DIO BULDANA NEWS 14.06.2024
अनाथ बालकांच्या पालकत्वासाठी समाजाने पुढे यावे
-जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील
बुलडाणा, दि. 14 : महिला व बाल विकास विभागांतर्गत बालकांच्या देखरेख संस्थेत दाखल अनाथ, निराधार, परित्यागीत, असक्षम पालकांचे बालक, एक वर्षाहून अधिक काळापासून पालक भेटायला आलेले नाहीत अशी भेट नसलेल्या बालकांना एक प्रेमळ कुटुंब मिळावे यासाठी प्रतिपालकत्व योजना राबविण्यात येते. बालकांचे पालकत्व घेण्याच्या उद्देशाने इच्छुक पालकांनी अर्ज करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.
प्रत्येक बालकाला प्रेमळ कुटुंब मिळावे, हा त्याचा अधिकार आहे. बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम आणि नियमांच्या तत्वानुसार प्रत्येक मुलाला घर मिळावे, कुटुंबात मुलांचे संगोपन व्हावे आणि अनाथालय, बालआश्रम, बालगृह, निरीक्षणगृह हे समाजातील दुर्लक्षित आणि देखभालीची आवश्यकता असणाऱ्या बालकांसाठी शेवटचा पर्याय असावा, हे कायद्याचे तत्व आहे. मात्र समाजातील अनेक बालके बेसहारा व निराश्रीत होऊन संस्थेत राहुन आपले जीवन जगत आहेत, अशा बालकांना कौटुंबिक वातावरण मिळावे व त्यांचे बाल अधिकारी सुरक्षित राहणे गरजेचे आहे.
या करीता केंद्र शासनाने बालकाची काळजी व संरक्षणासाठी बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम २०१५ व सुधारित २०२१ कार्यान्वित केला आहे. या कायद्यातील कलम २ मध्ये विधीसंघर्षग्रस्त बालक आणि काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या बालकांना यथासंभव त्यांना आवश्यक सुविधा पुरवून पुनर्वसनाद्वारे त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याबाबत तरतूद करण्यात आली आहे. या बालकांच्या पुनर्वसनाकरीता संस्थेंतर्गत आणि संस्थाबाह्य अशा दोन प्रकारे सुविधा पुरवून विकास करायचा प्रयत्न करण्यात येत आहे.
बालकांच्या काळजी व संरक्षणासाठी केंद्र शासनाने कार्यान्वित केलेल्या बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम २०१५ व सुधारित २०२१ या कायद्यातील पुनर्वसन आणि सामाजिक पुनःस्थापना या प्रकरणांमध्ये बालकांना संस्थाबाह्य सेवा पुरविण्याची तरतूद करण्यात आली आहे. इच्छुक कुटुंबांना या योजनेचा लाभ देण्याचे शासनाचे धोरण आहे.
अर्जदाराचे पात्रता निकषात अर्जदार हे शारीरिक, मानसिक, भावनिक व आर्थिकदृष्ट्या सक्षम असावेत, अर्जदारांना कोणताही जीवघेणी वैद्यकीय स्थिती नसावी, अर्जदार हे कोणत्याही स्वरूपाच्या गुन्हेगारी कृत्यामध्ये किंवा कथितरित्या दोषी नसावे, विवाहित जोडप्याच्या बाबतीत दोन्ही जोडीदारांची संमती असणे आवश्यक आहे. एकल महिला मुलगा किंवा मुलगी दोन्हीपैकी कोणाचीही निवड करु शकते. एकल पुरुष फक्त मुलाची निवड करु शकतो. अर्जदार हे प्रेमळ, काळजी घेणारे आणि मुलाच्या वाढीसाठी फायदेशीर असे कौटुंबिक वातावरण तयार करण्यासाठी वचनबद्ध असणे गरजेचे आहे.
