Friday 6 October 2023

DIO BULDANA NEWS 06.10.2023

 











दिव्यांग मंत्रालय हा शासनाचा ऐतिहासिक निर्णय

-ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू

*‘दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी’ अभियान संपन्न

बुलडाणा, दि. 6 : राज्य शासनाने सकारात्मक विचाराने दिव्यांग मंत्रालय स्थापन केले आहे. संपूर्ण देशात सर्वप्रथम महाराष्ट्राने दिव्यांग मंत्रालय सुरू केले आहे. दिव्यांग मंत्रालय हा शासनाचा ऐतिहासिक निर्णय आहे. यामध्यमातून दिव्यांगांना सशक्त करण्यात येईल, असे प्रतिपादन दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी अभियानाचे अध्यक्ष व मुख्य मार्गदर्शक ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी केले.

दिव्यांग कल्याण विभागातर्फे आयोजित ‘दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी’ अभियान आज, दि. 6 ऑक्टोबर 2023 रोजी सहकार विद्या मंदिराच्या सांस्कृतिक सभागृहात पार पडले. यावेळी आमदार संजय गायकवाड, जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते, समाज कल्याण प्रादेशिक उपायुक्त सुनिल वारे, समाज कल्याण सहायक आयुक्त डॉ. अनिता राठोड उपस्थित होते.

श्री. कडू म्हणाले, दिव्यांगांच्या प्रश्नाकडे कायम दुर्लक्ष करण्यात आले आहे. दिव्यांग नोंद घेण्यात येत नसल्यामुळे त्यांची नेमकी संख्या माहिती नव्हती. मात्र शासनाच्या पुढाकार घेतल्याने दिव्यांग मंत्रालय स्थापन करण्यात आले. मात्र येत्या काळात या विभागाला निधी देऊन सशक्त करणे गरजेचे आहे. या विभागाची आता सुरवात झाली असून गेल्या काळात 82 शासन निर्णय घेण्यात आले आहे. या निर्णयाची अंमलबजावणी होत आहे. विविध मदती आणि अनुदानाच्या राबविण्यात येत असल्यामुळे शासन आता दिव्यांगांच्या दारी पोहोचले आहे.

गेल्या अनेक वर्षापासून दिव्यांग वर्ग घराच्या लाभापासून वंचित आहे. त्यामुळे दिव्यांगांच्या घरासाठी स्वतंत्र घरकूल योजना व्हावी, यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल. घराचे बांधकाम करण्यासाठी अनुदानाची रक्कम सव्वालाखावरून वाढविणे गरजेचे आहे. दिव्यांगांना घरकुलासोबत देण्यात येणारे सानुग्रह अनुदानही वेळेत मिळावे, यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. गेल्या अनेक वर्षांपासून दिव्यांगाचा अनुशेष आहे, हा विविध योजनांच्या माध्यमातून भरून काढावा लागणार आहे. यासाठी समाजमन बदलवावे लागणार आहे.

दिव्यांगचे प्रश्न घेऊन कायम लढा दिला आहे. येत्या काळातही दिव्यांगांची परिस्थिती सुधारावी, यासाठी प्रयत्न करणार आहे. प्राथमिक केंद्र आणि उपकेंद्र ही आपली शक्तीस्थळे आहेत. याठिकाणी चांगले कार्य करण्यात यावे. तसेच दिव्यांगांना अंत्योदय कार्ड वितरित करण्यासाठी पुढाकार घ्यावा, यामुळे दिव्यांगाना मदत देणे शक्य होईल. शासनाने कोतवाल भरती जाहिर केली आहे. यामुळे दिव्यांगांना आरक्षण नाही, मात्र जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेऊन कोतवाल आणि कंत्राटी भरतीमध्ये दिव्यांगाना सामावून घ्यावे.

आमदार श्री. गायकवाड यांनी या अभियानातून वंचित घटकाच्या उत्थानासाठी पुढाकार घेण्यात आला आहे. मेळाव्याच्या माध्यमातून योजना पोहोचविण्यात आल्या आहे. येत्या काळात केंद्र शासनातर्फे पाच हजार दिव्यांगाना सहायकारी उपकरणे देऊन मदत करण्यात येणार आहे. आमदार निधीतून दरवर्षी 30 लाख रूपयांचा निधी देण्यात येत आहे. समाजानेही या कामी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले.

जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी अभियानातील प्रत्येक निवेदनावर शेवटपर्यंत पाठपुरावा करण्यात येईल. धोरणात्मक बाबीवरही मार्ग काढण्यात येईल. वंचित घटकासोबत प्रशासन नेहमी राहील, दिव्यांगांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे सांगितले.

मेळाव्यापूर्वी श्री. कडू यांनी दिव्यांगांनी निर्मिती केलेल्या वस्तूंच्या दालनाचे उद्घाटन केले. यावेळी विविध घटकातील लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला. तसेच दिव्यांगांच्या योजनांचे विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब मोहन यांनी प्रास्ताविक केले. जिल्हा समाज कल्याण अधिकारी मनोज मेरत यांनी आभार मानले.

