Wednesday 2 August 2017

news 2.8.2017 DIO BULDANA

                                
जिल्हा नियोजन समिती निवडणूकीकरीता 8 ऑगस्ट रोजी मतदान
·        रंगीत मतपत्रिका, एकूण 14 मतदान केंद्रावर होणार मतदान
·        पसंतीक्रम 1 न दिल्यास मतपत्रिका अवैध ठरणार
बुलडाणा, दि. 2 -  जिल्हा नियोजन समिती निवडणूक कार्यक्रम घोषीत झाला असून 8 ऑगस्ट 2017 रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. बुलडाणा येथील तहसील कार्यालय येथे दोन मतदान केंद्रावर तसेच इतर तालुक्यांच्या ठिकाणी तहसिल कार्यालय येथील प्रत्येकी एक मतदान केंद्रावर असे एकूण 14 मतदान केंद्रावर घेण्यात येणार आहे.  जिल्हा परिषद मतदार संघाचे मतदान हे तहसिल कार्यालय, बुलडाणा येथील मतदान क्रमांक एकच्या मतदान केंद्रावर राहणार आहे. नगर परिषद व नगर पंचायतीकरीता मतदान केंद्र हे संबंधित तहसील कार्यालय येथे राहणार आहे.
   या निवडणूकीमध्ये जिल्हा परिषदेचे सदस्य व नगर परिषदांमध्ये किंवा नगर पंचायतीकरीता मतदान केंद्र हे संबंधित तहसील कार्यालय येथे राहणार आहे. मतदान प्रक्रियेकरीता वापरण्यात येणाऱ्या मतपत्रिका रंगीत स्वरूपाची असणार आहे. ग्रामीण क्षेत्र जिल्हा परीषद मतदारसंघामध्ये नागरिकांच्या मागास प्रवर्गाकरीता पांढऱ्या रंगाची मतपत्रिका असणार आहे. तसेच नागरी क्षेत्र नगर परिषद व नगर पंचायत मतदारसंघामध्ये सर्वसाधारण प्रवर्गाकरीता फिका निळा (आकाशी) रंगाची मतपत्रिका, सर्वसाधारण महिला राखीवकरीता फिका हिरव्या रंगाची मतपत्रिका, अनुसूचित जाती प्रवर्गामध्ये फिका गुलाबी रंगाची मतपत्रिका असणार आहे. मतदान प्रक्रिया ही पसंतीक्रमानुसार असून पसंतीक्रम 1 हा अनिवार्य आहे. पसंतीक्रम 1 न दिल्यास सदर मतपत्रिका अवैध ठरणार आहे.
  तसेच पसंतीक्रम हे केवळ अंकामध्ये नमूद करणे बंधनकारक आहे. शब्दामध्ये दर्शविल्यास सदर मतपत्रिका अवैध ठरणार आहे. तसेच कोणत्याही एका भाषेमध्येच पसंतीक्रम दर्शविणे बंधनकारक राहील. मतदान पसंतीक्रम दर्शविण्यासाठी मतदान केंद्रावरील मतदान अधिकारी यांच्याकडून पेन पुरविण्यात येणार आहे. त्याच पेनाचा वापर मतदान करण्यासाठी करणे बंधनकारक आहे. अन्य पेनाने केलेले मतदान हे अवैध ठरणार आहे. मतदाराची ओळख पटविण्याकरीता जिल्हा परिषद सदस्यांसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांचे स्वाक्षरीने निर्गमीत केलेले ओळखपत्र तसेच नगर परिषद/नगर पंचायत सदस्यांकरीता संबधित मुख्याधिकारी, नगर परिषद यांनी त्यांचे स्वाक्षरीने निर्गमीत केलेले ओळखपत्रच ग्राह्य धरण्यात येईल. ओळखपत्रावर सदस्याचे पुर्ण नाव, त्याचे छायाचित्र तसेच स्वाक्षरी असणे आवश्यक आहे. उमेदवारांना याबाबत मार्गदर्शन तसेच आवश्यक त्या सुचना देण्यासाठी 5 ऑगस्ट 2017 रोजी दुपारी 4 वाजता, जिल्हाधिकारी कार्यालय, बुलडाणा येथे सभा घेण्यात येत आहे, असे निवडणूक निर्णय अधिकारी, जिल्हा नियोजन समिती निवडणूक, यांनी कळविले आहे.
                                                                                    ******

