे 100 टक्के नुकसान झाले असताना शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई देण्यासाठी कार्यवाही करण्याचे निर्देश देत पालकमंत्री डॉ शिंगणे म्हणाले, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीची कार्यवाही तातडीने करावी. शेतकरी आपला केंद्रबिंदू असून रात्रंदिवस त्याच्या कल्याणासाठी काम करून त्यांना दिलासा द्यावा. नुकसान भरपाई 100 टक्के देण्यासाठी पुन्हा पंचनामे करावे. पावसामुळे रस्तेदेखील खराब झाले असून ज्या रस्त्यांना मान्यता मिळाली आहे, ते रस्ते लवकरात लवकर पुर्ण करावे. रस्त्यांची कामे करताना दर्जेदार करावी. त्यामध्ये हयगय न करता जनतेचा पैसा वाया जाता कामा नये.
ते पुढे म्हणाले, यावर्षी कोरोना संसर्गामुळे निधीची करतरता आहे. त्यामुळे उपलब्ध निधीतून कामे पूर्ण करावी. कामे करताना प्राधान्यक्रम ठरवून ती पुर्ण करावी. कृषी व महसूल यंत्रणांनी सक्रीयतेने शेत नुकसानीचे पंचनामे पूर्ण करावे. बळीराजाला तातडीने आर्थिक मदत देण्याची कार्यवाही करावी. यावेळी संबंधीत विभागाचे कर्मचारी बांधव उपस्थित होते.
कोरोना अलर्ट : प्राप्त 654 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 99 पॉझिटिव्ह
- 16 रूग्णांना मिळाली सुट्टी
बुलडाणा,(जिमाका) दि.22: प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 753 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 654 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 99 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 93 व रॅपिड टेस्टमधील 6 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 218 तर रॅपिड टेस्टमधील 436 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 654 अहवाल निगेटीव्ह आहेत.
पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : बुलडाणा शहर : 22, बुलडाणा तालुका : दुधा 1 , साखळी 1, येळगांव 1, मोताळा शहर : 2, मोताळा तालुका : बोराखेडी 1, खामगांव शहर : 2, खामगांव तालुका : निमकवळा 3, पिं. राजा 1, दे. राजा शहर : 2, दे. राजा तालुका : पाडळी शिंदे 1, मेहुणा राजा 1, चिखली शहर : 16, चिखली तालुका : येवता 1, बोरगांव काकडे 2, मेहकर शहर : 8, मेहकर तालुका : डोणगांव 3, हिवरा आश्रम 2, मोळा 1, जानेफळ 3, दे. माळी 2, आरेगांव 1, कळंबेश्वर 2, लोणार शहर : 1, लोणार तालुका : सुलतानूपर 3, सिं. राजा तालुका : रूम्हणा 2, चांगेफळ 1, मलकापूर शहर : 5, शेगांव शहर : 3, शेगांव तालुका : वरूड गव्हाण 1, नांदुरा शहर : 2, संग्रामपूर तालुका : बावनबीर 1, मूळ पत्ता चांगलवाडी ता. तेल्हारा जि. अकोला येथील 1 संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 99 रूग्ण आढळले आहे.
तसेच आज 16 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.
कोविड केअर सेंटर नुसार सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे : बुलडाणा : आयुर्वेद महाविद्यालय 4, स्त्री रूग्णालय 1, अपंग विद्यालय 2, सिं.राजा : 1, खामगांव : 8,
तसेच आजपर्यंत 38637 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 8050 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 8050 आहे.
आज रोजी 1211 नमुने अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 38637 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 8794 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 8050 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात 627 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 117 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.
***********
बालकावरील अत्याचारप्रकरणी आरोपीस सात वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा
बुलडाणा,(जिमाका) दि.22: येथील पाच वर्षीय बालक घरासमोर खेळत असताना चॉकलेट देतो या बहाण्याने त्याला घरात नेवून त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपी सिद्धार्थ सपकाळ, रा. बुलडाणा (वय 23 ) यास भादंविचे कलम 377, बाळाचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 4 अंतर्गत सात वर्ष सश्रम कारावास व तीन हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सदर दंड न भरल्यास एक महिन्याची पुन्हा शिक्षा आरोपीस होणार आहे. सदर निकालाची सुनावणी बुलडाणा येथील सहजिल्हा न्यायाधीश व अतिरिक्त सत्र न्यायाधीश बी. एस महाजन यांनी केली आहे.
