जिल्हाधिकाऱ्यांचा प्रेरणादायी पुढाकार; टीबी रुग्णाला सहा महिन्यांसाठी दत्तक
बुलढाणा
दि.18 (जिमाका): प्रधानमंत्री टीबी मुक्त भारत अभियानाला
गती देण्यासाठी आणि जिल्ह्यातून क्षयरोगाचे समूळ उच्चाटन करण्याच्या उद्देशाने बुलढाण्याचे
जिल्हाधिकारी डॉ. प्रवीणकुमार देवरे यांनी एक कौतुकास्पद पुढाकार घेतला आहे. त्यांनी
स्वतः पुढे येत एका टीबी रुग्णाला पुढील सहा महिन्यांसाठी दत्तक घेतले असून, या कालावधीत
त्याच्या पोषण आहाराची संपूर्ण जबाबदारी स्वीकारली आहे.
केंद्र व राज्य
शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘निक्षय मित्र’योजनेअंतर्गत टीबी रुग्णांना आवश्यक
पोषण सहाय्य उपलब्ध करून दिले जाते. टीबीवर मात करण्यासाठी औषधोपचाराबरोबरच सकस व पौष्टिक
आहाराची आवश्यकता लक्षात घेऊन जिल्हाधिकारी डॉ. देवरे यांनी संबंधित रुग्णाची भेट घेत
त्याला पोषण आहाराचे किट सुपूर्द केले. यावेळी जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. वर्षा गुट्टे
तसेच क्षयरोग केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. दिनकर खेरोडकर उपस्थित होते.
दत्तक कालावधीत
रुग्णाला दरमहा देण्यात येणाऱ्या न्यूट्रिशन किटमध्ये गहू, ज्वारी किंवा बाजरी, डाळी,
खाद्यतेल तसेच दूध अथवा दूध पावडर यांचा समावेश करण्यात आला आहे. या पोषण सहाय्यामुळे
रुग्णाच्या उपचारांना अधिक बळ मिळणार आहे.
याप्रसंगी जिल्हाधिकारी
डॉ. प्रवीणकुमार देवरे यांनी नागरिकांना आवाहन करताना सांगितले की, टीबी हा केवळ आरोग्याचा
विषय नसून सामाजिक जबाबदारीचा भाग आहे. समाजातील दानशूर व्यक्ती, लोकप्रतिनिधी, अधिकारी,
स्वयंसेवी संस्था आणि उद्योजक यांनी मोठ्या संख्येने ‘निक्षय मित्र’ म्हणून नोंदणी
करून टीबी रुग्णांना मदतीचा हात द्यावा. प्रत्येक रुग्णाला पोषण आहार आणि मानसिक आधार
मिळाल्यास बुलढाणा जिल्हा लवकरच टीबीमुक्त होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
जिल्हाधिकाऱ्यांच्या
या संवेदनशील आणि प्रेरणादायी उपक्रमामुळे जिल्ह्यातील विविध विभागांतील अधिकारी तसेच
नागरिकांमध्येही ‘निक्षय मित्र’बनून टीबी रुग्णांच्या मदतीसाठी पुढे येण्याची प्रेरणा
निर्माण होत आहे.
0000

Comments
Post a Comment