मूग-उडीद पीकस्पर्धेसाठी अर्जाची मुदत 10 ऑगस्टपर्यंत वाढ; खरीप पीकस्पर्धेसाठी ऑनलाइन अर्ज करण्याचे कृषी विभागाचे आवाहन
बुलढाणा, दि. 4 (जिमाका): राज्यातील अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी आणि प्रयोगशील शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी कृषी विभागामार्फत खरीप हंगाम 2026-27 साठी राज्यांतर्गत पीकस्पर्धा जाहीर करण्यात आली आहे. यंदापासून प्रथमच या स्पर्धेसाठी स्वतंत्र ऑनलाइन प्रणालीद्वारे अर्ज स्वीकारले जात असून, मूग व उडीद पीकस्पर्धेसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत शासनाने 10 ऑगस्ट 2026 पर्यंत वाढविली आहे. यापूर्वी मूग व उडीद पिकांसाठी अर्जाची अंतिम मुदत 31 जुलै होती. मात्र, ऑनलाइन अर्ज प्रक्रियेचे हे पहिलेच वर्ष असल्याने शेतकऱ्यांची सोय लक्षात घेऊन शासनाने "एक वेळची विशेष बाब" म्हणून मुदतवाढ दिली आहे. या स्पर्धेचा उद्देश शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून घेतलेल्या अधिक उत्पादनाला प्रोत्साहन देणे, त्यांचा गौरव करणे आणि त्यांच्या अनुभवाचा लाभ इतर शेतकऱ्यांनाही मिळवून देणे हा आहे. तालुका स्तरावरील उत्पादनाच्या आधारे जिल्हा व राज्यस्तरीय विजेत्यांची निवड करण्यात येणार आहे. खरीप हंगामात भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमूग आ...