DIO BULDANA NEWS 30.05.2024
बॅंकांच्या शाखांनी दरमहा एक कर्ज प्रकरण निकाली काढावे
-जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील
*रोजगार निर्मिती कार्यक्रम राबविण्यासाठी उपाययोजना
बुलडाणा, दि. 29 : मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम प्रभावीपणे राबविणे आवश्यक आहे. यातून गावपातळीवर उद्योग सुरू होऊन स्थानिकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. त्यामुळे बँकांनी प्रत्येक शाखेमध्ये दर महिन्याला एक कर्ज प्रकरण मंजूर करून वाटप करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी दिल्या.
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत सन 2024-25 या आर्थिक वर्षात जिल्ह्यास 1 हजसा 300 लाभधारकांचे लक्षांक प्राप्त झाले आहे. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी झालेला बैठकीला जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक प्रमोद लांडे, व्यवस्थापक सुनील पाटील यांच्यासह सर्व बँकांचे क्षत्रिय प्रबंधक, झोनल मॅनेजर जिल्हा समन्वयक उपस्थित होते.
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेंतर्गत बँकांना दिलेले लक्षांक पूर्ण करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणे गरजेचे आहे. यासाठी योजनेचे लक्षांक डिसेंबर पर्यंत पूर्ण करण्यासाठी नियोजन करावे. योजनेच्या सुरुवातीपासून पोर्टलवर प्रलंबित कर्ज प्रकरणांचा तातडीने निपटारा करण्यात यावा. सन २०२३-२४मध्ये पोर्टलवर प्राप्त प्रकरणे मंजूर करावीत. तसेच स्टेट बँकेने बुलढाणा आणि चिखली येथे फोरेक्स शाखा स्थापित करण्यासाठी कार्यवाही करावी. निर्यात वाढीसाठी जिल्ह्यातील निर्यातदार उद्योजकांना तात्काळ पतपुरवठा करण्यासाठी प्रयत्न करण्यात यावेत.
सन 2023-24 या वर्षात 515 कर्ज प्रकरण मंजूर करण्यात आली आहेत. परंतू कर्ज वाटप झालेले नाहीत, अशा प्रकरणाचा त्वरीत निपटारा करावा. बँकांनी संभाव्य उद्योजकांची नावे जिल्हा उद्योग केंद्राकडे देऊन मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाच्या पोर्टलवर अर्ज भरून घ्यावेत. मार्च 2024 मध्ये जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेमधील सामंजस्य करार केलेल्या उद्योजकांना राष्ट्रीयकृत बँकांनी मदत करण्याचे आवाहन केले. जिल्ह्यात प्रथमच क्लस्टर योजनेमध्ये पाच डीएसआर आणि एक डीपीआर मंजूर झाला आहे. अजून एक डीपीआर मंजुरीच्या प्रतीक्षेत असल्याने बँकांनी क्लस्टर सदस्यांना सीएमईजीपी योजनेत दिलेल्या लक्षांक व्यतिरिक्त विशेष बाब म्हणून कर्ज उपलब्ध करून द्यावे, असे निर्देश दिले.
सन 2022-23 वर्षात जिल्ह्यातून 768 कोटी रुपयांची निर्यात झाली. गेल्या वर्षी सन 2023-24मध्ये वाढ होऊन 841 कोटी रुपये निर्यात झाली. बँकांनी निर्यातीसाठी कर्ज पुरवठा करून यावर्षी 1 हजार 500 कोटी रुपयांच्या निर्यातीचे उद्दीष्ट ठेवण्याचे सांगितले. निर्यातदारांना सोयीचे व्हावे, यासाठी जिल्ह्यात विदेशी चलन हाताळणारी बँक शाखा त्वरित कार्यान्वित करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. स्टेट बँकेचे रिजनल मॅनेजर इकबाल यांनी बुलढाणा फॉरेक्सची शाखा सुरू करण्याबाबत त्वरित कार्यवाही करण्यात येईल असे सांगितले. तसेच सामाजिक सुरक्षा विमा योजनेत सहभाग वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे सांगितले.
शेतकऱ्यांचे पीक कर्ज थकीत असल्यास त्याच्या पत्नीला कर्ज मंजुरीसाठी अडचण येऊ नये, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी दिल्या. शेतकरी बी-बियाणे खत खरेदीसाठी कृषी सेवा केंद्रावर जात असल्याने बँकांनी याठिकाणी योजनांचे फलक लावावेत. कर्ज घेतल्यावर तीन टक्के केंद्र शासन, तीन टक्के राज्य शासन, असे एकूण सहा टक्के व्याज अनुदानाचा लाभ शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्यावा. पीक कर्ज नियमित भरणाऱ्या शेतकरी कुटुंबातील मुलांना सीएमईजीपी योजनेचा लाभ मंजूर करण्यात यावा, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी दिल्या.
