Wednesday 4 April 2018

जिल्हा वार्षिक योजनेचा 99.98 टक्के निधी खर्च..dio buldana


 पाणपोईच्या माध्यमातून किटकजन्य रोगांविषयी जनजागृती
  • जिल्हा हिवताप कार्यालयाचा उपक्रम
 बुलडाणा, दि.4 : जिल्हा हिवताप कार्यालयाच्यावतीने कार्यालयाच्या परिसरात पाणपोई लावण्यात आली आहे. या भागात रूग्णालयांची संख्या जास्त असल्यामुळे जिल्ह्यातून व जिल्ह्याच्या बाहेरून मोठ्या प्रमाणावर रूग्ण येत असतात. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची निकड लक्षात घेता जिल्हा हिवताप अधिकारी एस. बी चव्हाण यांनी स्वखर्चाने या पाणपोईची व्यवस्था केली आहे.    या पाणपोईच्या माध्यमातून किटकजन्य  आजरांविषयी जनजागृती व्हावी, यासाठी किटकजन्य आजारांची माहिती देणारे फलक, बोर्ड लावण्यात आले आहे. त्यामुळे पाणी पिण्यासाठी थांबलेल्या नागरिकाला या किटकजन्य आजारांविषयी माहितीसुद्धा मिळत आहे.
    या पाणपोईचे उद्घाटन नुकतेच जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पंडीत, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. मकानदार, माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. गोफणे आदींच्या उपस्थितीत करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा हिवताप कार्यालयातील आर.जी बाभुळकर, पी.बी होगे, कुणाल हिवाळे, पी.डी जाधव, डी. सी जाधव, श्री. बिलारी, श्री. देवकर, आर. एस जाधव, श्री. लोखंडे, श्री. बाहेकर, श्री. जुमडे, श्री. वनारे, श्री. धुळधर, श्री. सरदार, श्री. बेंडवाल, सावन गवळी आदी उपस्थित होते.
*******
जिल्हा वार्षिक योजनेचा 99.98 टक्के निधी खर्च..
 बुलडाणा, दि.4 : जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) अंतर्गत प्रत्येक जिल्ह्याला निधी मिळत असतो. या संपूर्ण निधीचे नियोजन, वितरण व खर्च करून घेण्याची जबाबदारी जिल्हा नियोजन कार्यालय अर्थातच जिल्हाधिकारी कार्यालयाची असते. आर्थिक वर्षाच्या शेवटच्या महिन्यात, तर ही जबाबदारी कित्येक पटींनी वाढते. नुकताच मार्च एंड संपला असून जिल्ह्याला मिळालेल्या निधीचे 99.98 टक्के खर्च करण्यामध्ये जिल्हा प्रशासन यशस्वी ठरले आहे.  बुलडाणा जिल्ह्याला सन 2017-18 मध्ये एकूण 202.83 कोटी रूपयांचा निधी प्राप्त झाला होता. त्यापैकी 202.82 कोटी रूपये निधी खर्ची पडला आहे. यामधून प्रत्येक विभागाला मिळालेल्या उद्दिष्टांप्रमाणे निधी खर्ची करण्यात आला आहे.
   जिल्ह्याला सर्वसाधारण योजनेत 13861.75 लक्ष निधी महसूली खर्चासाठी, तर 6421.25 लक्ष रूपयांचा निधी भांडवली खर्चासाठी मिळाला आहे. या निधीमधून महसूली खर्चासाठीच्या रकमेतील 13861.7421 लक्ष व भांडवली खर्चासाठी प्राप्त निधीमधून 6421.21797 लक्ष रूपयांचा निधी खर्ची पडला आहे. अशाप्रकारे 20282.96 लक्ष रूपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. या संपूर्ण प्राप्त निधीच्या खर्चाचे नियोजन जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. यामध्ये थोड्याच दिवसांपूर्वी रूजु झालेले जिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदे, सहा. जिल्हा नियोजन अधिकारी सुनील सोनार व सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी आपली जबाबदारी यशस्वी पार पाडली.
