Thursday 3 September 2020

DIO BULDANA NEWS 3.9.2020


 भूसंपादनाचे प्रश्न मार्गी लावून विकासकामे वेगाने पूर्ण करावी

-          पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे

  • भूसंपादन, समृद्धी महामार्ग आढावा बैठक

बुलडाणा,(जिमाका) दि.3 :  जिल्ह्यात विविध विकास  कामे सुरू आहेत. त्यामध्ये सिंचन, रस्ते यासह अन्य कामांचाही समावेश आहे. जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरणाच्या माध्यमातून रस्त्यांची कामे सुरू आहेत. मात्र अनेक कामे भूसंपादन, वन विभागाची परवानगी आदींमध्ये अडकली आहेत. तरी अशा कामांमध्ये यंत्रणांनी समन्वय  ठेवून ही समाजहितोपयोगी कामे वेगाने पूर्ण करावी, अशा सूचना पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी आज दिल्या.

  जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात  विकास कामांबाबत भूसंपादन प्रकरणांची आढावा बैठक आयोजीत करण्यात आली होती. त्यावेळी पालकमंत्री बोलत होते.  याप्रसंगी व्यासपीठावर जिल्हाधिकारी षण्मुखराजन, अप्पर जिल्हाधीकारी प्रमोदसिंह दुबे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. आर जी पुरी आदी ‍ उपस्थित होते.

  खामगांव –चिखली राष्ट्रीय महामार्गावरील पैनगंगा नदीवरील पुलाचे काम त्वरीत पूर्ण करण्याचे सांगत पालकमंत्री म्हणाले, या पूलासाठी भूसंपादनाची कार्यवाही तात्काळ करावी. संबधीत यंत्रणांनी प्राधान्याने या कामाला गती देवून सदर पूल पुर्ण करावा. भूसंपादन प्रकरणांमध्ये वारंवार बैठका घेवून प्रक्रीया पूर्ण करून घ्यावी.

   समृद्धी महामार्गाचा आढावा घेताना पालकमंत्री डॉ. शिंगणे म्हणाले, समृद्धी महामार्गाचे काम संबधीत कंपनीने दर्जेदार करावे. त्यासाठी यंत्रणांनी  लक्ष द्यावे. समृद्धी महामार्गमध्ये भूसंपादन शेष असलेल्या जमिनीबाबत शेतकऱ्यांची समजूत काढावी. त्यांना प्रकल्पाचे लाभ लक्षात आणून द्यावे. अशा प्रकरणांमध्ये संबंधीत गावात जावून शेतकऱ्यांशी संवाद करावा.  या महामार्गाच्या कामामुळे खराब झालेले ग्रामीण रस्ते, इतर जिल्हा मार्ग संबंधीत कंपनीने दुरूस्त करून द्यावे. महामार्गालगत उभारण्यात नवनगरांच्या आजुबाजूला जमीन घेण्यासाठी मोठ्या शहरांमधून लोक येत आहेत. याबाबत शेतकऱ्यांनी नवनगरां जवळील शेतीचे लाभ लक्षात आणून द्यावे. त्यांना विक्रीपासून परावृत्त करावे.  

     गौण खनिज आढावा घेताना पालकमंत्री यांनी सूचीत केले, रॉयल्टी घेण्याची पद्धत सुटसुटीत करावी. त्यामुळे अनेक वेळा  कंत्राटदारांकडून विकास कामे वेळेत पूर्ण केल्या जात नाही. ही पद्धत सोपी करून विकास कामे गतीने पुर्ण करण्यासाठी नियमानुसार कारवाई करावी. कंत्राटदरांनी गौण खनिजाची खोदाई ठरलेल्या ‍ठिकाणांहूनच करावी. खाजगी मालकीच्या क्षेत्रातून खोदकाम करू नये. सिनगांव जहागीर येथील भूखंड वाटप करताना पात्र- अपात्र लाभार्थी यांचा सर्वे करावा. त्यासाठी विहीत कालमर्यादा आखावी.  बैठकीला संबधीत यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.

