Thursday 12 October 2017

news 12.10.2017 dio buldana


पर्यटकांनी पर्यटन स्थळांना जास्तीत जास्त संख्येने भेटी द्याव्यात
-         जिल्हाधिकारी
·       पर्यटन पर्व विषयावर पत्रकार परिषद
बुलडाणा, दि‍. 12 – केंद्र शासनाने 5 ते 25 ऑक्टोंबर 2017 या कालावधीत पर्यटन पर्व उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांमधून पर्यटन स्थळांची माहिती पर्यटकांना देण्यात येत आहे. पर्यटन पर्वाच्या निमित्ताने लोणार व सिंदखेड राजा येथे पर्यटन पर्व कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. तरी पर्यटकांनी जिल्ह्यातील ऐतिहासिक व निसर्गरम्य पर्यटन स्थळांना मोठ्या संख्येने भेटी द्याव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी केले आहे.
   केंद्र शासनाने जाहीर केलेल्या पर्यटन पर्व कार्यक्रमाविषयी माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात करण्यात आले. त्यावेळी जिल्हाधिकारी बोलत होते. याप्रसंगी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या अमरावती प्रादेशिक कार्यालयाचे प्रादेशिक व्यवस्थापक प्रशांत सवई आदी उपस्थित होते.
   राज्यभर पर्यटन पर्व साजरा करण्यात येत असल्याचे सांगत जिल्हाधिकारी म्हणाले, सदर कार्यक्रमातंर्गत स्थानिक पातळीवर जिल्हा प्रशासन व एमटीडीसी यांच्या संयुक्त विद्यमाने व पर्यटन क्षेत्राशी निगडीत व्यावसायिकांच्या सहकार्याने स्थानिक कला, संस्कृती, पाककृती व पर्यटन स्थळे यांची ओळख घडविण्यसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये लोणार येथील भगवानबाबा महाविद्यालयात चर्चासत्र, सिंदखेड राजा येथे पर्यटन जागृती अभियान व जिल्हास्तरीय शालेय विद्यार्थ्यांकरीता निबंध स्पर्धेचे आयोजन यांचा समावेश आहे.
  ते पुढे म्हणाले, पर्यटन स्थळांवर स्वच्छता पाळावी. तसेच प्रत्येक पर्यटकाने आपली वैयक्तिक जबाबदारी समजून पर्यटन स्थळाचे संवर्धन करावे. ऐतिहासिक पर्यटन स्थळांचा वारसा जपावा. लोणार येथील पर्यटन स्थळी एमटीडीसीचे निवासी संकूल आहे. या संकूलाचा लाभ घेवून निसर्गाने दिलेला ठेवा जरूर पर्यटकांनी अनुभवावा. याप्रसंगी एमटीडीसीचे श्री. सवई यांनी माहिती दिली.
                                                                                  ***********
जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त विधी साक्षरता शिबिर
बुलडाणा, दि‍. 12 – जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा सामान्य रूग्णालय व वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच विधी साक्षरता शिबिराचे आयोजन परिचारिका प्रशिक्षण केंद्र, बुलडाणा येथे करण्यात आले. यावेळी जागतिक मानसिक आरोग्य दिनाच्या घोषवाक्यानुसार कामाच्या ठिकाणचे मानसिक  आरोग्य   याला अनुसरून प्रशिक्षणार्थी परिचारिका व कर्मचारी यांना मार्गदर्शन करण्यात आले. याप्रसंगी अध्यक्षस्थानी सह दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर शैलेश बाफना, प्रमुख मार्गदर्शक म्हणून सह दिवाणी न्यायाधीश श्रीमती एन .के नागरगोजे, जिल्हा शल्य चिकित्सक श्रीमती सरीता पाटील, निवासी बाह्य संपर्क अधिकारी डॉ. मकानदार आदी उपस्थित होते. उपस्थितांनी कामाच्या ठिकाणी होणारा ताण तणाव कसा निवळावा, मानसिक स्वास्थ कसे टिकवावे, याविषयी मार्गदर्शन केले.
    न्यायालय व्यवस्थापक श्रीमती सुप्रिया देशमुख, वकील संघाचे ॲड सै. हारूण, मानसोपचार तज्ज्ञ डॉ. लता बाहेकर यांनी यावेळी मार्गदर्शन केले. संचलन चिकित्सालयीन मानस शास्त्रज्ञ ज्ञानेश्वर मुळे यांनी, तर आभार प्रदर्शन हरिदास अंभोरे, समाजसेवा अधिक्षक यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ. महेश बाहेकर, श्रीमती पुनम क्षीरसागर, समिर अढाव, श्रीमती सुनीता गवळी, चंद्रकांत जमधडे, दिपक नरवाडे, श्री. अवचार, श्री. मुळे, श्री इंगळे यांनी प्रयत्न केले.
**********





