DIO BULDANA NEWS 31.05.2024
जिल्हाधिकारी कार्यालयात अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी
बुलडाणा, दि. 31 : जिल्हाधिकारी कार्यालयात अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त तहसीलदार संजीवनी मुपळे यांनी प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन केले. यावेळी नाझर गजानन मोतेकर, वंदना वराळे, श्रीमती मनवर आदी कर्मचारी उपस्थित होते.
00000
अन्न प्रक्रिया उद्योगासाठी मिळणार तीन कोटींपर्यंत अनुदान
*शेतकरी उत्पादक कंपन्यांसह गटांना प्राधान्य
बुलडाणा, दि. 31 : स्थानिक, स्वदेशी, गावरान, सेंद्रिय पारंपारिक उत्पादनांना वाव देण्यासाठी केंद्र पुरस्कृत आत्मनिर्भर भारत मोहिमेंतर्गत प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना कृषी विभागामार्फत राबविण्यात येत आहे. यात कृषी प्रक्रिया उद्योजक उभारणीसाठी प्रकल्पाच्या ३५ टक्के, तसेच कमाल तीन कोटी रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे. यात शेतकरी उत्पादक कंपन्यांसह शेतकरी गटांना प्राधान्य देण्यात येणार आहे.
नव्याने स्थापित होणाऱ्या किंवा सद्यस्थितीत कार्यरत सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांना विस्तारीकरण, स्तरवृद्धीसाठी या योजनेतून एक जिल्हा एक उत्पादन यावर आधारित कृषी प्रक्रिया उद्योगांना प्राधान्य दिले जाणार आहे. या योजनेंतर्गत भांडवली गुंतवणूक, सामाईक पायाभूत सुविधा, इनक्युबेशन सेंटर, स्वयंसहाय्यता गटाच्या सदस्यांना बिज भांडवल, मार्केटींग व ब्रॅन्डीग आदी करिता अर्थसहाय्य देण्यात येत आहे. वैयक्तिक सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांना प्रकल्प किमतीच्या ३५ टक्के किंवा जास्तीत जास्त १० लाख तर सामाईक पायाभूत सुविधा, इन्क्युबेशन केंद्र, मुल्यसाखळी घटकांसाठी प्रकल्प किमतीच्या ३५ टक्के किंवा कमाल ३ कोटी अर्थ सहाय्य देण्यात येणार आहे.
उद्योजक, शेतकरी, बेरोजगार युवक, महिला, भागीदारी संस्था, तसेच गट लाभार्थीमध्ये शेतकरी उत्पादक गट, कंपनी, संस्था, स्वयंसहाय्यता गट, सहकारी, शासकीय संस्थांनी कृषी व अन्न प्रक्रिया उद्योग उभारणी किंवा त्यांचे विस्तारीकरण, स्तरवृद्धी व आधुनिकीकरण करण्यासाठी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेत सहभाग नोंदवावा.
प्रकल्प आराखडे तयार करणे, बँकेकडे सादर करणे, तसेच नोंदणीसाठी कृषी विभागाकडून जिल्हा संसाधन व्यक्तीमार्फत सहाय्य केले जाणार आहे. आत्मातील नोंदणीकृत शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी व वैयक्तिक शेतकरी यांनी प्रकल्प करतेवेळी प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग योजनेसोबत कृषी पायाभूत योजनेची सांगड घातल्यास अनुदानासोबत तीन टक्के व्याजात सवलत मिळणार आहे.
जिल्ह्यात आत्मनिर्भर भारत पॅकेज अंतर्गत प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य अन्न प्रक्रिया योजना सन २०२३-२४ अंतर्गत वैयक्तिक घटकांचे ४३७ लक्षांक प्राप्त झाले आहे. त्यापैकी ३९१ लक्षांक साध्य झाले आहेत. यात ३९१ लाभार्थींना १३.५० कोटी रुपयाचे अनुदान कृषि विभागामार्फत वितरीत करण्यात आले आहे. त्यानुसार जिल्ह्यात ३९१ उद्योग सुरु करण्यात आले आहे. २०२४-२५ करिता वैयक्तिक घटकांचे लक्षांक ४१५ प्राप्त झाले आहे. यासाठी लाभार्थ्यांनी अर्ज करावे, अर्ज करताना कृषि सहाय्यक आणि तालुका कृषि अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी pmfme.mofpi.gov.in या वेबसाईटवरील माहिती घ्यावी, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी मनोजकुमार ढगे यांनी केले आहे.
