Wednesday 27 July 2022

DIO BULDANA NEWS 27.7.2022

 

पिंप्री गवळी येथील विनापरवाना किटकनाशकांची विक्री

*कृषी विभागाच्या भरारी पथकाची कारवाई

*5 लाख 83 हजारांचे किटकनाशके, रासायनिक खते जप्त

बुलडाणा, दि. 27 : मोताळा तालुक्यातील पिंप्री गवळी येथील विनापरवाना किटकनाशकांची विक्री करणाऱ्या साईरामा हार्डवेअरवर कृषी विभागाच्या भरारी पथकाने छापा घालून कारवाई केली. या कारवाईत 5 लाख 83 हजारांचे किटकनाशके, रासायनिक खते जप्त करण्यात आले आहे.

 कृषी विभागाच्या भरारी पथकाला पिंप्री गवळी येथे विनापरवाना किटकनाशकांची विक्री सुरु असल्याबाबत माहिती मिळाली. त्याआधारे भरारी पथकाने सापळा रचून साईरामा हार्डवेअर या दुकानावर छापा घातला. विनापरवाना आणि अवैधरित्या किटकनाशके विक्री होत असल्याचे निदर्शनास आल्यामुळे दुकान मालक रोशन गजानन पाटील याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला. जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक अरुण इंगळे यांनी धामनगाव बढे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

या दुकानातील एकूण 5 लाख 83 हजार 527 रूपये किमतीचे किटकनाशके आणि रासायनिक खते जप्त करण्यात आली. भरारी पथक प्रमुख कृषी विकास अधिकारी अनिसा महावळे, मोहीम अधिकारी विजय खोंदील, जिल्हा गुणनियंत्रण निरीक्षक अरुण इंगळे, मोताळा तालुका कृषी अधिकारी सचिन मोरे, पोलीस ठाण्यचाचे मोहनसिंग राजपूत, गजानन भराड यांनी ही कारवाई केली.

शेतकऱ्यांनी फसवणूक टाळण्यासाठी किटकनाशके, बियाणे आणि खते अधिकृत परवानाधारक कृषी सेवा केंद्राकडूनच खरेदी करुन पक्की पावती घ्यावी, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने केले आहे.

00000





ऊर्जा महोत्सवाचे दिमाखात आयोजन

*प्रत्येक घरी वीज पोहचविण्याचे लक्ष

*ऊर्जा क्षेत्रातील देशाची दैदिप्यमान प्रगती

बुलडाणा, दि. 27 : केंद्र सरकारच्या ऊर्जा मंत्रालय, राज्य शासन आणि ऊर्जा विभागातर्फे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवांतर्गत ‘उज्वल भारत, उज्वल भविष्य,  पॉवर @2047’ चा ऊर्जा महोत्सव जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात पार पडला.

आमदार संजय गायकवाड अध्यक्षस्थानी होते. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी एस. रामामुर्ती, मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते उपस्थित होते.

आमदार श्री. गायकवाड यांनी, वीज ही विकासाची जननी आहे. आम्ही लहानपणी भारनियमन अनुभवले आहे. मात्र आज ती परिस्थिती राहिलेली नाही. हे आपल्या देशाचे ऊर्जा क्षेत्रातील प्रगतीचे पाऊल आहे, असे सांगितले.

जिल्हाधिकारी एस. रामामुर्ती यांनी २०४७ पर्यंत सक्षम भारत घडविण्यासाठी असलेली आव्हाने समर्थपणे पेलण्याची ताकद आपल्याकडे आहे. प्रधानमंत्री यांच्या मनातील भारत नक्कीच घडवला जाईल, असे सांगितले.

देशाने ऊर्जा क्षेत्रामध्ये केलेल्या कामगिरीवर चित्रफितीच्या माध्यमातून प्रकाश टाकण्यात आला. यावेळी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेणाऱ्या लाभार्थीना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. लाभार्थीनी विजेमुळे त्यांच्या जीवन आणि उत्पन्नात पडलेली भर याबाबत मनोगत व्यक्त केले.

महावितरणचे अधीक्षक अभियंता तथा नोडल अधिकारी संजय आकोडे यांनी प्रास्ताविक केले. विकास बांबल यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाला निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गीते, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश लोखंडे, पावर फायनान्स कॉर्पोरेशनचे उपमुख्य व्यवस्थापक तरुणकांत गुप्ता, उपस्थित होते.