जिल्हाधिकारी कार्यालयात
8 ऑगस्ट  रोजी लोकशाही दिन
  बुलडाणा, दि.2 : नागरिकांच्या तक्रारींचा निपटारा जलदगतीने व्हावा, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. मात्र या महिन्याच्या पहिल्या सोमवारला, दि. 7 ऑगस्ट  2017 रोजी रक्षाबंधन सणाची सुट्टी असल्यामुळे सदर लोकशाही दिन मंगळवार 8 ऑगस्ट 2017 रोजी दुपारी 1 वाजता आयोजित करण्यात आला आहे.  या दिवशी जिल्हाधिकारी व इतर शासकीय अधिकारी,नागरिकांच्या तक्रारींचे निरसन करणार आहेत. तसेच तालुका स्तरावर तहसील कार्यालयात महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येत आहे.
         जिल्ह्यातील शासकीय, निम शासकीय कार्यालयातील अडचणी व तक्रारी संबंधी ज्या नागरिकांना आपली निवेदने लोकशाही दिनी सादर करावयाची आहेत, त्यांनी जिल्हाधिकारी यांच्या नावे विहित नमुन्यात अर्ज करावा. विहित नमुन्यातील अर्ज व सोबत अर्जाची आगाऊ प्रत जोडून लोकशाही दिनाच्या 15 दिवस आधी पाठविणे आवश्यक आहे.
   अर्जदाराने लोकशाही दिनाच्या दिवशी मूळ अर्जासोबत उपस्थित रहावे. जिल्हाधिकारी कार्यालयात लोकशाही दिनी संबंधीत नागरिकांनी उपस्थित राहून दोन प्रतींमध्ये आपली निवेदने जिल्हाधिकारी यांना सादर करावीत. अन्य व्यक्तीमार्फत पाठविलेली निवेदने स्विकारली जाणार नाहीत. तालुका स्तरावरील लोकशाही दिनानंतर 1 महिन्याने जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही दिनात अर्ज करता येतो. तसेच तक्रारदारांबरोबर त्रयस्थाने येऊ नये. अर्जदाराने एका अर्जात एकच तक्रार सादर करावी. एकापेक्षा जास्त तक्रारी असलेला अर्ज स्विकारला जाणार नाही.
   तक्रार, निवेदन वैयक्तिक स्वरुपाची असावी, त्याचप्रमाणे न्यायप्रविष्ठ प्रकरणे, राजस्व/ अपिल, सेवा व आस्थापना विषयक बाबी, विहित नमुन्यात नसलेले तसेच आवश्यक त्‍या कागदपत्रांच्या प्रती न जोडलेले अर्ज, विविध न्यायालयात,  प्राधिकाऱ्यां-कडील, लोकआयुक्त यांच्याकडे प्रलंबित असलेल्या प्रकरणांच्या तक्रारी स्विकारल्या जाणार नाहीत, असे अर्ज संबंधित विभागाकडे आवश्यक कार्यवाहीसाठी 8 दिवसात पाठविण्यात येतील. त्याची एक प्रत अर्जदारास पाठविण्यात येईल,  असे जिल्हाधिकारी यांनी कळविले आहे.
                                                                                    *******
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती साजरी
  बुलडाणा, दि.2 : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 97 वी जयंती साजरी करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जातपडताळणी उपायुक्त वृषाली शिंदे, प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा समाज कल्याण अधिकारी मनोज मेरत उपस्थित होते. सर्वप्रथम लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतीमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.
  याप्रसंगी सामाजिक न्याय विभागाचे श्री. उबरहंडे, श्री. धोटे, श्री. धर्माधिकारी, श्री. गायकवाड, श्री. देशमुख, सर्व जिल्हा समाज कल्याण विभागाचे श्री. लातूरकर, श्री. देशमुख, श्री. फोपाटे, श्री. बनसोड तसेच अण्णाभाऊ साठे पुरस्कार प्राप्त डॉ. दाभाडे, व एच.ए मानवतकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचलन व प्रास्ताविक सतीष बाहेकर यांनी, तर आभार प्रदर्शन सी.एस इंगळे यांनी केले.
                                                                                    ****
बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी 4 ऑगस्ट पर्यंत पिक विमा योजनेत सहभागी व्हावे
  • 4 ऑगस्ट 2017 पर्यंत जनसुविधा केंद्रामार्फत पिक विमा भरावा
  • पीक पेरणी प्रमाणपत्र 31 जुलै 2017 पूर्वीचे असणे आवश्यक
बुलडाणा, दि. 2 -  खरीप हंगाम 2017 साठी जिल्ह्यातील खरीप ज्वारी, मका, तूर, मुग, उडीद, भुईमूग, सोयाबीन, तीळ आणि कापूस या नऊ पिकांकरिता पंतप्रधान पिक विमा योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेनुसार  पिकांना मिळालेल्या विमा संरक्षणामुळे नैसर्गिक आपत्ती, किड व रोगामुळे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण देता येणार आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांना यापूर्वी 31 जुलै अंतिम मुदत होती. यामध्ये शासनाने मुदतवाढ दिली असून बिगर कर्जदार शेतकऱ्यांना 4 ऑगस्ट 2017 पर्यंत पिक विमा जनसुविधा केंद्रामार्फत भरता येणार आहे. मुदतवाढ देण्यात आलेल्या कालावधीत  पिक विमा आता केवळ बिगर कर्जदार शेतकऱ्यांना www.agri-insurance.gov.in या पोर्टलवर ऑनलाईन  भरल्या जाणार आहे.

      ही मुदतवाढ केवळ बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठीच असून अर्जदार शेतकऱ्यांकडे 31 जुलै 2017 पूर्वीचे पीक पेरणी प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. सीएससी केंद्रांनी मुदतवाढीच्या कालावधीत दाखल करण्यात आलेल्या अर्जाबाबतची माहिती स्वतंत्रपणे ठेवण्यात येणार आहे. तरी प्रधानमंत्री पिक विमा योजनेत सहभाग घेण्याची वाढीव मुदत जिल्ह्यातील सर्व अधिसुचित पिकांकरीता 4 ऑगस्ट 2017 अशी आहे. या अंतिम दिनांकापूर्वी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे. त्याकरिता तात्काळ नजीकच्या जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, उपविभागी कृषि अधिकारी,  तालुका कृषि अधिकारी, कृषि सहायक, कृषि पर्यवेक्षक, मंडळ कृषि अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा. शेतकऱ्यांनी अंतिम मुदतीची वाट न बघता जास्तीत जास्त प्रमाणात पंतप्रधान पिक विमा योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन  जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी प्रमोद लहाळे यांनी केले  आहे.

No comments:

Post a Comment