शेतकरी अभ्यास दौरा योजनेतंर्गत 16 ऑक्टोंबर रोजी सोडत
बुलडाणा, दि‍. 12 – शेतीमालाची दर्जात्मक सुधारणा करण्याकरीता नव नवीन तंत्रज्ञानाचा कृषि क्षेत्रात अवलंब करणे, त्याअनुषंगाने विविध देशांनी विकसित केलेले शेतीविषयक तंत्रज्ञान, तेथील शास्त्रज्ञ व शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष भेटीद्वारे चर्चा करून आपल्या शेतकऱ्यांचे ज्ञान व क्षमता उंचावण्यासाठी राज्यातील शेतकऱ्यांचे देशाबाहेर अभ्यासदौरे कृषि विभागामार्फत आयोजीत करण्यात येतात. यासाठी शेतकऱ्यांनी प्रस्ताव कृषि विभागाकडे सादर केलेले आहेत. या प्रस्तावांची क्रमवारी निश्चित करण्यासाठी सोडत (लॉटरी) पद्धतीचा अवलंब 16 ऑक्टोंबर 2017 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हा प्रशिक्षण केंद्र, धाड रोड, बुलडाणा येथे आयोजित करण्यात आलेली आहे. तरी जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांनी तालुका कृषि अधिकारी कार्यालयात अर्ज सादर केलेले आहेत. त्यांनी सोडतीला उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी प्रमोद लहाळे यांनी केले आहे.
                                         *****
जिल्ह्यात दोन सधन कुक्कुट गटांची स्थापना करण्यात येणार
·       सार्वजनिक अथवा खाजगी भागीदारीवर असणार गट
  • 23 ऑक्टोंबर 2017 पर्यंत अर्ज सादर करावे
बुलडाणा, दि‍. 12 – राज्यात बुलडाणा जिल्ह्यासह 10 जिल्ह्यांमध्ये सार्वजनिक अथवा खाजगी भागीदारी तत्वावर सधन कुक्कुट गटांची स्थापना करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. त्यानुसार जिल्ह्यात दोन सधन कुक्कुट विकास गटांची स्थापना करावयाची आहे. त्याकरीता जिल्ह्यातून इच्छूक लाभार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छूक अर्जदार कुक्कुट पालन व्यवसाय करीत आहेत. तसेच ज्यांचेकडे सद्यस्थितीत हॅचर व सेटर (अंडी उबवण सयंत्र) सयंत्राची हाताळणी केली जात आहे, अशा लाभार्थ्यांना लाभार्थी निवड करताना प्राधान्य देण्यात येणार आहे.
शासन निर्णयानुसार लाभार्थी निवड जिल्हास्तरीय समितीर्मात केली जाणार आहे. या योजनेचा कालबद्ध अंमलब - जावणी आराखडा तयार केला असून लाभार्थ्यांना 23 ऑक्टोंबर 2017 पर्यंत अर्ज पंचायत समिती स्तरावर पशुसंवर्धन विभाग कार्यालयात स्वीकारण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी इच्छूकांनी जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त कार्यालय, बुलडाणा  येथे संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. व्ही. बी जायभाये यांनी केले आहे.
                                                            ******
कोथळीत स्वच्छतेचा जागर..!
·        संत गाडगे बाबा यांच्या वेशभुषेत स्वच्छता करून ‘स्वच्छता ही सेवा’ पंधरवडा साजरा
    बुलडाणा, दि‍. 12 - संपूर्ण भारताला स्वच्छ व सुंदर बनविण्याचा संकल्प आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाहीले आहे.  ते स्वप्न प्रत्यक्षात सुद्धा उतरले स्वच्छ भारत मोहिमेअंतर्गत शालेय शिक्षण विभाग राज्यातील शाळांत ‘स्वच्छता ही सेवा पंधरवडा’ साजरा करण्यात येत आहे. भारत भर 15 सप्टेंबर ते 2 ऑक्टोंबर हा पंधरवडा स्वच्छता पंधरवडा म्हणून साजरा करण्यात आला . या पंधरवाड्यात गावांगावात रॅली काढण्यात आल्या.  गावाची स्वच्छता, स्वच्छतेचे महत्व पटवून देण्यारी घोषवाक्ये, म्हणी त्यावर आधारित निबंध स्पर्धा, लघु नाटिका असे विविध कार्यक्रम या पंधरवाड्यामध्ये आयोतिज करण्यात आले.
    भारताला स्वच्छ व सुंदर बनवण्यात बुलडाणा जिल्हासुद्धा मागे राहिला नाही.  बुलडाणा जिल्ह्यात गावा-गावात वस्ती वस्तीमध्ये हा स्वच्छतेचा नारा निनादला आणि स्वच्छ भारताची प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. याचं उत्तम उदाहरण जिल्ह्यातील मोताळा या तालुक्याच्या ठिकाणापासून अवघ्या 9 किमीवरील कोथळी या छोट्टयाशा गावात दिसले. कोथळी गाव कमी जास्त दहा हजार लोकवस्तीचे आहे.  येथील जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातर्फे नुकतेच गावात स्वच्छता संदेश देणाऱ्या रॅलीचे आयोजन करण्यात आले. येथील विद्यालयातील सर्व विद्यार्थी आणि शिक्षक कर्मचारी यांनी गावात खराटा घेऊन गावातील घाणीचे साम्राज्य पार हद्दपार केले. स्वच्छता करून गावकऱ्यांना स्वच्छतेचा संदेश या मुलांनी दिला. गावातून रॅली तर निघाली पण या रॅलीला संपूर्ण गावाचे लक्ष वेधले ते संत गाडगे बाबांच्या वेषभूषा परिधान केलेले जनता विद्यालयातील सहा. शिक्षक प्रशांत पठ्ठे यांनी.  जणू गावकऱ्यांना असा भास होत होता की खरच संत गाडगे बाबा स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी आपल्या गावात आले की काय..! संत गाडगे बाबा यांनी आपले संपूर्ण जीवन स्वच्छते साठी वाहून दिले.  बाबा दिवसा हातात खराटा घेऊन गावातील घाण साफ करीत आणि रात्र झाली की कीर्तनाच्या माध्यमातून  नागरिकांच्या मनातील घाण साफ करीत असत.  ते म्हणायचे ‘अरे बाळांनो देव दगडात नाही.. तो माणसात आहे’ हे महाराज लोकांना सांगत असत. अशाच स्वच्छतेचा संदेश घेऊन  संत गाडगे बाबांची वेशभूषा परिधान केलेले श्री. पठ्ठे  यांनी खराटा हातात घेऊन अख्ख गाव स्वच्छ केले.  हे पाहून गावक-यांनाही हुरूप चढला त्यांनीही हातात खराटा घेतला व सोबत गावाला स्वछ केले.
     दि. 15 सप्टेंबर ते 2 ऑक्टोंबर या दरम्यान स्वच्छता पंधरवाडा साजरा करण्यात आला. त्या अनुषंगाने विद्यार्थी व सर्व शिक्षक यांनी गावात फिरून गावाची स्वच्छता करून स्वच्छतेचे महत्व जनतेला पटवून दिले.  श्री. पठ्ठे यांनी संत गाडगे महाराजांची वेशभूषा धारण करून गोपाला- गोपाला देवकी नंदन गोपाला म्हणत सगळ्यांचे लक्ष केंद्रित केले. तसेच प्रमुख चौकांमध्ये गाडगे महाराजांचे स्वच्छतेप्रती व शिक्षणाप्रती असणारे संदेश गाडगे महाराजांच्या शैलीत नागरिकांसमोर मांडले. हे नागरिकांनी लक्षपूर्वक ऐकले आणि नंतर रॅली पोहोचली. कोथळी गावाला लागूनच असलेले इब्राहिमपूर गावातही मोठ्या प्रमाणावर स्वच्छता ही सेवा पंधरवडा साजरा करण्यात आला. या ठिकाणीत संत गाडगे बाबा यांची  वेशभूषा धारण करून  शिक्षक श्री. पठ्ठे यांनी स्वच्छतेचा संदेश दिला. त्यामुळे गावचे सरपंच यांनी श्री. पठ्ठे यांचा सत्कार केला. इब्राहीमपूरमध्ये या रॅलीने स्वच्छतेचा गजर केला.