मुलांचे संगोपन करण्यासाठी पालकांची वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. 6 ते 12 वयोगट वर्षातील बालकाला दत्तक घेण्यासाठी संमिश्र विवाहित वय जोडी यांचे किमान वय 70, कमाल 110 वर्षे असावे. एकलसाठी किमान 35 आणि कमला 55 वर्षे असावे. 12 ते 18 वयोगट वर्षातील बालकाला दत्तक घेण्यासाठी संमिश्र विवाहित वय जोडी यांचे किमान वय 70, कमाल 115 वर्षे असावे. एकलसाठी किमान 35 आणि कमला 60 वर्षे असावे.
मुलांचे संगोपन करु इच्छिणाऱ्या पालकांनी caraing.gov.in ऑनलाईन पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे. मुलांचे संगोपन करु इच्छिणाऱ्या पालकांनी सदर पोर्टलवरी मार्गदर्शक तत्वांच्या अनुसूचीनुसार आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे.
ऑनलाईन अर्ज केल्यानंतर सदर अर्ज हा जिल्हा बाल संरक्षण कक्ष यांच्या पोर्टलला दिसल्यानंतर अर्जाची पडताळणी करण्यात येते. पडताळणीनंतर जिल्हा बाल संरक्षण कक्षामार्फत गृहभेट अभ्यास अहवाल पूर्ण केला जातो. गृहभेट अहवाल पोर्टलवर अपलोड केल्यानंतर अर्जदारांनी निवडलेल्या बालक, बालिकांची योग्यतेची शिफारस बाल कल्याण समिती करते. या शिफारशीनंतर बाल कल्याण समितीमार्फत पालकांना पालनपोषणासाठी देण्यात येतात.
पालनपोषणाचा कालावधीमध्ये अल्पकालीन प्रायोजकत्वाचा कालावधी हा १ वर्षाचा राहणार आहे. दिर्घ कालावधी हा १ वर्षापेक्षा जास्त आणि पालक कुटुंबाशी मुलाच्या सुसंगततेच्या मुल्यांकनाच्या आधारे बालक बालिका वयाच्या १८ वर्षा पर्यंत ठेवता येईल. बाल कल्याण समिती, प्रायोजकत्व आणि प्रतिपालकत्व मंजुरी समितीची शिफारस आणि जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या अहवालावर विचार केल्यानंतर पालनपोषनाची नियुक्ती समाप्त करण्याचा अधिकार राहील.
कायमस्वरुपी दत्तक विधान हे अर्जादारांनी प्रतिपालक्तव योजनेंतर्गत बालक, बालिका पालनपोषणासाठी घेतलेले असेल आणि पालकांच्या काळजीच्या कालावधीत मुलांचे पालनपोषण कुटुंबासोबत चांगल्या प्रकारे जुळवून घेतलेल्या प्रकरणामध्ये आणि पालक कुटुंब आणि पालनपोषनासाठी असलेले बालक, बालिका दोघेही दोन वर्षाच्या कालावधीनंतर दत्तक घेण्यास पात्र असू शकतात.
जिल्हा बाल संरक्षण कक्ष, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, बस स्टँडच्या मागे, मुड्ढे ले आऊट, डॉ. जोशी नेत्रालयाजवळ, बुलडाणा येथे संपर्क करु शकता किंवा दुरध्वनी क्र. ०२७६२-२९९३६६. मेल आयडी dopubuldana@gmail.com वरून अधिक माहिती प्राप्त करून घेऊ शकतात.
इच्छुकांनी बालकांचे पालकत्व स्विकारण्यासाठी caraing.gov.in पोर्टलवर फॉस्टर केअर अंतर्गत अर्ज करावे. तसेच बालकांना त्यांचा जगणे, सहभाग, सुरक्षितता, शिक्षण आणि विकासाचा अधिकार देण्यास मदत करावी, असेही आवाहन जिल्हाधिकारी तथा प्रायोजकत्व आणि प्रतिपालकत्व मान्यता समितीचे अध्यक्ष यांनी केले आहे.
00000000
आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या आयोजनाबाबत बैठक
*नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन
बुलडाणा, दि. 14 : आंतरराष्ट्रीय योग दिन दि. 21 जून रोजी साजरा करण्यात येणार आहे. योग दिनाच्या आयोजनाबाबत जिल्हास्तर आयोजन समितीची बैठक आज दुपारी 12 वाजता जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात पार पडली. जिल्हा क्रीडा अधिकारी बी. एस. महानकर अध्यक्षस्थानी होते.
