Friday 7 May 2021

DIO BULDANA NEWS 7.5.2021

नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पा अंतर्गत ई ग्रामसभेचे आयोजन बुलडाणा, (जिमाका) दि. 7: मलकापूर तालुक्यातील मौजे भालेगांव येथे नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पा अंतर्गत ई ग्रामसभा घेण्यात आली. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत बुलडाणा कृषी उपविभागातील १०३ गावे आहेत व एकुण ७७ ग्रामपंचायती आहेत. कोविड-१९ च्या प्रार्दुभाव वाढल्यामुळे गाव स्तरावर ग्रामसभा घेण्यात अडचण निर्माण झाली होती. त्यामुळे प्रकल्प संचालक,नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प याच्या पत्रान्वये ई-ग्रामसभा घेण्यास मंजुरी मिळाली. त्यामुळे बुलडाणा उप विभागात एकुण ५८ ग्रामपंचायती पैकी ३ ग्रामपंचायतीत ई-ग्रामसभा घेण्यात आल्या. गावाचे सरपंच, उप सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, कृषी ताई, कृषि मित्र, गावातील प्रगतीशील शेतकरी, समुह सहाय्यक, ग्रामसेवक, कृषि सहाय्यक, व कृषि विभागातील इतर अधिकारी तसेच गावकरी यांच्या सकात्मक प्रेरणेने मौजे भालेगांव ता. मलकापुर येथे ई-ग्रामसभेचे यशस्वीपणे आयोजन केले. सुरवातीला प्राथमीक स्वरुपात भालेगांव येथील समुह सहाय्यक उमेश जगताप, कृषि सहाय्यक काकासाहेब दळवी, ग्रामसेवक कु व्ही आर धांडगे, सरंपच तेजस घुले पाटिल व उपसरपंच सौ प्रिती सुरज वराडे यांची प्राथमिक एकत्र बैठक घेऊन त्यामध्ये गावातील लोकांना मायक्रोस्पॉस्ट टिम्स अॅप डाऊनलोड करायला सांगीतले. सोबत ग्राम कृषि संजीवनी समितीची रचना कशी असते ते परिपत्रक समजावून सांगीतले, खरीप हंगामात जवळ येत आहे. त्याकरीता गावाचा समग्र विकास आराखडा ज्यामध्ये पिकपध्दती पासुन कुठले पिक घ्यावयाचे पिकाला पाणी किती लागणार, पिकाचे किडी व रोगाचे संरक्षण कसे करावयाचे पिकाचे काढणी पश्चात तंत्रज्ञान, तयार झालेल्या शेतमालावर प्रक्रीया करुन त्याची विक्री व्यवस्था कशी करावी. गावात असलेले शेतकरी गट, परीसरात असलेले शेतकरीउत्पादक कंपनी यांचे सहाकार्य घेऊन शेतकऱ्याच्या शेतमालाला हमी भावापेक्षा जास्त दर कसा मिळेल या सदंर्भात चर्चा झाली. तसेच गावाची पाण्याची, गरज उपलब्ध होणारे पाणी व त्याची संरक्षीत सिंचनाची व्यवस्था करुणे या सर्व गोष्टीचा सविस्तर चर्चा ग्रामसभेत करण्यात आली. या उपविभाग मध्ये ३ ई-ग्रामसभा यशस्वीपणे झालेल्या आहेत. ई-ग्रामसभा हि नविन सकंल्पना असल्यामुळे नवनियुक्त सरपंच यांनी सुध्दा उत्साहाने व पुढाकार घेऊन ग्रामसेवक, समुह सहाय्यक, व कृषि सहाय्यक यांच्या सकारात्मक प्रतिसाद असल्यामुळे सदर ग्रामसभा उत्साहात पार पडली. ई-ग्रामसभा यशस्वी करण्याकरीता सरपंच तजेस घुले पाटिल, ग्रामसेवक कु व्ही आर धांडगे, कृषि सहाय्यक काकासाहेब दळवी,समुह सहाय्यक उमेश जगताप यांनी प्रयत्न केले. ****** खरीप हंगाम 2021 मध्ये शेतक-यांनी घरचेच सोयाबीन बियाणे वापरावे *कृषि विभागाचे आवाहन *गावनिहाय बियाणे उपलब्धतेची माहितीसाठी कृषी विभागाच्या www.buldanaagriculture.com संकेतस्थळाला भेट द्यावी बुलडाणा,(जिमाका) दि. 