00000
जून ते सप्टेंबरमध्ये सर्वसाधारणपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता
*दीर्घावधी पर्जन्यमानाच्या अंदाज जारी
बुलडाणा, दि. 31 : भारतीय हवामान खात्याने दीर्घावधी पर्जन्यमानाच्या अंदाज जाहिर केला आहे. त्यानुसार जून ते सप्टेंबरमध्ये सर्वसाधारणपेक्षा जास्त म्हणजेच १०६ टक्के पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.
दीर्घावधी पर्जन्यमानाच्या अंदाजानुसार देशात जून ते सप्टेंबर महिन्यात पडणाऱ्या पावसाची शक्यता १०६ % ( +- ४%) म्हणजे सर्वसाधारण पेक्षा जास्त अशी वर्तविण्यात आली आहे. ज्यामध्ये देशाची जून ते सप्टेंबर महिन्यातील पावसाची दीर्घकालीन सरासरी (१९७१ ते २०२० पर्यंतच्या पावसाची सरासरी) ही ८७ सेंमी. म्हणजेच ८७० मिमी. आहे. विभागनिहाय पावसाचा दीर्घावधी अंदाज पाहता मध्य भारतामध्ये ज्यात महाराष्ट्राचा समावेश आहे जून ते सप्टेंबर महिन्यात १०६ टक्के म्हणजेच सर्वसाधारणपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. सध्याच्या जागतिक मॉडेलच्या अंदाजानुसार येत्या मान्सून हंगामात भारतीय समुद्रातील पाण्याचे तापमान येणाऱ्या मान्सूनसाठी सकारात्मक आहे.
सन २०२१ पासून भारतीय हवामान खात्याने जून, जुलै, ऑगस्ट व सप्टेंबर अशा चार महिन्यांचा स्वतंत्र दीर्घावधी पावसाचा अंदाज प्रसारित करण्यास सुरुवात केली आहे. या चार महिन्यांसाठी मासिक पर्जन्यमानाचा अंदाज वर्तविण्यासाठी भारतीय हवामानशास्त्र विभाग जागतिक स्तरावरील अनेक मॉडेल्स एकत्र करून व प्रामुख्याने मान्सून मिशन संयुग्मित अंदाज प्रणालीचे मॉडेल वापरून अंदाज वर्तविते. या अंदाजान्वये जून महिन्यात मध्य भारतातील काही भागात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे तर काही भागात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता आहे. जिल्ह्यात जून महिन्यात सरासरीएवढा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
भारतीय हवामान खात्याने मान्सून केरळमध्ये दाखल झाल्याचे जाहीर केले. त्यानुसार जिल्ह्यात मान्सूनच्या पावसाचे आगमन १३ ते १५ जूननंतर होईल. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये. पुरेसा पाऊस म्हणजेच ७५-१०० मिमी पाऊस सलग दोन –तीन दिवसात पडल्यानंतर व जमिनीतील ओलावा १ फुट खोल लक्षात घेऊन पेरणीचा निर्णय घ्यावा व पेरणी वाफसा परिस्थितीत करावी. पावसाबाबत अद्ययावत अंदाज प्राप्त होण्यासाठी व खरीप पिकांसाठी शेतीतील दैनंदिन कामांचे सुयोग्य व सूक्ष्म व्यवस्थापन करण्यासाठी शेतकऱ्यांनी जिल्हा कृषी हवामान केंद्र, कृषी विज्ञान केंद्र यांच्याद्वारे आठवड्यातून मंगळवारी व शुक्रवारी प्रसारित होणाऱ्या हवामान आधारीत कृषी सल्ला पत्रिकेचा लाभ घ्यावा, तसेच खराब हवामान परिस्थितीत विजांपासून संरक्षण, सुरक्षा तथा जीवितहानी टाळण्यासाठी दामिनी मोबाईल ॲपचा वापर करावा, असे आवाहन कृषी हवामान तज्ज्ञ मनेश यदुलवार यांनी केले आहे.
जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची दाट शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी खरीपातील पिकांचे नियोजन करावे व त्यानुसार वाणांची निवड करावी. निवड केलेल्या वाणांची बाजारपेठेत उपलब्धता असल्याची पेरणीपूर्वी करावी. जून महिन्यात पेरणी करताना मातीतील ओलावा, पाऊसमान व कमाल तापमान आवर्जून लक्षात घ्यावे असे आवाहन वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल तारू यांनी केले आहे.
00000
Comments
Post a Comment