00000
सामंजस्य करार केलेल्या उद्योजकांची सभा
बुलडाणा, दि. 29 : जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेत सामंजस्य करार केलेल्या उद्योजकांची सभा जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेचा उद्देश जिल्हास्तरावर गुंतवणूक आकर्षित करणे, जिल्हास्तरीय गुंतवणूकदार आणि व्यवसायांना एकत्र व्यासपीठ उपलब्ध करून देणे, जिल्ह्यांना विकासाचा केंद्रबिंदू म्हणून जिल्ह्याचा व राज्याच्या विकासाला चालना देणे, राज्याची अर्थव्यवस्था सन 2027 पर्यंत एक ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहोचविणे यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत.
जिल्हास्तरीय कार्यक्रमांमध्ये प्रमुख उद्योग क्षेत्राबाबत चर्चासत्र गुंतवणुकीच्या संधी इतर क्षमता असलेल्या क्षेत्रामधील गुंतवणूक व व्यवसाय संधी बाबत चर्चा झाली. सामंजस्य करारावेळी उद्योजकांनी अनुभव कथन केले. सामंजस्य करार केलेल्या उद्योजकांनी प्रस्तावित गुंतवणूक कालबद्ध पद्धतीने करण्याचे नियोजन केले आहे. उद्योग व्यवसाय संबंधित विभागांकडून आवश्यक परवानगी, नोंदणी, मंजुरी, आर्थिक प्रोत्साहन आदी विविध मुदतीत प्राप्त करण्यासाठी विद्यमान धोरण नियम आणि नियमानुसार देण्यात येणार आहे. यासाठी जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी प्रत्येक उद्योजकासमवेत चर्चा केली.
जामोद येथील समाधान दामधर यांनी जामोद येथे एकच व्हीकेजीबी बँक शाखा असून सीएमईजीपी योजनेत क्लस्टर मेंबर्सना इतर बँकांनी कर्ज पुरवठा करावा किंवा नवीन शाखा सुरू करावी, अशी मागणी केली. जामोद येथे मीनल गारमेंट क्लस्टर, सातपुडा स्पायसेस फेडरेशन आणि नागवेली मिल्क प्रोसेसिंग क्लस्टर या तीन क्लस्टरचे डीएसआर मंजूर करण्यात आले. त्यांना इमारत बांधकामासाठी लागणाऱ्या इंडस्ट्रियल ना-हरकतीसाठी टाऊन प्लॅनिंग कार्यालयाने सोमवारपर्यंत त्वरित निकाली काढण्याचे निर्देशित दिले. महेश स्टील, केलवद यांचा प्रस्ताव बँकेत दाखल झाला असल्याचे सांगितले.
नारायण सिनकर यांच्या बालाजी इंडस्ट्रीला अखंडित वीज पुरवठा करण्याचे निर्देश वीज कंपनीला दिले. बुलढाणा ऑइल क्लस्टर आणि मातृत्व डेरी क्लस्टर, चिखली यांचे डीएसआर मंजूर आहे. क्लस्टर मेंबरची सीएमईजीपी योजनेत कर्ज प्रकरणे तयार करण्याचे निर्देश देण्यात आले. श्याम कुटीर गारमेंट क्लस्टर, चिखलीचे बांधकाम सुरु होणार असल्याचे सांगितले. मोताळा येथे 25 मेगावॅटचे सोलर पॅनलमार्फत वीज उत्पादन सुरू झाले आहे. तसेच सोनाळा, चिखली, मेहकर, खामगाव येथे वीज उत्पादन सुरू करण्यात येणार आहे. बुरड ॲग्रो फुड इंडियाचे कर्ज प्रस्ताव गतीने मंजूर करण्याची निर्देश देण्यात आले. सोनाळा येथील अभिता ॲग्रो इंडस्ट्रीजला आधुनिक यंत्रसामुग्री उपलब्ध करून देण्याच्या सूचना केल्या. तसेच उत्पादने मोठी बाजारपेठ आणि ऑनलाईन विक्रीसाठी ठेवण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी केल्या.
