Monday 20 April 2020

DIO BULDANA NEWS 20.4.2020


 सर्व यंत्रणांच्या समन्वयातून कोरोनाला हद्दपार करणे शक्य
                                                                             - गृहमंत्री अनिल देशमुख
*कायदा व सुव्यवस्था आढावा बैठक
*होमगार्डचे वेतन शासनाने दिलेल्या निधीतून करावे
बुलडाणा, (जिमाका) दि. 20 : जगभर थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन विविध उपाययोजनांच्या माध्यमातून काम करीत आहे. तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व यंत्रणा खंबीरपणे प्रयत्न करत आहेत.  जिल्ह्यासह राज्यातूनच नव्हे, तर देशातून कोरोनाला हद्दपारकरण्यासाठी सर्व यंत्रणांमध्ये समन्वय महत्वाचा आहे. सर्व यंत्रणांच्या समन्वयातूनच कोरोनाला हद्दपार करणे शक्य आहे. त्यामुळे यंत्रणांनी अशा आपत्कालीन परिस्थितीत समन्वयाने काम करावे, असे निर्देश गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले.
    जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समिती सभागृहात कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या अनुषंगाने उद्भवलेल्या परिस्थितीच्या आढावा बैठकीचे आयोजन 19 एप्रिल रोजी करण्यात आले होते. त्यावेळी गृहमंत्री अनिल देशमुख बोलत होते. यावेळी राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, खासदार प्रतापराव जाधव, जिल्हाधिकारी सुमन चंद्रा, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. दिलीप पाटील- भुजबळ,  जिल्हा परीषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी षण्मुगराजन आदी व्यासपीठावर उपस्थित होते. तसेच यावेळी सभागृहात आमदार श्वेताताई महाले, आमदार सर्वश्री संजय गायकवाड, राजेश एकडे, माजी आमदार सर्वश्री हर्षवर्धन सपकाळ, राहुल बोंद्रे, दिलीपकुमार सानंदा, विजयराज शिंदे, कृषि उत्पन्न बाजार समिती सभापती जालींधर बुधवत, अप्पर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रेमचंद पंडीत, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सांगळे आदी उपस्थित होते.
  गृहमंत्री पुढे म्हणाले की, नोंदणीकृत बांधकाम कामगारांना 2000 रूपये आर्थिक मदत देण्यात येणार आहे. लवकरच ती वितरीत केल्या जाणार आहे.  राज्य शासन प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. या प्रयत्नांमध्ये सर्व यंत्रणांचे योगदान महत्वाचे आहे. परप्रांतीय स्थलांतरीत मजूरांना त्यांच्या राज्यामध्ये पोहोचविण्यासाठी शासन प्रयत्नरत आहे. राजस्थानमधील कोटा येथे जिल्ह्यातच नव्हे, तर राज्यातील बरेच विद्यार्थी आहेत. त्यांना गावाकडे परत आणण्यासाठीसुद्धा शासन सकारात्मक आहे. मजूरांना प्रशासकीय यंत्रणेच्या माध्यमातून भोजन, निवासाची व्यवस्था करण्यात येत आहे.  रेशनकार्ड नसलेल्या व्यक्तींना धान्य मिळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने खनिजच्या निधीचा उपयोग करावा. त्यामधून राशनकार्ड नसलेल्या नागरिकांना धान्य देता येईल. धान्य वाटप करताना कुठेही गैरव्यवहार होणार नाही, याबाबत काळजी घ्यावी. स्वस्त धान्य दुकानांवर जबाबदारी निश्चित करून कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी. तसेच याबाबत गावात दवंडी देवून जनजागृती करावी. जिल्ह्यात आवश्यकता असलेल्या होमगार्डची सेवा घेण्यात आली. त्यांचे वेतन राज्य शासनाने कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी दिलेल्या निधीमधून करावे.