                                                      ******







खडकपूर्णा प्रकल्पाच्या टप्पा क्रमांक 4 वरील कास्तकारांचे कुठलेही उपोषण नाही
  • खडकपूर्णा धरण 27 मे 2016 पासून बुलडाणा पाटबंधारे विभागाकडे हस्तांतरीत
  • खडकपूर्णा प्रकल्प विभागाचे स्पष्टीकरण
 बुलडाणा, दि.4 : संत चोखा सागर अर्थातच खडकपूर्णा प्रकल्पावर टप्पा क्रमांक 4 वरील कास्तकार अथवा प्रकल्पग्रस्त उपोषण करीत आहेत. खडकपूर्णा प्रकल्पाच्या प्रवेशद्वाराची दयनीय अवस्था, अशा प्रकारचे वृत्त प्रकाशित झाले होते. मात्र खडकपूर्णा प्रकल्पाच्या टप्पा क्रमांक 4 वरील कास्तकार अथवा प्रकल्पग्रस्तांनी आजवर कुठल्याही प्रकारचे उपोषण केलेले नाही, असे स्पष्टीकरण कार्यकारी अभियंता, खडकपूर्णा प्रकल्प विभाग यांनी दिले आहे.
     खडकपूर्णा प्रकल्प विभागातून खडकपूर्णा धरण हे 27 मे 2016 पासून बुलडाणा पाटबंधारे विभाग, बुलडाणा यांचेकडे हस्तांतरीत झाले आहे.  त्यामुळे धरणाची वा धरणाच्याद्वाराच्या फलकाची जबाबदारी सदर विभागाकडे नाही. धरणाचे कालवा व्यवस्थापन खडकपूर्णा प्रकल्प विभागाकडे आहे. वृत्तात कार्यकारी अभियंता श्री. कदम यांच्या उदासिन धोरणामुळे प्रकल्पाच्या नामफलकाची दुर्दशा झाली आहे, असे नमूद आहे. याऊलट कार्यकारी अभियंता एम.एस कदम यांनी बहुतांश भुसंपादनाची व कास्तकारांची प्रकरणे मार्गी लावली आहेत. मेरा बु. शिवारातील कामे सुरू करून पुर्णत्वास नेत आहे. नाम फलकाच्या दुर्देशेबाबत प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष कुठलाही संबंध  नाही.  कारण सदर विभागाकडे केवळ बांधकामाधीन कामे आहे, धरण व जलाशय बुलडाणा पाटबंधारे विभागाकडे हस्तांतरीत केलेले आहे.  
   दिवसेंदिवस कामाची किंमत वाढत चालली आहे, त्यामुळे कंत्राटदारसुद्धा कामे करण्यास तयार होत नसल्याचे बोलल्या जात असल्याचे वृत्तात नमूद आहे.  त्याअनुषंगाने प्रकल्पावरील कामाच्या किंमतीचा फुगवटा जर होत असेल तर यास अनेक कारणे आहेत. भूसंपादनाच्या मोबदल्यात होणारी वाढ, बांधकामाच्या कच्च्या सामुग्रीची किंमतीत होणारी वाढ, वहनावळ व आस्थापनेवरील खर्च, वाढणारी महागाई या कारणांमुळे प्रकल्पाच्या किंमतीत वाढ होत असल्यास यास सदर विभाग अथवा कार्यकारी अभियंता श्री. कदम कारणीभूत नाहीत, असा खुलासा कार्यकारी अभियंता, खडकपूर्णा प्रकल्प विभाग, दे.राजा यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केला आहे.
                                                                 **************  
आला उन्हाळा.. तब्येत सांभाळा
·        उष्णतेच्या लाटेपासून संरक्षण करण्याचे नागरीकांना आवाहन
बुलडाणा, दि.4 : राज्यात मागील काही दिवसांपासून असलेल्या उष्णतेच्या लाटेमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या लाटेपासून    उष्माघातापासून बचाव करण्याकरीता करावयाच्या उपाययोजनांबाबत जिल्हा प्रशासनाने जनतेला आवाहन केले आहे. हवामान विभागाने यावर्षी उष्णतेच्या लाटेची सुरूवात नेहमीपेक्षा लवकर होण्याचा अंदाज वर्तविला आहे. तसेच 2018 मध्ये उष्णतेची लाट दिर्घकाळापर्यंत असण्याचा अंदाजही हवामान खात्याने वर्तविला आहे.