यावेळी वीज ग्राहकांसाठी असलेले कायदे, ग्राहकांचे हक्क आदीबाबत जनजागृती महावितरणचे गणेश बंगाळे आणि चमूने लघु नाटिकेद्वारे केली. तसेच शाहीर गणेश कदम यांनी लोककलापथकाद्वारे महावितरणच्या विविध योजना समजून सांगितल्या. मनीष कदम यांनी आभार मानले.

देशाने ऊर्जा क्षेत्रात केलेल्या कामगिरीवर प्रकाश टाकण्यासाठी ऊर्जा महोत्सवाचे आयोजन दि. 25 ते 30 जुलै या कालावधीत करण्यात येत आहे. देश ऊर्जेच्या बाबतीत आत्मनिर्भर होण्याकडे वाटचाल करीत आहे. सीओपी-21मध्ये अपारंपारिक ऊर्जा स्त्रोतांद्वारे वीज उत्पादनाचे 2030 पर्यंत एकूण उत्पादन क्षमतेपैकी 40 टक्के ऊर्जा निर्माण करण्याचे उद्दिष्ट होते. परंतू हे लक्ष नियोजित वेळेच्या ९ वर्षाअगोदरच गाठले आहे. भारत ऊर्जा निर्यात करणारा देश ठरला आहे. मागणीपेक्षा विजेचे उत्पादन अधिक असल्याने २०१५ मध्ये सरासरी १२.५ तास वीज उपलब्ध होती, ती आज देशात सरासरी २२.५ तास उपलब्ध झाली आहे.

00000

मच्छिमार, मत्स्य कास्तकारांनी ई-श्रम पोर्टलवर नोंदणी करावी

*सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय यांचे आवाहन

बुलडाणा, दि. 27 : देशातील असंघटीत कामगारांना सुरक्षा आणि फायदे देण्यासाठी केंद्र शासनाच्या श्रम व रोजगार विभागाच्या पोर्टलवर मत्स्यव्यवसाय कामगार मत्स्य विक्रेते, मत्स्यव्यवसाय व मत्स्यव्यवसाय अनुषंगाने कामात प्रत्यक्ष सहभागी असलेल्या कामगारांनी नोंद करावी, असे आवाहन मत्स्य व्यवसाय विभागाचे सहाय्यक आयुक्त म. वि. जयस्वाल यांनी केले आहे.

श्रम आणि रोजगार विभागाच्या register.eshram.gov.in या पोर्टलवर संबंधित कामगाराचे आधार कार्ड क्रमांक, मोबाईल क्रमांक, बँकेचा तपशिल आदी माहितीसह मत्स्य कामगारांना स्वतः नोंदणी करता येणार आहे. तसेच आपले सरकार सेवा केंद्रामध्ये मोफत नोंदणी करता येणार आहे.

सदर नोंदणीसाठी मत्स्यव्यवसाय, मत्स्य शेती क्षेत्रातील मच्छिमार आणि मत्स्य मूल्य साखळी (Fisheries Value Chain) आदीमध्ये समाविष्ठ असलेले मत्स्य कामगार यांची वयमर्यादा 16 ते 59 वर्ष असावी, तसेच जे कर्मचारी राज्य विमा (ESI), कर्मचारी भविष्य निधी संघटन (EPFO) यांचे सभासद नसावेत. सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम (PSUs) आणि शासन सेवेतील कर्मचारी आणि आयकर भरणारे नसावेत, अशी आवश्यक पात्रता आहे.

केंद्र शासनाने पोर्टल तयार केल्यामुळे असंघटीत मजूर, मच्छिमार, मत्स्यशेती व मत्स्यव्यवसाय अनुषंगाने कामांमध्ये समावेश असलेला मजूर आदींची माहिती आधार क्रमांकाशी जोडून अपलोड करण्यात येते. जे कामगार या पोर्टलवर नोंदणी करतील त्यांना प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेंतर्गत सुरक्षा विमा योजनेतून व्यक्तीचा मृत्यू झाल्यास दोन लाख रूपये आणि कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास एक लाख रुपये देण्यात येतात. असंघटीत कामगारांना सामाजिक सुरक्षा फायदे या पोर्टल मार्फत देण्यात येणे शक्य होईल. या पोर्टल वरील डेटाबेस, अचानक उद्भवणाऱ्या आणि राष्ट्रीय महामारीसारख्या परिस्थितीमध्ये सहाय्यासाठी वापरता येणे शक्य होईल. सदर पोर्टलमध्ये नोंदणी झाल्यानंतर मत्स्य कामगारांना याप्रमाणे लाभ होण्यास मदत होईल.