जिल्ह्यामध्ये जिल्हा आणि तालुकास्तरावर शालेय विद्यार्थी, युवक-युवती, नागरीकांमध्ये योग विषयक आवड निर्माण करणे, तसेच योगाचा प्रसार व प्रचार करणे, याकरीता आंतरराष्ट्रीय दिनाचे औचित्य साधून दि. 21 जून रोजी सकाळी 7 ते 7.45 वाजेपर्यंत आंतरराष्ट्रीय योगदिनाचे आयोजन करायचे आहे.
प्रचंड धावपळीच्या आणि स्पर्धात्मक युगामध्ये शरीर निरोगी ठेवण्यासाठी योग साधनेचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. गेल्या भारतीयांची ओळख असलेला योगाभ्यास आता आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या औचित्याने जगभरात अधिकृतरित्या मान्यता प्राप्त झाला आहे. संयुक्त राष्ट्रसंघाने २१ जून आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून घोषित केला आहे.
योगदिनात सहभाग घेण्यासाठी जिल्हा प्रशासन, शालेय शिक्षण विभाग, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, माध्यमिक, प्राथमिक शिक्षणाधिकारी कार्यालय, आयुष मंत्रालय, जिल्हा योग संघटना, आरोग्य भारती, क्रीडा भारती, आर्ट ऑफ लिव्हिंग, पतंजली योग समिती, नेहरु युवा केंद्र विविध क्रीडा मंडळ, महिला मंडळ, विविध एकविध खेळ संघटना, जिल्हा शारीरिक शिक्षण शिक्षक संघटना, आयुर्वेद महाविद्यालय, नर्सिंग महाविद्यालय आणि योगक्षेत्रात विविध कार्यरत संस्था यांच्या वतीने युवक-युवती, योगप्रेमी नागरिक, अधिकारी, कर्मचारी यांच्या करिता आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन जिजामाता क्रीडा व व्यापारी संकुल येथे दि. 21 जून 2024 रोजी सकाळी 7 वाजता करण्यात आले आहे. इच्छुकांनी या दिवशी सकाळी 6.30 वाजेपर्यंत उपस्थिती दर्शवावी, तसेच स्थानिक विविध शैक्षणिक संस्था, संघटना, शासकीय निमशासकीय कार्यालये, महाविद्यालये, जिल्ह्यातील नागरीक, युवक युवती, विद्यार्थी, खेळाडू, अधिकारी, कर्मचारी यांना सहभागी होता येईल.
जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालय, शैक्षणिक संस्था, क्रीडा मंडळे, महिला मंडळे, विविध शासकीय, निमशासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, योगप्रेमी नागरीक, खेळाडू यांनी दि. 21 जून 2024 रोजी सकाळी 7 ते 7.45 या वेळेत सामुहिक योग प्रात्यक्षिकामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी बी. एस. महानकर यांनी केले आहे.
00000
धानोरी तलाव मत्स्य विभागाकडे हस्तांतरीत
बुलडाणा, दि. 14 : शासनाने सुधारीत तलाव, जलाशय धोरण जाहीर केले आहे. त्यानुसार बुलढाणा जिल्ह्यातील मृद व जलसंधारण विभागाच्या मालकीचा धानोरी क्र. २ तलाव जिल्हा जलसंधारण अधिकारी मृद व जलसंधारण विभाग कार्यालयाकडून मत्स्यव्यवसाय विभागाकडे हस्तांतरीत झाला आहे.
सदर तलाव जलाशय परिसरातील स्थानिक नागरिकांना, प्रकल्पग्रस्त, मागासवर्गीय व महिला यांना संधी मिळण्याच्या दृष्टीने १०.२२ हेक्टरचा धानोरी क्र. २ मृद व जलसंधारण तलावावर मत्स्यव्यवसाय सहकारी संस्था नोंदणी करण्याचा प्रस्ताव सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था (दुग्ध), बुलडाणा यांच्याकडे सादर करण्याबाबतचे आवाहन मत्स्यव्यवसाय सहाय्यक आयुक्त सु. ग. गावडे यांनी केले आहे.