   सर्वसाधारपणपणे प्रामुख्याने प्रत्येक वर्षी एप्रिल मध्य, मे, जून या महिन्यामध्ये उष्माघाताचा प्रभाव जाणवत असतो. तसेच त्यामुळे मृत्यू होण्याची संभावना असते. मात्र जिल्ह्यात वाढत्या उष्णतेचा परिणाम आताच जाणवू लागला आहे.  उष्माघाताचा परिणाम होऊ नये,यासाठी सर्व जनतेनी आतापासूनच जागृत राहीले पाहीजे, रुग्णांना तातडीने औषधोपचार मिळण्यासाठी अगोदरच तयारी करुन ठेवणे आवश्यक आहे.
उष्माघात  होण्याची सर्वसाधारण कारणे : उन्हाळयात शेतावर अथवा इतर मजुरीची कामे फार वेळ उन्हात करणे, कारखान्याच्या बॉयलर रुम मध्ये काम करणे, काच कारखान्यात काम करणे, जास्त तापमानाच्या खोलीमध्ये काम करणे, घट्ट कपडयांचा वापर करणे अश्या प्रकारे उष्णतेशी प्रत्यक्ष अथवा तापमानातील वाढत्या परिस्थितीशी सतत संपर्क येण्याने उष्माघात होतो.
उष्माघाताची लक्षणे : थकवा येणे, ताप येणे, त्वचा कोरडी पडणे, भूक न लागने, चक्कर येण, निरुत्साही होणे, डोके दुखी, पोटात वेदना होणे अथवा पेंडके येणे, रक्तवाढ वाढणे, मानसिक बेचैन व अस्वच्छता, बेशुध्दावस्था इत्यादी. 
उष्माघातापासून बचावासाठी करावयाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना : गावामधील तसेच शहरामधील मंदीरे, सार्वजनिक इमारती, हॉल, उद्याने आदी ठिकाणे दुपारीसुद्धा उघडी ठेवावीत. जेणेकरून नागरिकांना दुपारच्या वेळी येथे आश्रय घेता येणार आहे. याकाळात रूग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्र आदी महत्वाच्या ठिकाणी विद्युत पुरवठा खंडीत करू नये, वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे, कष्टाची कामे सकाळी लवकर अथवा संध्याकाळी कमी तापमान असतांना करावीत , बाहेर काम करीत  असताना मध्ये-मध्ये नियमित आराम करण्यात यावा, गरोदर कामगार व आजारी कामगारांची अधिक काळजी घ्यावी, चक्कर येत असल्यास किंवा आजारी वाटल्यास त्वरित डॉक्टरकडे जावे, मद्य, चहा, कॉफी व कार्बानेटेड शितपेय पिण्याचे टाळावे, पुरेसे पाणी पित रहावे,  उष्णता शोषून घेणारे कपडे (काळया किंवा भडक रंगाचे) वापरु नयेत, सैल सुती पांढऱ्या रंगाचे कपडे वापरावेत, जलसंजीवनीचा वापर करावा, पाणी भरपूर प्यावे, सरबत प्यावे, उन्हात बाहेर जातांना गॉगल, डोक्यावर टोपी, टॉवेल यांचा वापर करावा, शिळे अन्न खाणे टाळावे, तीव्र उन्हात  मुख्यत: दुपरी 12 ते 3.30 या कालावधीत उन्हात बाहेर जाणे टाळावे. गडद, घट्ट व जाड कपडे घालण्याचे टाळावे.

*****
            रास्तभाव दुकानदारांनी संप मागे घ्यावा शासन चर्चेस तयार
- अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीष बापट
बुलडाणा, दि.4 : राज्यातील रास्तभाव दुकानदारांनी केलेल्या विविध मागण्यांपैकी बहुतांश मागण्या मान्य केल्या आहेत. दुकानदारांनी पुकारलेला संप मागे घ्यावा व त्यानंतर चर्चा करण्यास शासन तयार आहे. आवश्यकता पडल्यास कारवाई केली जाईल, असे अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीष बापट यांनी काल मंत्रालय येथे आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.