7 : सोयाबीन हे स्वपरागसिंचीत पिक आहे. या पिकाचे सर्वच वाण सरळ वाण आहेत. त्यामुळे दरवर्षी बियाणे बदलाची आवश्यकता नाही. एकदा प्रमाणित बियाणे वापरल्यानंतर त्याच्या उत्पादनातुन येणारे बियाणे पुढील 2 वर्षापर्यंत वापरात येते. शेतक-यांनी स्वत:कडील बियाणे वापरल्यास उत्पादन खर्च कमी होईल. मागील दोन वर्षात शेतकयांनी खरेदी केलेल्या प्रमाणित बियाणापासुन उत्पादित झालेले सोयाबीन चालु वर्षी बियाणे म्हणून शेतकरी वापरु शकतात. गावनिहाय बियाणे उपलब्धता जाणून घेण्यासाठी कृषी विभागाच्या www.buldanaagriculture.com संकेतस्थळाला भेट द्यावी. सोयाबीनचे बियाणे अत्यंत नाजुक असून त्याचे बाह्य आवरण पातळ असते. त्यामुळे त्याची उगवण क्षमता अबाधित राखण्यासाठी बियाणे हाताळतांना काळजी घ्यावी, बियाण्याची साठवणूक करताना आर्द्रतेचे प्रमाण 10 ते 12 टक्क्यापेक्षा जास्त नसावे. साठवणुकीसाठी प्लास्टीक पोत्यांचा वापर करू नये. बियाणे साठवतांना सोयाबीनची सातपेक्षा जास्त थर बियाण्याची पोती एकमेकावर ठेवू नये. बियाणे उन्हात ठेवू नये. बियाणे हाताळतांना जास्त प्रमाणात आदळ आपट होणार नाही, याची दक्षता घ्यावी. पेरणीसाठी राखून ठेवलेल्या सोयाबीनची उगवण क्षमता तपासावी. शेतकऱ्यांनी 60 टक्के पेक्षा जास्त उगवण क्षमता असलेल्या सोयाबीनची बियाणे म्हणून निवड करावी. सोयाबीन निवड करताना बाजारातून आणायचे असल्यास कोरडवाहू शेतीसाठी एम ए यू एस 71, एम ए यू एस 158, फुले कल्याणी, जे.एस 95, जे. एस 9305 या वाणांची निवड करावी. पेरणीच्या एक पूर्ण दिवस पूर्वी कार्बोकजिम 37.5 टक्के अधिक थायरम 37.5 टक्के ग्रॅम / किलो बियाण्यास लावावे. पेरणीच्या दोन तास पूर्वी 20 ग्रॅम रायझोबियम किंवा 6 मि.ली पि.एस.बी व ट्रायकोडर्मा 5 ग्रॅम किंवा 6 मी ली /किलो बियाण्यास लावावे. यापैकी जी पद्धत उपलब्ध असेल त्याचा बीजप्रक्रिया करण्यासाठी वापर करावा. बुरशीजन्य रोगांपासून संरक्षणासाठी बीजप्रक्रिया करावी. सोयाबीन पिकाची पेरणी करताना रुंद सरी वरंबा पद्धतीचा वापर करावा. ते शक्य नसल्यास प्रत्येक 4 ते 6 ओळी मागे 1 ओळ सोडावी म्हणजेच पट्टा पद्धतीने पेरणी करावी. बियाणे 3 ते 5 से मी पर्यंत खोल पडल्याची खात्री करावी. रात्रीच्या वेळी पेरणी करू नये. बीजप्रक्रिया करून बियाणे सावलीत वाळवावे नंतर त्याची पेरणी करावी, असे आवाहन कृषि विभागाने केले आहे. बियाण्याची उगवण क्षमतेनुसार एकरी बियाण्याचा वापर उगवण क्षमता 70 टक्के बियाणे एकरी 30 किलो, उगवण क्षमता 69 टक्के बियाणे एकरी 30.50 किलो, उगवण क्षमता 68 टक्के बियाणे एकरी 31 किलो, उगवण क्षमता 67 टक्के बियाणे एकरी 31.50 किलो, उगवण क्षमता 66 टक्के बियाणे एकरी 32 किलो, उगवण क्षमता 60 टक्के बियाणे एकरी 35 किलो.

No comments:

Post a Comment