  आंतर जिल्हा परवानगी देण्याबाबत शासनाचे कडक धोरण असल्याचे सांगत गृहमंत्री म्हणाले, शेती कामे करण्यासाठी लॉकडाऊनमधून सुट देण्यात आली आहे. शेतकऱ्यांना शेतमालाची वाहतूक करण्यासाठीही परवानगी आहे. तसेच त्यांना शेती करण्यासाठी दुसऱ्या ठिकाणी जायचे असल्यास जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून पासेसची व्यवस्था करावी. पीपीई किट, एन 95 मास्क व सॅनीटायझरचा पुरवठा शासन स्तरावरून करण्यात येत आहे. बँकासमोरील रांगा कमी करण्यासाठी नागरिकांना दुसरे काही पर्याय उपलब्ध करून द्यावे. विनाकारण दुचाकी फिरविणाऱ्या नागरिकांच्या दुचाकी जप्त कराव्यात.  
   पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यावेळी म्हणाले, या आपत्कालीन परिस्थितीत जिल्हा प्रशासन चांगले काम करीत आहे. संचारबंदीच्या काळात शेतकरी, शेतमजूर यांना खूप त्रास होत आहे. यापुढील काळात समाजातील सर्वच घटकांमधील अडचणी सोडविण्याचा प्रयत्न केल्या जाणार आहे. जिल्ह्यात सॅनीटायझर, पीपीई किट, मास्क यांच्यासह व्हेंटीलेटर, औषधे यांचा सुरळीत पुरवठा करण्यासाठी प्रयत्न केले आहेत. या संकटाच्या काळात शेतकऱ्यांना मिळालेली पिक विम्याची रक्कम बँकांनी कर्ज खात्यात वळती करू नये. ती रक्कम शेतकऱ्यांना निश्चितच उपयोगी ठरणार आहे. वर्तमानपत्रे सुरू झाली पाहिजेत. वर्तमानपत्रांच्या माध्यमातून तक्रारींचे निराकारण होत असते. तसेच माहिती नागरिकांना मिळते. त्यामुळे वर्तमानत्रे हा माहितीचा विश्वासार्ह स्त्रोत आहे. तसेच या लॉकडाऊनच्या काळात फळउत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांना मदत मिळाली पाहिजे, अशी मागणीही पालकमंत्री यांनी यावेळी केली.    
        जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी जिल्हृयात कोरोना रोखण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाय योजनाबाबत माहिती दिली. त्या म्हणाल्या, जिल्ह्यात ज्या भागात रुग्ण आढळले आहेत अशा 10 ठिकाणी कटेंन्टमेंट झोन करण्यात आले आहे. या भागांतील 85 हजार नागरिकांची नियमित आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. जिल्ह्यात 25 कोविड केअर सेंटर तयार करण्यात आले असून त्यामध्ये 2305 बेड आहेत. तसेच ‘डेडीकेटेड कोविड रूग्णालय 10 तयार करण्यात आली असून त्यामध्ये 660 बेड आहेत.  जिल्ह्यात 716 ठिकाणी कोविड उपचार सुविधा आहेत. तर 373 विशेषज्ज्ञ  डॉक्टरांची यादी तयार आहे. आवश्यकता पडल्यास सदर डॉक्टरांची सेवा घेता येणार आहे. जिल्ह्यात स्थलांतरीत मजूरांसाठी 40 निवारा केंद्र उभारण्यात आली आहेत. यामध्ये 4192 मजूरांना मोफत्‍ भोजन, निवास, समुपदेशन व आरोग्य तपासणीची सुविधा देण्यात आली आहे. तसेच 8 रक्तदान शिबिरांच्या माध्यमातून 298 पिशवी रक्त संकलीत करण्यात आले आहे. जिल्ह्यात 13 कृषि उत्पन्न बाजार समित्या सुरू असून 3558 क्विंटल धान्याची खरेदी करण्यात आली आहे. तसेच 2447 कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी कापूस विक्रीकरीता नोंदणी केली आहे. उज्ज्वला गॅस योजनेतंर्गत जिल्ह्यात 1,68,086 लाभार्थ्यांना लाभ देण्यात येत आहे. 
    जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील म्हणाले, जिल्ह्याच्या 04 आंतरराज्यीय सीमांच्या ठिकाणी चेकपोस्ट उभारण्यात आले आहे. तसेच 24 ठिकाणी आंतरजिल्हा चेकपोस्ट आहेत. संचारबंदीचे उल्लंघन केल्याच्या पार्श्वभूमीवर आतापर्यंत 993 गुन्हे दाखल करण्यात आला आहे. विविध कारवायांमधून 6 लक्ष 85 हजार 700 रूपयांचा दंडही वसूल करण्यात आला आहे. अफवा पसरविणाऱ्या गुन्ह्यांमध्ये 15 आरोपी करण्यात आले आहे.  बैठकीत विविध लोकप्रतिनिधींनी संचारबंदी काळात येत असलेल्या अडचणी मांडल्या. तसेच सुचनाही केल्या. बैठकीला सर्व संबंधित यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.
                                                                        **********



शहीद जवान चंद्राकांत भाकरे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
  • साश्रुनयनांनी दिला आखेरचा निरोप
  • शहीद जवान अमर रहे.. घोषणांनी आसंमत निनादला
बुलडाणा, (जिमाका) दि. 20 : जम्मू कश्मिरमधील बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोर क्षेत्रात केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या वाहनावर शनिवार 18 एप्रिल रोजी आंतकवाद्यांनी भ्याड हल्ला केला. त्यामध्ये जिल्ह्यातील पातुर्डा ता. संग्रामपूर येथील सीआरपीएफचे जवान चंद्रकांत भगवंतराव भाकरे (वय 38) यांच्यावर आज त्यांच्या मूळ गावी पातुर्डा येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.   यावेळी पातुर्डा ग्रामस्थ व उपस्थितांनी साश्रुनयनांनी चंद्रकांत भाकरे यांना अखेरचा निरोप दिला.
   आज सकाळी पातुर्डा गावातून शहीद चंद्राकांत भाकरे यांचे पार्थिव त्यांच्या घरी पोहोचले. त्यांचे अंत्यदर्शन घेतल्यानंतर सीआरपीएफ च्या विशेष वाहनातून पार्थिव अंत्यंसंस्कार स्थळी आणण्यात आले. दरम्यान गावातून पार्थिव वाहनातून आणत असताना गावकऱ्यांनी सामाजिक अंतराचे पालन करीत शहीद जवानाच्या पार्थिवावर पुष्प वर्षाव केला. अंत्यसंस्कार स्थळी पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी पुष्पचक्र वाहून आदरांजली वाहली. खासदार प्रतापराव जाधव,आमदार डॉ. संजय कुटे, जिल्हाधिकारी सुमन चंद्रा, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. दिलीप पाटील- भुजबळ, सीआरपीएफचे अधिकारी संजय लाटकर, संजय कुमार व ए.पी माहेश्वरी, उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर, तहसिलदार समाधान राठोड, सरपंच शैलजाताई भोंगळ  यांनीही शहीद जवानाच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहली.
    शहीद जवान यांच्यापश्चात आई, वडील, पत्नी, एक मुलगा व एक मुलगी, एक भाऊ एवढा आप्त परीवार आहे. शहीद जवान चंद्रकांत भाकरे केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या 179 व्या बटालीयनमध्ये कार्यरत होते. चंद्रकांत भाकरे 2 सप्टेंबर 2004 मध्ये सीआरपीएफमध्ये भरती झालेले असून ते  जम्मू कश्मिरमध्ये कर्तव्यावर होते. त्यांच्या चितेला छोटा मुलाने चिताग्नी दिला. तेव्हा उपस्थितांना अश्रू अनावर झाले. गावातून पार्थिव आणतांना पातुर्ड्याच्या आसंमत शहीद जवान अमर रहे… चंद्रकांत भाकरे अमर रहे… या घोषणांनी निनादून गेला.
