Wednesday 12 February 2020

DIO BULDANA NEWS 12.2.2020

शेतकऱ्यांनी गटशेतीच्या माध्यमातून आर्थिक उत्पन्न वाढवावे
-         एकनाथ डवले
  • चिखली येथे गटशेती प्रोत्साहन व सबलीकरण कार्यक्रम
बुलडाणा, दि. 12 : पारंपारीक पध्दतीने पिके न घेता गटशेतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी कंपनी स्थापन करावी. कंपनीच्या माध्यमातून विशिष्ट पिकांची लागवड करुन त्यावर प्रक्रीया करुन आपले आर्थिक उत्पन्न वाढवावे व गट शेतीमधून एकत्र येवून विकास साधावा, असे आवाहन कृषि विभागचे प्रधान सचिव एकनाथराव डवले यांनी केले आहे. यावेळी जिल्हा कृषि अधिक्षक अधिकारी नरेंद्र नाईक, पैनगंगा शेती उत्पादक व प्रक्रिया उद्योग शेतकरी गट कंपनीचे अध्यक्ष सचिन देशमुख, डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापिठ अकोला कार्यकारी समिती सदस्य विनायक सरनाईक, कृषि विकास अधिकारी अनिसा महाबळे, सिताफळ महासंघाचे अध्यक्ष श्याम गट्टाणी, उपविभागीय कृषि अधिकारी संतोष डाबरे, तालुका कृषि अधिकारी अमोल शिंदे आदी उपस्थित होते.
   तालुका कृषी अधिकारी कार्यालय, चिखली अंतर्गत गटशेती प्रोत्साहन व सबलीकरण योजना सन 2017-18 अंतर्गत चिखली तालुक्यातील खंडाळा मकरध्वज येथील पैनगंगा शेती उत्पादक व प्रक्रिया उद्योग शेतकरी गट कंपनी, खंडाळा मकरध्वज या कंपनीचे उद्घाटन  प्रधान सचिव (कृषी) एकनाथराव डवले यांच्या हस्ते 10 फेब्रुवारी रोजी करण्यात आले.
    याप्रसंगी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी श्री. नाईक यांनी गटशेती ही काळाची गरज असून  गटशेतीच्या माध्यमातून आपल्या शेतमालाचे मुल्यवर्धन करावे.  कार्यक्रमाचे प्रस्ताविकमध्ये कंपनीचे अध्यक्ष सचिन गोंविदराव देशमुख म्हणाले,  सन 2019-20 या वर्षी हळद पिकावर प्रक्रीया करुन हळद पावडर, मिरची पावडर, विविध मसाले निर्मिती करुन बाजारात विक्रीस आणणार आहेत. जागतिक कडधान्य दिनानिमित्त मान्यवरांचे हस्ते उन्हाळी मूग बियाणे, किट चे वाटप याप्रसंगी करण्यात आले व लाभार्थी शेतकऱ्यांना कृषि यांत्रकीकरण योजनेअंतर्गत ट्रॅक्टरचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन गोपाल जाधव यांनी केले.  कार्यक्रमाला मंडळ कृषि अधिकारी, कृषि पर्यवेक्षक व कृषि सहाय्यक, पैनगंगा शेती उत्पादक व प्रक्रीया उद्योग कंपनीचे संचालक, भागधारक, गावातील प्रतिष्ठीत नागरीक, आत्मा विभागाचे कर्मचारी, शेतकरी गटाचे अध्यक्ष, सचिव व शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते, असे तालुका कृषि अधिकारी, चिखली यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.
*****
आदिवासी मत्स्य संस्थांना मस्त्य व्यवसायासाठी जाळे पुरवठा करण्यात येणार
  • 11 मार्च 2020 पर्यंत अर्ज सादर करावे
बुलडाणा, दि. 12 : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अकोला, यांचे कार्यक्षेत्राअंतर्गत विशेष केंद्रीय सहाय्य योजना सन 2011-12 नुसार आदिवासी मत्स्य संस्थांना मत्स्य जाळे पुरवठा करण्यासाठी योजना मंजूर आहे.  त्याअनुषंगाने वैयक्तीक स्वरुपात नदया, नाले, तलावात मासेमारी करुन आपली उपजिवीका चालविण्यासाठी अर्थाजन करीत असणाऱ्या तसेच मत्स्य संस्थेचे सभासद असणाऱ्या लाभार्थ्यांकडून 17 फेब्रुवारी ते 11 मार्च 2020 पर्यत अर्ज प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अकोला यांनी कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी येथे सादर करावा.