याबाबत अधिक माहितीसाठी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी इंद्रजित देवकत्ते यांनी केले आहे.

00000

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त

पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा

*28 ते 29 जुलै 2022 दरम्यान ऑनलाईन रोजगार मेळावा

बुलडाणा, दि. 27 जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगारांना नोकरीच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या वतीने पंडीत दीनदयाल उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळावा दि. 28 जुलै ते दि. 29 जुलै 2022 दरम्यान आयोजित करण्यात आला आहे.

          या मेळाव्यात नामांकीत खासगी उद्योजक, कंपनी, त्यांचे प्रतिनिधी 75 पदांसाठी ऑनलाईन भरती प्रक्रिया राबवतील. तसेच पात्र पुरुष आणि महिला उमेदवारांच्या ऑनलाईन मुलाखती घेऊन पात्र उमेदवारांची निवड करण्यात येईल.

          कौशल्य रोजगार, उद्योजकता व नाविण्यता विभागाच्या mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नाव नोंदणी केलेल्या दहावी, बारावी, पदवी, आयटीआय पास, पदवीधर, पुरुष आणि महिला उमेदवारांनी आपले सेवायोजन कार्डचा आयडी आणि पासवर्डचा उपयोग करुन आपल्या लॉगीनमधून ऑनलाईन अर्ज  करावा.

या रोजगार मेळाव्यात सहभागी होण्याकरीता कार्यालयात येण्याची गरज नाही. उमेदवार जेथे असतील त्याच ठिकाणावरुन आपल्या सेवायोजन (एम्पलॉयमेंट) कार्ड युझर आयडी आणि पासवर्डचा उपयोग करुन आपल्या लॉगइनमधून ऑनलाईन रोजगार मेळाव्यात सहभागी होऊ शकतील.

पात्र पुरुष आणि महिला उमेदवारांनी आपल्या शैक्षणिक पात्रतेच्या आधारे एकापेक्षा जास्त पदांसाठीही ऑनलाईन अर्ज करु शकतील. उमेदवारांनी आपल्या सेवायोजन कार्डचा युझर आयडी आणि पासवर्ड वापरुन आपल्या लॉगीनमधून ऑनलाईन अर्ज करावा. ऑनलाईन अर्ज करताना अडचणी आल्यास जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, कार्यालयाच्या 07262-242342, 299342 या दुरध्वनीवर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त  प्रांजली बारस्कर यांनी केले आहे.

00000

मोताळा येथील नवीन प्रशासकीय इमारतीत वृक्षारोपण

बुलडाणा, दि. 27 : मोताळा येथे नव्याने बांधकाम होत असलेल्या प्रशासकीय इमारतीच्या परिसरात मंगळवार, दि. 26 जुलै 2022 रोजी 250 वृक्ष लागवडीचा कार्यक्रम पार पडला.

आझादी का अमृत महोत्सव निमित्ताने औद्योगिक प्रशिक्षण  संस्था, सामाजिक वनीकरण आणि तससिल कार्यालय यांच्या वतीने वृक्ष लागवडीचा कार्यक्रम घेण्यात आला.

कार्यक्रमाला तहसीलदार डॉ. सारिका भगत, वनपरिक्षेत्र अधिकारी व्ही. बी. थोरात, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य एस. डी. गंगावणे, मुख्याधिकारी विभा वऱ्हाडे, नायब तहसिलदार श्री. गौर, वनपाल पी. पी. राजपूत, व्ही. पी. म्हस्के, शाखा अभियंता श्री. गायकवाड, तलाठी श्री. कऱ्हाळे उपस्थित होते.