                                                                                                                *********

 बरे होण्याची मिळतेय हमी… कोरोना होतोय कमी..!
·        जिल्ह्यात पाच रूग्ण बरे होवून गेले घरी
·        जिल्हाधिकारी यांच्यासह डॉक्टर्स, नर्सेसने टाळ्या वाजवून व्यक्त केला आनंद
बुलडाणा, (जिमाका) दि. 20 : कोरोना विषाणू हळू हळू पुर्ण जगाला आपले अस्तित्व दाखवित लॉकडाऊन केले. जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणावर कोरोनाची धास्ती नागरिकांनी घेतली. प्रशासनाच्या प्रभावी उपाययोजनांमुळे कोरोनाचे अस्तित्व बंदीस्त करण्यात यश मिळत आहे. त्यामुळे बरे होण्याची मिळतेच हमी.. कोरोना होतोय कमी.. ही परिस्थिती जिल्ह्यात निर्माण झाली आहे.
    कोरोनाबाधीत त्या मृत व्यक्तीच्या अहवालानंतर चार रूग्ण पॉझीटीव्ह आले होते. त्यानंतर चिखली, चितोडा ता. खामगांव, शेगांव, देऊळगांव राजा व सिंदखेड राजा येथील संशयीत व्यक्ती कोरोना बाधीत आले.  त्यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली. स्त्री रूग्णालयातून जिल्ह्यात असलेल्या 21 कोरोनाबाधीत रूग्णांपैकी एकाचा मृत्यू झाला. त्यानंतर 20 रूग्णांवर कोविड रूग्णालयात उपचार सुरू होते. त्यामधून 17 एप्रिल रोजी तीन कोरोना बाधीत रूग्णांना दुसरी टेस्ट निगेटीव्ह आल्यानंतर रूग्णालयातून सुटी देण्यात आली. यानंतर 17 रूग्ण रूग्णालयात उपचार घेत होते, त्यानंतर आज पुन्हा चार रूग्णांचे दुसरा अहवाल निगेटीव्ह आला. तसेच एका आधीच्या कोरोनाबाधीताचा दुसरा अहवाल पॉझीटीव्ह आला होता. त्यानंतर आज त्या व्यक्तीचा दुसरा अहवाल निगेटीव्ह आला. त्यामुळे रूग्णालयातून आज 20 एप्रिल रोजी पाच रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. जिल्ह्यात या पाच रूग्णांसह डिस्जार्ज देण्यात आलेल्या रूग्णांची संख्या 8 झाली आहे. सध्या रूग्णालयात 12 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
     प्रशासनाने आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातून राबविलेल्या उपाययोजनांमुळे आज पाचही रूग्णांचे दुसरा रिपोर्ट निगेटीव्ह आले आहे. त्यांना आनंदाने जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांच्यासह जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रेमचंद पंडीत, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सांगळे, सर्व डॉक्टर्स, नर्सेस, ब्रदर्स यांनी टाळ्या वाजवून आनंद व्यक्त केला.  शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार उपचारादरम्यान संबंधित रुग्णांचे दाखल केल्यापासून 14 व 15 दिवसानंतरचे दोन्ही अहवाल तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. दोन्ही तपासणी अहवाल निगेटीव्ह आल्याने चिखली, चितोडा, दे.राजा व शेगांव येथील रूग्णाला 17 दिवसानंतर डिस्जार्ज देण्यात आला आहे.  जिल्ह्यातील कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण उपचारात बरे झाल्याने रुग्णांच्या चेहऱ्यावर तर आनंद होताच, मात्र त्याला बरे करण्यात महत्वपूर्ण कामगिरी बजावलेले कोरोना संसर्ग वार्डात काम करणारे डॉक्टर, पारिचारिका, कर्मचारी यांच्या चेहऱ्यावरुनही आनंद ओसंडून वाहत होता.
