Thursday 3 March 2022

DIO BULDANA NEWS 3.3.2022

 महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्यास मुदतवाढ, ३१ मार्चपर्यंत मुदत

* अर्ज करण्याचे समाज कल्याण विभागाचे आवाहन
* मागासवर्गीय विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहील्यास प्राचार्य जबाबदार राहणार
बुलडाणा, (जिमाका) दि. 3 : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य तसेच बहुजन कल्याण इतर मागास विभागामार्फत प्रत्येक वर्षी अनुसूचित जाती, भटक्या जमाती, इतर मागास व विशेष मागासप्रवर्गातील मॅट्रीकोत्तर शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना भारत सरकार शिष्यवृत्ती आणि राज्य शासनाची शिक्षण फी, परिक्षा फी या योजनांचा लाभ देण्यात येतो.
    सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यास विभागाच्या https:// mahadht.mahit.gov.in या पोर्टलवरुन ऑनलाईन अर्ज भरणे आवश्यक आहे. सदर प्रणालीवर ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा 14 फेब्रुवारी पासुन उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. जिल्ह्यात अनुसूचित जाती, इमाव, विजाभज व विमाप्र प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांचे अर्ज नोंदणी मागील वर्षाच्या तुलनेत कमी झाले आहे. सामाजिक न्याय विभाग, बहुजन कल्याण विभागामार्फत मंजूर करण्यात येणाऱ्या अनुसूचित जाती, इमाव, विजाभज व विमाप्र प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांशी प्रत्यक्ष संपर्क साधून त्यांना दिलेल्या मुदतीत ऑनलाईन अर्ज करण्याची सूचना महाविद्यालयांनी द्यावी. विद्यार्थ्यांनी मुदतीत अर्ज न भरल्यास विद्यार्थ्याला शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेता येणार नाही. मागील वर्षीच्या तुलनेत नोंदणी १०० टक्के करण्यात यावी. 
  अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत ७ मार्च तर,  इमाव, विजाभज व विमाप्र प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम मुदत ३१ मार्च २०२२ पर्यंत वाढविण्यात आली आहे. जिल्ह्यातील कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयांनी आपल्या महविद्यालयातील मागासवर्गीय  विदयार्थी अर्ज भरण्यापासुन वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्याची जबाबदारी प्राचार्य यांची राहील याची नोंद घ्यावी. तरी https://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज भरण्याचे आवाहन सहाय्यक आयुक्त डॉ. अनिता राठोड यांनी केले आहे.
***


सैलानी यात्रेला परवानगी नाही
- दिनेश गीते
*प्रशासनाचा निर्णय
बुलडाणा, (जिमाका) दि. ३: जिल्ह्यात देशभरात प्रसिद्ध असलेल्या सैलानी यात्रेला याहीवर्षी शासनाच्या निर्बंधांनुसार परवानगी देण्यात आली नाही. त्यानुसार यात्रा होणार नाही. तरी यात्रेला येणाऱ्या भाविकांनी येवू नये, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गीते यांनी केले आहे.  जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गीते यांच्या अध्यक्षतेखाली सैलानी बाब यात्रा समन्वय समितीची पूर्वनियोजन सभा जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. 
   ते पुढे म्हणाले, राज्य शासनाने राज्यातील १४ जिल्ह्यातील निर्बंध शिथिल केले आहेत. मात्र जिल्ह्यात अजून अपेक्षित लसीकरण झाले नाही. शासनाने ९० टक्क्यापेक्षा अधिक लोकांनी पहिला डोस आणि ७० टक्क्यापेक्षा अधिक लोकांनी दुसरा डोस घेतलेल्या जिल्ह्यात निर्बंध शिथिल केले आहेत. मात्र  जिल्ह्याचा त्यात समावेश नसल्याने याहीवर्षी चिखली तालुक्यातील सैलानी यात्रा होणार नाही, असेही दिनेश गीते यांनी स्पष्ट केले. यावेळी  जि. प. उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश लोखंडे, उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन कदम, सैलानी बाबा समितीचे अध्यक्ष अ. समद, एसटी महामंडळाचे विभागीय नियंत्रक रायलवार, तहसीदार रूपेश खंडारे, सैलानी येथील मुजावर शे. चाँद, शे. शफीक यांच्यासह अन्य अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
दर्शन यात्रा जरी भरवली गेली तरी मोठ्या प्रमाणत नागरिक सैलानी येथे होळीच्या पूर्वीपासून येतात.  तसेच संदल संपल्यानंतर हे नागरिक जातात.  यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी होणार आहे. तरी प्रशासनाने दर्गा बंद ठेवावा, याविषयी यावेळी चर्चा करण्यात आली. याप्रसंगी सैलानी येथील श्री  मुजावर यांनी देखील आपली भूमिका विषद केली.

No comments:

Post a Comment