   याप्रसंगी त्यांनी संत गाडगे महाराज यांच्या शैलीतील भाषण दिले. तसेच स्वच्छतेच्या मुद्द्यावर गावकऱ्यांचे प्रबोधन केले. श्री. पठ्ठे यांचे प्रबेाधन ऐकून नागरिक स्वच्छतेप्रती मंत्रमुग्ध झाले. या प्रेरणादायी प्रबोधनामुळे गाव स्व्च्छ ठेवण्यासाठी नागरिकांचे निश्चितच मत परिवर्तन झाले. तसेच स्वछ भारत आपल्याला घडवायचा आहे, अशी मनाशी खूनगाठ यावेळी ग्रामस्थांनी बांधली. इब्राहीमपूरमधून पुन्हा स्वच्छतेचा संदेश देत श्री. पठ्ठे यांची रॅली कोथळी गावात पोहोचली आणि शेवटी विद्यालयात या रॅलीचा समारोप करण्यात आला . स्वच्छता ही सेवा या रॅलीमुळे गावात स्वच्छतेचा संदेश घुमू लागला आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या मनावर स्वच्छतेचा संदेश बिंबविल्या गेला. तरी या सर्व उपक्रमांमुळे कोथळी व परीसरात स्वच्छतामय वातावरण निर्माण झाले आहे.

No comments:

Post a Comment