  तसेच आर्जसोबत आधार कार्ड, जातीचा दाखला, रहिवाशी दाखला, वैयक्तीक स्वरुपात छोटया नदया, नाले, तलावात मासेमारी करुन आपली उपजिवीका चालवित असल्याबाबत ग्रामसेवकाचे प्रमाणपत्र, मत्स्य संस्थेचे सभासद असल्याबाबत संस्थेचे पत्र, पासपोर्ट आकाराचे छायाचित्र जोडावे. तसेच मत्स्य संस्थेचे सभासद असणाऱ्या लाभार्थ्यांनी कार्यालयीन काम कामकाजाच्या दिवशी स्वत:उपस्थित राहून अर्ज सादर करावा. जेष्ठतेनुसार व जिल्हानिहाय लक्षांकानुसार लाभार्थी निवड करण्यात येणार असून मत्स्य संस्थेचे सभासद असणाऱ्या लाभार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे, असे प्रकल्प एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अकोला यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.
****
  अंत्योदय व प्राधान्य कुटूंबातील लाभार्थ्यांसाठी तांदूळ धान्याचे वाहतूक आदेश पारीत
बुलडाणादि‍ 12 -  राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत मार्च 2020 चे नियतनातील अंत्योदय व प्राधान्य कुटूंबातील लाभार्थ्यांना तांदुळाची वाहतुक भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील आमगांव गोदामातून शासकीय गोदामात करण्याचे आदेश पारीत करण्यात आले आहे. आधारभूत किंमत खरेदी योजनेतंर्गत माहे मार्च 2020 साठी तांदुळाची अंत्योदय योजनेचे एकूण 1330 मे.टन व प्राधान्य कुटूंबातील लाभार्थी योजनेकरीता एकूण 3039 मे.टन एवढे नियतन शासनाकडून प्राप्त झाले आहे. प्राप्त नियतनाच्या धीन राहून ही उचल करावयाची आहे.  अंत्योदय योजना लाभार्थ्यांसाठी वाटपाचे परिमाण 20 किलो प्रति कार्ड व प्राधान्य कुटूंब लाभार्थ्यांसाठी प्रति लाभार्थी  2 किलो आहे.
     गोदामनिहाय तांदुळ धान्याची वाहतूक खालीलप्रमाणे करावी. चिखली गोदामासाठी अंत्योदय योजना  685 व प्राधानय कुटूंबातील लाभार्थी योजना 2846 क्विंटल, बुलडाणा : अंत्योदय योजना  1399 व प्राधानय कुटूंबातील लाभार्थी योजना 3351 क्विंटल,  दे.राजा गोदामाकरीता अंत्योदय योजना  569 व प्राधान्य कुटूंबातील लाभार्थी योजना 1392 क्विंटल, अमडापूर : अंत्योदय योजना  233 व प्राधान्य कुटूंबातील लाभार्थी योजना 925 क्विंटल,मोताळासाठी अंत्योदय योजना  1174 व प्राधान्य कुटूंबातील लाभार्थी योजना 1973 क्विंटल, नांदुरासाठी अंत्योदय योजना 1215 व प्राधान्य कुटूंबातील लाभार्थी योजना 1998, खामगांव गोदामकरीता अंत्योदय योजना 1007 व प्राधान्य कुटूंबातील लाभार्थी योजना 3643 क्विंटल, शेगांवकरीता अंत्योदय योजना  608 व प्राधान्य कुटूंबातील लाभार्थी योजना 1754 क्विंटलजळगांव जामोदकरीता अंत्योदय योजना  1008 व प्राधान्य कुटूंबातील लाभार्थी योजना 1832 क्विंटल, संग्रामपूर गोदामाकरीता अंत्योदय योजना 1217 व प्राधान्य कुटूंबातील लाभार्थी योजना 1702 क्विंटल, मेहकरसाठी अंत्योदय योजना 846 व प्राधान्य कुटूंबातील लाभार्थी योजना 2481 क्विंटल, लोणारकरीता अंत्योदय योजना 1299 व प्राधान्य कुटूंबातील लाभार्थी योजना 1648 क्विंटल, सिंदखेड राजाकरीता अंत्योदय योजना  558 व प्राधान्य कुटूंबातील लाभार्थी योजना 1112 क्विंटल, मलकापूर : अंत्योदय योजना  907 व प्राधान्य कुटूंबातील लाभार्थी योजना 2011 क्विंटल, साखरखेर्डा : अंत्योदय योजना 309 व प्राधान्य कुटूंबातील लाभार्थी योजना 844 क्विंटल आणि डोणगांवकरीता अंत्योदय योजना  266 व प्राधान्य कुटूंबातील लाभार्थी योजना 878 क्विंटल क्विंटल असणार आहे. अशाप्रकारे एकूण अंत्योदय योजनेकरीता तांदूळ 13 हजार 300 क्विंटल व  प्राधान्य कुटूंबातील लाभार्थी योजनेकरीता 30390 क्विंटल क्विंटल पूरवठा करण्यात येणार  आहे, असे जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी पत्रकान्वये कळविले आहे.
