Monday 11 April 2022

DIO BULDANA NEWS 11.4.2022

 


समाज कल्याण कार्यालयात महात्मा जोतिबा फुले जयंती साजरी

बुलडाणा, (जिमाका)  दि. 9 : समाज कल्याण कार्यालयात आज 11 एप्रिल रोजी महात्मा जोतिबा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्ष सहायक आयुक्त डॉ अनिता राठोड होत्या,  तर प्रमुख उपस्थितीत वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक प्रदीप धर्माधिकारी, श्री. गोटीवाले, श्री.  खनवे होते. यावेळी महामानव महात्मा फुले, राजर्षी शाहु महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रातिमेचे पुजन करुन त्यांना अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी महात्मा फुले यांच्या सामाजिक शैक्षणिक कार्य या विषयावर समन्वयक सतिश बाहेकर यांनी मार्गदर्शन केले. महामानवांचे विचार जर आपल्या वाणित असेल तर भविष्यात आपल्या अनवाणी फीरावं लागणार नाही. भुतकाळातील इतिहास लक्षात ठेउन वर्तमानाची जाणिव ठेवून कर्मरत राहुन आयुष्य जगायचे असते .महामानवांच्या विचारांनी घडले मस्तक कोणापुढे नतमस्तक होत नसल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. अध्यक्षीय भाषणात डॉ. राठोड म्हणाल्या, माणसाने माणसाशी माणसासारखे वागावे. आपण आपला जिवन मार्ग निवडला पाहीजे व त्यानुसार वाटचाल केली पाहिजे.  प्रत्येकाने स्वावलंबी व्हावे आर्थिक स्त्रोत निर्माण करण्याची क्षमता आपल्या ज्ञानातुन झाली पाहीजे. संचालन संदिप कपले यांनी तर आभार संदिप घाटोळे यांनी मानले. यावेळी शासकीय वसतीगृहाचे विद्यार्थी, सर्व कर्मचारी उपस्थित होते.

                                                            ************

 


सिंचन प्रकल्पांमधील प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा

-          पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे

  • पेनटाकळी, खडकपूर्णा सिंचन प्रकल्प आढावा बैठक

बुलडाणा, (जिमाका)  दि. 9 : जिल्ह्यात मागील दोन वर्षापासून पावसाळा चांगला होत आहे. त्यामुळे जलाशयांमध्ये चांगला पाणीसाठा आहे. पाणीसाठा असल्यामुळे शेतकरी दोन – तीन पिके घेत आहेत. अशा परिस्थितीत प्रकल्पावरील सिंचनासाठी पाण्यावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांना पाणी मिळायला पाहिजे. पेनटाकळी, खडकपूर्णा प्रकल्पाची काही कामे अजूनही प्रलंबित आहेत. तरी ही कामे तातडीने पूर्ण करून प्रकल्पातून शेवटच्या शेतकऱ्याला सिंचनासाठी पाणी द्यावे, अशा सूचना पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी आज दिल्या.  जिल्हाधिकारी कार्यालयातील पालकमंत्री यांच्या दालनात पेनटाकळी, खडकपूर्णा प्रकल्पातील प्रलंबित कामांचा आढावा आज पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी घेतला. त्यावेळी आढावा घेताना पालकमंत्री बोलत होते. याप्रसंगी आमदार संजय रायमूलकर, अप्पर जिल्हाधिकारी धनजंय गोगटे, निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते, अधिक्षक अभियंता सुनील चौधरी, कार्यकारी अभियंता श्री. चोपडे, श्री. संत, सुधीर सोळंके, उपविभागीय अधिकारी भुषण अहीरे, महावितरणचे कार्यकारी अभियंता श्री. जायभाये आदी उपस्थित होते.

   पेनटाकळी प्रकल्पाच्या मुख्य कालव्याची गळती थांबविण्यासाठी कालव्याच्या दुरूस्तीचे काम तातडीने हाती घेण्याच्या सूचना करीत पालकमंत्री म्हणाले, पेनटाकळी प्रकल्पाच्या मुख्य कालव्यातील गळतीमुळे शेतकऱ्यांचे बरेच नुकसान झाले आहे. या कालव्याच्या 0 ते 11 किलोमीटर अंतराचे उपयोगी पर्याय वापरून कायमस्वरूपी दुरूस्ती करावी. त्यासाठी भौतिकदृष्ट्या उपयोगी असलेल्या जलसंपदा विभागाने सुचविलेल्या पर्यायाचा वापर करावा. लवकरच मुंबईला याबाबत बैठक घेण्यात येईल. खडकपूर्णा प्रकल्पाच्या अंचरवाडी वितरीकेवरील कामे पूर्ण करावी. शेवटच्या शेतकऱ्याला पाणी द्यावे. टाकरखेड भागीले येथील 33 के.व्ही वीज उपकेंद्राचा प्रस्ताव पाठवावा. त्यासाठी जागेची अडचण महावितरण व जलसंपदा विभागाने समन्वयाने सोडवावी. नारायणखेड उपसा सिंचन प्रकल्पाचा सौर ऊर्जेचा प्रस्ताव सादर करावा.

 ते पुढे म्हणाले, खडकपूर्णा प्रकल्पासाठी आरक्षीत केलेल्या जागा प्रकल्प पूर्ण झाल्यामुळे वापराविना पडून आहे. या जागांवरील आरक्षण काढून टाकावे. जेणेकरून जागा मोकळ्या होवून संबंधितांना जागेचा लाभ मिळेल. प्रकल्पाच्या उजव्या कालव्यातील पाणी सुरा, सरंबा गावापर्यंत शेवटच्या शेतकरी लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्यात यावे. त्यासाठी अडचणी दूर कराव्यात.  यावेळी संबंधित यंत्रणेचे अधिकारी उपस्थित होते.

                                               ************


No comments:

Post a Comment