00000
चारधाम यात्रेसाठी जाणाऱ्या यात्रेकरूंनी
नोंदणी करूच जाण्याचे आवाहन
बुलडाणा, दि. 29 : उत्तराखंडमध्ये चारधाम यात्रेसाठी यात्रेकरू मोठ्या प्रमाणावर जात आहेत. यात यात्रेकरूंची गैरसोय होणार असल्याने यात्रेकरूंनी नोंदणी करूनच जाण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
चारधाम यात्रा 2024 च्या सुरुवातीच्या आठवड्यात उत्तराखंडमधील पवित्र चारधामला भेट देणाऱ्या यात्रेकरूच्या संख्येत सतत वाढ होत आहे. त्यामुळे या यात्रेच्या उत्तम व्यवस्थापनासाठी दि. ३१ मे २०२४ पर्यंत सर्व व्हीआयपी दर्शन बंद करण्यात आले आहे. तसेच धाम येथील दर्शनाची प्रक्रिया सुरळीत करण्यासाठी उत्तराखंड शासनाने चारधाम यात्रेसाठी नोंदणीची प्रक्रिया सुरू केली आहे. यात्रेकरूंसाठी नोंदणी अनिवार्य आहे. भाविकांनी चारधाम यात्रा 2024 साठी registrationandtouristcare.uk.
वृद्ध आणि आजारी असलेल्या यात्रेकरूंनी यात्रा सुरू करण्यापूर्वी स्वतःची वैद्यकीय तपासणी करावी. तसेच आरोग्य विभागाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे. या सूचना health.uk.gov.in/pages/
00000
नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प यशस्वीरित्या पूर्ण
*प्रकल्पातून 50 हजार शेतकरी, 100 कंपन्या गटांना 217 कोटी अनुदान
बुलडाणा, दि. 29 : शेतकऱ्यांना संजीवनी देणारा नानाजी देशमुख कृषी संजीवन प्रकल्प यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आला आहे. या प्रकल्पातून 49 हजार 925 शेतकरी, 104 शेतकरी उत्पादक कंपन्या, शेतकरी गटांना 217 कोटी 10 लाख रुपयांचे अनुदान देण्यात आले आहे.
नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प राज्य शासनाचा महत्वाकांक्षी प्रकल्प जून २०१८ पासून जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येत आहे. या प्रकल्पातून शेतकऱ्यांना बदलत्या हवामानाशी जुळवून घेण्यास सक्षम करणे आणि शेती व्यवसाय किफायतशीर करण्याचे प्रमुख कामे करण्यात आली. सदर प्रकल्प जिल्ह्यातील 410 गावांमध्ये राबविण्यात आला. प्रकल्पाची मुदत 30 जून 2024 रोजी समाप्त होत आहे.
प्रकल्पातील सिंचन प्रकल्पामुळे 21 हजार 828 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आले आहे. तसेच 19 हजार 352 शेतकऱ्यांना नवीन रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या आहेत. कृषी औजारांमुळे 3 लाख 9 हजार 800 हेक्टर क्षेत्र कृषी यांत्रिकीकरणाखाली आले आहे. प्रकल्पातून 104 शेतकरी बचत गट, शेतकरी उत्पादक कंपन्यांना विविध कृषी व्यवसायासाठी अनुदान देण्यात आले आहे. यात कृषी औजारे बँक, गोदाम, स्वच्छता व प्रतवारी केंद्र, प्रक्रिया युनिट, लाकडी तेल घाणे आदी कृषी व्यवसायांचा समावेश आहे. कृषी व्यवसायामुळे जिल्ह्यामध्ये 6 हजार 710 मेट्रीक टन क्षमतेची साठवणूक सुविधा निर्माण झाली आहे.
प्रकल्पामधून 470 मृद व जलसंधारण कामे पूर्ण झाली आहे. त्यामध्ये प्रामुख्याने ढाळीचे बांध, माती नाला बांध, सिमेंट नाला बांध, खोल सलग समतल चर, गॅबियन बंधारे, शेततळे इत्यादीचा समावेश आहे. प्रकल्पांतर्गत एकूण 736 हवामान अनुकूल तंत्रज्ञान शेतीशाळांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये विविध हवामान अनुकूल तंत्रज्ञानाचा प्रचार आणि प्रसार करण्यात आला आहे. या तंत्रज्ञानाचा उपयोग शेतकऱ्यांना सध्याच्या बदलत्या हवामानात हवामान अनुकूल शेती करण्यासाठी होणार आहे. प्रकल्पाने शेतकऱ्यांना नवसंजीवनी देण्याचे काम केले आहे.
00000
Comments
Post a Comment