Saturday 25 July 2020

DIO BULDANA NEWS 25.7.2020

जिल्ह्यात 51 हजार 409 शेतकऱ्यांच्या लाखो क्विंटल कापूस खरेदी..!
  • कोरोना संसर्ग व पावसाच्या काळातही खरेदी
  • राज्यात 10 वर्षात प्रथमच विक्रमी कापूस खरेदी
बुलडाणा, दि.25 (जिमाका) : जिल्ह्यात गत काही दिवसांपासून कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव होत असून त्यामुळे टाळेबंदीची परिस्थिती आहे. तसेच दमदार पाऊस जिल्ह्यात कमी अधिक प्रमाणात पडत आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांकडे असलेला कापूस खरेदी करून शासनाने शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम केले आहे. कोरोना विषाणू संसर्ग परिस्थितीतही कापूस पणन महासंघ व भारत कापूस निगमच्या माध्यमातून जिल्ह्यात 51 हजार 409 शेतकऱ्यांच्या लाखो क्विंटलची ‘पांढऱ्या सोन्याची’  खरेदी करण्यात आली आहे.
  कोविड 19 आजारापूर्वी शासनाकडून कापूस खरेदी नियमित सुरू होती. मात्र कोविड संसर्गानंतर परिस्थिती बदलली. टाळेबंदी जाहीर करण्यात आली. त्यामुळे कापूस खरेदीला काही प्रमाणात ब्रेक लागला. मात्र राज्य शासनाने ही परिस्थितीसुद्धा व्यवस्थित हाताळत कापूस खरेदी सुरू केली. जिल्ह्यात कोविड 19 आजारापूर्वी कापूस पणन महासंघाकडून जिल्ह्यात 5 हजार 899 शेतकऱ्यांकडून 2 लक्ष 36 हजार 95 क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला. तर याच काळात सीसीआयकडून 32 हजार 303 शेतकऱ्यांच्या 9 लक्ष 76 हजार 665 क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली.
  कोविड 19 आजाराच्या संसर्गानंतर शासनाने कापूस खरेदी करण्यास सुरूवात केली. याकाळात कोरोना संसर्ग सुरक्षेचे नियम पाळून कापूस खरेदी करण्यात आली. कोविड च्या परिस्थितीत कापूस पणन महासंघाने  5 हजार 856 शेतकऱ्यांच्या 1,55,406 क्विंटल पांढऱ्या सोन्याची खरेदी केली. तर सीसीआय च्या माध्यमातून 7 हजार 351  शेतकऱ्यांकडून 2 लक्ष 33 हजार 381 क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला. अशाप्रकारे या दोन्ही काळात कापूस पणन महासंघाने 11 हजार 755 शेतकऱ्यांचा 3 लक्ष 91 हजार 502 क्विंटल कापसाची खरेदी केली.  तसेच भारतीय कापूस निगम अर्थात सीसीआयकडून एकूण 39 हजार 654 शेतकऱ्यांच्या 12 लक्ष 10 हजार 46 क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला.आतापर्यंत कोरोना संसर्ग व पावसाच्या काळात एकूण 51 हजार 409 शेतकऱ्यांच्या 16 लक्ष 1 हजार 548 क्विंटल कापसाची शासनाकडून झालेली विक्रमी खरेदी करण्यात आली आहे.
  कोरोना प्रादुर्भावामुळे कापसाचे बाजारातील दर हमी दरापेक्षा कमी असल्यामुळे शेतकऱ्यांचा कल हा शासकीय कापूस खरेदी केंद्रावर विकण्याचा होता.त्यानुसार शासकीय खरेदीचे नियोजन करून कोरोनाच्या काळात सीसीआय व कापूस पण महासंघाने आतापर्यंत राज्यात मागील 10 वर्षातील विक्रमी कापूस खरेदी केली आहे. सीसीआय ने 30 सप्टेंबर 2020 पर्यंत एएफएक्यु दर्जाचा कापूस खरेदी करणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे कापूस शिल्लक असलेल्या नोंदणीकृत शेतकऱ्यांचासुद्धा कापूस खरेदी करण्यात येणार आहे. कोरोना प्रादुर्भावाच्या संकटसमयी राज्य शासनाने विक्रमी कापूस खरेदी केल्यामुळे शेतकऱ्यांना निश्चितच दिलासा मिळाला आहे.   
********
कोरोना बाधीत मृत व्यक्तीच्या अंत्यसंस्काराला विरोध करणाऱ्यांवर होणार कारवाई
  • जिल्हादंडाधिकारी यांचे आदेश
बुलडाणा, दि.25 (जिमाका) : कोविड आजाराचा प्रादुर्भाव जिल्ह्यात वाढत असून विविध ठिकाणी कोरोना बाधीत रूग्णांचे मृत्यू होत आहे. कोविड 19 बाधीत व्यक्तीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करताना स्मशान भूमीमध्ये स्थानिक नागरिक, समुहाकडून विरोध होत असल्याचे निदर्शनास येत आहे. यापुढे कोविड बाधीत व्यक्तीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कारास प्रशासन व नातेवाईक यांच्यादृष्टीने योग्य अशा कुठल्याही स्मशानभुमीत स्थानिक नागरिक, समूहाकडून विरोध होत असल्यास सदर विरोध हा आपत्ती व्यवस्थापनास अडथळा आणल्याचे गृहीत धरून त्यांचे विरूद्ध आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 च्या कलम 51 अन्वये गुन्हे दाखल करण्यात येणार आहे. तसेच नियमानुसार उचित कारवाई करण्यात येणार आहे.  कोणत्याही परिस्थितीत कोविड बाधीत व्यक्तीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कारास विरोध होवून विलंब होणार नाही, याची खबरदारी घेण्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी सुमन चंद्रा यांनी दिले आहे.
  कोविड बाधीत व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर मृतदेहावर सोडीयम हायपोक्लोराईट द्रवाणे निर्जंतुकीकरण करण्यात येते. सदर मृतदेह प्लॅस्टीक पिशवीमध्ये अथवा रूग्णालयाने पुरविलेल्या बॅगमध्ये बंद करून बॅगचा बाह्यभाग हा 1 टक्के सोडीयम हायपोक्लोराईटने निर्जंतुक केल्यानंतर मृतदेह अंत्यसंस्काराकरीता देण्यात येतो. अशा मृतदेहावर स्मशानभूमीत होणारा स्थानिक, समूहाचा विरोध हा उचित नाही, असेही आदेशात नमूद आहे.
                                    

No comments:

Post a Comment