या प्रकरणात दि 3 मे 2019 रोजी सकाळी अंदाजे 8 वाजेसुमारास पिडीत बालक आरोपीच्या घरासमोर खेळत असताना आरोपीने चॉकलेट देतो असे म्हणून घरात बोलाविले. बाजूच्या खोलीत नेवून त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केले. दरम्यान त्रासामुळे बालकाने आरडा ओरड केली असता आरोपीने त्याला सोडून दिले व तेथून पळून गेला. सकाळी 9.30 वाजता रडत रडत घरी जात बालकाने ही हकीकत आपल्या आईला सांगितली. बालकाच्या आईने दिलेल्या रिपोर्टवरून बुलडाणा पोलीस स्टेशनला आरोपीविरूद्ध भादविचे कलम 377 व बाळाचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियमन 2012 चे कलम 4 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पूर्ण केल्यानंतर दोषारोपपत्र बुलडाणा येथील विशेष न्यायालयात दाखल करण्यात आले. रिपोर्ट दाखल केल्यानंतर पिडीताला 48 तास डॉक्टरांच्या निगराणीखाली ठेवून त्याच्यावर उपचार करण्यात आले.
सदर प्रकरणात सरकारी पक्षातर्फे फिर्यादी / पिडीतची आई, 5 वर्षीय पिडीत बालक, वैद्यकीय अधिकारी डॉ शालीकराम निकाळे, डॉ स्वाती गजानन गोलांडे व तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक विनायक रामोड यांची साक्ष विशेष न्यायालयात नोंदविण्यात आली. सदर सर्व साक्षीदारांचे साक्ष पुरावे घटनेला पुरक व एकमेकांशी सुसंगत असल्या कारणाने पिडीताचेवर आरोपीने अत्याचार केल्याचे निष्कर्षाप्रत विशेष न्यायालय आले व सदर शिक्षा न्यायालयाने सुनावली. या प्रकरणात फिर्यादी पक्षातर्फे विशेष सरकारी वकील ॲड सोनाली सावजी देशपांडे यांनी सरकारी पक्षाची बाजू प्रभावीपणे मांडली. याप्रकरणात त्यांना बुलडाणा पोलीस कोर्ट पैरवी पोहेकॉ किशोर कांबळे, पोलीस स्टेशन बुलडाणा यांनी सहकार्य केले, असे विशेष सरकारी वकील तथा सरकारी अभियोक्ता यांनी कळविले आहे.
**************
कर्जमाफी यादीत नाव असणाऱ्या शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण करावे
- जिल्हा उपनिबंधक यांचे आवाहन
बुलडाणा,(जिमाका) दि.22: महात्मा जोतिराव फुले शेतकरी सन्मान योजना 2019 अंतर्गत शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात येत आहे. ही राज्य शासनाची महत्वांकांक्षी योजना आहे. सदर योजनेतंर्गत पात्र लाभार्थ्यांच्या याद्या गावनिहाय टप्प्याटप्प्याने प्रसिद्ध होत आहे. योजनेच्या निकषानुसार यादीमध्ये नाव असलेल्या शेतकऱ्यांनी महा ई सेवा केंद्र अथवा ग्राहक सेवा केंद्रावर जावून आधार प्रमाणीकरण करणे गरजेचे आहे. आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर योजनेचा लाभ देण्याची कार्यवाही होते.
आजरोजी जिल्ह्यात 169288 शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण पुर्ण झालेले आहे. उर्वरित 5054 शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण अद्यापही पूर्ण झालेले नाही. त्यामुळे योजनेच्या निकषानुसार सदरचे शेतकरी प्रलंबित आहेत. तरी ज्या शेतकऱ्यांची कर्जमाफीच्या यादीमध्ये नाव आलेले आहे, मात्र अद्यापही आधार प्रमाणीकरण केलेले नाही, अशा शेतकऱ्यांनी महाई सेवा केंद्र अथवा ग्राहक सेवा केंद्रावर जावून कोविडचा प्रादुर्भाव लक्षात घेता सोशल डिस्टसिंगचेचे पालन करून आधार प्रमाणीकरण करून घ्यावे. ही प्रक्रिया तात्काळ करून घ्यावी. जेणेकरून कर्जमाफीचा लाभ देता येईल, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक आर.एल राठोड यांनी केले आहे.
Comments
Post a Comment