     श्री. बापट पुढे म्हणाले, राज्यातील एकूण 51 हजार 978 रास्तभाव दुकानदारांपैकी 5 हजार 600 रास्तभाव दुकानदार संपावर होते. संपात सहभागी असलेल्या जिल्हयांपैकी उस्मानाबाद व लातूर या जिल्हयांतील संप केवळ एक दिवसासाठीच होता.  या संपात रायगड जिल्ह्यातील केवळ पनवेल तालुका तसेच सांगली, बीड, उस्मानाबाद, परभणी आणि लातूर असे 6 जिल्हे वगळता राज्यातील उर्वरित जिल्हयांतील रास्तभाव दुकानदार सहभागी नाहीत. राज्यात सार्वजनिक वितरण प्रणालीचे संगणकीकरण करून E-pos मशिनद्वारे धान्य वाटप करण्याची पारदर्शक कार्यवाही सुरू आहे. हे करीत असतानाच राज्यातील रास्तभाव दुकानदार/किरकोळ केरोसीन परवानाधारक यांच्याबाबत शासन संवेदनशिल असून त्यांच्या हितासाठी शासनाने निर्णय वेळावेळी घेतलेले आहेत. रास्तभाव दुकानदार/किरकोळ केरोसीन परवानाधारकांच्या सहकार्याने रास्तभाव दुकानदारांच्या संगणकीकरणाची प्रकिया राबविण्यात येत आहे.
रास्तभाव दुकानदारांचे उत्पन्न वाढावे, यासाठी शासनाने घेतलेले महत्वाचे निर्णय
 स्वस्त धान्य दुकानदारांना धान्य वाहतुकीच्या रिबेट दरामध्ये 10 वर्षानंतर प्रथमत:  सुधारणा करुन 73 टक्के वाढ करण्यात आली .
किरकोळ/हॉकर्स/अर्धघाऊक केरोसीन परवानाधारकांचे कमिशन सुधारित करण्यात आले असून, किरकोळ/हॉकर्स परवानाधारकांचे कमिशन रू.250/- हून रू.450/- तसेच अर्धघाऊक परवानाधारकांचे रू.200/- हून रू.300/- सुधारित करण्यात आले आहे.
    राज्यातील रास्तभाव/ शिधावाटप दुकानदारांचे उत्पन्न वाढावे यासाठी रास्तभाव दुकानातून सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत खुल्या बाजारातील साखर वगळुन  गव्हाच्या 4 जाती, तांदळाच्या 11 जाती, खाद्यतेल/पामतेल, कडधान्य, डाळी, गुळ, शेंगदाणे, रवा, मैदा, चणापीठ व भाजीपाला या वस्तुंची विक्री करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
    राज्यातील रास्तभाव/शिधावाटप दुकानदार व किरकोळ केरोसीन दुकानदार यांचे उत्पन्न वाढावे यासाठी त्यांना व्यावसायिक प्रतिनिधी म्हणून नियुक्त करण्यासाठी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.
   राज्यातील रास्तभाव/शिधावाटप दुकानदार व किरकोळ केरोसीन दुकानदार यांना व्यावसायिक प्रतिनिधी म्हणून नियुक्त करण्यासाठी राष्ट्रीयकृत बँकांसोबतच खासगी बँकाना अनुमती देण्याबाबतचे शासन परिपत्रक दिनांक 3 फेब्रुवारी, 2017 रोजी  निर्गमित करण्यात आले आहे.
  राज्यातील रास्तभाव/शिधावाटप दुकान असलेल्या गावातील शेतकऱ्यांना शेतीसाठी आवश्यक असलेले प्रमाणित बी-बियाणे स्थानिक ठिकाणीच उपलब्ध व्हावेत यासाठी कृषी विभागाचा परवाना प्राप्त रास्तभाव दुकानदारांना रास्तभाव/शिधावाटप दुकानांतून प्रमाणित बी-बियाणे विक्रीसाठी ठेवण्यास दिनांक 3 मार्च, 2017 च्या शासन निर्णयान्वये परवानगी देण्यात आलेली आहे.