   त्यामुळे या सर्वानी टाळ्या वाजवून संबंधित कोरोनाबाधीत रूग्ण बरे झाल्याचा आनंद व्यक्त केला. यानंतर जिल्हाधिकारी यांनी डिस्चार्ज पेपर देवून, रुग्णवाहिकेतून संबंधित रुग्णांना घरी सोडण्यात आले. बुलडाणा येथे 28 मार्च रोजी  एका संशयीत व्यक्तीचा उपचारादरम्यान रूग्णालयात मृत्यू झाला होता. त्यानंतर त्यांचा रिपोर्ट कोरोनाबाधीत आला होता. त्यानंतर त्यांच्या निकट संपर्कातील व्यक्तींना दाखल करून त्यांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले. या पाचमध्ये बरे झालेल्या एकाचा समावेश त्या मृत व्यक्तीच्या हायरिस्क संपर्कातील आहे. तसेच उर्वरित चार दिल्ली येथील मरकज कार्यक्रमाच्या संपर्कातील आहेत.  तपासणी अहवालानंतर कोरोना संसर्ग वार्डात दाखल करुन या सर्वांवर उपचार करण्यात आले.  तसेच शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार या रुग्णांवर तसेच जिल्ह्यात संशयित आढळून येणाऱ्या रुग्णांवर शासकीय रूग्णालयातील आयसोलेशन कक्षात तपासणी, उपचार करण्यात आले. कोरोना बाधित आढळलेल्या या व्यक्तींचे दोन्ही स्वॅब घेवून तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. पहिला तपासणी अहवाल निगेटीव्ह असल्याचा, तर दुसरा तपासणी रिपोर्टही निगेटीव्ह असल्याचा अहवाल प्राप्त झाला. दोन्ही अहवाल निगेटीव्ह प्राप्त झाल्याने शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार सदर बाधीत रूग्ण कोरोना मुक्त झाल्याने त्याला आज डिस्चार्ज देवून घरी सोडण्यात आले.
  कोरोनाच्या या जीवघेण्या आजारातून वाचलेल्या सर्व कोरोना निगेटीव्ह रूग्णांचे चेहरे आनंदीत होते. सर्व मनोमन आरोग्य यंत्रणेतील डॉक्टर्स, नर्सेस यांचे आभार मानत होते. कोरोनापासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी अजूनही लॉकडाऊनचे पालन करावे, घरातून विनाकारण बाहेर पडू नये. सर्वांनी मास्क किंवा स्वच्छ हात रूमाल चेहऱ्यावर ठेवावा. अनावश्यक बाहेर  न पडता घरातच रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी यावेळी केले.                                                                                                                                                      *****************

लॉकडाऊन कालावधीत अत्यावश्यक सेवांचा घरपोच पुरवठा

बुलडाणा, (जिमाका) दि. 20 :   कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 दि.13 मार्च 2020 पासून लागू केलेला आहे. तसेच बुलडाणा शहरात कोरोना रुग्णांची संख्या पाहता सर्व भाजीपाला मार्केट बंद करण्यात आले आहेत. आज रोजी शहरात केवळ नगरपालीकेकडून ज्यांना पासेस देण्यात आले आहेत. त्यांनाच संबंधीत प्रभागात भाजीपाला विकण्यास परवानगी देण्यात आली आहे.
  तसेच खालील प्रभागात नेमून दिलेल्या पुरवठा अधिकारी यांचेसोबत सहाय्यक अधिकारी यांचीसुध्दा नियुक्ती करण्यात आलेली आहे. तरी नागरीकांनी आपले प्रभागाचे पुरवठा अधिकारी यांचेशी संपर्क करुन आवश्यकतेनुसार भाजीपाला तसेच किराणा दुकानदाराकडे किराणा मालाचा पुरवठा घरपोच पुरवठा करण्यासाठी व्हॉट्सॲप क्रमांकावर संपर्क करावा व घरपोच उपलब्ध करुन घ्यावा, असे आवाहन नगर पालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.
