राज्यातील आयुष रुग्णालयांसह बुलढाणा जिल्ह्यातील आरोग्य संस्थांमधील पदनिर्मितीस मान्यता केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या पाठपुराव्याला यश

 


 

बुलढाणा, दि. 26 (जिमाका) : राज्यातील नव्याने सुरू करण्यात आलेल्या आयुष रुग्णालयांतील नियमित पदनिर्मितीसह बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर ट्रॉमा केअर सेंटर, चिखली उपजिल्हा रुग्णालय, साखरखेर्डा ग्रामीण रुग्णालय तसेच मोताळा तालुक्यातील कोथळी प्राथमिक आरोग्य केंद्रातील पदनिर्मितीस राज्य शासनाने मान्यता दिली आहे. केंद्रीय आयुष, आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री Prataprao Jadhav यांनी यासाठी राज्य शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाल्याने यासंदर्भातील शासन निर्णय नुकताच निर्गमित करण्यात आला आहे.

नागरिकांना दर्जेदार व सुलभ आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून आरोग्य सुविधांच्या बळकटीकरणावर भर देण्यात येत आहे. ग्रामीण व दुर्गम भागातील आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने राज्यातील २५९ आरोग्य संस्थांसाठी आवश्यक पदांच्या आकृतीबंधास उच्चस्तरीय सचिव समितीने मान्यता दिली आहे.

तसेच पुणे, नंदुरबार, अहिल्यानगर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये नव्याने सुरू करण्यात आलेल्या ३० खाटांच्या आयुष रुग्णालयांमधील नियमित पदभरतीलाही शासनाने मंजुरी दिली आहे. यामुळे या रुग्णालयांमध्ये आरोग्य सेवा अधिक प्रभावीपणे उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.

बुलढाणा जिल्ह्यात चिखली येथील उपजिल्हा रुग्णालय, साखरखेर्डा येथील नवीन ग्रामीण रुग्णालय, मेहकर ट्रॉमा केअर सेंटर तसेच कोथळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी नव्या पदनिर्मितीस मान्यता मिळाल्याने जिल्ह्यातील आरोग्य सेवा अधिक सक्षम होणार आहे. या पदनिर्मितीमुळे वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, तांत्रिक कर्मचारी आणि इतर आरोग्य कर्मचाऱ्यांची उपलब्धता वाढून नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा मिळणार आहेत.

राज्य शासनाने २४ जून रोजी ५० टक्क्यांपेक्षा अधिक बांधकाम पूर्ण झालेल्या नवनिर्मित व श्रेणीवर्धित आरोग्य संस्थांसाठी पदनिर्मितीबाबत शासन निर्णय जारी केला आहे. या निर्णयामुळे राज्यभरात आरोग्य विभागात मोठ्या प्रमाणावर नियमित पदभरतीचा मार्ग मोकळा झाला असून युवकांसाठी रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत.

आरोग्य सेवांचे जाळे अधिक सक्षम करण्यासाठी आणि आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात येत असल्याचे केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी सांगितले. त्यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे राज्यातील अनेक आरोग्य संस्थांच्या पदनिर्मितीचा प्रश्न मार्गी लागल्याने आरोग्य सेवा व्यवस्थेला बळकटी मिळणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.

00000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

दत्तक विधान प्रक्रिया; इच्छुक पालकांनी कायदेशीर प्रक्रिया पुर्ण करावी