00000
बुलडाणा, चिखली, मेहकर येथे छत्रपती शाहू महाराज युवा शक्ती करीयर शिबीर
बुलडाणा, दि. 14 : कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नविन्यता विभाग, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, मुंबईच्या वतीने बुलडाणा, चिखली, मेहकर येथे छत्रपती शाहू महाराज युवा शक्ती करीयर शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
चिखली येथे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत बुधवार, दि. 19 जून रोजी सकाळी 10 वाजता शिबीर घेण्यात येणार आहे. आमदार श्वेता महाले उद्घाटक म्हणून उपस्थित राहणार आहेत. यात डॉ. शिवाजी पाटील, डॉ. अनंत सिरसाठ, सचिन वारूळकर, नितीन चौधरी, उपप्राचार्य प्रविण खांडवे मार्गदर्शन करणार आहेत. मेहकर येथे कृषि वैभव लॉन मध्ये गुरूवार, दि. 20 जून रोजी सकाळी 11 वाजता शिबीर घेण्यात येणार आहे. आमदार संजय रायमुलकर उद्घाटक म्हणून उपस्थित राहणार आहेत. यात उपविभागीय अधिकारी रविंद्र जोगी मार्गदर्शन करणार आहेत. बुलडाणा येथे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेध्ये गुरूवार, दि. 20 जून रोजी सकाळी 9 वाजता शिबीर घेण्यात येणार आहे. आमदार संजय गायकवाड उद्घाटक म्हणून उपस्थित राहणार आहेत.
यावेळी दहावी, बारावी. डिप्लोमा, डिग्री उत्तीर्ण, अनुत्तीर्ण, सर्व विद्यार्थी व पालकांनी मेळाव्यास उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
000000
मोटार वाहन निरीक्षकाची अपघातग्रस्तांना मदत
बुलडाणा, दि. 14 : देऊळगाव मही येथे वाहन तपासणी करणाऱ्या पथकाला वाहनाचा गंभीर अपघात झाल्याचे निदर्शनास आले. या पथकातील सहायक मोटार निरीक्षक अनुजा काळमेघ यांनी या अपघातग्रस्तांना तातडीने वैद्यकीय मदत करून अपघातग्रस्तांना मदत करण्याचा संदेश दिला आहे.
उप प्रादेशिक परिवहन कार्यालय बुलडाणा येथील वाहन तपासणी पथकाद्वारे जिल्ह्यातील विविध रस्त्यावर वाहन तपासणी करण्यात येते. या कार्यालयाचे वाहन तपासणी पथकाकडून तपासणी चालू असताना दि. 13 जुन 2024 रोजी देऊळगाव मही जवळ एमएच 28 बीबी 8202 वाहनाचा गंभीर अपघात झालेला दिसून आला. सदर अपघातात एक युवक गंभीररित्या जखमी झाला होता. या युवकाला सहायक मोटार वाहन निरीक्षक अनुजा काळमेघ आणि वाहन चालक आर. एम. डाकणे यांनी आपल्या वाहनातून रूग्णालयात दाखल केले. यातून त्यांनी नागरिकांमध्ये अपघातग्रस्तांना मदत करण्याचा संदेश दिला. सदर कार्य हे प्रशंसनीय आहे. रस्त्यावर अपघात झाल्यास जखमी व्यक्तींना मदत करण्यासाठी कोणीही पुढे येत नाही. नागरिकांमध्ये अपघातग्रस्तांना मदत केल्यास पोलीस केस कारवाई आणि न्यायालयात जावे लागेल, अशी धारणा असते. त्यामुळे अपघाताग्रस्तांना मदत करण्यासाठ नागरिक पुढे येत नाहीत.