प्रभागनिहाय यादी पुढीलप्रमाणे- प्रभाग क्र.1 गणेश नगर, चंद्रमणी नगर,लघूवेतन सोसायटी – पुरवठा अधि‍कारी गजेंद्र राजपुत, सहाय्यक – कु.माधुरी देविदास राजपूत, सदस्य सौ. कमलबाई मोरे, सौ. सिंधुताई खेडेकर, प्रभाग क्र.6- भडेच ले आऊट,आंबेडकर नगर,महात्मा फुले नगर, पुरवठा अधिकारी रविंद्र जाधव, सहाय्यक रविंद्र दाभाडे, सदस्य सौ. मिनाताई गायकवाड व आशिष जाधव, प्रभाग क्र.7- शिवाजी नगर, विदर्भ हाऊसिंग सोसायटी, टिळकवाडी, जुनागाव भि‍लवाडा, पुरवठा अधिकारी गौतम आराख, सहाय्यक सिध्दार्थ सरकटे, सदस्य सौ. यमुनाबाई काकस व कैलास माळे,  प्रभाग क्र.8 वावरे ले आऊट,वानखडे ले आऊट,आरस ले आऊट,राऊतवाडी ,देशपांडे ले आऊट,गुरुकृपा नगर – पुरवठा अधिकारी जगदेव कारले, सहाय्यक संजय जाधव व सौ. निर्मला मोरे, सदस्य सौ. वैशाली वावरे व उमेश कापूरे, प्रभाग क्र. 9 सुवर्ण नगर ,मच्छी ले आऊट,जैस्वाल ले आऊट- पुरवठा अधि‍कारी महेंद्रसिंग ठाकुर, सहाय्यक लक्ष्मण नेवरे, श्रीमती नंदा उबरहांडे, सदस्य सौ. सुभद्रा इंगळे व सौ. वैशाली इंगळे, प्रभाग क्र.10 इंदीरा नगर, जोशी पुरवठा अधिकारी सुनिल काळे,सहाय्यक श्रीमती कल्पना पडघान व सौ. अनुराधा सोनुने , सदस्य विजय जायभाये व सौ. आसमा याकुब, प्रभाग क्र. 11 क्लब ले आऊट, कानडे नगर, चैतन्यवाडी, लांडे ले आऊट,शाहु नगर – पुरवठा अधिकारी संजय मुळे, सहाय्यक बळीराम दहीभजन  व कु. अनिता राजपुत , सदस्य सौ. उज्वला काळवाघे व आकाश दळवी, प्रभाग क्र. 12 मिलींद नगर, सावि‍त्रीबाई फुले नगर, जगदंबा नगर,पोलीस लाईन – पुरवठा अधिकारी दिपक सोनुने, सहाय्यक सौ. रश्मी बंग, सौ. आशा नंदकिशोर नारखेडे व सिध्दार्थ जाधव, सदस्य सौ. निर्मला जाधव व श्रीमती सुचिता गवई, प्रभाग क्र 13- लक्ष्मी नगर, एकता नगर, केशवनगर, महाविर नगर, सरस्वती नगर, अष्टविनायक नगर- पुरवठा अधिकारी रविंद्र खानझोडे,सहाय्यक श्रीमती प्रमिला गावंडे व कु. मालती साळवे, सदस्य सौ. सरला बाहेकर व गोविंद सराफ, प्रभाग क्र. 14 रामनगर,लहाने ले आऊट,छत्रपती नगर,जिजामाता नगर,शिक्षक कॉलनी – पुरवठा अधिकारी विश्वास इंगळे, सहाय्यक गजानन गाढवे व सौ. मिनाक्षी बढे, सदस्य दिपक सोनुने व सौ. पुष्पा धुड, प्रभाग क्रं 5 संभाजीनगर, पाठक गल्ली, कारंजा चौक, शिवनेरी नगर, पुरवठा अधिकारी कु. पौर्णिमा सुस्ते, सहाय्यक कु. शिल्पा बापट, सदस्य अरविंद होंडे व सौ. कोमल बेंडवाल.