****
तांदुळ वाहतुकीसाठी जिल्हा वाहतुक प्रतिनिधी पदावर बी. एस जुमडे यांची नेमणूक
बुलडाणादि‍ 12 -  जिल्ह्यासाठी पणन हंगाम 2019-20 मध्ये आधारभूत किंमत खरेदी योजनेतंर्गत माहे मार्च 2020 साठी तांदुळाचे अंत्योदय योजनेकरीता 1330 मे.टन व प्राधान्य कुटूंबातील लाभार्थी योजनेकरीता 3039 मे.टन नियतनाची उचल भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील आमगांव गोदाम येथून करावयाची आहे. त्याअनुषंगाने माहे फेब्रुवारी 2020 या महिन्यासाठी जिल्हा वाहतुक प्रतिनिधी पदावर पुरवठा निरीक्षक बी. एस जुमडे यांची नमेणूक करण्यात आली आहे.
   या वाहतुकीकरीता ट्रक चालकाने कंत्राटदाराचे लेटर हेडवर विशिष्ट ट्रक भरून घेण्याबाबतचे प्राधीकारपत्र सादर केल्यानंतरच ट्रक भरून देण्यात येईल. ही वाहतूक जिल्हा पुरवठा कार्यालयाने मान्यता दिलेल्या वाहनातून करावी. वाहनांची आरसी बुक, फिटनेस प्रमाणपत्र तसेच विहीत आशयाची शपथपत्रे, वाहने नियंत्रणाखालील असल्यास वाहन मालकांचे शपथपत्र आदी कागदपत्रे तपासून वाहनात धान्य भरून देण्यात येणार आहे. वाहतुकीसाठी वापरात येणाऱ्या वाहनांना हिरवा रंग तसेच वाहनांवर सार्वजनिक वितरण व्यवस्था सुधारीत धान्य वितरण पद्धत महाराष्ट्र शासन असे स्पष्टपणे लिहावे.
   वाहतुक पासवरील अनुक्रमांक 10 मध्ये धान्याने भरलेल्या वाहनाची दिनांक व वेळ न चुकता भरावी. तरी नेमणूक करण्यात आलेल्या वाहतुक प्रतिनिधी यांनी नेमलेल्या कालावधीत भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील आमगांव गोदाम वेळप्रसंगी धान्य उचलीचे गोदाम बदलल्यास त्याठिकाणी दिलेल्या निर्देशानुसार हजर राहून कार्यालयीन कामकाज पार पाडावे, असे जिल्हा पुरवठा विभाग यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
                                                                                    *****
‘सर्वांना लाभ सर्वांचे कल्याण’ या ब्रिदनुसार कामगार विभागाचे काम
बुलडाणादि‍ 12 -  महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, मुंबई अंतर्गत जिल्ह्यात नोंदणीकृत बांधकाम कामगारांना शासनाच्या कामगार व महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांच्या विविध कल्याणकारी योजना जाहीर आहेत. मंडळ अस्तित्वात आले तेव्हापासून दरवर्षी कामगारांना विविध योजनांतर्गत लाभ दिल्या जात असून यावर्षी जास्तीत जास्त संख्येने बांधकाम कामगारांची नोंदणी करण्यात येईल. अटल विश्वकर्मा सन्मान योजनेतंर्गत माहे जुन 2019 ते सप्टेंबर 2019 पर्यंत बांधकाम कामगारांकरीता नोंदणी अभियान राबविण्यात आले होते. संपूर्ण जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नोंदणी करण्यात आली असून ‘सर्वांना लाभ सर्वांचे कल्याण’ या ब्रिद नुसार कामगार विभाग व मंडळाचे काम होत आहे.
    हे सर्व काम करीत असताना मंडळाच्या कामकाजासाठी अपुरा कर्मचारी वर्ग असतांनासुद्धा हजारोंच्या संख्येने आलेल्या कामगारांचे समाधान केल्या जात आहे. कामगारांची अडचण लक्षात घेवून त्यांना योग्यप्रकारे मार्गदर्शन केल्या जाते.  हे सर्व करीत असताना कोणत्याही एका विशिष्ट पक्षाला लाभ व्हावा, या दृष्टीकोनातून कोणतेही काम सरकारी कामगार कार्यालयाद्वारे अथवा मंडळाद्वारे केल्या जात नाही.
   नोंदणीकृत सर्व जिवीत सक्रीय बांधकाम कामगारांना तातडीने सुरक्षा संच व अत्यावश्यक संच वाटप करण्याचे कार्य सुरू करण्यात आले होते. परंतु मध्यंतरीच्या काळात विधानसभा निवडणूक आचार संहीता लागू होवून कंत्राटदाराचा कंत्राट संपुष्टात आलेला होता. त्यामुळे उर्वरित लाभार्थ्यांना सुरक्षा संच व विविध योजनांचे लाभाचे वाटप थांबविण्यात आले होते. सदर लाभ हे डीबीटी पद्धतीने बँकेद्वारे संबंधित बांधकाम कामगारांच्या खात्यात  आरटीजीएस करण्यात येतात. तरी ‘सरकारी कामगार अधिकारी धात्रक यांना निलंबित करण्याची मागणी’ या मथळ्याखाली प्रकाशित वृत्ताचे खंडन सरकारी कामगार अधिकारी सं. वा. धात्रक यांनी खुलासा प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

No comments:

Post a Comment