परंतु शासनाने रस्त्यावर अपघाताचे वाढते प्रमाण आणि समस्या लक्षात घेता अपघातग्रस्त व्यक्तींना अपघाताचे वेळी मानवतेच्या दृष्टीकोनातून प्राथमिक उपचार घेण्यासाठी मदत केली असल्यास मोटार वाहन कायद्यातील 2019 मधील सुधारित कलम 134 ए नुसार कायदेशीर संरक्षण देण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांना कोणत्याही कायदेशीर चौकशीला सामोरे जावे लागत नाही. अपघातग्रस्त व्यक्तींना मानवतेच्या दृष्टीने मदत करण्यासाठी सर्वसाधारण जनतेने समोर यावे. अपघातग्रस्त व्यक्तींना मदत केल्यास त्यांना कोणत्याही चौकशीला सामोरे जावे लागणार नाही. तसेच कोणताही नाहक त्रास होणार नाहीं, असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद गाजरे यांनी केले आहे.
00000
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमातून रोजगाराची संधी
बुलडाणा, दि. 14 : ग्रामीण आणि शहरी भागातील सुशिक्षीत बेरोजगार युवांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम राबविण्यात येत आहे. इच्छुक युवकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
ग्रामीण आणि शहरी भागातील सुशिक्षित बेरोजगार युवक, युवतींची वाढती संख्या व उद्योग व्यवसाय क्षेत्रात उपलब्ध होत असलेल्या स्वयंरोजगार व रोजगाराच्या विविध संधी विचारात घेऊन उद्योजकतेला चालना देणारी व सर्जनशिलतेला कालानुरूप वाव देणारा सर्वसमावेश कार्यक्रम मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाच्या माध्यमातून सुरु केला आहे. सन २०२३-२४ साठी जिल्हा उद्योग केंद्रास एकूण 1 हजार 300 युवक, युवतींना वित्तीय संस्थांच्या माध्यमातून लाभ देण्याचे लक्षांक आहे. या योजनेतून मोठ्या प्रमाणात रोजागर निर्मिती होणार असल्याने मुदतीत लक्षांक पूर्ण करण्यासाठी प्राधान्य देण्यात येत आहे.
या योजनेतून लाभ घेण्यासाठी कुठलेही स्थायी उत्पन्न नसलेले स्थानिक रहिवासी ज्यांचे वय १८ वर्षे पूर्ण अधिकतम मर्यादा ४५ वर्षे असून अनुसुचित जाती, अनुसूचित जमाती, महिला, दिव्यांग, माजी सैनिकांना पाच वर्षे शिथील आहे. शैक्षणिक पात्रता ही १० लाखावरील प्रकल्पासाठी सातवी पास, तसेच २५ लाखावरील प्रकल्पासाठी दहावी पास आहे. या योजनेत सेवा उद्योग, तसेच कृषी पुरक उद्योग, व्यवसायासाठी २० लाख, तसेच उत्पादन प्रकारच्या प्रवर्गातील प्रकल्पांसाठी ५० लाखापर्यंत कर्ज सुविधा उपलब्ध आहे. एकूण प्रकल्प किंमतीच्या शहरी भागासाठी १५ ते २५ टक्के आणि ग्रामीण भागासाठी २५ ते ३५ टक्यांपर्यंत अनुदान उपलब्ध होणार आहे. ही योजना ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येत आहे. उद्योग व्यवसाय उभारणीसाठी maha-cmegp.gov.in या संकेतस्थळावर भेट देवून अर्ज दाखल करावा, जिल्ह्यातील प्रत्येक गाव, शहरातील सुशिक्षित बेरोजगार युवक, युवतींनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक प्रमोद लांडे यांनी केले आहे.
00000
फळपीक विमा योजनेत सहभागी होण्याचे आवाहन
बुलडाणा, दि. 14 : पुनर्रचित हवामानावर आधारित फळपीक विमा योजनेत मृग बहार 2024-25 या वर्षासाठी सहभागी व्हावे, असे आवाहन कृषि विभागातर्फे करण्यात आले आहे.
