Wednesday 29 June 2022

DIO BULDANA NEWS 29.6.2022

 जिल्ह्यात 1 जुलैपासून सिंगल युज’ प्लॅस्टीकच्या वस्तू वापरावर बंदी

बुलडाणा, (जिमाका) दि.29 : केंद्रिय पर्यावरण वने व हवामान बदल मंत्रालयाने सिंगल युज प्लॅस्टिक वस्तुंच्या वापरावर बंदी घातली आहे. जिल्हयात 1 जुलैपासुन या निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी केली जाईल, अशी माहीती निवासी उपजिल्हाधिकारी, दिनेश गिते यांनी दिली.

    निवासी उपजिल्हाधिकारी कार्यालयात याबाबत नुकतीच जिल्हास्तरीय कृती दलाची बैठक निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी ते बोलत होते. या बैठकीला प्रदुषण नियंत्रण मंडळाचे उप-प्रादेशिक अधिकारी मनिष होळकर यांच्यासह पालिका, नगरपंचयतींचे मुख्याधिकारी, गटविकास अधिकारी उपस्थित होते.

  निवासी उपजिल्हाधिकारी म्हणाले, प्लॅस्टिकच्या काड्यांसह कानकोरणी, फुग्यांसाठी प्लॅस्टिकच्या काडया, प्लॅस्टिकचे झेंडे, कँडी कांडया, आईस्क्रीम कांडया, सजावटीसाठी पॉलिस्टीरीन (थर्माकोल), प्लेट्स, कप, ग्लासेस, कटलरी जसे काटे चमचे, बाउल, डबे, बरणी, चमचे, चाकु, पिण्यासाठीचे स्ट्रॉ, ट्रे, ढवळण्या (स्टरर्स), हॉटेलमध्ये खाद्यपदार्थ पॅक करुन देण्यासाठी डिश, मिठाईचे बॉक्स, आमंत्रण कार्ड व सिगारेटची पाकिटे यांची प्लॅस्टिक आवरणे, 100 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीचे प्लॅस्टिक किंवा पीव्हीसी बनर्स, सजावटीसाठी वापरण्यात येणारे थर्माकोल व प्लॅस्टिक इ. वापरावर 1 जुलै पासुन बंदी घालण्यात येणार आहे. त्याची अंमलबजावणी करण्याकरीता विशेष पथक स्थापन करण्यात आलेले आहे आणि उल्लंघन करणाऱ्यांवर या पथकांमार्फत दंडनिय कारवाई केली जाणार आहे.

    प्लॅस्टिक कचऱ्याचे विलगीकरण, संकलन, साठवण, वाहतुक आणि विल्हेवाट यासाठी असणारी यंत्रणा सक्षम करणे गरजेचे आहे. सविस्तर कृती आराखडयास शैक्षणिक संस्था, व एन.सी.सी. एन.एस.एस. स्कॉउटस, युवा क्लब, ईको क्लब आणि सयंसेवी संस्थाचा समावेश करुन, दवंडी पिटवून प्लॅस्टिक प्रदुषण कमी करण्यासाठी सक्षम चळवळ उभारुन प्लस्टीक वस्तुंचा वापर करण्यास परावृत करावे असे आवाहनही यावेळी करण्यात आले आहे. बैठकीला संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

                                                                                *****

राष्ट्रीय शौर्य पुरस्कारासाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन

बुलडाणा, (जिमाका) दि.29 : भारतीय कल्याण परिषदेमार्फत दरवर्षी 6 ते 18 वर्ष वयोगटातील बालकांना कठीण प्रसंगात केलेल्या उल्लेखनिय कार्याबद्दल राष्ट्रीय शौर्य पुरस्कार देण्यात येतो. या पुरस्कारासाठी अर्ज स्वीकारणे सुरू झाले आहे. सदर अर्ज हा ICCW या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अर्ज डाऊनलोड करून 20 सप्टेंबर 2022 पर्यंत जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, मुठ्ठे ले आऊट, बुलडाणा येथे सादर करावा.

 अर्जासोबत अर्जदार ज्या शाळेमध्ये शिकत आहे. त्या शाळेचे मुख्याध्यापक किंवा पंचायत/जिल्हा परिषद प्रमुख, राज्य बालकल्याण परिषदेचे अध्यक्ष किंवा सरचिटणीस, जिल्हाधिकारी किंवा समकक्ष पदाचे सरकारी अधिकारी, पोलीस अधिक्षक किंवा समकक्ष पदाचे पोलीस अधिकारी यांपैकी दोन सक्षम अधिकाऱ्यांची शिफारस आवश्यक आहे.  जन्माचा दाखला, वर्तमानपत्राचे कात्रण, किंवा प्रथम खबरी अहवाल, किंवा पोलीस डायरी नोंद, घटनेचा लेखा जोखा तसेच सहाय्यक दस्तऐवजसह प्रस्ताव तयार करावा.या पुरस्कारसाठी उल्लेखनिय कार्य केलेली घटना 1 जुलै 2021 ते 30 सप्टेंबर 2022 दरम्यान घडलेली असावी. पुरस्कारासाठी निवड ही ICCW द्वारा निवड केलेल्या समितीमार्फत होणार आहे. कोणत्याही कारणास्तव नामंजुर केलेले अर्ज पुन्हा स्वीकारले जाणार नाही. पुरस्काराचे वितरण देशाच्या राजधानीत नवी दिल्ली येथे करण्यात येणार आहे.   अंतिम मुदत 30 सप्टेंबर 2022 आहे. इच्छुक अर्जदारांनी अर्ज करावे, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी अशोक मारवाडी यांनी केले आहे. 

                                                              पुरस्कार व स्वरूप

भारत पुरस्कार 1 लक्ष रूपये, धृव पुरस्कार, मार्कडेय पुरस्कार, श्रवण पुरस्कार, एकलव्य पुरस्कार व अभिमन्यु पुरस्कार 75 हजार रूपये, सामान्य पुरस्कार 40 हजार रूपये असे आहे. 

No comments:

Post a Comment