                                                                                    *******

भोन येथील समृद्ध वारसा जतन करावा

-          पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे

 

बुलडाणा,(जिमाका) दि.3 :  संग्रामपूर तालुक्यात भोन येथे सम्राट अशोक कालीन अवशेष उत्खनामध्ये सापडले आहे. हा एक समृद्ध वारसा आहे. या वारस्याचे जतन झाले पाहीजे. कारण भोन जिगाव प्रकल्पामध्ये जाणार आहे. त्यामुळे योग्य स्तरावर भोन येथील उत्खनन होवून जमीनीत दडलेला  हा समृद्ध सांस्कृतीक वारसा बाहेर काढणे गरजेचे आहे. त्यासाठी संबधीत यंत्रणांनी योग्य ती कारवाई करावी,  असे निर्देश पालकमंत्री डॉ राजेद्र शिंगणे आज दिले.

   जिल्हाधीकारी कार्यालयातील नियोजन समिती सभागृहात भोन येथील उत्खननाबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी व्यासपिठावर जिल्हाधिकारी षण्मुखराजन, अप्पर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. पुरी आदी उपस्थित होते.

   भोनबाबत मंत्रालयात बैठक आयोजित करणार असल्याचे सांगत पालकमंत्री म्हणाले, भोन येथील जमिनीच्या उदरात दडलेले अवशेष बाहेर काढून त्याचे संवर्धन, जतन करण्यासाठी मंत्रालयात मा. मुख्यमंत्री किंवा मा. उपमुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात येईल. संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी बैठकीला बोलाविण्याच्या सूचनाही पालकमंत्री यांनी यावेळी दिल्या.  यापूर्वी करण्यात आलेल्या पुरातत्व विभाग, पुणे येथील कॉलेजने केलेल्या उत्खननाचा आढावाही पालकमंत्री यांनी घेतला. याप्रसंगी जलसंपदा विभागाचे अधिक्षक अभियंता श्री. सुपेकर यांनी जिगांव प्रकल्प व भोन बाबत केलेल्या कार्यवाहीची माहीती दीली. बैठकीला संबधीत विभागाचे अधिकारी उपस्थीत होते.

********

पीक विम्याच्या लाभापासून एकही पात्र नुकसानग्रस्त शेतकरी सुटू नये

-          पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे

 

बुलडाणा,(जिमाका) दि.3 :  जिल्ह्यात जुलै, ऑगस्ट महीन्यात काही भागात अतिवृष्टी झाली. परिणामी शेतकऱ्यांचे नुकसान झाले. तसेच शेतांमध्ये नदीच्या पुराचे पाणी, धरणांमधून सोडलेले पाणी गेल्यामुळे पीके वाहून गेली. अशा परिस्थितीत पिक विमा काढलेल्या पात्र शेतकऱ्यांना पीक विम्याच्या मदतीचा लाभ देण्यात यावा. यामधून एकही नुकसानग्रस्त पात्र शेतकरी सुटता कामा नये, असे निर्देश पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिले.

      जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समिती सभागृहात पीक विमाबाबतबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी व्यासपिठावर जिल्हाधिकारी षण्मुखराजन, अप्पर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. पुरी आदी उपस्थित होते.  बैठकीला जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नरेंद्र नाईक यांनी माहिती दिली.  

  नुकसानीमध्ये मूग पीकाचे 100 टक्के नुकसान झाले असल्याचे सांगत पालकमंत्री म्हणाले, पिक विमा काढलेल्या मूंग उत्पादक शेतकऱ्यांच्या नुकसानीचा सर्वे पूर्ण करावा. कृषी विभागाने याबाबत लक्ष घालून सर्वे पूर्ण करून घ्यावा. पात्र एकही शेतकरी मदतीपासून वंचित ठेवू नये. सर्वेमध्ये त्रुटी ठेवू नये.  पोकरा योजनेत निवडलेल्या गावांमध्ये शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवाव्यात. तसेच या गावांमध्ये भेटी देवून तेथील शेतकऱ्यांचे समुपदेशन करावे. या योजनेचा लाभ शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत मिळवून द्यावा, अशा सूचनाही पालकमंत्री यांनी यावेळी दिल्या. बैठकीला उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, पीक विमा कंपनीचे अधिकारी उपस्थित होते.

                                                                ******

No comments:

Post a Comment