प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारित फळपीक विमा योजना सन 2024-25 व 2025-26 या दोन वर्षासाठी मृग बहारामध्ये चिकू, पेरु, लिंबू, सिताफळ, डाळिंब, मोसंबी आणि संत्रा अशा सात फळपिकांचा समावेश करण्यात आला आहे. ही योजना लागू करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. कमी पाऊस, पावसाचा खंड, जास्त तापमान, जादा आर्द्रता व जास्त पाऊस या हवामान धोक्यापासून निर्धारित केलेल्या कालावधीत शेतकऱ्यांना विमा संरक्षण आणि आर्थिक सहाय्य देणे व फळपीक नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थितीत शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखणे योजनेचे प्रमुख उद्दिष्ट आहेत.
अधिसूचित क्षेत्रात अधिसूचित फळ पिके घेणारे कुळ, भाडे, पट्टीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसह सर्व शेतकरी या योजनेत सहभाग घेण्यास पात्र आहेत. सन 2024-25 पुनर्रचित हवामान आधारीत फळपीक विमा योजना कर्जदार, तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित फळपिकासाठी आहे. या योजनेंतर्गत केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार केंद्र शासनाने त्यांचा विमा हप्ता 30 टक्के दरापर्यंत मर्यादित केला आहे. त्यामुळे 30 टक्क्यावरील विमा हप्ता राज्य शासन आणि शेतकऱ्यांनी स्वीकारणे क्रमप्राप्त आहे. या योजनेंतर्गत ३० ते ३५ टक्क्यापर्यंतचे अतिरिक्त ५ टक्के विमा हप्ता दायित्व राज्य शासनाने स्वीकारले असून ३५ टक्केवरील विमा हप्ता राज्य शासन आणि शेतकरी यांनी ५०-५० टक्के प्रमाणे भरावयाचे आहे.
शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता यावा, यासाठी जमीन भूधारणेच्या मर्यादित एका शेतकऱ्यास अधिसूचित फळ पिकासाठी किमान ०.२० हेक्टर आणि कमाल ४ हेक्टर क्षेत्र मर्यादेपर्यंत विमा नोंदणी करता येणार आहे. अधिसूचित फळपिकांपैकी संत्रा, मोसंबी व डाळिंब अशा एका फळ पिकासाठी एका वर्षात एकाच क्षेत्रावर मृग अथवा आंबिया बहार यापैकी कोणत्याही एकाच हंगामाकरिता विमा संरक्षणासाठी अर्ज करता येईल. केवळ उत्पादनक्षम फळबागानाच विमा संरक्षणाचे कवच लागू राहणार आहे. फळपीक निहाय निर्धारित केलेले हवामान धोके लागू झाल्यावर नुकसान भरपाई देय आहे. विमा क्षेत्र घटक महसूल मंडळ राहील. फळपिक विमा योजनेत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांनी ई-पिक पाहणी करणे बंधनकारक आहे. तसेच विमा नुकसान भरपाई मिळण्यासाठी शेतकऱ्यांचे बँक खाते आधार आधारित पेमेंटसाठी लिंक असणे आवश्यक आहे.
शेतकऱ्यांनी कर्जदार व बिगर कर्जदार योजनेतील सहभागाचा अर्ज सादर करणे, विमा हप्त्याची रक्कम कर्जदार किंवा बिगर कर्जदार शेतकऱ्यांच्या बँक खात्यामधून प्राथमिक सहकारी संस्था, बँक, आपले सरकार सेवा केंद्र, विमा प्रतिनिधी यांनी कपात करणे शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम मुदत संत्रा, पेरू, लिंबू दि. २५ जून २०२४, मोसंबी, चिकू दि. ३० जून २०२४, डाळिंब दि. १४ जुलै २०२४, सीताफळ दि. ३१ जुलै २०२४ आहे.