वृक्षारोपन कार्यक्रम यशस्वीतेसाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे कर्मचारी आणि प्रशिक्षणार्थी यांनी वृक्षरोपण केले. वनपरिक्षेत्र अधिकारी श्री. थोरात यांनी वृक्षलागवडीनंतर संगोपनाची आवश्यकता, तसेच पर्यावरण संतुलनासाठी वृक्ष लागवडीचे महत्व सांगितले. यावेळी उपस्थितांना वृक्ष लागवडी संदर्भात शपथ देण्यात आली.

00000

मोताळा आयटीआयमध्ये साहित्याची निविदा

बुलडाणा, दि. 27 : मोताळा येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत आरओ वॉटर कूलर, कम्प्युटर, चेअर्स, जनरेटर शेड, बॅटरी आदी साहित्याचा पुरवठा करण्याकरीता दि. 31 जुलै 2022 पर्यंत बंद लिफाफ्यात‍ निविदा मागविण्यात आली आहेत. सदर निविदा शासकीय कामाकरिता मागविण्यात आली असल्याचे प्राचार्य एस. डी. गंगावणे यांनी कळविले आहे.

00000

राष्ट्रीय लोक अदालतीचे 13 ऑगस्ट रोजी आयोजन

बुलडाणा, दि. 27 : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या आदेशानुसार जिल्हा आणि तालुक्याच्या ठिकाणी दि. 13 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.

या राष्ट्रीय लोकअदालतीचा फायदा पक्षकारांनी घेऊन दाखल किंवा दाखलपूर्व प्रकरणे आपसात तडजोडीद्वारे निकाली काढावेत, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष स्वप्नील खटी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव एच. एस. भुरे, जिल्हा वकिल संघाचे विजय सावळे यांनी केले आहे.

राष्ट्रीय लोक अदालतीच्या माध्यमातून प्रकरणे निकाली काढण्यासाठी पक्षकारांनी आणि संबंधितांनी नजिकच्या तालुका विधी सेवा समिती किंवा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण येथे संर्पक साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

00000

लोकशाही दिनाचे 1 ऑगस्ट रोजी आयोजन

* मोबाईल क्रमांक 9021353670 वर तक्रारी कराव्यात

बुलडाणा, दि. 27 : जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन सोमवार, दि. 1 ऑगस्ट 2022 रोजी करण्यात आले आहे.

प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात येते. ऑगस्ट महिन्याचा लोकशाही दिन दि. 1 ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आला आहे. या लोकशाही दिनी तक्रारदारांनी ऑनलाईन पद्धतीने 9021353670 या मोबाईल क्रमांकावर पीडीएफ फाईल तयार करून तक्रारी द्याव्यात. त्यामुळे तक्रारदारांना लोकशाही दिनाला स्वत: उपस्थित राहण्याची आवश्यकता नाही. तक्रारदारांना दिलेल्या व्हॉट्सॲप क्रमांकावर व्हिडीओ कॉल करून संपर्क साधण्यात येणार आहे. तक्रारदाराने सदर मोबाईल व्हॉट्सॲप क्रमाकांचे त्याकाळात इंटरनेट सुरू असण्याची खातरजमा करावी.

तालुकास्तरावरील लोकशाही दिनानंतर एक महिन्याने जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही दिनात अर्ज करता येतो. तसेच तक्रारदारांबरोबर त्रयस्थाने येऊ नये. अर्जदाराने एका अर्जात एकच तक्रार सादर करावी. एकापेक्षा जास्त तक्रारी असलेला अर्ज स्विकारला जाणार नाही. तक्रार, निवेदन वैयक्तिक स्वरुपाची असावीत. त्याचप्रमाणे न्यायप्रविष्ठ प्रकरणे, राजस्व, अपिल, सेवा आणि आस्थापना विषयक बाबी, विहित नमुन्यात नसलेले तसेच आवश्यक त्या कागदपत्रांच्या प्रती न जोडलेले अर्ज, विविध न्यायालयात, प्राधिकाऱ्यांकडील, लोकआयुक्त यांच्याकडे प्रलंबित असलेल्या प्रकरणांच्या तक्रारी स्विकारल्या जाणार नाहित, असे अर्ज संबंधित विभागाकडे आवश्यक कार्यवाहीसाठी आठ दिवसात पाठविण्यात येतील. त्याची एक प्रत अर्जदारास पाठविण्यात येईल, असे जिल्हाधिकारी यांनी कळविले आहे.

00000

 

No comments:

Post a Comment