  प्रतिबंधीत क्षेत्राकरीता नोडल ऑफीसर म्हणून संदेश मोरे यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांचा मोबाईल क्रमांक 8149123090 आहे.  प्रभाग क्र.2 मिर्झा नगर, इकबाल नगर परिसर – पुरवठा अधिकारी रमीजराजा चौधरी , सहाय्यक रईसोद्दीन काझी, फारुख अ. रऊफ, वाहेदाबेगम शे. नजीर, शबाना अंजुम सै. सोहेल, रेहाना बेगम हसनअली, राहीला परवीन  मो. विकार, सदस्य सै. आसिफ सै. यासीन व श्रीमती इसरत परविन मो. अझहर.  प्रभाग क्र. 3 क्रांतीनगर , तेलगु नगर आणि प्रभाग क्र. 4 गवळीपुरा, इकबाल नगर, जोहरनगर, पुरवठा अधि‍कारी अ.नासीर रज्जाक, सहाय्यक  सरफराज अहेमद देशमुख, शे. छोटु शे. गुलाब, सईदाबी म. असलम, अजराशाहीन शे  बशीर ,हुमा कौसर म. निजाम ,जुमराशाहीन अकिलखान, सदस्य अफसर मो. सरवर, राणी बी. शे. लाल, श्रीमती रजीयाबी शे रहीम, श्रीमती गोसियाबी शे. सत्तार.
किराणा दुकानदारांचे पुढील व्हॉट्सॲप संपर्क क्रमांकावर यादी पाठवावी – क्वालीटी हाऊस 8378088000, प्रियंका पोव्हीजन 9923139663, कोठारी सुपरशॉप 9922555355, भवरलाल सोनराज चोपडा 9764687171, उज्जैनकर किराणा 9028232354, संजय किराणा 9422180564, एआरडी मार्ट 9421898989, राजेश किराणा 9423145147, पारस ट्रेडर्स 7888048882,अरीहंत सुपर बाजार 9422121178,सुपर शॉप 9422960931,पारस सुपर बाजार 9421393852,रिलायन्स मार्ट 7666904794 याबाबतची नोंद सर्व नागरिकांनी  घ्यावी, असे मुख्याधिकारी नगर परिषद कार्यालयाच्या वतीने  प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.
                                                                        ******
कोरोना अलर्ट : जिल्हयात आज प्राप्त 6 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह '
बुलडाणा, (जिमाका) दि. 20 : जिल्ह्यात एकूण 21 रूग्ण कोरोना पॉझीटीव्ह आढळलेले असून त्यापैकी एक मृत आहे. उर्वरित 20 रूग्णांवर कोविड रूग्णालयात उपचार सुरू होते. त्यापैकी 17 एप्रिल रोजी  तीन रूग्णांचे नमुने निगेटीव्ह आले असून त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे रूग्णालयातून डिस्जार्ज देण्यात आला, तर आज 20 एप्रिल रोजी रूग्णांचे कोरोना दुसऱ्यांदा अहवाल निगेटीव्ह आल्यामुळे वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे त्यांना रूग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. सुटी देण्यात आलेल्या रूग्णांची संख्या 8 झाली असून सध्या रूग्णालयात 12 रूग्ण उपचार घेत आहेत.
  रूग्णालयात सध्या 12 रूग्णांवर उपचार सुरू आहेत  तसेच आज 20 एप्रिल रोजी 6 अहवाल प्राप्त झाले आहेत. हे सर्व 6 अहवाल निगेटीव्ह आहेत. तसेच आज रोजी अहवालाच्या प्रतिक्षेत असलेले नमुने 5 आहेत. कोविड रूग्णालयात उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रूग्ण 12 आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 297 आहेत, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. आर. जी पुरी यांनी दिली आहे.

No comments:

Post a Comment