शेतकऱ्यांची कर्जदार व बिगर कर्जदार विमा हप्त्याची रक्कम इलेक्ट्रॉनिक पद्धतीने संबंधीत विमा कंपनीस हस्तांतरित करणे व एकत्रित विमा घोषणापत्रे आणि विमा प्रस्ताव व्यापारी बँक, ग्रामीण बँक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखेकडून संबंधीत विमा कंपनीस सादर करणे आणि पिक विमा योजनेच्या संकेतस्थळावर पीएमएफबीवाय पोर्टलवर योजनेत सहभागी झालेल्या प्रत्येक शेतकऱ्याची माहिती नोंदविण्याचा अंतिम मुदत योजनेतील शेतकरी सहभागाच्या अंतिम दिनांकानंतर १५ दिवसाच्या आत फळबाग उत्पादक शेतकऱ्यांनी बँकेची किंवा क्षेत्रीय अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक आणि कृषी सहायक यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोजकुमार ढगे यांनी केले आहे.
00000
सोमवारपासून कृषि संजीवनी पंधरवडा
बुलडाणा, दि. 14 : देशाचे पहिले कृषिमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या 125 व्या जयंतीनिमित्ताने सोमवार, दि. 17 जून ते 1 जुलै, 2024 या कालावधीत कृषि संजीवनी पंधरवडा राबविण्यात येणार आहे. या पंधरवड्यामध्यू विविध उपक्रम राबविण्यात येतील.
डॉ. पंजाबराव देशमुख कृषि संजिवनी पंधरवडाची सांगता दि. १ जुलै २०२४ रोजी स्व. वसंतराव नाईक यांच्या जन्मदिनी कृषि दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे. या पंधरवड्यामध्ये प्रत्येक दिवशी विशिष्ट उपक्रमाद्वारे शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे. जिल्हास्तरावरील कृषि संजीवनी सप्ताहात दि. 18 जून 2024 रोजी कृषि विज्ञान केंद्रात पी. एम. किसान उत्सव दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे. तसेच जिल्ह्यातील 13 तालुक्यात विविध कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.
या पंधरवड्यात दि. १७ जून रोजी बीजप्रक्रिया जनजागृती दिन, दि. १८ जून रोजी पी. एम. किसान उत्सव दिवस, दि. १९ जून रोजी जमिन सुपिकता जागृती दिन, दि. २० जून रोजी गुणवत्तापूर्ण निविष्ठांची ओळख दिन, दि. २१ जून रोजी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत फळबाग लागवड व प्रसार, दि. २२ जून रोजी पिक विमा जनजागृती दिन, दि. २३ जून रोजी हवामान अनुकूल शेती तंत्रज्ञान प्रसार दिन, दि. २४ जून रोजी सोयाबीन व मका लागवड तंत्रज्ञान दिन, दि. २५ जून रोजी कापूस, भात व ऊस लागवड तंत्रज्ञान दिन, दि. २६ जून रोजी तूर व इतर कडधान्य लागवड तंत्रज्ञान दिन, दि. २७ जून रोजी कृषि महिला शेतकरी सन्मान दिन, दि. २८ जून रोजी जिल्ह्यातील महत्त्वाच्या पिकांची कीड व रोग नियंत्रणाच्या उपाययोजना, दि. २९ जून रोजी शेतकरी मासिक वाचन दिन च वर्गणीदार वाढविणे, दि. ३० जून रोजी प्रगतशील शेतकरी संवाद दिन, दि.१ जुलै रोजी कृषि दिन साजरा करण्यात येणार आहे.
कृषि संजीवनी पंधरवड्याचा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी मनोजकुमार ढगे यांनी केले आहे.
00000
केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांचा जिल्हा दौरा
बुलडाणा, दि. 14 : केंद्रीय आयुष, आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव बुलडाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.
त्यांच्या दौऱ्यानुसार दि. 14 जून 2024 रोजी रात्री 11.30 वाजता शेगाव मेहकर येथील निवासस्थानी आगमन होईल. त्यानंतर शनिवार, दि. 15 जून आणि रविवार, दि. 16 जून आणि सोमवार, दि. 17 जून रोजी बुलडाणा जिल्ह्यातील विविध स्थानिक कार्यक्रमांना उपस्थित राहतील. त्यानंतर सोमवारी सायंकाळी 6.30 वाजता मेहकर येथून औरंगाबाद मार्गे दिल्लीला प्रयाण करतील.
00000
Comments
Post a Comment