  लक्ष्य निर्धारीत सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत धान्य उपलब्धतेच्या हमी करिता निश्चित केलेल्या सुधारीत धान्य वितरण पध्दतीनुसार अन्नधान्य व इतर जीवनावश्यक वस्तूंचे वाहतूक कंत्राट निश्चित करण्याबाबत मार्गदर्शक सूचना दिनांक 20 एप्रिल, 2017 च्या शासना निर्णयान्वये देण्यात आल्या आहेत.       
  सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील Pos मशिनद्वारे होणाऱ्या अन्नधान्य वितरणासाठी अधिकृत रास्तभाव/ शिधावाटप दुकानदारांच्या मार्जिनमध्ये रु.70/- वरुन रु.150/- प्रती क्विंटल वाढ करण्याचा निर्णय शासन निर्णय दिनांक 4 सप्टेंबर, 2017 रोजी घेण्यात आला आहे.
  फ्री-सेल केरोसीन तसेच 5 कि.ग्रॅ.चे लहान सिलेंडर्स यांचे वितरण करण्यास रास्तभाव व केरासीन विक्रेते यांना शासन निर्णय दिनांक 7 सप्टेंबर 2017 अन्वये मान्यता देण्यात आली आहे.
  राज्यातील घाऊक केरोसीन परवानाधारकांचे कमिशन रू.787.82 वरून रू.1008.83 असे शासन निर्णय दिनांक 15.9.2017 अन्वये सुधारित करण्यात आले आहे.
 नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा, मुंबई यांच्या अधिपत्याखालील मुंबई-ठाणे शिधावाटप क्षेत्रातील अधिकृत रास्तभाव/शिधावाटप दुकानातून  महानंद दूग्‍धशाळेचे दूध व दुग्‍धजन्य पदार्थ विक्रीसाठी ठेवण्यास  शासन निर्णय दिनांक 19 जानेवारी, 2018 अन्वये परवानगी देण्यात आली आहे.
 राज्यातील सर्व अधिकृत रास्तभाव दुकानदारांचे उत्पन्न वाढवे यासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ मर्यादित, मुंबई (महानंद) या दुग्धशाळेचे दूध व दुग्धजन्य पदार्थ राज्यातील सर्व अधिकृत रास्तभाव दुकानामध्ये विक्रीस ठेवण्यास शासन निर्णय दिनांक 9 मार्च, 2018 अन्वये परवानगी देण्यात आली आहे.
                                                                        ***********
ग्राहक मार्गदर्शन शिबिराचे 10 एप्रिल रोजी आयोजन
 बुलडाणा, दि.4 : भारतीय ग्राहक मार्गदर्शन संस्था, मुंबई यांच्यावतीने ग्राहक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन जिल्हा नियोजन समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, बुलडाणा येथे  10 एप्रिल 2018 रोजी सकाळी 10.30 वाजता  करण्यात आले आहे. ग्राहकांचेहित जपणाऱ्या प्रत्येक बाबीवर या शिबिरात विस्तृत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तरी या कार्यक्रमाला ग्राहक संरक्षण चळवळी संबंधित व्यक्ती, संघटना तसेच नागरिकांनी उपस्थित रहावे. त्याचप्रमाणे जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेमधील अशासकीय सदस्यांनी सुद्धा कार्यक्रमाला उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी केले आहे.
                                                          **********

अन्नसुरक्षा योजनेतंर्गत अंत्योदय लाभार्थ्यांच्या गहु व तांदुळाचे वाहतूक आदेश पारीत
  • 30 एप्रिल 2018 पर्यंत धान्य उचल करावी
बुलडाणा, दि.4 -   राष्ट्रीय  अन्न सुरक्षा अधिनियम, 2013 अंतर्गत अंत्योदय योजनेतील लाभार्थ्यांकरिता माहे मे 2018 चे नियतनातील गहू व तांदुळ धान्याची शासकीय गोदामात  वाहतूक करण्याचे आदेश पारित करण्यात आले आहे. या धान्याची उचल भारतीय अन्न महामंडळाच्या  टेंभुर्णा फाटा, खामगांव यांचे गोदामातून  30 एप्रिल 2018 पर्यंत करावी लागणार आहे.
