राज्यांतर्गत पीकस्पर्धेसाठी ऑनलाइन अर्ज सुरू; शेतकऱ्यांना सहभागाचे आवाहन • तालुका ते राज्यस्तरावर बक्षिसांची संधी
बुलढाणा, दि. 28 (जिमाका) : राज्यातील अन्नधान्य, कडधान्य आणि गळीतधान्य पिकांची उत्पादकता वाढविण्यासह प्रगतशील शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी कृषी विभागामार्फत राज्यांतर्गत पीकस्पर्धा – खरीप हंगाम २०२६ आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी यंदापासून प्रथमच स्वतंत्र ऑनलाइन अर्ज प्रणाली सुरू करण्यात आली असून, पात्र शेतकऱ्यांनी मुदतीत अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी केले आहे. यापूर्वी पीकस्पर्धेची प्रक्रिया ऑफलाइन पद्धतीने राबविण्यात येत होती. मात्र, प्रशासनात पारदर्शकता, सुलभता आणि गतिमानता आणण्यासाठी यंदापासून ऑनलाइन अर्ज प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. खरीप हंगामातील भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमूग आणि सूर्यफूल या ११ पिकांसाठी तालुका, जिल्हा आणि राज्यस्तरावर स्पर्धा होणार आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्याच्या स्वतःच्या नावावर जमीन असणे आणि ती स्वतः कसत असणे आवश्यक आहे. एका शेतकऱ्याला एका वेळी एका पिकासाठीच सहभाग घेता येईल. भात पिकासाठी किमान २० गुंठे, तर इतर पिकांसाठी ४० गुंठे क्षेत्रावर सल...