ताराबाई शिंदे यांच्या वाड्याला भेट

          दरम्यान श्री. कडू यांनी सकाळी ‘स्त्री-पुरूष तुलना’ करणाऱ्या लेखिका ताराबाई शिंदे यांच्या वाड्याला भेट दिली. यावेळी श्री. कडू यांनी ताराबाई शिंदे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यांनी शिंदे कुटुंबियांशी संवाद साधून त्यांच्या कार्याची माहिती घेतली. शिंदे कुटुंबाच्या वतीने श्री. शिंदे यांचा शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

00000

माजी राष्ट्रपती स्व. डॉ. एपीजे अब्दुल कलाम जन्मदिनी वाचन प्रेरणा दिन

बुलडाणा, दि. 6 :  माजी राष्ट्रपती स्व. डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनी रविवार, दि. 15 ऑक्टोबर रोजी वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात येणार आहे.

शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये वाचनाप्रती आवड निर्माण करण्यासाठी हा वाचन प्रेरणा दिवस म्हणून साजरा करण्यात येणार आहे. शासकीय, निमशासकीय कार्यालये, शाळांमध्ये कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच विद्यार्थी, शिक्षकवर्ग व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी कामकाजाच्या वेळेमध्ये किमान अर्धा तास वाचनासाठी द्यावा. तसेच दि. 15 ऑक्टोबर 2023 रोजी वाचन प्रेरणा दिनानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाने केले आहे.

00000










यंत्रणांनी दिव्यांगांप्रती सहानुभूतीची भूमिका ठेवावी

-ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू

बुलडाणा, दि. 6 : प्रदीर्घ कालावधीनंतर राज्य शासन दिव्यांगांच्या प्रश्नी कार्य करीत आहे. प्रामुख्याने शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात यंत्रणांनी आपले योगदान द्यावे, तसेच दिव्यांगांप्रती सहानुभूती ठेवावी, असे आवाहन दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी अभियानाचे मुख्य मार्गदर्शक ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात दिव्यांगांच्या प्रश्नाबाबत जिल्हास्तरीय यंत्रणांची आढावा बैठक घेतली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील उपस्थित होते.

श्री. कडू म्हणाले, जिल्ह्यातील दिव्यांग मेळावा यशस्वीपणे पार पडला आहे. यातून दिव्यांगांसाठी करावयाची कार्य समोर आले आहे. प्रामुख्याने एका कुटुंबात अधिक दिव्यांग असलेल्या कुटुंबांना प्राधान्याने लाभ देण्यात यावे. यामुळे त्यांचे जगणे सुकर होईल. दिव्यांगांकडून प्रामुख्याने घरकुल आणि सानुग्रह अनुदानाची मागणी होते. मात्र या पुढे जाऊन त्यांना रेशन, रोजगार, शिक्षण, रोजगार, आरोग्याच्या सेवा आदी देण्यासाठी यंत्रणांनी पुढाकार घ्यावा.

दिव्यांगांना अंत्योदय योजनेतून रेशन मिळण्याची सुविधा आहे. मात्र हा लाभ त्यांना होत नाही. त्यामुळे महिन्याच्या शेवटी उचल झाला नसल्यास उर्वरीत धान्य दिव्यांगांना वाटप करण्यासाठी प्रस्ताव पाठवून मान्यता घेण्यात यावी आणि त्यानुसार रेशन वाटप करण्यात यावे. शिक्षण क्षेत्रात होतकरू विद्यार्थ्यांसाठी विशेष तरतूद करावी. दिव्यांगांच्या शाळा डिजीटल होण्यासाठी पुढाकार घ्यावा. जेणेकरून हे विद्यार्थी समोर जाऊ शकतील.

दिव्यांगांच्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी यंत्रणांतील सर्वांची कार्यशाळा घ्यावी. यामध्ये दिव्यांगांचा शोध घेण्यापासून त्यांना लाभ मिळण्यापर्यंत माहिती देण्यात यावी. कर्मचाऱ्यांनी प्रत्येक गावनिहाय सर्व्हेक्षण केल्यास यात चांगले कार्य होणार आहे. दिव्यांगांसाठी कार्य करीत असताना दिव्यांग बालके जन्माला येऊ नये यासाठी यंत्रणा उभारून कार्य केल्यास दिव्यांगत्वाचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल. यात आरोग्य यंत्रणांना चांगले कार्य करता येईल.

दिव्यांगांसाठी कार्य करीत असताना यंत्रणांनी जबाबदारीपेक्षा कर्तव्य म्हणून कार्य करावे. यंत्रणांकडे आलेला एकही दिव्यांग व्यक्ती परत जाऊ नये. सेवाभावी दृष्टीकोन ठेऊन जिल्ह्यातील यंत्रणांनी कार्य करावे. दिव्यांगाच्या बाबतीत केलेल्या कार्याचा इतर जिल्ह्यांनी आदर्श ठेवावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी, दिव्यांगाच्या क्षेत्रात कार्य करण्यास वाव आहे. प्रत्येक गावात सर्व्हेक्षण करून दिव्यांगांच्या समस्या जाणून घेतल्या जातील. दिव्यांगांचे प्रमाणपत्र देण्यामध्ये मध्यस्थाशिवाय कार्य करण्यात यावे. ग्रामपंचायतीने दिव्यांगांचा निधी वितरीत केला नसल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. तसेच सधन असलेल्या दिव्यांगांनी अनुदान सोडल्यास गरजू दिव्यांगांना लाभ देता येईल, असे सांगितले.

बैठकीपुर्वी कारंजा चौकातील व्यास बालोद्यान येथे ताराबाई शिंदे यांचा पुतळा उभारण्यात येणार आहे. या कामाचे भूमिपूजन श्री. कडू यांनी केले.

000000

No comments:

Post a Comment