     गोदामनिहाय धान्याची वाहतूक खालीलप्रमाणे करावी.  बुलडाणा गहू  2098 क्विंटल व तांदुळ 348,  चिखली गहू 1026 व तांदुळ 171, अमडापूर गहू 348 व तांदुळ 58,  दे.राजा गहू 871 व तांदूळ 145,  मेहकर गहू 1267 व तांदूळ 211, डोणगांव गहू 397 व तांदूळ 66, लोणार गहू 1947 व तांदूळ 323,  सिं.राजा गहू 835 व तांदूळ 139, साखरखेर्डा गहू 462 व तांदूळ 77, मलकापूर गहू 1312 व तांदूळ 219, मोताळा गहू 1761 व तांदूळ 294, नांदुरा गहू 1820 व तांदूळ 302, खामगांव गहू 1507 व तांदूळ 251, शेगांव गहू 908 व तांदूळ 151, जळगांव जामोद गहू 1512 व तांदूळ 252, संग्रामपूर गहू 1879 व तांदूळ 313 क्विंटल आहे. अशाप्रकारे गहू 19 हजार 950  व तांदुळाचा 3 हजार 320 क्विंटल पुरवठा करण्यात येणार  आहे, असे जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी कळविले आहे.
*****


महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेला जिल्ह्यात  2760 परीक्षार्थी
  • रविवार, 8 एप्रिल 2018 रोजी परीक्षेचे आयोजन
  • 8 परीक्षा केंद्रांचे नियोजन
  • राज्य सेवा पूर्व परीक्षा -2018
बुलडाणा दि.4 - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्य सेवा पुर्व परीक्षा-2018 चे रविवार, 8 एप्रिल 2018 रोजी आयोजित करण्यात आली आहे. परीक्षा सकाळी 10.30 ते 1 आणि 2.30 ते 5 वाजेपर्यंत अशा दोन सत्रांमध्ये होणार आहे. या परीक्षेला जिल्ह्यातून 2760 परीक्षार्थी बसणार आहे. तसेच परीक्षेसाठी बुलडाणा येथील 8 परीक्षा केंद्रांचे नियोजन करण्यात आले आहे.
    यामध्ये शिवाजी विद्यालय, सुवर्ण नगर येथील परीक्षा केंद्रात 504 परीक्षार्थी, एडेड हायस्कूल चिखली रोड येथील परीक्षा केंद्रात 408, शारदा ज्ञानपीठ चिखली रोड येथील परीक्षा केंद्रात 336, रामभाऊ लिंगाडे पॉलीटेक्नीक कॉलेज चिखली रोड परीक्षा केंद्रात 312, जिजामाता महाविद्यालय चिखली रोड परीक्षा केंद्रात 192, सेंट जोसेफ इंग्लीश हायस्कूल, राजर्षी शाहू पॉलीटेक्नीक शाहू नगर सागवण येथे 384 परीक्षार्थी, भारत विद्यालय चिखली रोड येथील परीक्षा केंद्रात 384 परीक्षार्थी व प्रबोधन विद्यालय जिजामाता नगर परीक्षा केंद्रात 240 परीक्षार्थी परीक्षेस बसणार आहे.
     परीक्षार्थी उमेदवारांना परीक्षा कक्षात सकाळी 10.30 वाजता प्रवेश देण्यात येणार असून परीक्षा कक्षात प्रवेश प्रमाणपत्र व काळ्या शाईचे बॉल पॉईंट पेन आणण्याची परवानगी देण्यात आली आहे. याशिवाय कॅलक्युलेटर, भ्रमणध्वनी, वह्या, पुस्तके, पेजर, मायक्रोफोन, डिजीटल डायरी आदी आक्षेपार्ह वस्तू, साहित्य परीक्षा कक्षात आणण्यास व स्वत:जवळ बाळगण्यास सक्त मनाई आहे. याबाबत सर्व परीक्षार्थी उमेदवारांनी नोंद घ्यावी. तसेच संबंधीत परीक्षार्थींनी त्यांचेसोबत स्वत:चे आधार कार्ड, निवडणूक ओळखपत्र, पॅन कार्ड किंवा चालक परवाना यापैकी एकाची छायांकित प्रत सोबत आणणे आवश्यक आहे, असे केंद्र प्रमुख तथा आरडीसी ललीत वराडे यांनी कळविले आहे.
                                                                        ****
पाच गावांसाठी टॅंकर मंजूर
  • पिंपरखेड, हनवतखेड, उमनगांव, दरेगांव व असोला बु गावांचा समावेश
बुलडाणा, दि. 4- बुलडाणा तालुक्यातील पिंपरखेड, हनवतखेड, सिंदखेड राजा तालुक्यातील उमनगांव, दरेगांव व चिखली तालुक्यातील असोला बु. येथील पाणीटंचाईची तीव्रता लक्षात घेता या गावांसाठी पाणीपुरवठ्याकरिता टँकर मंजूर करण्यात आले आहे. पिंपरखेड गावाची लोकसंख्या 615 असून येथे एक टँकर मंजूर करण्यात आले आहे. तसेच हनवतखेड गावची लोकसंख्या 315 असून येथे एक टँकर मंजूर आहे.त्याचप्रमाणे सिंदखेड राजा तालुक्यातील उमनगांव व दरेगांव गावची लोकसंख्या अनुक्रमे 572, 2257 आहे. यागावांसाठी प्रत्येकी एक टँकर मंजूर करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे चिखली तालुक्यातील असोला बु गावच्या 2150 लोकसंख्येकरीता एक टँकर दररोज 49 हजार लीटर पाण्याचा पुरवठा करणार आहे.
   टँकरने केलेल्या खेपांची नोंद ग्रामपंचायतीला नोंद घेण्यात यावी. नोंदवहीची तपासणी नियमितपणे गटविकास अधिकारी यांनी करावी. निवीदाधारकाने टँकर नादुरूस्त झाल्यास त्वरित दुसरे टँकर उपलब्ध करून द्यावे, असे जिल्हाधिकारी यांनी कळविले आहे.
                                                            ***********
जिल्ह्यात 33 विंधन विहीरींना मंजूरात
  • चिखली तालुक्यात 11, शेगांव 5 व खामगांव तालुक्यातील 4 गावांचा समावेश
बुलडाणा दि‍.4 - जि‍ल्हा परषद  बुलडाणा यांच्यावतीने पाणी टंचाई कृती अराखडा सन 2017-2018 मध्ये समाविष्ट असलेल्या चिखली, शेगांव, मेहकर व खामगाव तालुक्यातील 22 गावांमध्ये एकूण 33 विंधन विहींरींना मंजुरात देण्यात आली आहे. पाणी टंचाई निवारणार्थ घेण्यात येणाऱ्या या विंधन विहीरींची कामे पूर्ण करण्याची जबाबदारी कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणी पुरवठा, जिल्हा परिषद यांच्यावर आहे.
   विंधन विहीरींना मंजूरात दिलेल्या गावांमध्ये चिखली तालुक्यातील 11 गावांचा समावेश आहे. काही गावांमध्ये 1, तर काही ठिकाणी 2 व 3 विहीरींना मंजूरात देण्यात आली आहे. एक विहीरीला मंजूरात दिलेल्या गावांमध्ये चिखली तालुक्यातील खंडाळा मकरध्वज, तेल्हारा, खोर, भोगावती, सवणा,  वैरागड, टाकरखेड हेलगा, शेलसूर यांचा समवेश आहे. तर दोन विहीरींना मंजूरात हरणी व धोडप या गावांचा समावेश आहे. तसेच तीन विहीरी अमडापूर गावामध्ये देण्यात आल्या आहेत.  
   खामगांव तालुक्यात एक विंधन विहीर दौंदेवाडा येथे मंजूर करण्यात आली असून, अंबिकापूर, शहापूर व टेंभूर्णा या गावांमध्ये दोन विंधन विहीरी देण्यात आल्या आहे. तर शेगांव तालुक्यात वरखेड बु, एकफळ व टाकळी विरो येथे एक विंधन विहीरी देण्यात आली आहे. तसेच खेर्डा येथे दोन विहीरींना मंजूरात देण्यात आली आहे.  मेहकर तालुक्यात चिंचोली बोरे व सोनाटी या गावांमध्ये दोन विंधन विहीर या देण्यात आल्या आहे, असे जिल्हाधिकारी यांनी कळविले आहे.
                                                ***********



No comments:

Post a Comment